Home Blog Page 196

आज नवीन आयकर बिल संसदेसमोर; या बदलाचा करदात्यांवर थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

0

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज केंद्र सरकार नवीन आयकर बिल 2025 (New Income Tax Bill 2025) सादर करणार आहे. हा नवीन कायदा, जुन्या आयकर कायद्याचा 1961 ची जागा घेईल. या कायद्यात 63 वर्षानंतर बदल होईल. या कायद्यात मोठ्या बदलाची नांदी येणार आहे. करदात्यांना सुटसुटीत आणि सोप्या कायद्याची भेट देण्यात येणार आहे. तसेच करदात्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मोठे बदल करण्यात येतील. करदात्यांना आता यापुढे किचकटता कमी करण्यात येईल.

बिलाची ड्राफ्ट कॉपीत काय माहिती?

12 फेब्रुवारी रोजी या बिलाची ड्राफ्ट कॉपी समोर आली आहे. हा नवीन आयकर कायदा पहिल्यापेक्षा लहान, सरळ आणि समजण्यास सोपा असेल. हा नवीन कायदा, अधिक स्पष्ट असेल. तर त्यातील किचकटता कमी होईल. कर प्रणाली अधिकाधिक करदाताभिमूक करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज हे बिल लोकसभेत सादर करतील. याशिवाय अजून इतर मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

डिजिटलीकरणावर भर, सहज भरा कर

केंद्र सरकारने Income Tax Bill 2025 माध्यमातून कर प्रणाली अधिक सुटसुटीत, सरळ, पारदर्शक, करदाताभिमूख करण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलत्या जगाचा पासवर्ड आत्मसात करत कराचा भरणा करण्यासाठी डिजिटलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कर चोरी शोधणे आणि त्यांच्यावर सक्ती करणे सोपे होईल.

1. जुन्या कायद्यापेक्षा सुटसुटीत

नवी Income Tax Bill 2025 सोपा, सुटसुटीत आहे. इतकेच नाही तो, जुन्या कायद्यापेक्षा लहान, आटोपशीर असेल. जुन्या 1961 च्या आयकर कायद्यात 880 पानं होती. तर आता नवीन कायद्यात 622 पानं असतील. नवीन बिलात 536 विभाग आणि 23 प्रकरणांचा समावेश आहे.

2. मूल्यांकन वर्षाऐवजी कर वर्ष

सरकार नवीन आयकर बिलात मूल्यांकन वर्षाऐवजी (Assessment Year) कर वर्ष (Tax Year) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. यामुळे या दोन वर्षाविषयी करदात्यांच्या मनात तयार होणारा संभ्रम दूर करणे हा आहे. आयकर रिटर्न भरण्याविषयीची झंझट कमी होईल.

3. नवीन कर प्रणालीत मानक वजावट वाढेल

वेतनदार, नोकरदारांसाठी या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. जुन्या कर रचनेत, पूर्वी 50,000 रुपयांची मानक वजावट (Standard Deduction) मिळतो. तर आता नवीन कर प्रणालीत ही मर्यादा 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवीन कर प्रणालीतील टॅक्स स्लॅब

4 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न – कोणताही कर नाही

4,00,001 ते 8 लाख रुपयांपर्यंत – 5% कर

8,00,001 ते 12 लाख रुपयांपर्यंत – 10% कर

12,00,001 ते 16 लाख रुपयांपर्यंत – 15% कर

16,00,001 ते 20 लाख रुपयांपर्यंत– 20% कर

दगाबाज पाकिस्तानवर भारतीय सैन्याचा घातक वार, त्यांचे 4 ते 5 सैनिक ठार

0

पाकिस्तानने आपला स्वभाव आणि सवयीप्रमाणे दगाबाजी केली. पुंछच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्य चौक्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानच मोठ नुकसान झालं आहे. या गोळीबारात पाकिस्तानचे काही सैनिक जखमी झाले आहेत. त्यांच्या 4 ते 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान मागच्या आठवड्याभरापासून LOC वर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावण्यासाठी अलर्ट मोडवर आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक कारस्थानाला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने सुरु असलेल्या या कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर आज जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हा एक उच्च स्तरीय समीक्षा बैठक करणार आहेत. या बैठकीला उप राज्यपालांशिवाय जम्मू-काश्मीरचे DGP नलिन प्रभात, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उच्च अधिकारी, IGP उपस्थित राहतील.

