Home Blog Page 43

ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना; यामुळे कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही : अमित शाह

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी या घटनेनं संपूर्ण देश स्तब्ध आहे, असं म्हटलं. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्या वतीनं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.

बचावलेल्या प्रवाशाला भेटलो : अमित शाह

अमित शाह म्हणाले, अपघातानंतर 10 मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीनं मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असं अमित शाह यांनी सांगितलं. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृत पणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली.

कुणालाही वाचवण्याची संधीचं मिळाली नाही

घटनेनंतर तातडीनं गुजरात सरकारनं आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलीस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करुन सर्वांनी एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य केलं. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होतं. तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असंही अमित शाह यांनी सांगितलं.

सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेण्याचं काम दोन तीन तासात पूर्ण होईल. विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचं काम झालं आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील, असं अमित शाह म्हणाले.

जितके मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे डीएनए नमुने घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. गुजरातमध्ये 1000 डीएनए टेस्ट कराव्या लागतील. याची सुविधा गुजरातमध्ये आहे. त्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागणार नाही. एफएसएल आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ दोन्ही संस्था कमी वेळात डीएनए परिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिले जातील. नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था इतर व्यवस्था योग्यपणे करण्यात आली आहे. आढावा बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

नागरी उड्डयण विभागानं चौकशी सुरु केली आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी योग्यप्रकारे चौकशी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले. हा अपघात आहे, अपघाताल कोणी रोखू शकत नाही. परंतु 365 दिवस 24 तास अशा प्रकारच्या घटनांवेळी प्रशासनाच्या तत्परतेची कसोटी होते. गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेची कसोटी दुर्भाग्यपूर्ण स्थितीत झाली ते सर्वांसमोर आलं, असं अमित शाह म्हणाले.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अपघातात मृत्यू; पत्नी आणि मुलीची भेट… राहिली अपूर्ण

0

एअर इंडियाच्या एका भीषण विमानअपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मुलीच्या भेटीसाठी ते निघाले. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अहमदाबाद विमानतळावरून निघाले, पण अहमदाबादमध्येच त्यांच्या आयुष्याची एका भीषण अपघातात अखेर झाली. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी (१२ जून) दुपारी लंडनच्या दिशेने झेपावलेल्या या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही होते. तब्बल २४२ जण असलेले हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगरमध्येच कोसळले.

केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचे अपघातात निधन झाल्याची माहिती दिली.

“आमचे नेते, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे याच विमानातून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. पण, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने भाजपच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. हा अपघात इतका मोठा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये येत आहेत. जे जे शक्य असेल, ते इथे येऊन करतील”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विजय रुपाणींची पत्नीही मुलीच्या घरी

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची मुलगी लंडनमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी अंजली रुपाणी या लंडनमध्ये मुलीकडे गेल्या. त्यानंतर गुरूवारी (१२ जून) विजय रुपाणीही त्यांच्या भेटीसाठी लंडनला निघाले होते.

२०४ जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यामुळे विमानातील बहुतांश प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

‘स्थानिक’च्या निवडणुकीत महायुती एकत्रच, पण काही लढती मैत्रीपूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले की, “आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समिती यांना पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोणाशी युती करायची किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण काही जागांवर जिथं शक्यच होणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतही करु” जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले, तरी लढत मैत्रीपूर्ण असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज सुमारे २ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. यानंतर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत बोलताना त्यांनी राज्याच्या शेतकी, ऊर्जा व प्रशासन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली.

