Home Blog Page 3

‘ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ‘, संरक्षणमंत्र्यांनी संपूर्ण मोहिमेवर लोकसभेत सांगितलं नेमकं कारण

0

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचा सपशेल पराभव झाला. या संपूर्ण मोहिमेवर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली.

‘तो’ दावा निराधार आणि खोटा

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर राजनाथ सिंह म्हणाले की, “6 आणि 7 मे रोजी एक ऐतिहासिक लष्करी कारवाई केली गेली, ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधातील आमची कठोर भूमिका होती.” संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने हार मानल्यानंतर भारताने युद्धविराम केला, यात इतर कोणाचीही कोणतीही भूमिका नाही. राजनाथ सिंह म्हणाले की, “जसे हनुमानजींनी लंका जाळली, तसेच आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले.” यासोबतच, संरक्षण मंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, पाकिस्तानविरुद्ध युद्धविराम घडवून आणण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा दावा निराधार आणि खोटा आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “…भारताने कारवाई थांबवली कारण संघर्षापूर्वी आणि त्यादरम्यान जी काही राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे ठरवली होती, ती आम्ही पूर्णपणे साध्य केली होती. त्यामुळे, ऑपरेशन कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले, असे म्हणणे निराधार आणि पूर्णपणे चुकीचे आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ का थांबवले?

सीमेपार करणे किंवा तिथल्या जमिनीवर कब्जा करणे हा आमचा उद्देश नव्हता. तर दहशतवादाविरुद्ध होता. हे त्या लोकांसाठी होते, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले. आम्ही फक्त त्यांना लक्ष्य केले, ज्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला. लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते, याचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत युद्ध सुरू करणे नव्हता. भारताने 10 मे रोजी पाकिस्तानच्या हवाई पट्ट्या उद्ध्वस्त केल्या, तेव्हा त्यांनी हार मानली. ते म्हणाले की, “आता खूप झाले, थांबा.” यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले.

विरोधकांनी ‘तो’ प्रश्न का विचारला नाही?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आपले किती विमान पाडले, असे विचारण्याऐवजी आपण शत्रूचे किती विमान पाडले, असे विचारायला हवे होते. जर तुम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले का, असा प्रश्न विचारायचा असेल, तर त्याचे उत्तर ‘हो’ आहे.”

ज्यांनी आपल्या मुली आणि सुनांचे सिंदूर पुसले, त्यांना आम्ही मिटवले.आपल्या सैनिकांना काही नुकसान झाले का, असा प्रश्न विचारायचा असेल तर ‘नाही’. उद्दिष्टे मोठी असताना छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नये, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोपांनी घेरलेल्या मंत्री व आमदारांचं टेन्शन वाढलं; ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालां समोरच ही मोठी मागणी

0

राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी पक्षाला थेट आव्हान दिले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना एक महत्त्वाचे पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री व आमदारांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप

या पत्रात राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहारांबद्दल आणि विविध प्रकरणांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेषतः, मंत्री संजय शिरसाठ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्यावरील गंभीर प्रकरणांची वस्तुस्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडण्यात आली. या मंत्र्यांवर विविध प्रकारचे गैरव्यवहार आणि वादग्रस्त प्रकरणे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

इतरही अनेक गंभीर प्रकरणांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये ‘हनी ट्रॅप’ प्रकरण, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार यासारख्या मुद्द्यांवरही राज्यपालांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संबंधित मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

शिष्टमंडळातील कोण कोण?

शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदा फातप्रेकर, विशाखा राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, अनंत नर आणि महेश सावंत या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. ठाकरे गटाने राज्यपालांच्या भेटीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाढत्या लोकसंख्येचा भार, प्रशासनावर ताण, वाढत्या नागरीसुविधा; पुणे महापालिकेची होतीये दमछाक

0

पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे. त्यामुळे विकासकामे आणि देखभालदुरुस्तीची कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर ताण येत आहे. त्यातच आता खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला जात आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडला आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करून पूर्वभागासाठी स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे, असे मत माजी महापौर, माजी आयुक्त आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

