Home Blog Page 217

राज ठाकरे यांचे सरकारला आवाहन; म्हणाले, मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे…

0

मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकवले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. महापुरुषांना जातीपातीत अडकवू नका. महाराष्ट्राला जातीपातीच्या संकटातून मुक्त करायला हवं असंही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत पुण्यात तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. विश्व मराठी संमेलनाचा समारोप झाला. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. असं राहिल तरच जग आपल्याला दाद देतात. बाकीची राज्य आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगत असतील तर आपणही अशीच भूमिका घेतली पाहिजे. देशात आजपर्यंत कोणत्याही राज्याचे राज्यगीत नाही. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याचे राज्यगीत आहे. इतिहास म्हणजे भूगोल. कोणीही एखादा भूभाग मिळवल्यानंतर बनतो तो इतिहास. भूगोलाशिवाय इतिहास नाही. प्रगतीच्या नावावर जमीन जात असतील तर त्याला विकास म्हणत नाही. विकासाच्या नावावर जमीनी जाणार असतील तर याला विकास म्हणता येणार नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

इतिहासातून आपण काही घेणार नसलो तर इतिहास न वाचलेला बरा. 370 कलाम काश्मिर मधून रद्द झाले. याचा अर्थ काय? भारतीय माणूस काश्मिर मध्ये घर खरेदी करु शकतो. हे फक्त काश्मिरमध्ये नाही तर हिमाचल प्रदेश, आसाम, मणीपुर येथे जमीन घेऊ शकत नाही. आपणच का मोकळीक दिली आहे. महाराष्ट्रात कुठेच कसे निर्बंध का नाही अस सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

सरकारने मराठी भाषे प्रमाणे मराठी माणसाचे देखील अस्तित्व टिकवले पाहिजे. साहित्यीकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. पूर्वी साहित्यीक विविध विषयांसह राजकारणावर देखील आपली मत मांडत होती. आता देखील साहित्यीकांनी राजकारणाविषयी आपली मतं मांडली पाहिजते. तरुणांना वाचनाची गोडी लागली लागली पाहिजे. प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. मराठी भाषेची अस्मिता टिकली पाहिजे. नाही तर या असल्या संमेलनाला काही अर्थ नाही. मराठी भाषा, मराठी पुस्तकांचा प्रचार झाला पाहिजे. महाराष्ट्रतील प्रत्येकाने मराठी भाषेची अस्मिता टिकवली पाहिजे. जाती पातीमधून महाराष्ट्र बाहेर येणे गरजेचे आहे.

शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड निलंबित; लाथ मारणं, हुज्जत घालणं भोवलं…

0

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घालणं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या दोघांवर कठोर कारवाई केली आहे. कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. परिषदेचा हा निर्णय दोन्ही पैलवानांसाठी अत्यंत मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयावर आता शिवराज आणि महेंद्र काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पंच अडून बसले
दरम्यान, अंतिम सामना पार पडल्यानंतर पंचांनीही आक्रमक भूमिका घेतली. शिवराज राक्षेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आखाड्यातून उठणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिला. तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जागचं हलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर एक कोटी देईन
दरम्यान, पंचाच्या निर्णायवर शिवराज राक्षेने जोरदार आक्षेप घेतला आहे. माझे दोन्ही खांदे जमिनीला टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. तुम्ही रिमो बघितला नाही. डायरेक्ट निर्णय देऊन टाकला. माझी अपिल चेक करायला हवी होती. ही कुस्ती नव्हतीच. हा निर्णय योग्य नाही. हा निर्णय जर योग्य असेल तर मी 1 कोटीचं बक्षीस द्यायला तयार आहे, असं आव्हानच शिवराज राक्षेने दिलं आहे.

