Home Blog Page 9

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट १२ दोषी निर्दोष मुक्त; १२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू राज्य सरकारला दणका

0

मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने त्यांचा अपील मान्य केला. फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे.

१२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. तर ११ जणांचा आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली आहे. गेली १९ वर्ष यातील दोषी एकही दिवस तुरुंगाबाहेर आले नव्हते.

मुंबईत ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मीरारोड या रेल्वे स्थानकांदरम्यान स्फोट झाले होते. यात २०९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

जुनी कार विकतायची आहे? या आवश्यक कागदपत्रांची खात्री करा, मिळेल मनासारखा भाव

0

जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल, तर केवळ गाडी चांगल्या स्थितीत असणं पुरेसं नाही, तर तिच्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रं पूर्ण आणि उपलब्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य कागदपत्रं हाताशी असतील, तर कारचा व्यवहार केवळ सुरळीतच होत नाही, तर तुम्हाला तुमच्या कारचा मनासारखा दर मिळण्याचीही शक्यता अधिक असते.

चला, बघूया कार विकताना कोणती कागदपत्रं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे:
१. वाहनासंबंधीची कागदपत्रं

  • नोंदणी प्रमाणपत्र (RC): भारतात मोटार वाहन कायद्यानुसार (1988), कोणतंही वाहन विकताना नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे दस्तऐवज सिद्ध करतो की गाडी तुमच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि तुम्ही तिचे कायदेशीर मालक आहात.

टीप: जर RC हरवली असेल किंवा चोरीला गेली असेल, तर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर करून फॉर्म 26 भरून तुम्ही तिची डुप्लिकेट कॉपी मिळवू शकता.

  • प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC): हे दाखवतो की गाडीचे धुराचे प्रमाण सरकारच्या निकषांनुसार आहे. गाडी विकताना हा कागद अत्यावश्यक आहे आणि जवळच्या पेट्रोल पंपावरून मिळवता येतो.
  • गाडीचा विमा (Insurance): RTO गाडीची मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया केवळ विमा असतानाच स्वीकारतो. त्यामुळे चालू विमा पॉलिसी असणं आवश्यक आहे.
  • ऐच्छिक कागदपत्रं: व्हेइकल बिल, मॅन्युअल, सर्व्हिस रेकॉर्ड इ. जर तुमच्याकडे असतील, तर ते विकत घेणाऱ्याचा विश्वास अधिक दृढ करतात आणि व्यवहार सुलभ करतात.

२. ओळख पडताळणीसाठी कागदपत्रं

  • पॅन कार्ड: आर्थिक व्यवहारांमध्ये आणि मालकी बदलाच्या प्रक्रियेसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  • पत्त्याचा पुरावा: स्व-सत्यापित आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वीज बिल यांपैकी कोणताही दस्तऐवज पत्त्याच्या पडताळणीसाठी ग्राह्य धरला जातो.

३. आरटीओशी संबंधित कागदपत्रं

  • फॉर्म 28 (NOC): नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, जे दर्शवतो की वाहनाच्या हस्तांतरणास कोणताही आडथळा नाही.
  • फॉर्म 29: या फॉर्मद्वारे आरटीओला कळवायचं असतं की गाडी तिसऱ्या व्यक्तीला विकली गेली आहे. दोन प्रती आवश्यक असतात.
  • फॉर्म 30: फॉर्म 29 नंतर विक्रेत्याने हा फॉर्म भरून आरटीओला तातडीने मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगणं आवश्यक असतं.

सामना हरवण्यात आंद्रे रसेलने सोडली नाही कोणतीही कसर, पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला ३ विकेट्सनी हरवलं

0

वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतील दोन सामन्यांनंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष लागलं होतं. मात्र, पहिल्याच सामन्यात रसेलने आपल्या अपयशामुळे चाहत्यांची मोठी निराशा केली आणि वेस्ट इंडीजच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा आरोपही सहन करावा लागला.

जमैका येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. वेस्ट इंडीजने २० षटकांत १८९ धावा केल्या. टीमचे कर्णधार शे होप (५५) आणि रोस्टन चेस (६०) यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. मात्र, आंद्रे रसेल फक्त ८ धावांवर बाद झाला. ९ चेंडूंमध्ये केवळ ८ धावांची भर घालणाऱ्या रसेलची ही खेळी अत्यंत निराशाजनक ठरली.

रसेलकडून अपेक्षा होती की, फलंदाजीत अपयश आलं तरी तो गोलंदाजीत चमत्कार करेल. पण त्याने तिथेही अपेक्षांना तडा दिला. केवळ २ षटकांत त्याने ३७ धावा दिल्या आणि एकही बळी घेतला नाही. त्यामुळे तो संघाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या अपयशाचा पुरेपूर फायदा घेतला. कॅमेरून ग्रीनने ५१ आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवनने ५० धावांची खेळी करत सामन्यावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाने १९० धावांचं लक्ष्य ७ चेंडू राखून आणि ७ गडी राखून पूर्ण केलं.

या सामन्याद्वारे आंद्रे रसेलने निवृत्तीकडे वाटचाल करताना आपली छाप सोडण्याऐवजी अधिक निराशा निर्माण केली. अशा प्रकारचा निरोप कुणालाच नकोसा वाटावा, असाच रसेलचा खेळ ठरला. आता दुसऱ्या सामन्यात तो कसं प्रदर्शन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

“दिल दिया है जान भी देंगे…” – हिमेश रेशमिया दिल्ली कॉन्सर्टमध्ये भावुक; ऑपरेशन सिंदूरला म्युझिकल ट्रिब्यूट

0

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया याने आपल्या ‘कॅप मॅनिया टूर’ अंतर्गत दिल्लीत झालेल्या भव्य कॉन्सर्टमध्ये एक आगळीवेगळी परफॉर्मन्स सादर करत, ‘ऑपरेशन सिंदूर’ला संगीताच्या माध्यमातून सलाम ठोकला. इंदिरा गांधी एरिनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात हिमेश आपल्या हटके शैलीत गायन करताना भावूकही झाला.

गाण्यांच्या लाटांवर टाळ्यांचा गजर रंगत असतानाच हिमेश याने स्टेजवर उभं राहून भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केलं. “आपण आज एकमेकांना भेटू शकतो, यामागे आपल्या जवानांचं बलिदान आहे. त्यांना विसरू नका. जय हिंद. ऑपरेशन सिंदूर जिंदाबाद!” असं म्हणत त्याने दिलीप कुमार यांच्या १९८६ मधील सुपरहिट चित्रपट ‘कर्मा’ मधील गाजलेलं देशभक्तीपर गाणं “दिल दिया है, जान भी देंगे” सादर केलं. सगळं सभागृह त्या क्षणी देशभक्तीच्या भावना आणि टाळ्यांच्या आवाजाने भरून गेलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

कार्यक्रमात हिमेश आपल्या नेहमीच्या हसतमुख अंदाजात प्रेक्षकांशी संवाद साधत होता. त्याने आपल्या खास सिग्नेचर ‘नाकातून गायन’ शैलीवर थट्टाही केली आणि प्रेक्षकांनाही “तुम्हाला रेग्युलर गाणं हवंय की नाकातून?” असं विचारून हशा पिकवला. या गमतीशीर क्षणात त्याने आपली पत्नी सोनी हिला स्टेजवर बोलावून मिठी मारली. दोघांमधील प्रेमळ बॉन्डिंग पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

हिमेश रेशमिया केवळ गायकच नाही, तर ते एक ऑलराउंडर कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला असंख्य सुपरहिट गाणी दिली आहेत. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’, ‘तेरा सुरूर’ सारख्या गाण्यांमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्याने स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ‘बॅडअ‍ॅस रवी कुमार’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, जिथे त्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. सध्या तो इमरान हाश्मीच्या ‘गनमास्टर जी9’ या चित्रपटात काम करत आहे.

दिल्लीतील हा अनोखा संगीतसोहळा केवळ गाण्यांपुरता मर्यादित नव्हता, तर त्यात देशप्रेम, भावुकता, विनोद आणि एक कौटुंबिक उबेसुद्धा होती. हिमेश रेशमियाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, संगीत हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर ते भावना व्यक्त करण्याचा एक ताकदवान मंच आहे.