भारतीय सैन्याकडून जशास तसं प्रत्युत्तर

सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कुठल्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सैन्याची जिवीतहानी झाली आहे.

दोन भारतीय जवान शहीद झालेले

अधिकाऱ्यांनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आलं. एकदिवस आधीच जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयित दहशतवाद्यांनी IED ब्लास्ट घडवून आणला. त्यात कॅप्टनसह दोन भारतीय जवान शहीद झाले. एक जवान जखमी झाला. त्याला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कॅप्टन करमजीत सिंह आणि नायक मुकेश सिंह शहीद झाले. बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांच कारस्थान आहे. हे सैन्याचे जवान LOC वर गस्त घालत असताना हा स्फोट झाला.

राजाराम पूल ते वारजे हद्द नदीकाठ 36 मीटर रस्ता मार्ग मोकळा?; जागामालक अन् महापालिका अधिकारी बैठक यशस्वी संपन्न

0

कर्वेनगर भागातील राजाराम पूल ते वारजे हद्द नदीकाठ 36 मीटर रस्ता मागणी पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक सोसायटी ऐक्य केल्यानंतर दिलेल्या शब्दाप्रमाणे आज शिवणे खराडी रस्त्यामधील राजाराम पूल ते वारजे हद्द हा नदीकाठचा 36 मीटर रस्ता बाधित जागा मालकांची यशस्वी बैठक पुणे महापालिका पथविभाग उपायुक्त यांच्याकडे पार पडली आणि गेली तीस वर्ष प्रलंबित असलेला हा रस्ता पूर्ण होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे व ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम पंत मेंगडे यांनी व्यक्तिशः लक्ष घालत हा विषय मार्गी लावण्याचा चंग धरला असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.

कर्वेनगर च्या मुख्य 100 फुटी डीपी रस्त्यावर दोन मार्च रोजी सकाळी सर्व सोसायटीतील नागरिकांनी मानवी साखळी करत या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाला जाणून दिले. प्रशासकीय अधिकारी हेतू पुरस्कर याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी ही जाहीरपणे बोलण्यात आल्या होत्या. त्याच वेळी जागामालक आणि पुणे महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पूर्ती आज पुणे महापालिकेच्या पतविभाग कार्यालयात झाली. यावेळी सविस्तर चर्चा करून संबंधित रस्ता त्वरित पूर्ण करण्यासाठी उपायुक्त पावस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या पत विभागामध्ये झालेल्या बैठकीमध्ये संबंधित जागा मालकांच्या संमतीने जागा ताब्यामध्ये घेऊन रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याविषयी जागा मालकांनी संमती दिली आहे. त्यातच पथविभागाच्या वतीने पावसकर साहेब यांच्या सूचनेनुसार कर्वेनगर मधील सर्व बाधित जागामालक यांना हस्तांतरण करण्यासाठी एक खिडकीची योजना करण्याची ही तयारी दाखवली आहे.  स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी बोलवलेल्या या बैठकीला ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम मेंगडेही उपस्थित होते.

पेरिविंकल सूस शाखेचे “स्मृतिगंध” स्नेहसम्मेलन आठवणींचा हिंदोळा! चढता आलेख बघता लवकरच पेरीविंकल विद्यापीठ होईल: डॉ भटकर

0

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन आज बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी बाणेर येथील बंटारा भवन येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले. “स्मृतिगंध” म्हणजेच मेमरीज वी चेरीश म्हणजेच आठवणींचा हिंदोळा..या थीम वर आधारित शाळेच्या मुख्याध्यापिका सौं निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

स्मृतिगंध म्हणजेच आठवणींचा मागोवा घेणारे क्षण मग ते अगदी लहानपणीच्या आठवणीचे असोत किंवा तरुणातले आठवण हा एक असा हिंदोळा आहे की आठवणींच्या जगात मन खूप रमते मग त्या लहानपणीच्या असल्या तरी सुद्धा. सण वार हे आपण करतच असतो पण त्या शिवाय शाळेत किंवा आयुष्यात बरेच डेज म्हणजेच दिवस आपण साजरे करतो जसे की मदर्स डे, फादर डे, फ्रेंडशिप डे, पर्यावरण दिन, शिक्षक दिन व या प्रत्येक दिवसाचे महत्व त्या ऍक्ट व डान्स परफॉर्मन्स मधून सूस शाखेच्या चिमुकल्यानी पटवून दिले. मेरी माँ में तेरा लाडला, एकटी एकटी, दमलेल्या बाबाची कहाणी, जंगल जंगल बात चली है, काले मेघा आदी एक से बढ़कर एक गाण्यांवर अत्यंत बहारदार पर्फोर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दिपवणारे आविष्कार सादर केले.