राज्य शासनाने शेतीत आधुनिकतेचा स्वीकार करत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सौरऊर्जा, सिंचन सुविधा आणि यांत्रिकीकरण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘पोकरा’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्याने जागतिक बँकेने दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. यांत्रिकीकरण, शेततळ्यांचे बांधकाम आणि अन्य सुधारणा शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील. शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत १६,००० मेगावॉट सौरऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

अनुशेष २०२७ पर्यंत संपवणार

फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासावर विशेष भर दिला. २०२७ पर्यंत विदर्भाचा सिंचन अनुशेष पूर्णतः संपवण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे ते म्हणाले. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाद्वारे भंडाऱ्यातून बुलडाणा व वाशीमपर्यंत पाणी पोहोचवले जाणार असून, यामुळे १० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

माळेगाव कारखाना निवडणूक 7 विद्यमान 5 माजी संचालक चौरंगी लढत? अजित पवार x भालचंद्र देवकाते अशी रिंगणात

0

माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूकीत २१ जागांसाठी चौरंगी लढत होणार हे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उमेदवारी कायम राहिली. त्यांनी आपल्या सत्ताधारी नीळकंठेश्वर पॅनेलमध्ये 7 विद्यमान संचालक, तर 5 माजी संचालकांनाही पुन्हा निवडणूक रिंगणात उरविले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही बळीराजा सहकार बचाव पॅनेलचे अधिकृत उमेदवार जाहीर केले व आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याचे सांगितले.

पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे यांनीही सहकार बचाव शेतकरी पॅनेलमधून तडगे आव्हान उभे केले. कष्टकरी शेतकी समितीने व अपेक्षांनीही या निवडणूकीत मोट बांधली असून उद्या (ता. १३) रोजी उमेदवार यादी जाहीर करणार आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचावर्षीक निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेली अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये युती होईल असे सांगण्यात येत होते. संबंधितांमध्ये तडजोडीसाठी बैठका झाल्या.

त्या बैठकीचे केंद्र स्थानी अजित पवार यांच्यावतीने छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पुथ्वीराज जाचक, किरण गुजर,राजवर्धन शिंदे, अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते आदी नेते होते. पारंपारिक विरोधकमध्ये चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनीच संबधितांबरोबर चर्चा केली.

तसेच शरद पवार गटाकडून अॅड. एस. एन. जगताप, गणपत देवकाते यांनी अजित पवार यांच्याशी बैठक केली. प्रत्यक्षात मात्र युती होण्याच्या प्रक्रियेचे चांगभल झाल्याचे उघड झाले. या प्रमुख पदाधिकार्‍यांना आपापले पॅनेल निवडून आण्यासाठी आता सभासदांच्या अपेक्षांचा डोंगर आणि आव्हानांची मोठी दरी पार करावी लागणार आहे.

गट निहाय नावे पुढील प्रमाणे –

नीळकंठेश्वर पॅनेल

माळेगाव गट –

बाळाहेब पाटील तावरे, शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरूंगले.

पणदरे गट –

तानाजी तात्यासाहेब कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप.

सांगवी गट –

विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंद्रराव खलाटे,

खंडाज-शिरवली गट –

प्रताप जयसिंग आटोळे, सतिश जयसिंग फाळके.

निरावागज गट –

जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते. बारामती गट –

नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे

ब वर्ग संस्था मतदार संघ-

अजित अनंतराव पवार

अनुसूचित जाती जमाती –

रतनकुमार साहेबराव भोसले

महिला राखीव प्रतिनिधी –

संगिता बाळासाहेब कोकरे, सौ. ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले. इतर मागास प्रवर्ग –

नितीन वामनराव शेंडे.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग –

विलास हृषिकांत देवकाते.

सहकार बचाव शेतकरी पॅनेल –

माळेगाव गट –

रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम गजानन काटे, रमश शंकराव गोफणे.

पणदरे गट –

सत्यजित संभाजीराव जगताप, रणजित शिवाजीराव जगताप, रोहन रविंद्र कोकरे.

सांगवी गट –

चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजित वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे.

खांडज-शिरवली गट –

विलास नारायण सस्ते, मेघशाम विलास पोंदकुले.

निरावागज गट –

राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासाहेब देवकाते. बारामती गट –

गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह उर्फ नेताजी विजयसिंह गवारे.

ब वर्ग मतदार संघ

भालचंद्र बापूराव देवकाते,

अनुसूचित जाती-जमाती

बापूराव अप्पाजी गायकवाड,

महिला राखीव प्रतिनिधी

राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे

इतर मागास प्रवर्ग

रामचंद्र कोंडीबा नाळे

भटक्या विमुक्त जाती व जमाती

सुर्य़ाजी तात्यासाहेब नाळे.

बळीराजा सहकार बचाव पॅनेल –

माळेगाव गट –

अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलत काटे, श्रीहरी पांडुरंग येळे.

पणदरे गट –

सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप.

सांगवी गट-

संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोक जाधव, सुरेश तुकाराम खलाटे.

खांडज-शिरवली गट –

सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी आटोळे. निरावागज गट –

गणपत शंकर देवकाते, शरदचंद्र शंकरराव तुपे.

बारामती गट –

प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी.

महिला राखीव –

शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे.

इतर मागास वर्गातून

भारत दत्तात्रेय बनकर, ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले.

अनुसूचित जाती- जमाती मतदार संघ

राजेंद्र श्रीरंग भोसले.

बच्चू कडूंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कर्जमाफीची तारीख दिल्यावरच आंदोलन मागे, कडू मागण्यांवर ठाम

0

कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज बच्चू कडूयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असे बच्चू कडू म्हणाले. आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे आवाहन कडू यांनी केले. बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे. बच्चू कडू यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी बच्चू कडू यांच्या उलट्या देखील झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसापासून जेवण न केल्याने बच्चू कडू यांचे वजन चार किलोपेक्षा जास्त घटलं आहे.

परभणीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंडण आंदोलन

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेण्यात आल्याने आता राज्यातील इतर ठिकाणी पदाधिकारी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. परभणी मधील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन देऊन त्यांनी त्याची पूर्तता न केल्याने बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत. जर सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी जाहीर केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या?

1. दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.

2. आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.

3. दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.

4. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.

5. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.

6. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.

7. पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.

8. ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.

9. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.

10. मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.

11. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.

12. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i

13. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.

14. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.

चमत्कार ! एअर इंडिया भीषण विमान अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला, अपघाताचा घटनाक्रम सांगितला…

0

अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.या विमान अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात सरकारी यंत्रणांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भीषण विमान अपघातात एक प्रवासी बचावला असल्याची माहिती आहे. विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. या प्रवाशाचं नाव विश्वशकुमार रमेश असं आहे. त्याचा रुग्णवाहिकेकडे जात असतानाचा व्हिडिओ समोर आल आहे.

विमानातील एक प्रवासी बचावला

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या संदर्भातील माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात 11 अ या सीटवरील प्रवासी बचावल्याची माहिती आहे. या बचावलेल्या प्रवासाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या विमान अपघातात किती जणांचा मृत्यू झाला हे सध्या सांगता येणार नाही, असं ते म्हणाले. विमान निवासी भागात क्रॅश झाल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असंही जीएस मलिक यांनी म्हटलं.

अपघात कसा घडला?

विश्वश कुमार रमेश हे 40 वर्षांचे असून ते या विमान अपघातातून बचावले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर 30 सेकंदात मोठा आवाज सुरु झाला अन् विमान क्रॅश झालं, हे खूप वेगानं घडलं, असं विश्वश कुमार रमेश म्हणाले. ते या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्या छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे, ते हिंदूस्तान टाइम्स सोबत बोलत होते. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात एअर इंडियाचं विमान कोसळलं. हे विमान बोईंग कंपनीकडून तयार करण्यात आलं होतं. एअर इंडियाच्या एआय -171 या फ्लाईटनं लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं आणि काही सेकंदांमध्येच ते मेघानीनगरमध्ये कोसळलं. एअर इंडियाचं हे विमान सिव्हील रुग्णालयाच्या टीबी विभागावर तर बीजे मेडिकल कॉलेजच्या कोसळलं. या अपघातात होस्टेलमध्ये विद्यार्थी जेवण करत होते, ते देखील जखमी झाल्याची माहिती आहे.

एअर इंडियाच्या या विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल हे मुंबईचे रहिवासी आहेत. तर को पायलट क्लाइव्ह कुंदर हे होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तास विमान उडवण्याचा अनुभव होता.

बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदिती पवार यांचे अभिनंदन

0

गुहागर दि. १२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, पेवे विभाग क्र. २, शाखा निगुंडळ या शाखेचे माजी सभासद तसेच माजी निवृत्त मुख्यध्यापक दिवंगत दत्ताराम पवार यांची सून सौ. आदिती (सोना) विनायक पवार, मौजे निगुंडळ हिने मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याने बौद्धजन सहकारी संघ, गाव व मुंबई शाखा आणि शिक्षण समिती यांच्या वतीने सौ. आदिती (सोना) विनायक पवार यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे.

सौ. अदिती पवार यांनी संसार सांभाळून चिकाटी आणि ध्येय उराशी बाळगून मोठ्या पराकाष्ठेने यश संपादन केल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

कळमुंडी गावचे सुपुत्र मोतीराम रामचंद्र मोहिते आणि सुगंधा मोतीराम मोहिते यांच्या द्वितीय सुकन्या आदिती पवार यांना लहानपणापासूनच डॉक्टर, वकील अशी उच्चपदवीधारक उच्चशिक्षित होण्याची इच्छा होती म्हणून त्याच दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांचे पती विनायक दत्ताराम पवार यांनी आपली सुविद्य पत्नी आदिती हिच्या उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा पाठिंबा दिला म्हणून त्यांचे ही संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, विनायक दत्ताराम पवार व सौ. आदिती विनायक पवार या उभयतांस पुढील उज्वल कारकिर्दीसाठी बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा देण्यात येत आहे असे बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सरचिटणीस संदेश गमरे आणि सहकाऱ्यांनी नमूद केले आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव;  दादांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा!- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, शुभारंभ लॉन्स येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी ना. पाटील यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपण अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त हार-तुरे नको सामाजिक उपक्रमांसाठी निधी संकलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी निधी संकलनात हातभार लावला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आ. शंकरभाऊ जगताप, हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, नेत्या रेश्मा सय्यद, शिवसेना नेते नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, रुपालीताई ठोंबरे पाटील, समीर चांदेरे, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, दत्ताभाऊ सागरे, दीपक मानकर, ॲड. मंदार जोशी, पराग ठाकूर, खरवडे देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर पोलीस मित्र संघटना, बघतोय रिक्षावाला संघटना, पतितपावन संघटना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रकांतदादा पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

यावेळी शुभेच्छा देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना दादांचा संवेदनशील माणूस म्हणून सहा वर्षे जवळून अनुभवतोय. समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटकाला न्याय देताना; समाजातील उपेक्षिताचे दु:ख हे आपलं दुःख मानून ते सदैव काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. यातून समाजातील दु:खच संपेल, असं माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महापालिका निवडणुका उरले फक्तं 75 दिवस; अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी जाहीर होणार

0

पुणे : नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले असून अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी व नंतर आरक्षण सोडत होऊन निवडणुका जाहीर केल्या जातील. ऑक्टोबर अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार- 

11 ते 16 जून

प्रगणक गटाची मांडणी करणे प्रारूप प्रभाग रचना तयार करणे

17 ते 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे

19 ते 23 जून

स्थळ पाहणी करणे

24 ते 30 जून

गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे,

1 ते 3 जुलै

नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणे

4 ते 7 जुलै

प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे

8 ते 10 जुलै

प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे.

राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, 22 ते 31 जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती सूचना मागविणे, एक ते 11 ऑगस्ट शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे .

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे. असा कार्यक्रम असणार आहे.

मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये विमान क्रॅश; नागरी वस्तीत प्रवासी विमान कोसळलं

0

गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं हे विमान असल्याचे समजते.

घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती काही क्षणात…..