Home Blog Page 218

तुम्हीही कॅन्सरवाला तांदूळ खाताय? धक्कादायक संशोधन समोर! कर्करोग, श्वसन विकार, पचन विकारांचाही धोका

0

ज्यांना भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी. तुम्ही जो तांदूळ म्हणजेच भात खाताय, त्यात प्लास्टीक आहे आणि त्याने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. हे सगळं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र यावर एक रितसर संशोधन झालंय. नेमकं काय आहे हे संशोधन? सविस्तर जाणून घेऊया…..

आपल्यापैकी अनेकांचं जेवण भात खाल्लाशिवाय पूर्णच होत नाही. मात्र याच भातात म्हणजेच तांदळात सूक्ष्मप्लास्टीकचे कण आढळलेत. प्रा. डॉ. अनिल गोरे,  प्रा. गोविंद कोळेकर, कुमारी पिनल भावसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. डॉ. अनिल गोरे यांनी आपल्या संशोधनात भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचं सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण केलं.

कर्करोग, श्वसन विकार, पचनाशी संबंधित विकारांचा धोका

या अभ्यासात 100 ग्रॅम तांदळात सरासरी 30.8 अधिक 8.61 कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. पारदर्शक फायबर स्वरूपाचे कण, 100 ते 200 मायक्रोमीटर आकाराचे होते. तांदळात प्रामुख्यानं पॉलीएथिलीन (PE), आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) हे  सूक्ष्म प्लास्टिक कण आढळले. हे धक्कादायक संशोधन जर्नल ऑफ हाझार्डस मटेरिअल्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. तांदळातले हे सूक्ष्मप्लास्टिक अत्यंत घातक दूषित घटक आहे, जे मानव आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतात, असे या संशोधनानंतर डॉ. अनिल गोरेंनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातल्या तांदळाच्या विविध ब्रँण्डमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कण आढळले. यामुळं कर्करोग, श्वसन विकार, पचनाशी संबंधित विकारांचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उपाय काय?

विशेषतः पुरुष आणि मुलांपेक्षा महिलांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक सेवन जास्त असल्याचं दिसून आलंय. या प्लास्टिक कोटेड तांदळापासून वाचण्यासाठी सोपे उपाय पुरेसं असल्याचं संशोधक अनिल गोरे सांगतात. त्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांनू तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला संशोधकांनी दिलाय. तसंच शिजवण्याआधी तांदूळ पाण्यानं किंवा मिठाच्या पाण्यानं जास्तवेळा धुवून घ्यावा असा सल्ला त्यांनी दिलाय.

जीवनशैलीत बदल

माणसाच्या रोजच्या अन्नात केमिकल, प्लास्टिक, विषारी घटकांचा शिरकाव खूप वाढलाय. आधुनिक जीवनशैलीसोबत आयुष्य सुलभ करणारे घटकच आता आयुष्याचे वैरी ठरू लागलेत. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं असा एका चित्रपटातला प्रसिद्ध डायलॉग आहे. मात्र हे प्लास्टिक पोटात जाऊन माणसाला पृथ्वीवरुन संपवू लागलंय याचं भान आतातरी माणसानं ठेवायला हवं आणि तसे बदल जीवनशैलीत करायला हवेत.

पुणे १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच (जीबीएस) जीवाणू असल्याचे उघड! खासगी टँकरचा पाणीपुरवठा सुरू

0

पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेले रुग्ण आढळत असलेल्या भागांत खासगी टँकरनेही पाणीपुरवठा होतो. हे टँकर जेथून पाणी घेतात, अशा १५ ठिकाणच्या पाण्यात ई-कोलाय जीवाणू आढळला आहे. महापालिकेने आवाहन करूनही टँकरमालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्याने हे घडल्याचे उघडकीस आले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून खडकवासला, धायरी, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याचे स्रोत आणि अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात आहे. या परिसरातील सोसायट्यांना पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर ज्या केंद्रांवरून पाणी भरतात, त्याचीही तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून, या पाण्यामध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरचालकांनी ब्लीचिंग पावडरचा वापर करावा, अशी सूचना महापालिकेने केली आहे. यासाठी महापालिकेने ब्लीचिंग पावडरदेखील मोफत उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक टँकरचालकांनी ही पावडर नेण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. केवळ तीन ते चार टँकर मालक महापालिकेकडून ब्लीचिंग पावडर घेऊन गेले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