बोलून नाही, करून दाखवणार
दरम्यान, यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझं आज स्वप्न पूर्ण झालं आहे. आजोबांनी मला लहानपणापासून डाव शिकवले. कुस्ती शिकवली. आमच्या घरातील मोठ्या लोकांनीही कुस्तीचं बाळकडू दिलं. त्याचंच हे फळ मिळालं आहे, असं पृथ्वीराज मोहोळ म्हणाला. कुस्तीतील वादावरही त्याने भाष्य केलं आहे. वाद घालणारा मोठा पैलवान आहे. ते डबल केसरी पैलवान आहेत. पण मी त्या घटनेचा निषेध करतो. सिकंदर यांच्या कुस्तीनंतर वाद झाला होता. मात्र, शांत राहून पुन्हा जिंकलो. आता मी पुढची तयारी करत आहे. मी पुढे काय करणार हे बोलून दाखवणार नाही, तर करून दाखवणार आहे, असंही त्याने सांगितलं.

सकाळपासून देवासमोर बसून होते पण… पंचाच्या निर्णयावर शिवराजच्या आईची भावुक प्रतिक्रिया, वडील म्हणाले…

0

पुणे : पैलवान शिवराज राक्षे याच्या रौद्रावतारामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले. पंचाचा निर्णय मान्य न झाल्याने त्याने पंचांची कॉलर पकडून लाथ मारली. मात्र माझी पाठ टेकलेली नव्हती, किंबहुना दोन्ही खांदे टेकलेले नव्हते. पंचांकडे दाद मागूनही त्यांना फेटाळल्याने मला राग अनावर झाला. त्यांनी माझ्यावर अन्याय केल्याने राग अनावर झाल्याने मी लाथ मारली, असे शिवराजने माध्यमांना सांगितले. शिवराजच्या वर्तनावर आणि पंचांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवराजच्या आईनेही लेकावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली आहे.

वाडिया पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे अंतिम तीन सामना संपन्न होण्याआधीच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामन्यादरम्यान तुफान राडा झाला.

शिवराजची आई काय म्हणाली?

शिवराजच्या महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी सकाळपासून देवासमोर बसून प्रार्थना केली मात्र पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजवर अन्याय झाली, अशी भावुक प्रतिक्रिया शिवराज राक्षेच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली.

शिवराजच्या कुस्तीचा निकाल चुकीचा दिला गेलाय. हवे तर पुन्हा कुस्ती खेळवावी. कायमच माझ्या लेकावर अन्याय का होतो? तो तिसऱ्यांदा विजेता होईल म्हणून त्याच्यावर अन्याय केलाय का? अशी विचारणा शिवराजच्या आईने केली.

शिवराजचे वडील काय म्हणाले?

शिवराजने पंचांना लाथ मारली, असे वारंवार सांगण्यात येते. पण चांगल्या पैलवानावर अन्याय करून त्याला बदनाम करण्याचे कारण काय? असा सवाल शिवराजच्या वडिलांनी विचारला.

मैदानात नेमकं काय घडलं?

पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात रोमहर्षक सामना सुरू असताना मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित करून सामना पृथ्वीराजने जिंकल्याचे घोषित केले. पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोषाला सुरुवात केली.

रागाने लालबुंद झालेल्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडून लाथेने मारले

त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडली. एवढ्यावरच न थांबता त्याने पंचांना लाथही मारली. शिवराज आणि पंचांमध्ये झटापट सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर मध्यस्थी केली.

माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले?

माझे दोन्ही खांदे टेकलेच नाहीत, माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले? अशी विचारणा शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तुम्ही निर्णय देताना खेळ भावना दाखवली नाही, अशी तक्रार शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तसेच पंचांनी माझ्यावर अन्याय केल्याची भावना शिवराज राक्षेने बोलून दाखवली.

महाराष्ट्र केसरी गदेवर पृथ्वीराज मोहोळचे नाव, अगोदर राक्षे प्रताप अन् नंतर अंतिम फेरीत महेंद्रच पलायन ‘काका’ च्या मर्यादा उघड?

0

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला. महेंद्र गायकवाड याने निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले. पंचांसोबत हमरीतुमरी झाल्यानंतर महेंद्र गायकवाड उघडा होऊन मैदानाबाहेर गेला. पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.