अगदी सुरुवातीला राष्ट्रगीताने नाट्यगृहाचा पडदा उघडून कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व परम संगणकाचे जनक आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, विक्रांत देशमुख – पोलिस अधिक्षक, राज्य महामार्ग, सुनिल चांदेरे – उपाध्यक्ष PDCC बँक, दिलीप दगडे – संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका छाया मारणे, दिलीप मुरकुटे – चेअरमन, बाणेर नागरी सहकारी पतसंस्था, उपाध्यक्ष भाजप पुणे शहर – अजय मारणे, मसाजी काळे- उप पोलिस अधिक्षक, निलेश शेंडे – अध्यक्ष पत्रकार संघ मुळशी, रमेश ससार – माजी अध्यक्ष पत्रकार संघ, संस्कार प्रयमरी सकूल च्या संचालिका सौ स्नेहा साठे, सुदर्शन हायस्कूल चेअरमन अविनाश पवळे, चाणक्य academy चे बढे, माऊली म्हेत्रे – पत्रकार न्यूज मेकर चॅनेल, अर्जुन पसाले , नगरसेवक वैभव मुरकुटे, योगेश सोनवणे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल , शिवानी बांदल, यशराज बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यगृहाच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्याना “स्टूडेंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मुकुट , सर्टिफिकेट व ट्रॉफी प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेतर्फे मान्यवरांना देखील पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी बहाल करण्यात आली तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी शाळेचा चढता आलेख त्यांच्या वार्षिक अहवालात सादर करून वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , शिक्षकांचे ,मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले व दिवसेंदिवस हा आलेख असाच वाढून आता यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे नमूद केले.

तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी पालकांचा शाळेशी असलेला दृढ विश्वास यातच सर्व काही आले असे सांगून सूस शाखेच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मुख्याध्यापिका , शिक्षक व सर्वांचे मनापासून कौतुक करून आज येथे असणारा प्रत्येक विद्यार्थी मोठाच होणार व या व्यासपीठावर आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाखेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
तसेच खरच लहान लावलेल्या पेरिविंकल च्या रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो व सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मा. विक्रांत देशमुख यांनी केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेहा माळवदे ,सचिन खोडके कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. प्रफुल्ला पाटील व इयत्ता ५वी ते ११वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने करण्यात आली.

फायटर जेटसाठी भारत स्वत:च इंजिन बनवू शकेल का? कुठपर्यंत पोहोचलं कावेरी इंजिन प्रोजेक्ट?

0

‘तेजस’च्या रुपाने भारताने स्वबळावर फायटर विमान विकसित केलय. पण कुठलही लढाऊ विमान, हेलिकॉप्टर किंवा UCAV बनवण्यासाठी एका चांगल्या इंजिनाची आवश्यकता असते. भारताकडे स्वत:च फायटर जेट आहे. पण इंजिनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागतय. असं नाहीय की, आपण स्वबळावर इंजिन विकसित करण्याचे प्रयत्न सोडून दिलेत. भारतही फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर काम करत आहे. या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन. कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे. हे इंजिन DRDO च्या अंतर्गत गॅस टर्बाइन अनुसंधान प्रतिष्ठानने (GTRE) विकसित केलय.

या इंजिनचा वापर भविष्यात मानव रहीत विमानात म्हणजे UAV मध्ये करण्याची भारताची योजना आहे. भारताच स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्याचं मिशन संपलेलं नाही. कावेरी इंजिन विकसित करताना जे अनुभव आले, त्यातून नवीन दिशा मिळणार आहे. स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन विकसित करणं हा मिशनचा मुख्य उद्देश आहे.

कुठल्या देशांकडे आहे हे इंजिन?

कावेरी इंजिनच्या इनफ्लाइट परीक्षणला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंजुरी देण्यात आली. जगातील केवळ पाच देश ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच अशा प्रकारच एडवान्स इंजिन विकसित केलं आहे. हे ते देश आहेत, ज्यांच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा वीटो पावरचा अधिकार आहे. भारतही या एलिट क्लबमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यात मानव रहीत विमानं UAV साठी या इंजिनचा वापर करण्याची भारताची योजना आहे.

