Home Blog Page 8

हडपसर विधानसभा मतमोजणीस पुर्नगणनेचा आदेश; प्रशांत जगताप यांच्या याचिकेनंतर निर्णय

0

हडपसर विधानसभा मतदारसंघातील २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतमोजणीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार प्रशांत जगताप यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर, पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पुर्नगणनेचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, हडपसर मतदारसंघातील २७ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्समधील मते २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान भोसरी येथे पुन्हा मोजली जाणार आहेत. ही माहिती सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.

प्रशांत जगताप यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार चेतन तुपे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांचा केवळ ७,१२२ मतांनी पराभव झाला. तुपे यांना १,३४,८१० मते, तर जगताप यांना १,२७,६८८ मते मिळाली होती. पक्षफुटीनंतर दोन्ही गटांमध्ये थेट लढत झाली होती.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणीत गडबडी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. हडपसर हा त्यापैकी एक प्रमुख मतदारसंघ होता.

यापूर्वी, निवडणूक आयोगाने हडपसरमधील २७ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची फेरतपासणी करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्या मशिन्सचा वापर प्रत्यक्ष मतमोजणीऐवजी मॉक पोलसाठी करावा, असे निर्देश देण्यात आले होते. याला जगताप यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली आणि अखेर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुर्नगणनेचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप म्हणाले, “या पुनरगणनेत हडपसरमधील मतमोजणीमध्ये झालेल्या घोटाळ्याचे पडसाद नक्की उमटतील, अशी मला खात्री आहे.”

नवीन पिढीला खरा बुद्ध समजावून सांगण्यास आपण कमी पडतोय – प्रा. प्रतीक पवार

0

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) “फोटोफ्रेममध्ये शांत, ध्यानमग्न अवस्थेत असलेले तथागत गौतम बुद्ध आपण जसेच्या तसे स्वीकारलेत परंतु खरे बुद्ध व त्यांचे विचार आपल्यापासून व आपल्या नवीन पिढीपासूच कोसो दूर राहिले आहेत किंबहुना आपण ते समजून घेतलेच नाही त्यामुळे येणाऱ्या पिढ्यान बुद्ध समजावून सांगण्यात आपण कमी पडतोय, चित्रकाराने आपल्या कल्पनाशक्तीने बुद्धाचे चित्र रेखाटले त्यामागे त्याचा दृष्टिकोन स्थल, काल, वेळ परत्वे वेगळा असू शकतो पण आपण कट्टरपंथी झाल्याने आपल्या मनात क्लेश, तिरस्कार निर्माण होतो व त्याचेच रूपांतरण पूढे संघर्षात होते आपण संधीमार्ग स्वीकारत नाही तडजोड करत नाही त्यामुळे बुद्ध विचारधारेपासून आपण दूर लोटले जात आहोत, बुद्ध हे विज्ञानवादी असून ते मोक्षदायी नसून मार्गदता आहेत त्यांनी आपल्या विचारधारेतून अनेकांना आदर्श माणूस घडवलं आहे, आपण ही त्याच विचारधारेचे पाईक होऊन तडजोड करायला शिकले पाहिजे, मुलांना उचशिक्षण देऊन त्यांना खऱ्या बुद्धांचा विचार त्यांना समजावून पुढील वाटचाल केली पाहिजे आता चळवळीची दिशा कालपरत्वे बदलली पाहिजे, आपली स्वप्ने ही मर्यादित न ठेवता मोठी स्वप्ने उराशी बाळगून आपण क्षेत्रात अग्रेसर झालं पाहिजे” असे प्रतिपादन प्रा. प्रतीक पवार वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रमुख व्याख्याते या नात्याने “आंबेडकरी चळवळीतील तरुणांची दिशा आणि धम्म” या विषयावर बोलत असता केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प सरसेनानी सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले प्रास्ताविक सादर करताना त्यांनी स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले सोबतच समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रामनेर शिबिरात ज्यांना सहभागी व्हायच आहे अश्यांनी नावनोंदणी करावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात सभापती आनंदराज आंबेडकर यांनी “ज्यावेळी मी बार्टी येथील पीएचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न हाती घेऊन सोडवला त्यावेळी विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र आदी विभागातील ६०० विद्यार्थी होते परंतु कोकणातील एकही उमेदवार मला आढळला नाही त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कोकण पिछाडीवर आहे की काय असा विचार मनाला स्पर्शून जातो, आपण फक्त पीटी केसचा विचार करतो माझ्यानंतर माझा मुलगा माझ्या जागेवर कामाला लागेल इतकाच संकुचित विचार करीत आपण मुलाच्या भविष्याचा विचार न करता त्याचे भविष्य सरळसरळ अंधारात लोटत आहोत परंतु आता व्यापक विचार करीत आपल्या मुलाला उच्चशिक्षित करून उच्चपदावर पाठवल पाहिजे ही मानसिकता आपल्यात निर्माण झाली पाहिजे, विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, खानदेश, माणदेश आदी विभागातील विद्यार्थी जशी प्रगती करत आहेत तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोकणातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे सर्व क्षेत्रात अग्रसेर होण्याकडे वाटचाल केली पाहिजे, विकसनशील अश्या सामंजस्य व मध्यम मार्गाचा अवलंब करून प्रगती केली पाहिजे” असे मार्गदर्शन केले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमनी तांबे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, प्रकाश करूळेकर, यशवंत कदम, सिद्धार्थ कांबळे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, चिंतामणी जाधव, महेंद्र पवार, सुशीलाताई जाधव, सिद्धार्थ कांबळे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटच्या सत्रात दिवंगत बौद्धाचार्यांना साश्रु नयनांने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