ई-कोलाय जीवाणू सापडलेल्या सर्व केंद्रांना तातडीने नोटीस बजाविण्यात येणार असून, महापालिकेने दिलेल्या ब्लीचिंग पावडरचा वापर टँकरमध्ये करून त्यानंतरच नागरिकांना पाणी द्यावे, अशी सूचना दिली आहे. या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक खासगी टँकर मालकांची महापालिकेकडे नोंदच नाही. वास्तविक टँकरमधून पाणी पुरविताना ते कोठून भरले जाते, याची माहितीही महापालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

नंदकिशोर जगताप म्हणाले, जीबीएसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिका आवश्यक ती काळजी घेत आहे. खाजगी टँकर मालकांनी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा यासाठी पालिकेने सूचना केलेल्या आहेत. टँकरमालकांनी महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास, त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्याला नुकसान पोहोचविल्याचा ठपका ठेवून जेथे हा जीवाणू आढळला ती केंद्रे कायमची बंद केली जातील.

अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी अन् अन्य प्रकल्पास किती रुपयांची तरतूद?

0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर यात महाराष्ट्रासाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद केली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. तसेच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख रुपये मिळणार आहेत.

ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख रुपये मिळणार आहे. सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

सामान पाणीपुरवठा कामाला गती नाही तरी चौथ्यांदा मुदतवाढीच्या हालचाली; २४३५ निधीपैकी १४१७ निधी खर्च

0

समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला महापालिकेने दिलेली तिसरी मुदतवाढ संपत आली तरीही अद्याप २० टक्के कामे बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा चौथ्यांदा कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून, त्याला आयुक्तांची मान्यता घेतली जाणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी मंजूर केलेल्या २४३५ कोटींच्या निधीपैकी १४१७ निधी खर्च झाल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेला महापालिकेच्या मुख्य सभेने मे २०१५ मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानंतर २४३५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या.

योजनेसाठी नेमलेल्या प्रकल्प सल्लागाराने दिलेल्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर बसवणे, नागरी सुविधा केंद्र ७ आणि ५ नवीन पम्पिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निविदेत नमूद केले होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे आजवर तीन वेळा या कामांना मुदतवाढ देण्यात आल्या आहेत.

तिसरी मुदतवाढ आता फेब्रुवारीमध्ये संपत आहे, तरीही योजनेची कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप वीस ते पंचवीस टक्के कामे बाकी आहेत. त्यामुळे चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणी मीटर बसविण्यास विरोध

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविले जात आहेत. मीटर बसविल्यानंतर पाण्याची चोरी पकडली जाणार, जास्त पाणीबिल येणार या भीतीने मीटर बसविण्यास नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून विरोध होतो. त्यामुळे योजनेतील इतर कामांच्या तुलनेत पाणी मीटर बसविण्याचे काम उपेक्षित उद्दिष्ट गाठू शकले नाही.

अनेक पाणी मीटरची मोडतोड

योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीबिल आकारले जाणार आहे. त्यामुळे बसविलेले मीटर संध्या तरी धूळ खात बंद अवस्थेत आहेत. त्यातच मीटर बसविण्यास विरोध, त्यामुळे बसविलेल्या अनेक मीटरची मोडतोड झाल्याचे चित्र पहायला मिळते.

अद्याप २० टाक्यांची कामे प्रलंबित

योजनेंतर्गत एकूण ८६ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. यापैकी ६६ टाक्यांची कामे झालेली आहेत. यातील १३ टाक्यांची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. जागा नसल्याने ५ टाक्यांची ठिकाणे बदलल्याने कामे रखडली आहेत. तसेच अद्याप दोन टाक्यांना जागाच उपलब्ध झालेली नाहीत, तर एका टाकीचे काम न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे.