कावेरी इंजिन प्रोजेक्टची सुरुवात कधी झालेली?

स्वदेशी तेजस फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं जात आहे. भारताचं स्वदेशी एअरो-इंजिन विकास कार्यक्रमातील हे एक महत्त्वाच पाऊल आहे. कावेरी इंजिन परियोजनेची सुरुवात 1980 च्या दशकात झाली होती. पण यात अनेक अडथळे, अपयश आलं. DRDO ने वर्ष 2016 मध्ये पुन्हा या कार्यक्रमावर काम सुरु केलं. भारताच स्वबळावर स्वदेशी इंजिन विकसित करण्याच स्वप्न आहे. इनफ्लाइट परीक्षणात यश मिळाल्यास ते आत्मनिर्भर संरक्षण टेक्नोलॉजीच्या दिशेने एक मोठं पाऊल असेल. कावेरी इंजिनची चाचणी यशस्वी ठरल्यास भारताच अन्य देशांवरील अवलंबित्व कमी होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण करणार विकेटकीपिंग? हेड कोच गंभीरने कुणाचं नाव घेतलं?

0

टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करत 3-0 ने मालिका जिंकली. टीम इंडियाने अशाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी चमकदार कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. आता टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील 20 फेब्रुवारीला खेळताना दिसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांना संधी दिली आहे. मात्र दोघांपैकी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत अनेक क्रिकेट चाहत्यांना प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर हेड कोच गौतम गंभीर याने उत्तर दिलं आणि चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

केएल राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून पहिली पसंत असणार आणि ऋषभ पंतला पर्याय म्हणून प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्याबाबत इतक्यात विचार केला जाणार नसल्याचं गंभीरने स्पष्ट केलं. पंतला इंग्लंडविरुद्धच्या 3 पैकी एकाही एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही.पंत एकमेव असा खेळाडू ठरला ज्याला इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये संधी मिळाली नाही.

केएलची कामगिरी

केएलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात बॅटिंगसाठी सहाव्या स्थानी पाठवण्यात आलं. मात्र केएलला सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी संघर्ष करावा लागला. मात्र केएलला तिसऱ्या सामन्यात पाचव्या स्थानी पाठवण्यात आलं आणि फरक दिसला. केएलने 29 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. टीम इंडियाने हा सामना 142 धावांनी जिंकला.

गौतम गंभीर काय म्हणाला?

“केएल राहुल आमची विकेटकीपर म्हणून पहिली पसंती आहे. सध्या मी इतकंच सांगू शकतो. ऋषभ पंतला संधी मिळेल, मात्र आता केएल चांगलं करतोय तर आम्ही 2 विकेटकीपर फलंदाजांना एकत्र खेळवू शकत नाहीत”, असं हेड कोच गौतम गंभीर याने तिसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट केलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

भीषण अपघातानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेचा मोठा निर्णय, कोर्टात घेतली धाव

0

गेल्या वर्षाच्या शेवटी, 28 डिसेंबरला विख्यात मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या ड्रायव्हरने भरधाव वेगाने गाडी चालवत मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं होतं. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि उर्मिला, तिचा ड्रायव्हर आणि एक कामगार हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात उर्मिलाच्या कारचाही चक्काचूर झाला होता. या अपघाताला आता जवळपास दीड महिना उलटून गेलेला असून त्याचदरम्यान उर्मिलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या अपघाताप्रकरणी तिने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या या अपघाताचा तपा, सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी तिने या याचिकेतून केली आहे. फौजदारी याचिकेच्या माध्यमातून तिने मुंबई उच्च न्यायालयात ही मागणी केली असून मुंबई पोलीस हे सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याची तक्रारही तिने याचिकेत केली आहे.

काय म्हटलं आहे याचिकेत ?

जिथे हा अपघात झाला तिथले सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी विनंती उर्मिलाच्यावतीने याआधी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र तिथं सीसीटीव्हीच नसल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यानंतर उर्मिलाने हायकोर्टात धाव घेत याचिका केली. मुंबई पोलीस एका खासगी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा कोठारेंचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्ता खोदलेला होता, तिथे कोणतेही योग्य दिशादर्शक फलकही तिथं लावलेले नव्हते असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेची दखल घेत हायकोर्टाने या अपघाताचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना नोटीस जारी केलीय. त्यामुळे दोन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने समता नगर पोलीस ठाण्याला दिले आहेत.