पाच मिनिटे रंगलेल्या या कुस्तीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने टाकलेले डाव यशस्वी ठरले. या डावात महेंद्र गायकवाड फसला आणि त्याने मैदान सोडलं. इतकंच काय तर पंचांच्या निर्णयावरही आक्षेप घेतले. दुसरीकडे, पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि त्याला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली. पृथ्वीराज मोहोळ याने विजयानंतर आनंद व्यक्त केला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. दुसरीकडे, शिवराज राक्षेवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या असेल, अशी भूमिका पंचांनी घेतली होती. पण मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अनेक निर्णय गेल्या काही काळात वादग्रस्त ठरले. ते वादग्रस्त निर्णय कोणते ते पाहुयात,

विकी बनकर विरुद्ध सईद चाऊस

विकीला विजयी घोषित केल्याने वाद

——

अभिजीत कटके विरुद्ध किरण भगत

कटकेला विजयी घोषित केल्याने वाद

  • ——-

सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड

महेंद्र गायकवाडला विजयी घोषित केल्याने वाद.

भारताचा इंग्लंडवर 150 धावांनी दणदणीत विजय; फिलिप सॉल्टचे अर्धशतक व्यर्थ

0

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी- 20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने 37 चेंडूत शतक ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजाची पिसे काढली. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना अभिषेक शर्माचा झंझावात सुरु होता. या सामन्यात भारताने इंग्लंडवर 150 धावांनी विजय मिळवला आहे. 248 धावांचा पाठलाग करताना इंग्लडच्या संपूर्ण संघाला अवघ्या 97 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 4-1 ने ही मालिका जिंकली आहे.

भारताने या सामन्यात पॉवर प्लेमध्ये 95 धावा करत रेकॉर्ड नोंदवला आहे. तसेच भारताने 6.3 षटकात म्हणजेच 39 चेंडूत शतक ठोकलं. तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक ठोकत वेगवान शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्मा 54 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 250 चा होता.

अभिषेक शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिले होते. संजू सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने 15 चेंडूत 24 धावा केल्या. सूर्यकुमार यादव या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त 2 धावाच करता आल्या. पण शिवम दुबेने 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या माध्यमातून 30 धावा केल्या. हार्दिक पटेल आणि रिंकु सिंह प्रत्येकी 9 धावांवर बाद झाले.

या सामन्यात इंग्लडचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याने जोरदार प्रतिकार केला मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. फिलिप सॉल्ट आणि जेकब बेथेल सोडले तर इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आलेली नाही. या सामन्यात भारताकडून वरुण चक्रवर्तीने 2, अभिषेक शर्माने 2, शिवम दुबेने 2, मोहम्मद शामीने 3 तर रवी बिष्णोईने 1 विकेट घेतली.

मराठी भाषेसाठी आम्ही काही केलं तर केसेस टाकू नका… पाठिंबा द्या, व्यासपीठावरच राज ठाकरेंनी मंत्र्याला बजावलं

0

मराठी विश्व संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेच्या संवर्धनावर भर दिला. तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत मराठी भाषा, तिच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला. मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी साहित्यिकांना समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले, सरकारला मराठी माणसांचे हक्क जपण्यास सांगितले आणि तरुण पिढीला मराठी वाचनसंस्कृती जोपासण्याचा सल्ला दिला.

“मी कसा इथे?” – राज ठाकरेंनी स्पष्ट केली उपस्थिती

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल अंदाजात म्हटले, “तुमच्या मनात प्रश्न असू शकतो की, मी इथे कसा आलो? पण उदयजींनी मला आग्रह केला आणि मी आलो.” या विधानाने उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली.

राज ठाकरे यांनी भाषेच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “आपली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आपण जर आपल्या भाषेबाबत ठाम राहिलो, तरच जग आपल्याला किंमत देईल.”