लोकसंख्येचा भार पुणे महापालिकेला झेपत नाही

पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा भार पुणे महापालिकेला झेपत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतून हडपसर स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी सातत्याने मी विधानसभेत केली आहे. हडपसर महापालिकेचा प्रशासकीय कारभारासाठी लागणाऱ्या इमारतीसाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. हडपसर महापालिका करताना पाणीप्रश्न, जलशुद्धीकरण केंद्र, मलनिस्सारण प्रकल्प याबाबतची स्पष्टता पुणे महापालिका आणि राज्यसरकारने देणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांचे मूलभूत सुविधांबाबतचे हक्क बाधित ठेवणे गरजेचे आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पालिकेतून वगळण्यात आली. त्यावेळी या गावाची नगरपालिका न करता हडपसर स्वत्रंत महापालिका करण्याची मागणी केली होती. आता पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सहा महिने हद्दीत बदल करता येत नाही. त्यामुळे हडपसर महापालिकेचा निर्णय तुर्तास होणार नाही. पण हडपसर स्वतंत्र महापालिकेसाठी आतापासून प्रयत्न केले तर दोन ते तीन वर्षांत ती अस्तित्वात येईल.

– चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ.

राज्यातील सर्वांत मोठी महापालिका

पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे. पण महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी व एकूणच सोयीसुविधांमध्ये वाढ नाही. त्यामुळे विकासकामे आणि देखभालदुरुस्तीची कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर ताण येत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडला आहे. त्यातच आता खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर सोयी-सुविधांचा ताण पडत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे. माजी महापौर संघटना त्यासाठी आग्रही आहे.

– अंकुश काकडे, माजी महापौर, पुणे महापालिका.

सुविधा पुरविताना पुणे महापालिकेची दमछाक

पुणे महापालिका क्षेत्रफळाने सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक आहे, असे मी आयुक्त असतानाच राज्यसरकारला कळविले होते. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी उशीर झाला आहे. लवकरात लवकर याबाबतचा निर्णय राज्यसरकारने घेणे आवश्यक आहे. वाढलेल्या भाैगोलिक क्षेत्रफळाने पायाभूत सुविधा पुरविताना पुणे महापालिकेची दमछाक होत आहे.

 – महेश झगडे, माजी आयुक्त, पुणे महापालिका.

विभाजन होणे काळाची गरज

पुणे महापालिकेचे विभाजन झालेच पाहिजे. हडपसरच्या पुढे आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे पूर्वभागासाठी म्हणजे हडपसर ही स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. पुणे महापालिका हद्दीपासून ५ किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करत आहे. त्याने अन्य भागांत पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. भौगोलिकदृष्ट्या पालिका वाढल्यामुळे नागरीसुविधा देण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महापालिकेचे विभाजन होणे काळाची गरज आहे.

 – रवींद्र धंगेकर, माजी आमदार, कसबा मतदारसंघ.

चाकण औद्योगिक क्षेत्र समस्या मुक्तीसाठी महायुती सरकारचा ‘ऑन ॲक्शन मोड’ भाजपा आमदार महेश लांडगे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री, उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक

0

पिंपरी-चिंचवड: चाकण औद्योगिक क्षेत्रातीलल वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी भाजपा महायुती सरकार ‘ ऑन ॲक्शन मोड’वर आले आहे. दि. 30 जुलै रोजी मुंबई येथे सांर्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक नियोजित केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन ‘‘ॲक्शन प्लॅन’’ निश्चित करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित सर्व विभागांची बैठक नियोजित केली आहे. या बैठकीत निश्चितपणे धोरणात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. गत पावसाळी अधिवेशनामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा सदस्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे चाकण आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे.

या बैठकीला अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्य अधिकारी, चाकण / तळेगांव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘‘UNCLOG_Chakan_MIDC’’ या मोहिमेला केवळ पाठिंबा नव्हे, तर सक्रीयपणे चाकण वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत. आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजपा महायुतीचे सरकार हिंजवडी आयटी पार्क समस्यामुक्तीसाठी ज्या प्रमाणे काम करीत आहे. त्याप्रमाणे चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे

बाणेर बालेवाडी वाहतूक कोंडी; जमीन अधिग्रहण जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार: ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

0

कोथरुड मतदारसंघात पुणे महापालिका स्मार्ट सिटी चा भाग म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये या भागाचा समावेश करण्यात आला त्यानंतर या भागात विकास आराखडा ही तयार करण्यात आला परंतु विकास आराखड्यातील आरक्षित जागा आणि वाहतुकीचा विचार करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांबाबत प्रलंबित विषय आहेत. यातील अनेक विषय जमीन अधिग्रहणाअभावी प्रलंबित पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याबद्दल तीव्र नाराजी ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे दोन महिन्यांत संपादन करून जमीन ताब्यात आल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करावा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले असतानाही अद्याप सदर विषयावर कार्यवाही झाली नाही, त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर मधील लक्ष्मीमाता मंदिर येथील रस्ता रुंदीतरण यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, खड्डेमय रस्ते, नादुरुस्त पदपथ आदींवर चर्चा झाली. त्यासोबतच मिसिंग लिंकची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण होत नसल्याने त्यावर ही नापसंती व्यक्त केली.