प्रकल्पास विलंब होण्याची कारणे

– पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा व नेत्यांचा विरोध

– जलवाहिन्यांच्या खोदाईकरिता वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, संरक्षण विभाग आदींकडून परवानग्या मिळत नाहीत.

– दाट वस्ती भागात काम करण्यास येणाऱ्या विविध अडचणी.

– खोदाईसाठी विविध सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्यास येणाऱ्या अडचणी.

डिसेंबर २०२४ पर्यंत झालेली कामे :

– वितरण जलवाहिन्या : १२२४ पैकी ९६७ किमी

– टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या : १०१ पैकी ९२.१९ किमी.

– पाणी मीटर : २ लाख ३२ हजार २८८ पैकी १ लाख ६८ हजार ७२२

– पाणी साठवण टाक्या : ८६ पैकी ६६

– नागरी सुविधा केंद्र : ः७ पैकी ५

– पंपिंग स्टेशन : ५ पैकी ४ ठिकाणची कामे सुरू आहेत.

– आत्तापर्यंत २ हजार ४३५ कोटी पैकी १ हजार ४१७ कोटी रुपये खर्च

तिप्पट मोबदल्याच्या आमिषाने गंडा; बावधनमधील बांधकाम व्यावसायिकाची दोन कोटींची फसवणूक

0

कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटी एक हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही मोबदला न देता त्याची फसवणूक केली. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे व बावधन येथे जानेवारी ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथील ३७ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) फिर्याद दिली. अनिष आचार्च, मनिष कुमार अगरवाल, पराग गर्ग, मुकुल जैन यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधाचे रक्षण करणेबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व शेती व्यवसाय आहे. संशयितांनी त्यांच्या प्रिविन प्रेपरेटिव्ह प्रा. लि. (पत्ता ए ६१, तिसरा मजला, सेक्टर ६५, नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तरप्रदेश) या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यातून वेळोवेळी रोख, आरटीजीएस व आयएमपीएसव्दारे दोन कोटी एक हजार रुपये ठेव स्वरुपात घेऊन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिप्पट मोबदला देतो, असे सांगितले. मात्र, फिर्यादीला कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न देता विश्वासघात करून फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सागर ठाकरे तपास करीत आहेत.

पुरंदर, भोर, दौंड ३ उमेदवारांची माघार ‘खडकवासला’तच प्रतिरूप मतमोजणी: जिल्हा निवडणूक शाखेची माहिती

0

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीवर हरकत घेतलेल्या बहुतांश उमेदवारांनी माघार घेतल्याने आता केवळ खडकवासला मतदारसंघातच प्रतिरूप मतमोजणी होणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुरंदर, भोर व दौंड मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेले अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच शिरूर मतदारसंघातील उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे प्रतिरूप मतमोजणीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ व काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश होता. यात बारामतीतील युगेंद्र पवार यांनी माघार घेतल्यानंतर १० अर्ज शिल्लक राहिले होते. आता पुरंदर, भोर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही माघार घेतली आहे.

उर्वरित सहा मतदारसंघांमधील उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता केवळ खडकवासला मतदारसंघातील उमेदवाराने आपला तपासणी व पडताळणीचा अर्ज कायम ठेवला आहे. न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अर्जांवर निर्णय न्यायालयाच्या निर्देशांनुसार होणार आहे. तर खडकवासला मतदारसंघातील अर्जावर प्रतिरूप मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे.

