घरातीलच व्यक्ती तुमची शत्रू बनली तर काय कराल? चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी करा; तुम्ही कधीच हरणार नाही!

0
37

आपला सर्वांत मोठा धोका घराबाहेरच आहे, असे आपल्याला अनेकदा वाटते. मग बाहेरचा शत्रू, आपल्याशी स्पर्धा करणारी व्यक्ती, मत्सर करणारा शेजारी किंवा कामाच्या ठिकाणी विरोध करणारी व्यक्ती यांच्यापासून आपण सावध राहतो. मात्र, चाणक्य नीतीनुसार, काही वेळा खरा धोका बाहेर नसतो, तर तो आपल्या अगदी जवळच असू शकतो.

घरातील व्यक्ती आपल्याविरोधात गेली, तर परिस्थिती अधिक कठीण होते. कारण- त्या व्यक्तीला आपल्या स्वभावाची, सवयींची, कमकुवत बाजूंची आणि वैयक्तिक गोष्टींची माहिती असते. बाहेरचा विरोधक समोरून येतो आणि त्यामुळे त्याच्यापासून सावध राहता येते. पण, जवळची व्यक्ती विरोधात गेली, तर तिच्यावर असलेला विश्वासच अडचणीचे कारण ठरू शकतो.

म्हणूनच अशा परिस्थितीत भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या विचारांमध्ये अशा प्रसंगी स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी संयम, गुप्तता आणि योग्य वेळेची निवड यांना विशेष महत्त्व दिले आहे.

घरातील विरोधक अधिक धोकादायक का ठरू शकतो?

घरातील व्यक्तीला तुमच्या अनेक वैयक्तिक गोष्टी माहीत असतात. तुमच्या भीती, अडचणी, कमकुवत बाजू आणि मनातील भावना यांची माहिती त्याला असू शकते. त्यामुळे हीच माहिती तुमच्याविरोधात वापरली जाण्याची शक्यता असते.

अधिक वाचा  गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा अन् यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा; वाहतूक कोंडीपासून सुटका

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. आपण आपल्या माणसांवर सहज विश्वास ठेवतो. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या विरोधाची सुरुवातीला कल्पनाही येत नाही.

अशा परिस्थितीचा मानसिक परिणामही मोठा होऊ शकतो. सततचा विरोध, टोमणे किंवा कमी लेखण्याची सवय यांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळा घरातील वैयक्तिक गोष्टी बाहेर सांगून तुमची प्रतिमाही खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

घरातील व्यक्ती विरोधात असल्याची चिन्हे कोणती?

एखादी व्यक्ती तुमच्या यशामुळे सतत अस्वस्थ होत असेल, तुमच्या अपयशात आनंद व्यक्त करीत असेल किंवा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ इतरांसमोर मांडत असेल, तर सावध राहणे गरजेचे आहे.

तुमच्यात आणि इतर कुटुंबीयांमध्ये वारंवार गैरसमज निर्माण करणे, तुमच्या खासगी गोष्टी बाहेर सांगणे, समोर गोड बोलणे, पण मागे तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी सांगणे हीदेखील काही चिन्हे मानली जातात.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

त्याशिवाय प्रत्येक वेळी तुमची इतरांशी तुलना करणे, तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवणे, संधी मिळेल तेव्हा तुम्हाला कमी लेखणे किंवा घरातील इतर सदस्यांना तुमच्याविरोधात उभे करण्याचा प्रयत्न करणे, याकडेही दुर्लक्ष करू नये.

आपलीच व्यक्ती विरोधक का बनते?

त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एखाद्याला तुमची प्रगती सहन होत नसल्याने मत्सर निर्माण होऊ शकतो. काही वेळा स्वतःचा स्वार्थ पूर्ण न झाल्याने व्यक्ती नाराज होऊन विरोध करू लागते.

काही लोकांना घरातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार चालवायची असते. त्यांच्या मताला विरोध झाला की, ते वैरभाव ठेवू शकतात. स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणारी व्यक्तीही दुसऱ्याला कमी लेखून समाधान मिळविण्याचा प्रयत्न करू शकते. पैसा, मालमत्ता किंवा वारसा हक्काच्या कारणांमुळेही जवळच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. काही व्यक्तींच्या स्वभावामुळे त्या दुसऱ्याला त्रास देण्यातच समाधान मानतात.

चाणक्यांनी सांगितलेली महत्त्वाची रणनीती

  • अशा वेळी सर्वात आधी मौन बाळगणे महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया समोरच्या व्यक्तीला अधिक संधी देऊ शकते.
  • तुमच्या खासगी गोष्टी प्रत्येकाशी शेअर करू नका. एखाद्यावर संशय आला तरी पुरावा नसताना थेट आरोप करणे टाळा. आधी परिस्थिती समजून घ्या आणि वस्तुस्थिती तपासा.
  • थेट भांडण करण्याऐवजी शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्या व्यक्तीमुळे वारंवार मानसिक त्रास होत असेल, तिच्यापासून आवश्यक तेवढे अंतर ठेवणे योग्य ठरू शकते.
  • तुमची ऊर्जा प्रत्येक वादात खर्च करू नका. तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित ठेवा. समोरची व्यक्ती तुम्हाला अस्वस्थ करून, तुमच्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला बळी पडू नका.
  • शेवटी, स्वतःच्या कमकुवत बाजू प्रत्येकासमोर उघड करू नका. परिस्थितीला रागाने नव्हे, तर संयमाने सामोरे जा. तुमची प्रगती, तुमचे यश आणि तुमची शांतता हेच कोणत्याही विरोधाला दिलेले सर्वांत प्रभावी उत्तर ठरू शकते.
अधिक वाचा  पुणे भाजप तीन खांबी धुसफूशीचा मोहोळांच्या समोर सोक्षमोक्ष? नगरसेवकांची महाबैठक मुरली’अण्णां’चे रिकनेक्ट होईल

(तळ टीप : चाणक्य नीतीतील विचार हे प्राचीन नीतीशास्त्राचा भाग आहेत. त्यांचा वापर आजच्या परिस्थितीनुसार विवेकाने करणे आवश्यक आहे.)