मानवी मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्ध होय – बौद्धाचार्य मनोज पवार

0

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांची कल्याणकारी शिकवण गावागावात सर्वदूर पसरू लागली त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी प्रकांडपंडित, विद्वान, ब्राह्मण मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असत अश्याप्रकारे तथागत धम्माचा प्रचार व प्रसार करत पुढे पुढे जात होते, काही दिवसांनी प्रसेनजीत राजाच्या राज्यात पोहोचले त्यावेळी अनेक लोक त्यांना येऊन भेटू लागले व एकच खंत व्यक्त करू लागले की ‘भगवंत येथे अनेक अरहंत येऊन प्रवचन देऊन जातात परंतु आम्ही सांगतो तेच अंतिम सत्य असून तेच तुम्ही माना असे सांगतात तेव्हा भगवंत आम्ही यातून काय समजायचे ?’ तेव्हा त्यांचे शंकानिरसन करताना भगवंत म्हणतात की ‘एखादी गोष्ट ऐकली आहे म्हणून, परंपरेने मानली जात आहे म्हणून, आमच्या धर्मास अनुकूल आहे म्हणून, तर्कसंगत किंवा न्यायसंगत आहेत म्हणून, आमच्या मनाच्या अंतःकरणातील आहे म्हणून, सांगणारा व्यक्ती महत्वाचा, जेष्ठ किंवा पूजनीय आहे म्हणून स्वीकारू नका तर तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा कोणत्या गोष्टी योग्य आहेत निर्दोष आहेत व त्यानुसार चालल्याने आपले हित होईल, आपले कल्याण होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल त्याचा स्वीकार करा, सत्य अनुभवाने जाणले गेले आणि बघितले तर ते कुशल आहे यावर न थांबता त्यानुसार आचरण करा तेव्हा तुमचे कल्याण होईल’ म्हणून मानवी मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्ध होय” असे प्रतिपादन बौद्धाचार्य मनोज पवार यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचे द्वितीय पुष्प गुंफत असताना “कलामसुत्त अर्थात मानव मुक्तीचा जाहीरनामा” या विषयावर बोलत असताना केले.

बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली उपकार्याध्यक्ष अशोक कदम (पाटपन्हाळे, कदमवाडी) शाखा क्र. ११ या शाखेस आणि कदम परिवारास प्रथमच पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते ऑनलाइन Google Meet द्वारे सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर केले.

सदर कार्यक्रमास गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच अशोक कदम व कदम परिवार, पाटपन्हाळे शाखा क्र. ११, आदर्श बौद्धाचार्य व्याख्याते मनोज पवार गुरुजी, शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, सर्व उपासक, उपासिका व सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्ष दीपक मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

फोन चार्ज करण्यासाठी काकांचा जीवघेणा जुगाड; उघड्यावरून चोरली थेट वीज!