नेमकं काय झालं होतं ?

28 डिसेंबर 2024 रोजी उर्मिला कोठारेच्या कारचा कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अपघात झाला होता. या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली , त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

अपघातानंतर काही दिवसांनी जानेवारी महिन्यात उर्मिलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती, तिची मुलगी आणि वडील गणपती बाप्पासमोर नमस्कार करताना दिसले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्मिलाने तिच्या कार अपघाताविषयी माहिती दिली होती.

नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; जाणून घ्या सविस्तर

0

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. सत्ताधारी महायुती आपली सत्ता कायम टिकवण्यात यशस्वी ठरली, तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडी कमकुवत होत चालली आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त ओघ भाजप, शिवसेनेकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाला सर्वात जास्त गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार आहेत. सत्ता आणि राजकीय भविष्याचा विचार करुन ठाकरे गटातून बाहेर पडणारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत.

आज कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. कारण राजन साळवी हे कोकणातील मोठे नेते आहेत. मागच्या अनेक निवडणुकीत त्यांनी राजापूर विधानसभेचा गड राखला होता. 2024 विधानसभा निवडणुकीत मात्र, शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधु आहेत. राजन साळवी यांच्या जाण्याने कोकणात ठाकरे गट आणखी कमकुवत होईल.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत

ठाकरे गटातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करत असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला आहे. नाशिक हा काही वर्षांपूर्वी मनसेचा गड मानला जात होता. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता नाशिकमध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

कोणी केला प्रवेश?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उद्धव ठाकरे गटातील तथा नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी, शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

मध्यरात्री महत्त्वाची बैठक, शिवसेनेत प्रवेश करण्याआधी साळवी म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे माझे…’

0

कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी ठाण्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशापूर्वी काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. या बैठकीनंतर राजन साळवी माध्यमांशी बोलले. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती. ते भाजपत प्रवेश करतील असा सर्वांचा अंदाज होता. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला होता.

पण राजन साळवी यांनी आपलं मूळ शिवसेनेची निवड केली. तिथे विद्यमान आमदार किरण सामंतही आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची होती. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी म्हणाले.

‘शिंदे साहेबांचा आशिर्वाद आवश्यक’

“आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, विद्यमान आमदार किरण सामंत आणि मी अशी एकत्रित बैठक झाली. मतदारसंघ, जिल्ह्यासंबंधी आवश्यक चर्चा झाल्या. सर्व चर्चा सकारात्मक झाल्या. सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहे. आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशिर्वाद आवश्यक आहे” असं राजन साळवी म्हणाले.

‘असं अभिवचन आम्ही शिंदेसाहेबांना दिलय’

“भविष्यात हातात हात घेऊन जिल्हापातळीवर, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं अभिवचन आम्ही शिंदेसाहेबांना दिलय. उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश आहे, त्यासाठी मी समाधानी आहे” असं राजन साळवी म्हणाले. पत्रकारांनी विनायक राऊत यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच त्यांनी बोलणं टाळलं. “मी उद्या बोलेन. सामंत बंधू माझ्या समवेत होते. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेलो. चर्चा सकारात्कम झाली. राजन साळवींना कुठे, कसा मानसन्मान देण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतली आहे. जे काय बोलायचय ते उद्या बोलू” असं राजन साळवी म्हणाले.

वनडे मालिकेत इंग्लंडला क्लिन स्वीप, भारताने तिसरा सामना 142 धावांनी जिंकला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज

0

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली. अवघी एक धाव करून रोहित शर्मा बाद झाला. पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखूवन दिलं. विराट कोहलीला शेवटच्या सामन्यात सूर गवसला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभव सहन करावा. इंग्लंडने षटकात सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. भारताने तिसरा सामना 142 धावांनी जिंकला.

भारताने विजयासाठी दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. फिलीप सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. तर टॉम ब्रॅडनने सॉल्टसह ही भाीदारी वाढवली. पण त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले. जो रूट, जोस बटलर स्वस्तात बाद झाले. इंग्लंडच्या अशा खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी चांगल्या खेळीच्या अपेक्षा आता मावळल्या आहेत. इंग्लंडचा संघ भारताच्या गटात नाही. पण इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली तर भारताशी सामना होऊ शकतो.