न्यायालयात याचिका दाखल केलेल्या सहा उमेदवारांव्यतिरिक्त आणखी तीन उमेदवारांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यांनी मात्र मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही. पडताळणीसाठी अर्ज केलेल्या व याचिका दाखल केलेल्यांपैकी शिरूरमधील उमेदवारानेही पडताळणीसाठीचा अर्ज मागे घेतला असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मतमोजणीची पडताळणीसाठीचा अर्ज

– खडकवासला

न्यायालयात अर्ज केलेले उमेदवार

– खेड आळंदी, शिरूर, चिंचवड, पिंपरी, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, भोसरी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निरीक्षक पदी सुरेश पालवे पाटील निवड झाल्याबद्दल सत्कार

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड निरीक्षकपदी नुकतीच श्री. सुरेश पालवे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी गुप्ते मंगल कार्यालय येथील शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. शहराध्यक्ष म्हणून श्री.दीपक मानकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर पक्षवाढीसाठी महत्वाचे कार्यक्रम केले त्या सर्व बाबींचा समावेश असलेला कार्य अहवाल देखील त्यांना यावेळी देण्यात आला.

निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहले पाहिजे. पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माझा गेली २० ते ३० वर्षापासूनचा संपर्क आहे. विधान परिषद पदवीधर निवडणुकीत दीपक मानकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. गेली दोन वर्षांपासून शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांची पक्ष संघटनेतील पदाधिकारी हे पुणे शहरात खूप चांगल्याप्रकारे काम करीत असून राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना. श्री.अजित दादा पवार यांचे हात अजून बळकट करीत आहात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची पूर्वतयारी करावी, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, नव्याने करावयाची पदनियुक्ती करणे त्याचबरोबर कार्यकर्त्याला शासनाच्या विविध कमिटीवर काम करण्याची संधी दिली जाईल.

शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना. श्री.अजित दादा पवार यांनी निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील या अतिशय योग्य व्यक्तीची निवड केलेली. आहे. निरीक्षक श्री. सुरेश पालवे यांचे पुणे शहराशी जवळचे नाते असून तळागाळापर्यंत ते काम करतात. आदरणीय दादांची महाराष्ट्रासह पुण्यातील ताकद अजून वाढली पाहिजे. पुणे शहरातील कार्यकर्ते तळमळीने पक्षाचे काम करतात. त्यांना वेगवेगळ्या पदांची संधी मिळायला पाहिजे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणे शहरात एक नंबर असेल.

सदर प्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, उपाध्यक्ष दत्ता सागरे, पुणे शहर निरीक्षक रुहीसबा सय्यद, सरचिटणीस अर्चना चंदनशिवे,विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, सोशल मिडिया सेल अध्यक्ष शीतल मेदने, तृतीयपंथी सेल अध्यक्ष निर्जला गायकवाड, बँक कर्मचारी अध्यक्ष गिरीश मेंगे,महिला कोथरूड अध्यक्ष तेजल दुधाणे, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष नीता गायकवाड, विधानसभा पर्वती कार्याध्यक्ष रामदास गाडे, पुणे कँन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,शाम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदेंचा पुण्यावर डोळा, पण ठाकरेंच्या शिलेदाराने थोपटले दंड! निवडणुकीआधी गळती रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय!

0

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचं पहायला मिळत होतं. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला रिकाम्या हाती परतावं लागल्याने आता पुण्यात शिंदे गट अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने आता वसंत मोरे यांनी सुत्र हातात घेतली आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता असताना शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांना भेटणार

पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांना भेटणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरे गटाला गळती लागली आहे. 5 माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला होता.

पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे अॅक्टिव

अशातच पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असताना संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. महादेव बाबर यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचं पहायला मिळतंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

एकनाथ शिंदेंचे सुचक संकेत

दरम्यान, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून मला कुणीही भेटू शकतो. मी कधीही कोणासोबतही दुजाभाव केलेला नाही. तुम्हाला आताच का शंका येत आहे? पुण्यात शिवसेना मजबूत असून आणखी मजबूत होणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सुचक संकेत दिले होते. त्यावर आता वसंत मोरे अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय.

8 वा वेतन आयोग, किसान क्रेडिट कार्डमध्ये मोठा बदल नवीन टॅक्स स्लॅबच नाही; मध्यमवर्गाची पाचही बोटं तुपात

0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये मध्यमवर्गाला छप्परफाड गिफ्ट दिल्याने त्यांच्यात आनंदाची लहर आली आहे. 8 वा वेतन आयोग, नवीन टॅक्स स्लॅबच नाही तर मोदी सरकारच्या इतर 3 मोठ्या गिफ्टमुळे मध्यमवर्गाची पाचही बोटं तुपात आहेत. विमा योजना, दुर्धर आजार, कॅन्सरसह स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी मदत, कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदलाची नांदी यामुळे मोदी सरकारवर सर्वसामान्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहे.

या केल्या घोषणा

अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या आयकर सवलतीची मर्यादा 50,000 हून वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय विमा क्षेत्रात FDI ची मर्यादा 74% टक्क्यांहून वाढवून 100% करण्यात आली. त्यामुळे कंपन्यांना अधिक गुंतवणूक मिळेल तर प्रिमियम कमी होईल. सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर बिल सादर करणार आहे. त्यामध्ये कर रचनेत बदलाची शक्यता आहे. तर 12 लाखांपर्यंतची कर सवलत केवळ वेतनदारांना देण्यात येणार आहे. इतर ठिकाणाहून उत्पन्न होत असले तर हा फायदा होणार नाही.

12 लाखच्या कर सवलतींचा यांना नाही फायदा

बजेटची अजून एक बाजू समोर आली आहे. यामध्ये 12.75 लाखांपर्यंत कर सवलत देण्यात आली आहे. अर्थात ही सवलत केवळ त्यांनाच मिळेल, ज्यांचे उत्पन्न हे केवळ वेतनातून येईल. जर एखाद्या व्यक्तीची शेअर बाजार, म्युच्युअल फंड वा इतर गुंतवणुकीतून फायदा होत असेल तर अशा लोकांना ही सवलत मिळणार नाही. त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागेल. तर ज्यांना पगार आहे, त्यांना मात्र या कर सवलतीचा फायदा होणार आहे. विमा योजना, दुर्धर आजार, कॅन्सरसह स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी मदत, कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील.

किसान क्रेडिट कार्डमध्ये मोठा बदल

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखाहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर पंतप्रधान धनधान्य योजनेची पण घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तर कृषी क्षेत्रात आता आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे. त्यानुसार, तेलबिया आणि डाळी उत्पादनात आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे बजेट कधी? अजित पवारांकडून थेट घोषणा, म्हणाले…

0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गींना मोठं गिफ्ट दिलं. निर्मला सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून आठव्यांदा अर्थसंकल्प माडंताना विविध क्षेत्रांसाठी भरभरून आर्थिक तरतुदी केली आहे. अर्थमंत्र्यांनी उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञानासह कृषी क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी केल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना झुकतं माप देण्यात आलं आहे. तसेच गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केली आहेत.

केद्रींय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलचीही घोषणा केली.

“लाडक्या बहि‍णींचाही विचार करणार”

“मी केंद्राचं बजेट अजून ऐकलेलं नाही. पण तुमच्या राज्याचे बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे. त्यावेळी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा विचार करुनच अर्थसंकल्प मांडणार आहे. माझ्या लाडक्या बहि‍णींचाही मी विचार करणार आहे. तरुण तरुणींचाही विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम”

“मी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम घेत आहे. जे पुणेकरांना मिळतंय ते बारामतीमध्ये मिळालं पाहिजे. बारामतीमध्ये आधुनिक मॉडर्न किचन निर्माण होत आहे. बारामतीकरांनो फलटण चे बाहेर येऊन बारामतीमध्ये व्यवसाय करत आहेत”, असेही अजित पवार म्हणाले.

नवीन कर रचना कशी?

उत्पन्न कर

0 ते 12 लाखांपर्यंत कर नाही

12 ते 16 लाखांपर्यंत 15 टक्के

16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के

20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के

24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के

4 लाखांपर्यंत करमुक्त

गेल्यावर्षी 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. यंदा नवीन आयकर प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता 4 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर एक रुपयाही भरावा लागणार नाही. पण ही घोषणा केवळ नवीन आयकर प्रणालीनुसार कर जमा करणाऱ्या करदात्यांनाच मिळणार आहे.