त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! 22, 23वर्षाच्या पोरी, 44 लाखांचा माल जप्त, खडसेंचे जावई कसे अडकले? A टू Z स्टोरी…

0

पुण्यातील खराडीतील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटे छापा घालून मोठी कारवाई केली. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई, दोन कुख्यात बुकींसह पाच पुरुष व दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंतची (२९ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील खोली क्रमांक १०२ मध्ये करण्यात आली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, १० मोबाइल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू, मोबाइल आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह विविध कलर्मानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, माळवाडी), समीर फकीर सय्यद (वय ४१, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, औंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमधील तीन रूम डॉ. खेवलकर यांच्या नावे बुक झाल्या होत्या. अटकेपूर्वी आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोपटाणी याचा मूळ व्यवसाय सिगारेट वितरणाचा आहे. सय्यदचा हार्डवेअर व्यवसाय असून, यादव बांधकाम व्यावसायिक आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय कुंभार, शैलेश संखे, सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक अस्मिता लाड, राजेश माळेगावे आदींनी केली. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार याचा तपास करत आहेत

मैदानात जडेजा-सुंदरने धुतले अन् पत्रकार परिषदेत गंभीरने बोलती केली बंद करत इंग्लंडला हे सुनावलं….

0

भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका आता अंतिम टप्यात येऊन पोहोचली आहे. चौथा कसोटी सामना भारताने खेळून ड्रॉ करत असताना इंग्लंडचे खेळाडू वैतागताना दिसले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी खेळी करुन भारताला पराभवाच्या स्थितीतून बाहेर काढले. सामन्यात एक अशी वेळी आली होती जेव्हा सुंदरने इंग्लंडच्या खेळाडूचा भर मैदानात अपमान केल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंडयांच्यातील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत बरीच नाट्यमयता पाहायला मिळाली. 138 व्या षटकानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव दिला. सामना निकाल लागणार नाही हे निश्चित होते. त्यानंतरही रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी स्टोक्सला नकार दिला. दोन्ही फलंदाज शतकाच्या जवळ होते. जडेजा 89 धावा काढल्यानंतर खेळत होता आणि सुंदर 80 धावा काढल्यानंतर खेळत होता. इंग्लंडच्या खेळाडूंना हे आवडले नाही आणि मैदानावरील वातावरण तापले.

भारतीय फलंदाजांनी मैदानावर इंग्लंडला पाणी पाजले त्यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर यांनीही इंग्लंडची बोलती बंद केली. गंभीरला या वादावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “जर कोणी 90 धावांवर फलंदाजी करत असेल आणि दुसरा 85 धावांवर, तर ते शतकाचा हक्कदार नाहीत का? ते निघून जातील का? जर इंग्लंडचा एखादा खेळाडू 90 किंवा 85 धावांवर फलंदाजी करत असेल आणि त्याला त्याचे पहिले कसोटी शतक झळकावण्याची संधी मिळाली, तर तुम्ही त्याला तसे करू देणार नाही का?”

वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात पहिले कसोटी शतक झळकावले. त्याच्या शतकासह, भारतीय संघ सामना अनिर्णित ठेवण्यास सहमत झाला आणि हस्तांदोलन केले. गंभीर म्हणाला, “पाहा, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. जर त्यांना असे खेळायचे असेल तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मला वाटते की दोघेही शतकाच्या पात्रतेचे होते आणि त्यांनी ते मिळवले.” भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने कसोटीतील पहिले शतक झळकावले. दुसरीकडे, जडेजाचे पाचवे आणि इंग्लंडमधील दुसरे शतक त्याच्या बॅटमधून आले.

शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार चौकशीदरम्यान मोठी घटना उपकार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या; अशा एक्झिटमुळे अनेक प्रश्न उभे

0

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन त्यांनी आयुष्याची अखेर केली. शेटेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे जवळचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सोनई येथे शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान विविध वादामुळे चर्चेत आहे. धर्मादाय आयुक्तांकडेही या प्रकरणी सुनावणीही सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन शेटे हे माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शनी शिंगणापूर देवस्थानमधील सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक तपास सुरू आहे. शेटे यांच्या पार्थिवावर सोनई येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीन शेटे यांच्या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे चर्चांना आले उधाण आलं आहे.

सार्वजनिक जीवनातील एक जबाबदार अधिकारी असलेल्या नितीन शेटे यांची अशा प्रकारे एक्झिट घेणं अनेक प्रश्न उभे करत आहे. देवस्थानमधील राजकीय हस्तक्षेप, आर्थिक घोटाळे आणि अंतर्गत कलह या सर्व गोष्टींचा तपास लावणं आता अत्यावश्यक बनलं आहे. ही केवळ आत्महत्या की दबावामुळे उचललेलं टोकाचं पाऊल? असा प्रश्न विचारला जात असून प्रशासनासह संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.

उजनी ९७ टक्के भरल्याने १६ दरवाजे भीमानदीत ५१००० क्युसेक विसर्ग; उजनीत ४१,६०० क्युसेकचा विसर्ग सुरूच

0

उजनीत सध्या दौंडवरून उजनीत सध्या ४१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. धरण ९७ टक्क्यांपर्यंत भरल्याने भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल सध्या पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने आज (रविवारी) रेड अलर्ट सांगितला आहे. त्यामुळे दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्यास उजनीतून भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्याने भीमा नदीतील पाणी बंद करण्यात आले होते, पण मागील चार-पाच दिवसांत पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने आता उजनीचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. सध्या उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले असून धरणातून ५० हजारांवर विसर्ग नदीत सोडला आहे. याशिवाय बोगद्यातून ४०० क्युसेक, कालव्यातून ११०० क्युसेक, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून २६० क्युसेक आणि धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे. शुक्रवारी पहिल्यांदा भीमा नदीत पाच हजार क्युसेक पाणी सोडले आणि रविवारी सकाळी तो विसर्ग ५० हजार करण्यात आला आहे. वीर धरण ९५ टक्के भरल्याने सध्या वीरमधून नदीतून १४ हजार ६२७ क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

महिन्यात उजनीतून सोडले ३९ टीएमसी पाणी

२६ मे रोजी उणे पातळीतून प्लसमध्ये आलेल्या उजनीत सध्या ऑगस्टअखेर जेवढा पाणीसाठा अपेक्षित आहेत, तेवढे पाणी आहे. २० जूनपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यास सुरवात झाली. आता उजनीत ९७.१४ टक्के (११५.७२ टीएमसी) पाणीसाठा असून २० जून ते २७ जुलैपर्यंत धरणातून ३९ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली.

पंढरपूरला १.१६ लाख क्युसेकनंतर पुराचा धोका

भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. एक लाख १६ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत झाल्यावर पंढरपूरला पुराचा धाको संभवतो. सध्याच्या विसर्गात पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली. तरीपण, नदी काठावरील सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उजनी धरणाची सद्यस्थिती

उजनीत दौंडवरून ४५ हजार तर वीरमध्ये १७ हजार क्युसेकची आवक

उजनीत ऑगस्टअखेर ९६ टक्के पाणीसाठा अपेक्षित, पण सध्या धरण ९७.१४ टक्के भरले

उजनीतून सोडलेले पाणी उद्या (सोमवारी) सकाळी नऊपर्यंत पोचणार, नदी काठावर सतर्कतेचा इशारा

आज (रविवारी) मध्यरात्री पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली

दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्याने उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले

महाराष्ट्र नव्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीला ब्रेक! मोठे बदल, तिसरी भाषा रद्द करण्याचा निर्णय; कोणत्या भाषांचा असणार समावेश?

0

हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे. तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा अनिवार्य ठेवण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीआरटी) तयार केलेल्या या नव्या मसुद्यात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यवसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे.

याआधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नव्या मसुद्यातून हिंदी वगळण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम नागरिकांच्या पाहणीसाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, 28 जुलैपासून नागरिकांना आपले अभिप्राय नोंदवता येतील, अशी माहिती एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.