त्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचा उल्लेख करत विचारले की, “कुठल्या राज्याचे असे स्वतंत्र गीत आहे?” यावरून त्यांनी महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि इतिहासाचा पुनरुच्चार केला.

मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ठाम भूमिका

“मराठी माणसाचं अस्तित्व जपायला हवं. राज्य सरकारने शहरांमध्ये मराठी माणसांना स्थान मिळवून द्यायला हवं,” असे म्हणत त्यांनी मराठी बांधवांच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय असूनही जमीन खरेदी करता येत नाही, मग महाराष्ट्रात बाहेरचे लोक सहज जमिन का विकत घेतात?” या विधानातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुरस्कार आणि तिरस्काराचा मुद्दा

“अभिनेत्यांना पुरस्कार मिळतात, पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो,” असे म्हणत त्यांनी कलाकार आणि राजकारण्यांच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिसादांवर भाष्य केले. त्यांनी उपस्थित साहित्यिकांना विनंती केली की, “साहित्यिकांनी समाजासाठी योग्य दिशा दाखवली पाहिजे. राजकीय मतं मांडणं गरजेचं आहे.”

मराठी भाषेसाठी ठोस भूमिका –

राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठी भाषेसाठी काही करत असू, तर त्याला पाठिंबा द्या, केसेस टाकू नका.” राज ठाकरे यांनी तरुणाईला वाचनसंस्कृती वाढवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “संमेलनातून बाहेर पडताना प्रत्येकाने किमान १० पुस्तके विकत घ्यावीत.”

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर नवीन चित्रपट

त्यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या चित्रपटाचा उल्लेख करत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येत आहे. यानंतर संभाजी महाराजांवरही नवीन चित्रपट येणार आहे.”

जातीयवादाचा निषेध –

राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका करत म्हटले की, “आपल्या महापुरुषांना जातीपातीमध्ये अडकवू नका. प्रत्येक महापुरुष हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.”

जनतेचा विश्वास महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प सार्थ ठरवेल : अजित पवार

0

महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प जनतेचा विश्वास सार्थ ठरवेल. त्यामध्ये शेतकरी, मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी, उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या अधिपत्याखालील सादर होणार अर्थसंकल्प जमेचा ठरणार आहे. याशिवाय यंदाच्या बजेटमध्ये शेती आणि शेतीपुरक व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी आर्टीफिशल इंटॅलिजन ( एआय) तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी पथदर्शी प्रकल्पाला पुरेशी तरतुद केली जाईल, अशी माहिती स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली.

शिरष्णे (ता.बारामती) येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने उभारलेल्या दूध बल्क कुलरच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतूदीचा महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आणि विशेषतः मध्यमवर्गींच्या भल्यासाठी निर्णायक ठरणार आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, “ मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला आहे.

प्रधानमंत्री मोदी साहेब यांचे यावरून महाराष्ट्रावर विशेष लक्ष असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांहून १ लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्यानं ही औषधं स्वस्त होणार आहेत. महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे.

सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, तसेच आयआयटीमधील, मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा महाराष्ट्रातील युवकांना निश्चितपणे होईल,“ अशी माहिती पवार यांनी सांगितली.

ऊस शेतीवर कृत्रिम बुद्धीमत्तेची (एआय) भूमिका वरदान ठरणार आहे, असे सांगून पवार म्हणाले की बहुमतांशी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढलेली आहे आणि उसाच्या क्षेत्रातील उत्पन्न मात्र घटत चालले आहे. त्यामुळे यापुढील काळात कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न काढणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी यापुढे एआय तंत्रज्ञान शिवारात विकसित करणे खूप महत्वाचे आहे.

यासंबंधी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात मोठे काम उभे झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे एकरी दीडशे टन ऊस उत्पन्न मिळू शकते, असे प्लाॅट राज्यातील शेतकऱ्यांना कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून पहावयास मिळाले आहेत. अर्थात या प्रक्रियेला चालना देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये भरिव तरतूद करण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी सोमवार (ता.३) रोजी मुंबई-मंत्रालयात कृषीसह संबंधित विभागाची बैठक बोलविली आहे.