अमिताभ बच्चन आणि तीन अभिनेत्रींचे चर्चित संबंध: कधीच उघड झाले नाही रेखा, परवीन बाबी, जीनत अमान यांच्यासोबतचे अफेअर!

0

भारतीय सिनेमा विश्वातील “शहेनशाह” अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचं नाव केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. 1973 साली अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी विवाहबद्ध झालेले बिग बी, आजही “रेखा”बरोबरच्या अफेअरमुळे जनमानसात आठवले जातात. मात्र, फक्त रेखाच नाही तर आणखी दोन सुप्रसिद्ध अभिनेत्रींसोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं होतं—परवीन बाबी आणि जीनत अमान.

Amitabh Bachchan Secret Affair (1)

परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन
स्वतःच्या काळात बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेलेल्या परवीन बाबी यांचं नाव अनेक दिग्गजांबरोबर जोडलं गेलं. त्यात महेश भट्ट, डॅनी डेंजोंगपा यांचाही समावेश होता. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांचंही एक काळी अफेअर होतं, असं गुपचूपपणे बोललं जातं. ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘नमक हलाल’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. या मैत्रीच्या पलिकडचा संबंध दोघांनी कधीही स्वीकारला नाही, पण अफवा अनेक होत्या.

Amitabh Bachchan Secret Affair

जीनत अमान आणि अमिताभ बच्चन
अत्यंत ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनेत्री जीनत अमान यांचं नावही अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका टप्प्यावर जोडलं गेलं होतं. ‘डॉन’, ‘लावारिस’ या चित्रपटांतील त्यांची जोडी खूप गाजली. काही रिपोर्ट्सनुसार दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती, मात्र हे अफेअर फार काळ टिकलं नाही. जीनतचं नाव त्या काळात संजय खान आणि मजहर खान यांच्यासोबतही चर्चेत आलं होतं, त्यामुळे अमिताभसोबतचं कथित नातं जास्त वेळ टिकू शकलं नाही.

Amitabh Bachchan Secret Affair (2)

रेखा आणि अमिताभ – एक गूढ प्रेमकथा
रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी आजही एक गूढ रहस्य म्हणून ओळखली जाते. ‘दो अजनबी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या भेटीची सुरुवात झाली होती. त्यानंतर ‘सिलसिला’ चित्रपटातही या जोडीने वास्तवातील भावनांना पडद्यावर उतरवलं. सर्वात मोठी चर्चा झाली ती नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात, जेव्हा रेखा एक नववधूसारखी साडी, सिंदूर आणि मंगळसूत्र घालून पोहोचली. त्यावेळी ती आणि अमिताभ यांचं नातं सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं. रेखाने नंतर म्हटलं की, तो लूक ती एका शूटिंगसाठी तयार झाली होती, मात्र सत्य काय हे कधीच समोर आलं नाही.

एका महानायकाचे गुपित प्रेमप्रकरण
अमिताभ बच्चन हे जरी आजही जया बच्चन यांच्यासोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत असले तरी त्यांच्या प्रेमाच्या आणि अफेअरच्या गोष्टी सिनेसृष्टीत आजही गुलदस्त्यातून बाहेर येतच असतात. या सर्व अफवांवर त्यांनी कधीही अधिकृत भाष्य केलं नाही, मात्र त्यांच्या प्रत्येक जोडीनं प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं, हे मात्र नक्की!

iPhone 17 सीरीजमध्ये मोठे बदल; नवे डिस्प्ले, नव्या डिझाइनसह ‘Air’ मॉडेल ठरणार खास

0

टेकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! Apple लवकरच आपली नवी iPhone 17 सीरीज बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. अद्याप लॉन्चची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी विविध लीक्स आणि रिपोर्ट्समधून या नवीन iPhone सिरीजविषयी अनेक मोठ्या अपडेट्स समोर आले आहेत. यंदा iPhone 17 मध्ये डिझाइनपासून ते डिस्प्ले आणि इंटरफेसपर्यंत अनेक ठळक बदल पाहायला मिळणार आहेत.

