महाराष्ट्र राज्य हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निघृण हत्या खटल्यात पुणे येथील विशेष जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला गुरुवारी (ता.२५) दोषी धरले. मात्र, त्याला शिक्षा येत्या सोमवारी (ता. २९) सुनावली जाणार असून ती फाशी होईल, अशी शक्यता आहे. कारण या खटल्यातील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी याच शिक्षेची मागणी केली आहे. दरम्यान, खून खटल्याचा निकाल दोन महिन्यांत येण्याची राज्यातील ही दुर्मिळ घटना आहे.
महाराष्ट्र दिनी १ मे २०२६ रोजी या खळबळजनक घटनेत बळी गेलेली चिमुरडी ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजोळी आली होती. नराधम भीमराव कांबळे याने नवजात वासरू दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका गोठ्यात नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची दगड आणि इतर वस्तूने ठेचून निघृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली. नसरापूर आणि भोर परिसरात संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. आरोपीला जाहीर फाशी देण्याची मागणी त्यांनी केली होती. आरोपीने याअगोदर २०१५ मध्ये स्वतःच्या पुतणीवर आणि नंतर एका वृद्ध महिलेवरही अत्याचार केलेला आहे.
जलदगती न्यायालयात खऱ्या अर्थाने जलद चाललेला हा खटला ठरला. १ मे रोजी घडलेल्या या गुन्ह्यापासून ते २५ जून रोजी दोषसिद्धी होण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी एसआयटी स्थापन करून अवघ्या १५ दिवसांत ११०० पानांचे भक्कम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात १८ मे रोजी न्यायालयात दोषारोप निश्चित होऊन ‘इन-कॅमेरा’ सुनावणी सुरू झाली. ८२ साक्षीदारांची साक्ष, सीसीटीव्ही फुटेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीएनए व वैज्ञानिक पुरावे सादर करून सरकारी पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपीला दोषी धरले.
१४ वर्षानंतर येरवडा जेल मध्ये पुन्हा तयार करावा लागेल फाशीचा दोर
जर, न्यायालयाने भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले, तर पुणे जिल्ह्याच्या कायदेशीर इतिहासातील ती मोठी घटना असेल. पुणे जिल्ह्यात तब्बल १४ वर्षांनंतर (किंवा सामान्य गुन्हेगारांच्या संदर्भात ३१ वर्षांनंतर) एखादा सुळी जाईल म्हणजे त्याला फाशी होईल. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१२ रोजी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अजमल अमीर कसाब याला येरवडा जेल मध्ये फाशी झाली होती. तो विदेशी म्हणजे पाकिस्तानी होता तसेच त्याला देशद्रोही कृत्याबद्दल फाशी देण्यात आले होते. त्यापूर्वी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करणाऱ्या हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा या दोन दहशतवाद्यांना ९ ऑक्टोबर १९९२ रोजी येरवडा कारागृहात फासावर लटकावण्यात आले होते. २०१२ नंतर गेल्या १४ वर्षांत पुणे जिल्ह्यात कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही. सामान्य गुन्हेगारी (खुनाचा गुन्हा) प्रकरणाचा विचार केला, तर येरवडा जेलमध्ये सर्वात शेवटची फाशी २६ ऑगस्ट १९९५ रोजी अलिबागच्या सुधाकर जोशी (काही नोंदींनुसार अमृतलाल जोशी) याला देण्यात आली होती. त्याअगोदर पुण्यात १० लोकांचे खून करून संपूर्ण शहर हादरवून सोडणाऱ्या राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांतराम जगताप आणि मुनाव्वर शाह या चौकडीला एकाच दिवशी २५ ऑक्टोबर १९८३ रोजी येरवडा जेलमध्ये सुळावर चढविण्यात आले होते.
1 मे रोजी हादरला होता महाराष्ट्र
1 मे रोजी आजीकडे सुट्ट्यांमध्ये गेलेल्या साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घुणपणे हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेतलं. गुन्हा घडल्यानंतर 45 दिवसांत या खटल्याचा निकाल लागणार आहे. राज्याच्या न्यायालयाीन इतिहासातील जलदगतीने सुनावणी होणारा हा पहिला खटला आहे.
कठोर शिक्षेची मागणी
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केला. या घटनेनंतर अनेक निदर्शने झाली. पुण्यासह संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले. नागरिकांनी फाशीच्या शिक्षेप्रमाणे कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आणि वासरू दाखवण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. एका गुरांच्या गोठ्याजवळील शेडमध्ये नेऊन तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार (सोडोमी) केले. मुलीने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात कापड कोंबून, छातीवर वार करून तिचा गुदमरवून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला गेला.
या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मुलीचा मृतदेह थेट पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर आणून 4 तास रस्ता रोको आंदोलन केले. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. भोर-राजगड बंद: या घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी संपूर्ण बंद पाळला होता.
आरोपीची पार्श्वभूमीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीमराव कांबळे हा मूळचा वेगळ्या गावचा असून त्याने कुटुंबाशी संबंध तुटल्याने नसरापुरात मोलमजुरी सुरू केली होती.धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर 1998 आणि 2015 मध्येही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, आधीच्या प्रकरणांमध्ये पुरावे अभावी त्याची सुटका झाली होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष होता.