साखर निर्यातीमुळे दर वाढ

१० लाख मे. टन साखर निर्यातीला केंद्राकडून परवानगी मिळाली आणि सध्याला साखरेचे प्रतिक्विंटल दर ३५०० च्या पुढे जाऊ लागले आहेत. यापुढील काळात निर्यातीचे धोरण राबवविले जाणार व एमएसपी वाढविण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे शेतकरी भावांनो माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २८०० रुपये जरी दिला असला, तरी विशेषतः माळेगाव आणि सोमेश्वरचे प्रशासन अंतिम ऊस दर सर्वाधिक काढेल. यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!

0

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध घेतलेल्या कठोरतेचा परिणाम अमेरिकेत दिसून येत आहे. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर 11 दिवसांत 25 हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले.ट्रम्प यांच्या आईस टीमने (इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट) 12 राज्यांमध्ये छापे टाकले. वृत्तानुसार, सर्वाधिक छापे रिपब्लिकन राज्यांमध्ये झाले आहेत. यापैकी 1700 अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.

18 हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीसाठी निवड

यापूर्वीच 18 हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीसाठी निवड करण्यात आली आहे. या काळात मेक्सिको सीमेवरून घुसखोरीच्या घटनांमध्ये 64 टक्के घट झाली आहे. बिडेन यांच्या कार्यकाळात, यावर्षी 1 ते 19 जानेवारी दरम्यान दररोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडल्या, तर ट्रम्प यांच्यानंतर या वर्षी 20 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत दररोज सरासरी केवळ 126 घुसखोरीच्या घटना घडल्या.

ट्रम्प यांनी कॉलेज-विद्यापीठाची नऊ हजार कोटींची सबसिडी बंद केली

अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांना DEI (विविधता, समानता आणि समावेश) कार्यक्रमांतर्गत 9,000 कोटी रुपयांची सबसिडी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. DEI कार्यक्रम गैर-गोरे, महिला, ट्रान्सजेंडर आणि अपंग विद्यार्थ्यांना संशोधन आणि इतर प्रकल्पांसाठी सरकारी अनुदान प्रदान करतो. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात DEI कार्यक्रम थांबवला. त्यामुळे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अमेरिकेतील एकूण 32 लाख फेडरल कर्मचाऱ्यांपैकी 8 लाख कर्मचारी DEI कार्यक्रमांतर्गत काम करतात. त्यापैकी सुमारे एक लाख भारतीय आहेत. यामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व धारण केलेल्या आणि H-1B व्हिसासारख्या वर्क व्हिसावर काम करणाऱ्यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांना DEI संपवायचे आहे आणि गोऱ्या लोकांसाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अधिक संधी वाढवायची आहेत. अमेरिकेच्या 35 कोटी लोकसंख्येपैकी 20 कोटी लोक गोरे आहेत. यातील बहुतांश ट्रम्प यांची कोअर व्होट बँक मानली जाते.

 

बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून निकाराग्वाला पाठवले

ट्रम्प सरकारच्या ताज्या कारवाईत अटकेत असलेल्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत. मेक्सिकोच्या सर्वाधिक 9226 अवैध स्थलांतरितांना पकडले आहे. दुसऱ्या स्थानावर हैतीचे 7600 बेकायदेशीर स्थलांतरित होते, तर तिसऱ्या स्थानावर निकारागुआचे 4800 अवैध स्थलांतरित होते. अमेरिकेत 11 दशलक्ष अवैध स्थलांतरित आहेत. सर्वाधिक 40 लाख मेक्सिकन आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर 7.25 लाख भारतीय आहेत.

वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, बापाला खांद्यावर घेऊन मोहोळचा जल्लोष; काकापर्वाच्या मर्यादा अन् खालकर तालीमचा उदय

0

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत मैदान मारलंय. पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली. यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला. तर दुसरीकडे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत वडिलांना खांद्यावर घेऊन मोहोळने मैदानात जल्लोष केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा झाल्यापासून अंतिम लढतीत विजय होण्यापर्यंत सर्वत्रच पुण्यातील काका पवार यांच्या मल्लांचा दबदबा कायम पाहण्यास मिळाला आहे. परंतु ज्या ज्या वेळी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये काका पवार यांच्या मल्यांना मल्लांना धोका निर्माण होतो त्या त्यावेळी सामूहिक प्रकारे वेगवेगळे गोंधळ घालण्याचे हातखंडे यापूर्वीही राबवण्यात आल्यामुळे अहिल्यानगरच्या कुस्ती आयोजनामध्येही त्याचे दर्शन झाले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड – पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड याने अचानकपणे मैदान सोडल्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केलं, मोहोळ यांना विजयी घोषित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांचे हस्ते गदा देऊन मोहळचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर माझ्या आजोबांचं वडिलांचं आणि माझं स्वप्न ही पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहळने दिली आहे.

कुस्ती क्षेत्रामध्ये काका पवार यांचे अमूल्य योगदान असले तरीसुद्धा मागील काही काळापासून कुस्ती आयोजनामध्ये आपला दबाव कायम राखण्यामध्ये प्राधान्य देण्यात मशगुल असल्याचे पाहण्यास मिळाले. गादी विभागातील त्यांच्या मल्लाने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे. तर अंतिम सामन्यामध्ये वारंवार अडथळा आणण्याची रणनीती आखत काका पवार यांच्या चमूने अंतिम सामन्याच्या लढतीमध्ये कायम आक्षेप घेण्याची भूमिका घेतली खरी परंतु संबंधित सामना आपल्या हातातून जाणार याची लक्षणे दिसू लागल्यानंतर अत्यंत मानाच्या असलेल्या महाराष्ट्र केसरी लढतीतूनच पळ काढण्याचे काम केल्यामुळे काका पवार यांच्या अधिपत्याखाली कुस्तीचे कोणते धडे शिकवले जातात हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण आहे पृथ्वीराज मोहोळ?

पृथ्वीराज मोहोळ हा पुण्यातील खालकर तालीमचा पैलवान आहे. पुण्यातील कुमठेकर रोडवर खालकर तालिम आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ झाला. पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेने पंचावर पराभवाचं खापर फोडलं. त्याला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला. यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय. या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये काका पवार यांच्या दोन्ही मल्लांनी केलेल्या कृत्यामुळे कुस्ती शौकनांची मात्र नाराजी झाली.

माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो : राक्षे

पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोप शिवराज राक्षेने केला. माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षेने केला. तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेने केली. माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो, असे राक्षे म्हणाला.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेवारीच सांगितली

0

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच अर्थमंत्री म्हणून आठव्यांदा अर्थसंकल्प माडंताना निर्मला सीतारमन यांनी विविध क्षेत्रांसाठी भरभरून आर्थिक तरतुदी केल्या. यावेळी त्यांनी उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या तरतुदी केल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. तसेच गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केली.

निर्मला सीतारमन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून महाराष्ट्रासाठी काय तरतुदी करण्यात आल्या असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, याबद्दलची संपूर्ण आकडेवारी सांगितली आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1885649743260381327?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1885649743260381327%7Ctwgr%5E5f0c7a4fd293a7eecd1f3a6e9e05dc27332cc7fa%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fbudget%2Fcm-devendra-fadnavis-share-tweet-date-how-much-funding-maharashtra-receive-see-details-1343107.html

देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र! (टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)

– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी

– पुणे मेट्रो : 699.13 कोटी

– एमयुटीपी : 511.48 कोटी

– एमएमआरसाठी एकात्मिक हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी

– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी

–  इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी

– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी

– महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी

– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी

– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी

– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अजित पवारांकडून समाधान व्यक्त

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्राला किती निधी मिळाला, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले.