मुख्यमंत्री फडणवीसांकडून सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत योगेश कदम यांना ‘क्लीन चीट’; म्हणाले…..तर असा आरोप योग्य होता

0
3

मुख्यमंत्री फडणवीसांकडून सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत योगेश कदम यांना ‘क्लीन चीट’; म्हणाले…..तर असा आरोप योग्य होतापुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडन येथे पसार झाल्यानंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सदर शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवान्यासाठी मंजुरी दिल्यामुळे विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच योगेश कदम यांची पाठराखण करतात, असाही आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

नाशिकच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य होता. पण परवाना दिलेला नाही.”

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

स्वतः योगेश कदम यांनीही या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. विरोधकांनी आरोप केल्यानंतर त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पडताळणीनंतर शस्त्र परवाना देण्यात आल्याचे स्पष्टीकरण मंत्री योगेश कदम यांनी दिले होते.

“शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे, म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे”, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, सुप्रिया सुळेंची मोर्चात एन्ट्री; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

अनिल परब यांनी केली राजीनाम्याची मागणी

खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याने मंत्री कदम यांनी राज्यात थैमान घातले आहे. त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि न दिल्यास हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी गुरुवारी (९ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केली.

त्यामुळे कदम वाटेल तसे वागत आहेत

योगेश कदम यांची अनेक बेकायदेशीर कृत्ये पुराव्यांसह विधिमंडळात मांडल्यानंतरही मुख्यमंत्री प्रत्येक वेळी त्यांची पाठराखण करीत आहेत. त्यामुळे काहीही केले तरी चालते, आम्हाला अभय आहे, असा संदेश जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कदम यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे कदम बिनधास्तपणे वाटेल तसे वागत असल्याचा आरोप परब यांनी केला होता.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च