0

जुगाड म्हणजे आपत्ती काळात उपयोगी पडणारा मार्ग, पण काही वेळा हे जुगाड जीवावर बेतू शकतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक इसम थेट विद्युत वाहक ताऱ्यांवरून आपला मोबाईल चार्ज करताना दिसतो आहे! या थरारक प्रकाराने नेटकऱ्यांना हादरवून टाकलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, काकांनी एक लांब दांडा घेतला आहे, त्यावर चार्जर अडकवलेला आहे आणि थेट चालू वीज वाहक तारांना तो जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्याच वेळात चार्जर त्या तारेला जोडला जातो आणि मोबाईल चार्ज होतो. पण हा जुगाड जितका अचंबित करणारा आहे, तितकाच जीवघेणाही आहे.

जरा सी चूक झाली असती, तर थेट वीजेचा धक्का बसून प्राण गमवण्याचीही शक्यता होती. व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त आणि आश्चर्यचकित आहेत. एकाने कमेंट केली, “काका चार्जर नव्हे, स्वतःचं बायोपास करून घेणार होते!” तर दुसऱ्याने लिहिलं, “हा स्टंट आहे की आत्महत्या?”

 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर krishna_das___123 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून काही लाख लोकांनी तो पाहिला आहे. हसत-हसत जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे, विद्युत विभाग आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर मानली जात आहे.

अशा जीवघेण्या जुगाडांपासून दूर राहावं, असं आवाहन वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. मोबाईल चार्ज करायला जीवन धोक्यात घालणं, ही शहाणपणाची गोष्ट नाही. तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी असे प्रकार टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

PFचा पैसा काढताना ही चूक टाळा, नाहीतर पेन्शनवर पाणी! EPFOचं महत्त्वाचं आवाहन

0

नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी EPFO कडून एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच PFमधील रक्कम ही केवळ आपत्कालीन खर्चासाठीच नव्हे, तर निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी ठेवलेली असते. मात्र बऱ्याच वेळा नोकरी बदलताना किंवा काही गरजेपोटी अनेक कर्मचारी आपला पूर्ण PF रक्कम काढून टाकतात आणि यामध्ये EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेतील रक्कमही निघून जाते. यामुळे पेन्शन मिळण्याचा हक्कच संपतो.

EPFOच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षांहून अधिक काळ आपले PF योगदान सुरू ठेवले असेल आणि EPSमधील रक्कम काढली नसेल, तर तो 50 वर्षांनंतर पेन्शनसाठी पात्र ठरतो. मात्र EPSमधील रक्कम एकदा काढली, की भविष्यात पेन्शन मिळवण्याची संधीही हातून निघून जाते. त्यामुळे EPFOने कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे की, PFमधून रक्कम काढताना EPSच्या रकमेची विल्हेवाट विचारपूर्वक लावा.

यासोबतच EPFOने 1 जानेवारी 2025 पासून पेन्शनधारकांसाठी एक नव्या सुविधेची सुरुवात केली आहे. याअंतर्गत पेन्शनधारक आता कोणत्याही बँकेतून आपली पेन्शन रक्कम प्राप्त करू शकतात. यापूर्वी ही सुविधा निवडक बँकांपुरती मर्यादित होती. पण आता डिजिटल पडताळणीच्या आधारे, गावात, शहरात किंवा देशाच्या कोणत्याही भागातून पेन्शन मिळवणं शक्य झालं आहे.

जगभरात महागाई आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात, निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे PFमधील EPS रक्कम म्हणजे भविष्यातील आधारस्तंभ आहे, हे लक्षात घेत EPFOने कर्मचाऱ्यांना सचोटीने आणि दूरदृष्टीने निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. एक चुकीचा निर्णय आयुष्यभराच्या पेन्शनवर पाणी फेरू शकतो.

AI क्षेत्रात ‘अक्षय कुमार’सारखा श्रीमंत होण्याची संधी! 2550 कोटी रुपयांचं जबरदस्त पॅकेज देतायेत कंपन्या!

0

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सध्या मोठी खळबळ माजली आहे. AI तंत्रज्ञानात पारंगत असणाऱ्यांना आज कंपन्या अक्षरशः सोन्याहून महाग मानत आहेत. इतकंच नाही, तर या क्षेत्रातील तज्ञांना मिळणारं पगाराचं आकडं थेट बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या संपत्तीकडे झुकतंय. जगभरातील काही AI तज्ज्ञांना तब्बल 2550 कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेजेस देऊन कंपन्या त्यांना आपल्या टीममध्ये सामील करत आहेत.

अहवालांनुसार, अभिनेता अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये आहे. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, AI एक्सपर्ट बनणं म्हणजे अक्षय कुमारसारखा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे!

Windsurf CEOचा Googleमध्ये प्रवेश, सोबत AI टीमही
AI क्षेत्रातली ही स्पर्धा किती टोकाची झाली आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजे Windsurf नावाच्या कंपनीतील घडामोडी. कंपनीतील कर्मचारी मोठ्या डीलसाठी वाट पाहत होते. पण अचानक बातमी आली की, कंपनीचे CEO राजीनामा देऊन Googleमध्ये प्रवेश करत आहेत, आणि त्यांच्यासोबत अनेक AI रिसर्चर आणि इंजिनियरही Googleमध्ये सामील होत आहेत.

या घडामोडीनंतर तीन दिवसांत Windsurfला दुसरी AI कंपनी विकत घेणार असल्याचंही जाहीर झालं. यावरून स्पष्ट होतं की, आज AI रिसर्चर्सची बाजारात जी मागणी आहे, ती एखाद्या स्टार सेलिब्रिटीप्रमाणे आहे.

Metaच्या ‘AI ड्रीम टीम’साठी प्रचंड स्पर्धा
या सगळ्या स्पर्धेच्या केंद्रस्थानी आहे Meta. मार्क झुकरबर्ग AIच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या कंपन्यांतील टॉप AI रिसर्चर्सना आपल्या “ड्रीम टीम” मध्ये घेण्यासाठी मनासारखं पगार आणि सवलती देत आहेत.

त्याचा थेट परिणाम म्हणजे, इतर कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ब्रेन ड्रेन’चा धोका सतावतोय. त्यामुळे प्रत्येक कंपनी आता आपल्या AI टॅलेंटला टिकवण्यासाठी आणि नवीन प्रतिभा खेचण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करत आहे, मग त्यात पगारात भरमसाठ वाढ असो किंवा स्टॉक ऑप्शन्स, बोनस आणि वेगळी प्रगती योजना असो.

गिरीश महाजनांच्या त्या फोटोची चौकशी करा, संजय राऊतांचा हनी ट्रॅपप्रकरणी ट्विट बॉम्ब…..

0

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण ७० पेक्षा जास्त जण या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी सध्या चौकशी सुरु असून विविध खुलासे होताना दिसत आहे.आता या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत. आता याच प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचा एक फोटो ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथील मूळ रहिवासी असलेला ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे, त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी देणे आणि मुलींना डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांवरून मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात पॉक्सो, बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी लोढाला अटक केली आहे.

कथित समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा मुंबईतील चकाला परिसरात ‘चकाला हाऊस’ नावाचा बंगला आहे. येथेच त्याने एका १६ वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीसह अत्याचार केल्याचा, तिचे अश्लील फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आणि तिला घरात डांबून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ३ जुलै रोजी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि ५ जुलै रोजी लोढाला अटक करण्यात आली. यानंतर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पॉक्सो, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यातच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी हा दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला. आता या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी ट्वीट बॉम्ब टाकला आहे.

संजय राऊत ट्वीट

संजय राऊत यांनी नुकतंच ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना पेढा भरवताना दिसत आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले,’ असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण तापले आहे.

मुंबई साखळी स्फोटातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता, पुढे पर्याय? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रदीप घरत काय म्हणाले

0

अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि 189 निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या 2006 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.या प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने दिला. तपास सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

2006 साली चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत पाच ठिकाण स्फोट झाले. त्यामध्ये 189 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 800 हून अधिक नागरिक जखमी झाले. याच बॉम्बस्फोटाच्या खटलाप्रकरणातील न्यायालयाच्या या निकालामुळे मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निकालाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यावेळेस आरोपींची निर्दोष मुक्तता होते, त्यावेळेस सर्व कागदपत्र, पुराव्यांची पडताळणी होते. आणि त्या पडताळणीमधून जो पुरावा समोर येईल तो विश्वास वाढवणारा किंवा आरोपींचा दोष दाखवणारा असला पाहिजे, हे न्यायालय लक्षात घेतं. त्यामुळे न्यायालय ज्यावेळेस आरोपीची निर्दोष मुक्तता करत असेल तर पोलिसांनी जो पुरावा कोर्टासमोर सादर केला किंवा ज्याची मांडणी करण्यात आली, तो पुरावा आरोपींना दोषी धरण्याइतपत निश्चितच सबळ नव्हता असं आपल्याला म्हणावं लागेल, असं प्रदीप घरत यांनी सांगितलं.

अत्यंत संवेदनशील प्रकरणात जर निर्णय विरुद्ध गेला असेल तर संबंधित यंत्रणा (पोलिस यंत्रणा व राज्यसरकार) कमी पडल्या असंच आपल्याला म्हणावं लागेल. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊ त्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे होता. आणि जो काही पुरावा मिळाला तो सबळरित्या कोर्टासमोर सादर करायला हवा होता. पण तसं झालेलं दिसतं नाही.

यापुढे सर्वोच्च न्यायलयात उच्च न्यायलयाच्या निर्णयाला आव्हान देणं हाच पर्याय आहे, असंही घरत यांनी नमूद केलं.

पोलिस यंत्रणा कुठे कमी पडली ?

याप्रकरणात सत्र न्यायालयाने 12 आरोपींना दोषी ठरवलं होतं, 5 जणांना मृत्यूदंड तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र उच्च न्यायालयामध्ये याच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. सत्र न्यायालय ते उच्च न्यायालय यादरम्यान पोलिस यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली, असा सवाल घरत यांना विचारण्यात आला.

सत्र न्यायलयाने जो निवाडा दिला, त्याची संपूर्ण छाननी आणि पडताळणी उच्च न्यायलयाने केली असेल. आणि त्यामुळे उच्च न्यायलयाला वाटलं की आरोपींना शिक्षा होण्याच्या लेव्हलचा तो पुरावा नाही. ज्यावेळेस उच्च न्यायालयाच्या ऑर्डर्सची प्रत हाथी येईल त्यावेळेसच, आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कितपत आव्हान देता येईल हे समजू शकेल.

पुण्यात चांदणी चौक हायवेवर भीषण अपघात; अग्निशमन दलाकडून रिक्षाचालकाची थरारक सुटका

0

पुण्यात बावधन कडून वारजेकडे जाणाऱ्या हायवेवर वेद विहार समोर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. MH 12 QR 4621 या क्रमांकाच्या रिक्षाचा रस्त्याच्या डीवायडरवर अपघात झाला आणि रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून पडला होता. घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आणि अग्निशमन विभागाच्या टीमने अत्यंत शिताफीने बचावकार्य पार पाडले.

अपघातग्रस्त रिक्षामध्ये अडकलेले रिक्षाचालक गणेश कोळसकर (वय ३५) यांची सुटका करण्यासाठी वारजे फायर ब्रिगेड, NDA अग्निशमन केंद्राची फायर गाडी, आणि रिस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्प्रेडर कटर च्या सहाय्याने अडकलेल्या चालकाचे दोन्ही पाय मोकळे करत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर तातडीने अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. या बचावकार्यात अग्निशमन अधिकारी सुनिल नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने कामगिरी बजावली. टीममध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे, तसेच ड्रायव्हर गोडसे, कल शेट्टी आणि चौरे यांचा सहभाग होता.

‘सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही’; अंजली दमानियांचा हल्लाबोल

0

लातूरमध्ये काल’छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले. यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

“सुरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार?, असा सवाल दमानिया यांनी केला.

“सूरज चव्हाण ह्या माणसाची इतकी मजाल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी चॅनेलशी बोलताना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे ?”, असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

“तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा”, अशी मागणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहेत. तसेच “मुख्यमंत्री फडणवीस आता तरी थांबवा ही गुंडगिरी’, असंही या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे बॅनर फाडले

‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.

राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपली भूमिका मांडताना ॲड. घाडगे-पाटील यांनी पत्ते उधळत मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले. त्यानंतर ते विश्रामगृहात थांबलेले असताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ‘छावा’चे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी राष्ट्रवादीच्या काहीजणांनी ॲड. घाडगे पाटील व तेथील एकदाेघांना मारहाण केली. पाेलिस येईपर्यंत बराच गदाराेळ सुरू हाेता. स्थानिकचे कार्यकर्ते हस्तक्षेप करून भांडणे नकाे, असे आवाहन करीत हाेते. परंतु, जबर मारहाणीमुळे वातावरण तापले. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा औसा राेडवर ‘छावा’च्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीविराेधात जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. त्यावेळी तत्परतेने पाेलिस दाखल झाले. त्यांनी शांततेचे आवाहन केले. काही वेळानंतर जमाव पांगला. पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदाेबस्त वाढविला हाेता.