Home Blog Page 207

पुणे शहर वाहतूक कोंडीतून होणार सुटका! खेड शिवापूर ते रावेत नवीन सेवारस्ता, ३२ किलोमीटर ६०४ कोटींचा खर्च

0

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेतदरम्यान ३२.४ किलोमीटर लांबीचा नवीन सेवारस्ता तयार होणार आहे. दोन मार्गिका असणारा हा रस्ता असून, यासाठी ६०४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाने याला मंजुरी दिली आहे.

मार्च २०२५ पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासाठी ९० टक्के भू-संपादनाचे काम पूर्ण केले आहे, तर उर्वरित १० टक्के पुणे महापालिका भू-संपादन करत आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी कमी होणार आहे.

नऱ्हे, नवले पूल, वारजे, चांदणी चौक व रावेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची होणारी कोंडी व नऱ्हे, नवले पुलाच्या परिसरात अपघाताचे प्रमाण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता तयार करणार आहे. एका बाजूच्या सेवा रस्त्यावर दोन मार्गिका असणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे.

सध्या या रस्त्यावरून दररोज सुमारे दोन लाख १० हजार वाहनांची वाहतूक होते. या सेवा रस्त्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. खेड शिवापूर ते रावेत असा प्रवास करण्यासाठी सध्या ४५ मिनिटे ते एक तास वेळ लागतो. सेवा रस्त्यामुळे वेळेत बचत होण्यास मदत होईल.

तीन टप्प्यांत काम

१. खेड शिवापूर ते कात्रज नवीन बोगदा

२. वारजे ते बालेवाडी

३. वाकड ते रावेत

असा असेल प्रकल्प

१. खेड शिवापूर ते रावेतदरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूने ३२.४ किलोमीटर लांबीचा सेवारस्ता

२. दोन्ही बाजूने दोन मार्गिका

३. एक मार्गिका ३.५ मीटरची असणार

४. रोज किमान एक लाख वाहनांना याचा थेट फायदा

असा होईल फायदा

मुख्य मार्गावरील वाहतूक कमी होईल, परिणामी वाहतूक कोंडी टळेल

लहान वाहनांसाठी व स्थानिक रहिवाशांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार

अपघाताचे प्रमाण कमी होईल

प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी वाचेल

इंधनात बचत

वाहतूक जलद होण्यास मदत

भू-संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मार्च महिन्यापासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

– सुभाष घंटे,

वरिष्ठ अभियंता,

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

झुकेगा नहीं साला….उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने माफीनाम्यावर सही करण्यास दिला नकार, पत्रात नक्की काय लिहिलं होतं?

0

अहिल्यानगर इथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. मात्र या अंतिम लढतीतील पंचांचा निर्णय न पटल्याने महेंद्र गायकवाडने  दुसऱ्या फेरीनंतर कुस्तीत सहभागी होण्यास नकार दिला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले आणि महेंद्र गायकवाडवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.

आज महेंद्र गायकवाड पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु गर्जना चषक कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकार्यांनी त्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या प्रकाराबद्दल लिखित स्वरुपात माफी मागायला सांगितलं.

महेंद्र गायकवाडच नाव असलेलं माफीनाम्याचे पत्र कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकार्यांनीच तयार करुन ठेवले. त्यावर महेंद्रला सही करायला सांगण्यात आले. मात्र महेंद्रने त्याला नकार दिला. असं राजकारण होत राहिलं तर कुस्ती संपायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिलीय.

माफीनामा पत्रात काय लिहिले होते?

माफीनामा पत्रात लिहिले होते की, मी नुकत्याच अहील्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापुर जिल्हा कुस्तीगीर संघाकडुन महाराष्ट्र केसरी माती विभात सहभागी झालो होतो. माती विभागामध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला, त्यानंतर महाराष्ट्र केसरी कीतावासाठी माझी लढत पृथ्वीराज मोहोळ सोबत झाली. या लढतीमध्ये कुस्ती संपण्यास 16 सेंकद वाकी असताना माझ्याकडुन गैरसमजुती कुस्ती सोडुन देण्यात आली. तसेच कुस्ती संपल्यानंतर माझ्याकडुन पंचाना मोठ्या आवाजात अरेरावी करण्यात आली, सर्व प्रकार माझ्या गैरसमजुतीमधुन झाला असुन मी त्यावर दिलगिरी व्यक्त करतो.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असुन 3 वर्षासाठी बंदी करण्यात आलेली आहे. मी आपणास या पत्राव्दारे विंनती करतो की आपण पुणे येथे होत असलेल्या राज निमंत्रित हिंदु गर्जना चषक या स्पर्धेत सहभाग घेण्यास परवानगी द्यावी.

वाघोली परिसरात सगळ्यात खतरनाक प्राणी आढल्याने खळबळ; रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

0

पुण्यातील वाघोली येथील ग्रीन सनराईज हिल परिसरात आज सकाळी एक भारतीय हायना दिसून आला. हा हायना आईव्ही निया सोसायटी परिसराजवळ भटकताना दिसल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. ग्रीन सनराईज हिल ग्रुपच्या सदस्यांनी सकाळी ७:३० वाजता या हायनाला पाहिले आणि त्याची माहिती पुणे पल्सला दिली. वनविभागाला या घटनेची तत्काळ माहिती देण्यात आली असून, योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

रहिवाशांच्या मते, हा हायना जखमी असण्याची शक्यता आहे. परिसरात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असावा, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. ग्रीन सनराईज हिल हा परिसर फिटनेस प्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा हायना वाघोली भागात पहिल्यांदाच दिसला असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नागरी वसाहतीजवळ वन्यजीवांचे अस्तित्व वाढत असल्याचे हे संकेत असल्याचे काही पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वनविभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक्झिट पोलनंतर ‘आप’चा पोल, उमेदवारांचा केजरीवालांना ग्राऊंड रिपोर्ट, एवढ्या जागा जिंकणार?

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे एखादा अपवाद वगळता सर्वच एक्झिट पोल हे भाजपचे सरकार येणार असेच स्पष्ट करत आहे. उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे उद्या दिल्लीत आप हॅट्ट्रीक करणार की भाजप २७ वर्षांनी दिल्ली काबीज करणार हे कळणार आहे. दरम्यान आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये आज एक बैठक पार पडली त्यात उमेदवाराकडून माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. असे पक्षाचे नेते गोपाल राय यांनी सांगितले.

आपला किती जागा मिळणार?

आपच्या रिपोर्टनुसार दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी होणार आहेत. पक्षाला ५० हून जास्त जागा मिळतील. तसेच ७ ते ८ जागांवर कडवी लढत होणार असून या जागांवरही आपला जिकंण्याची आशा आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला ७० पैकी ६२ जागा मिळाल्या होत्या. २०१५ मध्ये आपला ६७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला होता.

विरोधी पक्षाकडून एक्झिट पोलचा वापर

शनिवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी सर्व उमेदवारांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील रिपोर्ट सादर केला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. त्यांनी आरोप लावला की विरोधी पक्ष ऑपरेशन लॉटस ला पूर्णत्वास आणण्याच्या प्रयत्नात मानसिक दबाब बनवा म्हणून एक्झिट पोलचा वापर करत आहे.

या बैठकीनंतर पक्षाचे नेते गोपाल राय यांनी पत्रकांरांशी बोलताना सांगितले की, केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी ग्राऊंड रिपोर्ट सादर केले. जे सूचित करत आहेत की आप ५० हून जास्त जागांवर निर्णायक विजय मिळवत आहे. तर, ७ ते ८ जागांवर कडवी लढत होणार आहे. राय यांनी दावा केला की विरोधी पक्ष एक्झिट पोल चा वापर करुन चुकीची आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘एक्झिट पोलच्या माध्यमातून विरोधी पक्ष आपण सत्ता स्थापन करत आहोत हे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, विरोधी पक्ष पैसे आणि मंत्रिपदाच्या ऑफरचा फोन करत आहेत.

2019 ते 2024 एकूण 34 लाख मतदार नोंद मात्र  5 महिन्यात तब्बल 39 लाख नव मतदार नोंद कुठून आली? राहुल गांधींचा सवाल

0

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. मात्र, ही निवडणूक अनेकांची अंदाज चुकवणारी ठरली. या निवडणुकीमध्ये EVM हॅक केले गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला आणि अत्यंत गंभीर आरोप केले.

राहुल गांधी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.  2019 ते 2024 दरम्यान राज्यात 34 लाख मतदार नोंदवले गेले. मात्र,  तब्बल 39 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदवले गेले. विधानसभेपूर्वी सहभागी झालेले हे 39 लाख मतदार कोण आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी  उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला या 39 लाख मतदारांची यादी नाव, पत्ता आणि फोटोसह द्यावी अशी मागणी आम्ही करतोय. मात्र, निवडणूक आयोग आम्हाला ही यादी देत नाही असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, महाराष्ट्र सरकारच्या आकड्यांनुसार राज्यात 18+ असलेली लोकसंख्या 9.54 कोटी आहे. तर निवडणूक आयोगानुसार 9 कोटी 70 ला लोकांनी मतदान केलं. त्यामुळे प्रौढ नागरिकांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

कामठी विधानसभेचं उदाहरण

राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले, काँग्रेसला 1.36  लाख मतदान मिळालं. लोकसभेलाही 1.34 लाख मिळालं.  मात्र, लोकसभेत भाजपला 1.19 ला मतदान मिळालं. 35 हजार नवे मतदार सहभागी झाले होते आणि नवे पूर्ण मतं  भाजपला मिळाले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले. “महाराष्ट्रात आमची मतं कमी झाली नाहीत. भाजपची मतं वाढली आहे. आम्ही आरोप करत नाही, पण आम्हाला मतदारांची यादी हवी आहे. लोकसभा आणि विधानसभेची यादी नाव, पत्ता, फोटोसह द्या. हे तुम्ही का देत नाहीत?”

कपोकल्पित बातम्या देऊन तुमची विश्वसाहर्ता कमी करु नका… ‘मुलगा निवडून आणता आला नाही अन्.’, राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

0

जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला घेणे देणे नाही. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही.यावेळी आम्ही कष्ट घेतले होते. मेहनत केली होती. लोकसभेत आम्हाला केवळ एक जागा मिळाले. मागेही एका लोकसभा निवडणुकीत माझ्या मुलास निवडून आणता आली नाही. या लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला होता. त्यावर अजित पवार यांनी या शब्दांत त्यांना आरसा दाखवला.

लाडकी बहीण पैसे परत घेणार नाही

लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि जाहीर केली. या योजनेचा लाभ २ लाख ५० हजार उत्पन्न असणाऱ्यांना द्यायचा होता. त्याचा लाभ अपात्र लोकांनी घेतला असला तरी त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून परत घेण्यात येणार नाही. महिलांना कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस कारवाई करणार

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर जनतेतून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होत आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल असे विधान करायला नको होते. पोलीस त्याची चौकशी करून कारवाई करतील. राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी आता चौकशीसाठी स्वतःची टीम लावावी. शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. यामुळे त्यांचे रडगाणे सुरु आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

शिवभोजन थाळी बंद केल्याच्या बातम्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, अजून अर्थसंकल्प मांडला नाही. त्यापूर्वीच तुम्ही शिवभोजन थाळी बंद असल्याच्या बातम्या देत आहे. 26 जानेवारी रोजी राज्यात 21 जिल्हे होणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नव्हती. तुमची विश्वसाहर्ता कमी करु नका. कपोकल्पित बातम्या देऊ नका, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

विधानसभा निवडणूक निकालाआधीच दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ; अरविंद केजरीवाल यांच्या घरी ACBची टीम धडकली

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून फोन आल्याबद्दल आणि १५ कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याबद्दल आप नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर, एसीबीची पथके आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीचे पथक आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे.

केजरीवाल यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता, भ्रष्टाचार विरोधी शाखेचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे आणि केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकासोबत बसले आहे. दरम्यान, एसीबी कार्यालयात संजय सिंह यांचे जबाब नोंदवले जात आहेत. एसीबीने एकूण ३ टीम तयार केल्या आहेत. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मार्फत सखोल चौकशी करावी, असे एलजीने म्हटले आहे.

भाजप नेत्याने केली होती चौकशीची मागणी

दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना पत्र लिहून अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी आपच्या ७ विद्यमान आमदारांना १५ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आणि एफआयआर नोंदवण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि इतर कोणत्याही तपास संस्थेला निर्देश देण्याची विनंती केली आहे.

आप नेते संजय सिंह म्हणाले, “मी माझ्या वकिलाकडे तक्रार करण्यासाठी आलो आहे. भाजप आमदारांच्या घोडेबाजारात सहभागी आहे आणि त्यांनी आमच्या आमदारांना आणि मंत्र्यांना प्रत्येकी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. मी भाजपविरुद्ध तक्रार करण्यासाठी एसीबी कार्यालयात आलो आहे.”

संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, एसीबी भाजपच्या तक्रारीची वाट पाहत होती का? जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर कोणतीही कारवाई का केली गेली नाही? आतापर्यंत १६ हून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे, आम्ही एकाचा नंबर जाहीर केला आहे. जर एसीबीने यावर कारवाई केली तर आम्ही अधिक माहिती देऊ. आपच्या कायदेशीर कक्षाचे प्रमुख संजीव नसियार म्हणाले, “एसीबी टीमकडे कोणत्याही प्रकारची कोणतीही सूचना नाही. ते आल्यापासून ते सतत फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत.” असे नासियार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांच्याकडून दहा हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी

0

मुलाच्या विवाहानिमित्त उद्योगपती गौतम अदाणी यांनी दहा हजार कोटी रुपये समाज कार्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. जीत गौतम अदाणी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाणार आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम वापरण्यात येणार आहे. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील.

मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, ‘परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे.’

अहमदाबाद मधील अदाणी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लब मध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला. हिरे व्यापारी जैमिन शहा याची दिवा ही कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. यासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती.

पुण्यातील विद्यार्थ्यांनी स्मार्ट व्हीलचेअरचे अनावरण केले

0

टेकव्हिजन २०२५: STEM शिक्षण आणि नवोन्मेषाचा ऐतिहासिक टप्पा

पुण्यातील विद्यार्थ्यांनी स्मार्ट व्हीलचेअरचे अनावरण केले

पुणे, ६ फेब्रुवारी २०२५ – टेकव्हिजन २०२५, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या STEM उपक्रमाने एड्युकॉन्क्लेव्ह २.० मध्ये महत्वपूर्ण छाप सोडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात, प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या (भारत सरकार) अंतर्गत पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या सहकार्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सादर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले.

फक्त दुसऱ्या वर्षातच, प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाशी भागीदारी करून टेकव्हिजन संस्थात्मक स्वरूपात स्वीकारले गेले आहे. यावर्षीच्या प्रदर्शनास १०० हून अधिक STEM शिक्षकांनी भेट दिली तसेच पुण्यातील १४ सरकारी आणि अनुदानित शाळांमधील १०००+ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे विद्यार्थी हँड्स-ऑन STEM शिक्षणामुळे त्यांचे जीवन कसे बदलत आहे, याचा उत्कृष्ट प्रत्यय देत होते.

एक अन्य महत्त्वाचा शोध म्हणजे स्मार्ट व्हीलचेअर, जो पुण्याच्या प्रथमेश सोनवणे आणि सार्थक अर्जुन यांनी विकसित केला आहे. रिमोट नेव्हिगेशन आणि अडथळा ओळखण्याच्या तंत्रज्ञानासह, हे उपकरण दिव्यांग व्यक्तींना मुक्तपणे हालचाल करण्यास मदत करते. “आता शारीरिक मर्यादा कोणालाही थांबवू शकत नाहीत,” असे प्रथमेश म्हणाला.

अनुष्का देशमुख आणि अनुष्का पिंगुळ, पुणे यांनी दृष्टीदोष असलेल्या लोकांसाठी ‘थर्ड आय’ हे व्यक्तीच्या शरीरावर घालण्याजोगे अडथळा शोधक उपकरण तयार केले आहे. पारंपरिक काठी केवळ समोरचे अडथळे ओळखते, परंतु त्यांच्या उपकरणामुळे सर्व दिशांमधील अडथळे लहान कंपनांद्वारे लक्षात येतात. “हे केवळ एक उपकरण नाही—हे स्वातंत्र्य आहे,” असे अनुष्काने स्पष्ट केले.

समाजोपयोगी नवोन्मेष

प्रदर्शनातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक होता कृषीबॉट, एक रिमोट-कंट्रोल फर्टिलायझर स्प्रेइंग सोल्युशन, जो दिंडोरी, नाशिकच्या आदित्य पिंगळे आणि त्याचे सहकारी अभिजित पवार व परशराम पिंगळ यांनी विकसित केला आहे. आदित्यने आपल्या शेतकरी काकांना २० लिटरच्या फवारणीच्या बाटल्या वाहून नेण्यामुळे होणारा त्रास पाहिला आणि हा भार कमी करण्याचा निर्धार केला. “आता शेतकरी अगदी ३ किमी अंतरावरूनदेखील मोबाईलद्वारे आपल्या शेतीमध्ये खत फवारू शकतात,” असे आदित्यने सांगितले.

रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन मुंबईच्या क्रांती नाईक आणि हर्षल यांनी अल्कोहोल डिटेक्टरसह हेल्मेट तयार केले आहे, जे चालकाच्या श्वासातून मद्य आढळल्यास बीप करून सतर्क करते. “आम्हाला आशा आहे की भविष्यात हे उपकरण सक्तीचे होईल आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल,” असे क्रांती म्हणाली.

STEM क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन (YASHADA) चे उप संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे कौतुक केले. “मी विशेषतः नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी रोबोटिक्स प्रकल्प सादर केल्याचे पाहून प्रभावित झालो,” असे ते म्हणाले.

पुणे नॉलेज क्लस्टरच्या CEO डॉ. प्रिया नगराज यांनी सांगितले की, “आपण तंत्रज्ञानाचा उपयोग जबाबदारीने आणि नैतिकतेच्या चौकटीत करत आहोत याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे. यंदाच्या ‘ट्रान्सफॉर्मिंग STEM एज्युकेशन’ या थीम अंतर्गत डिजिटल साधनांचा उपयोग आणि शिक्षणातील त्यांचे प्रभावी उपयोजन यावर विचार केला जात आहे.”

NEP 2020 सोबत टेकव्हिजनचा प्रवास

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण यावर भर देते. टेकव्हिजन हा त्याच संकल्पनेला पूरक असून तो विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देतो.

“टेकव्हिजन फक्त संधींबद्दल नाही, तो परिणामांबद्दल आहे. हे विद्यार्थी संधींची वाट पाहत नाहीत—ते त्या निर्माण करत आहेत,” असे सलाम बॉम्बे फाउंडेशनचे मुख्य विकास अधिकारी गौरव अरोरा म्हणाले. “आम्हाला टेकव्हिजनला एक राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ बनवायचे आहे, जिथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थी त्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा देऊ शकतील.”

बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, तुम्हाला यायचं नसेल तर… कोर्टाने अक्षय शिंदेंच्या आईवडिलांना स्पष्टच सांगितलं

0

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरु आहे. त्यातच काल आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही, असे सांगितले आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. बदलापूर प्रकरणात याचिकाकर्ते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टाकडून तुम्हाला यायचं तर या, आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी काल कोर्टात सुनावणी सुरू असताना अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्यांनी आम्हाला हा खटला लढायचे नाही, असे सांगितले. अण्णा शिंदे यांनीदेखील हीच मागणी केली. आम्हाला लोकांकडून खूप त्रास दिला जातो. या वयात आता आम्हाला धावपळ शक्य नाही. आमचाही मुलगा गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आज कोर्टाने भाष्य केले.

“तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर…”
“तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही. तुम्हाला यायचं असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही”, असे कोर्टाने बदलापूर एन्काऊंटरप्रकरणी याचिकाकर्ता अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना सांगितले आहे. बदलापूर एन्काऊंटरप्रकरणाची सुनावणी सुरु राहणार आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होईल, असे सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान त्यांनी हे आदेश दिले.

पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित फेक एन्काऊंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत अक्षय शिंदेची आई अलका आणि वडील अण्णा शिंदे यांनी खटला मागे घेतल्याप्रकरणी भाष्य करण्यात आले. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदेच्या आई-वडिलांवर कोर्टात यायचे की नाही हा निर्णय सोपवला आहे.

वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
याप्रकरणी आता अक्षय शिंदेची कोर्टात बाजू मांडणारे वकील अमित कटारनवरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. मात्र त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाही. म्हणून आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. येत्या २४ तारखेला पुढील सुनावणी होईल. अक्षयच्या आई वडिलांनी जरी याचिका मागे घतली असली तरी आम्ही लढा सुरू ठेवू, असे अमित कटारनवरे म्हणाले.