बेजेल्स आणखी पातळ – अधिक आकर्षक लूक
iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये Apple ने गेल्यावर्षीपर्यंतचे सर्वात पातळ बेजेल्स दिले होते. मात्र यंदा ही पातळ किनार iPhone 17 आणि नवीन iPhone 17 Air या दोन्ही मॉडेल्समध्ये देखील दिसणार आहे. यामुळे स्क्रीन अधिक आकर्षक आणि immersive वाटणार आहे.

Plus मॉडेल बंद – ‘Air’ मॉडेलची एंट्री
Apple यंदा Plus वेरिएंट रद्द करून त्याच्या जागी iPhone 17 Air हे नवीन मॉडेल घेऊन येणार आहे. हे मॉडेल अधिक हलके, स्लीम आणि कॉम्पॅक्ट असेल. जे वापरकर्त्यांना प्रीमियम फील देणाऱ्या पण सहज हाताळता येणाऱ्या iPhone चा पर्याय शोधत आहेत, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे मॉडेल डिझाइन करण्यात आलं आहे.

Dynamic Island UI मध्ये सुधारणा
नवीन iPhone 17 सीरीज iOS 26 वर आधारित असेल. या नव्या OS मध्ये Dynamic Island इंटरफेस अधिक फंक्शनल आणि इनोव्हेटिव्ह होणार आहे. यामधील कटआउट आणखी लहान होण्याची शक्यता असून, यामुळे स्क्रीन युटिलायझेशन अधिक चांगले होईल.

डिस्प्ले साईझ आणि रिफ्रेश रेटमध्ये बदल
iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्ये यंदा 6.1 ऐवजी 6.3 इंच डिस्प्ले असू शकतो. याशिवाय, रिफ्रेश रेट देखील 60Hz वरून 90Hz पर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. Pro आणि Pro Max मॉडेल्समध्ये अँटी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असलेले डिस्प्ले असू शकतात, ज्यामुळे प्रकाश पडल्यावरही स्क्रीनवर स्पष्टपणे बघता येईल.

कधी लॉन्च होणार iPhone 17 सीरीज?
Apple दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली नवीन iPhone सिरीज सप्टेंबर 2025 मध्ये सादर करू शकतो. अद्याप कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी या महिन्यातच लॉन्च होण्याची शक्यता आहे.

IND vs ENG: दुखापतींच्या धक्क्यांमुळे टीम इंडिया अडचणीत; मँचेस्टर कसोटीत नवे चेहरे दिसण्याची शक्यता

0

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला आता दुखापतींचा डोंगर सामना सुरु होण्यापूर्वीच पार करावा लागणार आहे. मँचेस्टर कसोटीत चार महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे संघात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याचे संकेत आहेत.

ऋषभ पंत, नीतीश रेड्डी, अर्शदीप सिंह आणि आकाश दीप हे चार खेळाडू सध्या दुखापतीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. नीतीश रेड्डी आधीच संपूर्ण मालिकेबाहेर गेला आहे. अर्शदीप आणि आकाश दीप हे मँचेस्टर कसोटीत खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ऋषभ पंतबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र तो फिट झाला, तर त्याच्या पुनरागमनाची शक्यता आहे. अन्यथा ध्रुव जुरेलला विकेटकीपर म्हणून संधी मिळू शकते.

संघाच्या फलंदाजी विभागात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे सलामीला येणार असून, करुण नायर आणि कर्णधार शुभमन गिल हे मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरतील. ऋषभ पंतची अनुपस्थिती असेल, तर मिडल ऑर्डरमध्ये ध्रुव जुरेलची उपस्थिती दिसू शकते.

ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांची निवड निश्चित वाटते. नीतीश रेड्डीच्या जागी अंशुल कंबोज या नवख्या खेळाडूला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते. अंशुलने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून, २४ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८६ धावा आणि ७९ विकेट्स घेतल्या आहेत.

गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे मुख्य भिस्त असतील. आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुखापतींच्या झटक्यांमुळे टीम इंडियासमोर चौथ्या कसोटीत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. मात्र नव्या चेहऱ्यांच्या संधींच्या पार्श्वभूमीवर ही कसोटी टीम इंडियासाठी पुनरागमनाचं व्यासपीठ ठरू शकते. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा मालिकेत पराभव निश्चित मानावा लागेल.

जामीनदार होण्यापूर्वी सावधगिरी बाळगा! अन्यथा होऊ शकतो आर्थिक फटका

0

नातेसंबंध, मैत्री किंवा सहवेदना या नात्यांमध्ये अनेकदा आपण कोणाच्या तरी मदतीसाठी पुढे येतो. अशीच एक मदत म्हणजे बँक लोनसाठी जामीनदार होणे. परंतु, कोणत्याही नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी बिनधास्त जामीनदार होणे हे धोकादायक ठरू शकते. कारण जामीनदार होण्याचा अर्थ आहे, त्या कर्जाची जबाबदारी तुमच्यावर येणे.

जामीनदार म्हणून तुमचं नाव बँकेच्या दस्तावेजांमध्ये असलं, तर उधारदार व्यक्ती लोन न फेडल्यास बँक तुमच्याकडून पैसे वसूल करू शकते. त्यामुळे, जामीनदार बनण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची क्षमता याचा नीट विचार करणं अत्यावश्यक आहे.

डिफॉल्टर झाल्यास जामीनदारला बसतो फटका
जर कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाच्या हप्त्यांमध्ये चूक करते किंवा थकबाकीदार ठरते, तर बँक थेट जामीनदारकडे नोटीस पाठवते. त्यामुळे जामीनदारचा क्रेडिट स्कोअरही खराब होतो, आणि भविष्यात स्वतःसाठी कर्ज घेणे कठीण होते. इतकंच नव्हे, तर व्याजाचा दरही अधिक लागू शकतो.

बँक कर्ज देताना जामीनदारची क्षमता गृहीत धरून त्याच्या क्रेडिट मर्यादेत त्या कर्जाचा समावेश करते. याचा अर्थ, जामीनदार म्हणून आपण इतर कोणतंही नवीन कर्ज घेताना अडचणीला सामोरे जाऊ शकतो.

दिवाळखोरीतही अडकतो जामीनदार
कर्ज घेणारी व्यक्ती जर दिवाळखोरी घोषित झाली, तर ती कर्जफेडीपासून मुक्त होऊ शकते. पण जामीनदारवर संपूर्ण रकमेची जबाबदारी राहते. आणि ही जबाबदारी फक्त कर्ज संपेपर्यंतच नाही, तर बँकेच्या लेखी परवानगीशिवाय जामीनदार पदावरून मुक्तता होत नाही.

आहेत काही फायदेही
तरीही, जामीनदार होण्याचे काही सकारात्मक पैलू आहेत. उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीसाठी जामीनदार झाल्यास, जर ती वेळेवर कर्ज फेडते, तर तुमचाही क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो. आणि तुमच्या मदतीमुळे तिच्या जीवनातील एखादी गरज पूर्ण होऊ शकते. परंतु यासाठी सावधपणे आणि योग्य माहिती घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्यावी?

  • जामीनदार होण्याआधी संबंधित व्यक्तीची नोकरी, उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची तयारी जाणून घ्या
  • कर्जाची रक्कम, कालावधी, हप्ते यांची सविस्तर माहिती घ्या
  • स्वतःची आर्थिक स्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासा
  • कर्जाची कागदपत्रे नीट वाचा आणि शक्य असल्यास वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या
  • कर्जाची परतफेड नियमित होत आहे का, हे वेळोवेळी तपासा

जामीनदार होणे हा एक मोठा निर्णय असतो. तो केवळ नात्याच्या आधारावर घेणे शहाणपणाचे नाही. भावनिकदृष्ट्या मदतीचा हात पुढे करणं चांगलं असलं, तरी आपल्या आर्थिक सुरक्षेचा बळी जाणार नाही याची खात्री करून घ्या. अन्यथा, एका चुकीच्या निर्णयामुळे भविष्यातील तुमचे स्वप्न देखील धूसर होऊ शकते.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादळाची शक्यता, भाजपकडून मोठा दावा

0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा खळबळ उडवणारा विकास घडला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले की विरोधी पक्षातील काही खासदार, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना (UBT) गटातील – सध्या भाजपच्या संपर्कात असून लवकरच भाजपची लोकसभेतील ताकद वाढणार आहे.

भाजपच्या या हालचालीमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणं तयार होण्याची चिन्हं आहेत. सध्या महाराष्ट्रात ४८ लोकसभा जागा असून त्यापैकी भाजप, काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट), आणि शिंदे गट यांच्या मिळकतीनुसार राजकीय वजन ठरते. परंतु गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानुसार काही खासदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता असून त्यामुळे सत्तासमीकरणात मोठा बदल होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘ब्रँड’वर टीका करत म्हटलं की, ठाकरे ब्रँडचं महत्त्व २०१९ नंतर संपलं आहे. काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून फारकत घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेची खरी ओळख आणि मूल्यं उद्धव ठाकरेंनी सोडली असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव आता उरलेला नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही गिरीश महाजन यांनी निशाणा साधला. पटोले यांनी ठाणे, नाशिक व मंत्रालयांतील अधिकाऱ्यांशी संबंधित हनीट्रॅप प्रकरणावर गंभीर आरोप केले होते. मात्र महाजन यांनी त्यांच्या आरोपांना थेट आव्हान दिलं असून म्हटलं की, जर खरोखर कोणतेही पुरावे असतील, तर ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर करावेत. अन्यथा केवळ आरोप करून वातावरण बिघडवणे चुकीचे आहे.

या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची चर्चा ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडेच झालेली भेट. अनेकांनी या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले असले, तरी गिरीश महाजन यांनी ती भेट फक्त विधानसभा सत्रादरम्यान झालेली एक सौजन्य भेट होती, असे स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

राज्याच्या राजकारणात सध्या शांतता असली, तरी पडद्यामागे खोल हालचाली सुरू असल्याचे संकेत गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे मिळत आहेत. भाजपकडून होणारे असे दावे आणि विरोधकांच्या गोटात पडणारी पडझड ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकते. आगामी काही दिवसांत कोणते खासदार कोणत्या दिशेने वळतात, यावरच राज्यातील राजकीय समिकरणांचे भवितव्य ठरणार आहे.

किमया आश्रमात गुरुपौर्णिमा 2025 उत्सव अद्वितीय आध्यात्मिक वातावरणात पार; १०००हून अधिक साधकांचा सहभाग

0

१० जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी, साधकांनी गुरुपाद्य पूजन करत आपली श्रद्धा व्यक्त केली आणि १००० हून अधिक साधकांनी सहभाग घेतला. त्यानंतर स्वामी कृष्ण चैतन्य यांच्याकडून अनेकांना गुरुदीक्षा प्रदान करण्यात आली. जागृतगुरूंचे मार्गदर्शन आणि दीक्षा मिळाल्याने साधकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकले भक्तीभावाने ते क्षण भावनिक झाले.

स्वामीजी हे ISRO-DRDO चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच किमया गुरुगादीचे १३३७ वे पिठाधीश आहेत. या उत्सवाची सुरुवात ३ जुलैपासून ‘गुरुपर्व’ या विशेष काळाने झाली होती, ज्यामध्ये अनेक प्राचीन विधी व शक्तिप्रद पूजांचा समावेश होता. गुरु सदाशिव महापूजा, नाग बंधन मुक्ति पूजा, हनुमान महापूजन, बगलामुखी पूजन, आणि अनेक जटिल यंत्र पूजा या काळात साधकांच्या साक्षीने पार पडल्या.

तसेच, ७ ते ९ जुलै दरम्यान, तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत ५८ साधकांना संन्यास दीक्षा प्रदान करण्यात आली जो गुरुपर्वातील एक विशेष आध्यात्मिक टप्पा ठरला. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर सात्विक महाप्रसाद, तसेच साधकांनी अनंतलोकातील नागराज वासुकी यांच्या सान्निध्यात असलेल्या शांत ध्यानाची जागा अनुभवली आणि भक्तिस्थळातील भक्तिमय आनंदाचा आस्वाद घेतला. अंतःशांतीचा अनुभव घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने, पुण्याजवळील चांदे (मुळशी) येथील निसर्गसंपन्न किमया आश्रमाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी.