Home Blog Page 177

गोऱ्हेंच्या वक्तव्यावर राजकारण तापलं! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर, कोकाटे प्रकरणावरही मत व्यक्त

0

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत, विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत, किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत, तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे, यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहिली गोष्ट माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात, आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात. मी कॅबिनेटमध्येच स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्हाला जी नावं पाहिजे ती तुम्ही पाठवा. पण ज्या नावामध्ये ज्यांची नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये समावेश आहे, त्यांच्या नावांना मी परवानगी देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे 125 जणांची नावं आली, त्यातील 109 नाव मी क्लिअर केली आहेत, उर्वरीत नावांना परवानगी दिली नाही, कारण त्यांच्यावर कुठला न कुठला आरोप आहे, त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही मी अशा लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘आका, काकाही सुटणार नाही, सात पिढ्या लक्षात राहील असा धडा शिकवणार’, पुणे पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

0

पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्या वाल्यांना त्रास देतात, धमक्या देतात. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही. त्यांना सात पिढ्या लक्षात राहील, असा धडा शिकवू, असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचा दावा केला.

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात बोलताना अमितेश कुमार म्हणाले, संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. पूर्वी प्रत्यके महिन्याला सरासरी 8.5 खून होत होते. आता महिन्याला सरासरी 7.2 खून होतात. आम्हाला हे उद्दिष्ट 6.5 करायचे आहे. पुण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यामध्ये 34 टक्के घट झाली आहे. या आकडेवारी आम्ही समाधानी नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.

चुकीचे घडले तर सोडणार नाही

वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटले. ते म्हणाले, काही गुन्हेगारी टोळ्याचा विषय आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात शिवजयंती दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण झाली होती. त्यातील आरोपींना मोका लावण्यात आला आहे. त्याच्या टोळीप्रमुखाला देखील आरोपी करण्यात आले आहे. गजा मारणे याला आरोपी करण्यात आले असून त्याला देखील अटक करण्यात येईल. सध्या तीन आरोपींना अटक आहे. इतर आरोपी फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे. टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही. पण त्यांच्याकडून काही चुकीचे घडले तर त्यांना सोडणार नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.

कोणतीही गँग नाही…

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या 20 ते 22 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यांचा धागा सापडलेला आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. कोयता गँग किंवा टोळी अशी कुठली एक टोळी अस्तित्वात नाही. शहरात कोणत्या गँग नाही. कोयता किंवा हत्यार हातात घेऊन काही गुन्हेगार गुन्हे करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिस करतात. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असा दावा अमितेश कुमार यांनी केला.

राजकीय दबाव असतो का? या प्रश्नावर अमितेश कुमार म्हणाले, आमच्यावर कुणाचा दबाव नाही. लोकांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. लोकप्रतिनिधीची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. सर्व लोकप्रतिनिधींचा आमचा सोबत उत्तम संवाद आहे. त्यांच्याकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नाचे निराकरण आम्ही करत असतो. पोलिसांवर आरोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.

राहुल सोलापूरकरवर सध्यातरी गुन्हा नाही

पुण्यामध्ये अत्यंत आवश्यकता असलेल्यांना नवीन शस्त्र परवाना दिले जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना परवाना देणार नाही. आतापर्यंत 300 लायसन्स रद्द केले आहेत. तसेच वाहतूक पोलीस लपून छपून कारवाई करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांनी चौकात थांबले पाहिजे. कुठेतरी आडोश्याला नाही. तसे न करण्याच्या कठोर सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. राहुल सोलापूरकरवर सध्यातरी गुन्हा दाखल करणार नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

”माझ्याकडे असे पुरावे आहेत, ज्यामुळे मोठमोठ्या गोष्टींचा छडा लागणार” एसपींच्या भेटीनंतर धनंजय देशमुख काय म्हणाले?

0

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी धनंजय यांच्यासोबत मस्साजोगच्या गावकऱ्यांचं एक शिष्टमंडळ होतं. साधारण तास-दीड तास एसपींसोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. मंगळवारपासून गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु होणार आहे, त्याबाबत रात्रीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.

पोलिस अधीक्षक नवनीत कॉवर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या तीन दिवस अगोदर आणि नवीन एसपी कॉवत साहेब जॉईन होण्याच्या पूर्वी म्हणजे २१ डिसेंबरपर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या मी एसपी साहेबांच्या कानावर घातल्या आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि २८ तारखेला सगळं लेखी स्वरुपात मी देणार आहे.

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, माझ्याकडे असे पुरावे आहेत, की ते नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावेच लागतील. सीसीटीव्ही, डीव्हीआर.. आणखी भरपूर आहे. मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो.. जे काम स्थानिक गुन्हे शाखेने करायला पाहिजे होते, ते काम आम्ही गावकरी करीत आहोत. या पुराव्यांमुळे मोठमोठ्या गोष्टींचा छडा लागणार आहे. आजपर्तंय कुठल्याच कागदावर आणि तपासामध्ये जे आलेलं नाही, ते मी २८ तारखेला देणार आहे.

”६ ते २१ डिसेंबरदरम्यान पोलिसांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. ८ तारखेला आरोपींसोबत चहापाणी झालं आहे. गुन्हा घडल्यानंतर जे करायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आज मी एसपींसोबत चर्चा केली नसती तर हे पुढे आलं नसतं. त्यामुळे या प्रकरणाच्या पुर्नतपासणीची माझी मागणी आहे.”

”उद्यापासून सुरु होणाऱ्या आंदोलनाबाबत शिष्टमंडळ आणि गावकरी चर्चा करणार आहेत. आंदोलनासाठी पोलिसांनी वेळ मागितला आहे, परंतु तो निर्णय गावकरीच करणार आहेत. पोलिसांनी काय काय करायला पाहिजे होतं? का केलं नाही? लोकेशन का सांगितलं नाही? त्या दिवशी मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण पीआय सांगत होते २० मिनिटात तुमचा भाऊ येईल.. म्हणून घात झाला.” असंही धनंजय देशमुख म्हणाले.

”हे कुठल्याच तपासामध्ये आलेलं नाही”

माझ्याकडे अशा गोष्टी आहेत, ज्या कुठल्याच तपासामध्ये आलेल्या नाहीत. ते मी २८ तारखेला सांगणार आहे. १० टक्के गोष्टी माझ्या मनामध्ये ठेवत आहे, त्याचे सगळे पुरावे मी देणार आहे. असं म्हणत धनंजय देशमुख यांनी चार दिवसांमध्ये सगळं जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे

पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाचे ‘सेमीफायनल’ तिकीट अजून कन्फर्म नाही, होऊ शकते बाहेर; पाहा समीकरण काय 

0

भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला.

भारतीय संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे. या विजयासह पाकिस्तानचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे सलग २ सामने जिंकूनही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. दरम्यान कसं असेल भारतीय संघासाठी समीकरण? जाणून घ्या….

कसं आहे पॉईंट्स टेबल?

भारतीस संघाने आतापर्यंत सलग २ सामने जिंकले आहेत. मात्र अजूनही भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळू शकलेलं नाही. भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी आहे. पण, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा काही नेम नसतो. संपूर्ण समीकरण समजून घ्या. सलग २ सामने जिंकून ४ गुणांसह भारताचा संघ अव्वल स्थानी आहे. तर १ सामना जिंकलेला न्यूझीलंडचा संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानी आणि पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानी आहे.

सेमीफायनलच्या समीकरणाबाबत बोलायचं झालं, तर सलग २ सामने जिंकून भारताने सेमीफायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित केलं आहे. मात्र अजूनही साखळी फेरीतील ३ सामने शिल्लक आहेत. पुढील सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात जर बांगलादेशने बाजी मारली.

तर हा संघ २ गुणांची कमाई करेल. बांगलादेशचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. जर बांगलादेशने हा सामनाही जिंकला, तर बांगलादेश ४ गुणांची कमाई करेल. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा शेवटचा सामना भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. जर न्यूझीलंडने या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला, तर न्यूझीलंडचेही ४ गुण होतील.

असं जर घडलं, तर तिन्ही संघ ४-४ गुणांच्या बरोबरीला येतील. असं झाल्यास नेट रनरेटमध्ये आघाडीवर असलेला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. नेट रन रेटच्या बाबतीत, बांगलादेशचा संघ सर्वात मागे आहे. बांगलादेशचा नेट रनरेट -०.४०८ इतका आहे. तर भारतीय संघाचा नेट रनरेट ०.६४७ आङे. तर न्यूझीलंडचा संघ १.२०० इतका आहे. जर भारतीय संघ शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत झाला, तर सेमीफायनलमध्ये जाणं कठीण होऊन जाईल.

नाक घासलं तरी माफी नाही; सुषमा अंधारे कडाडल्या, नीलम गोऱ्हेंविरोधात दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा

0

ठाकरे गटात एका पदासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागतात, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. हे विधान मात्र त्यांच्या अंगलट आले आहे. नेत्या नीलम गोऱ्हे या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. सुषमा अंधारे गोऱ्हेंविरोधात अब्रु नुकसानीचा दावा करणार आहेत.

गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली, नंतर भारिपमध्ये उडी मारली. त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ओळख मिळाली. नंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बेईमानी केली. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हेच त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत माझा ठाकरे पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला.

नीलम गोऱ्हेंच्या शब्दकोशात प्रामाणिकपणा हा शब्द नाहीय. नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षांनी चारवेळा आमदारकी दिली. गोऱ्हेंनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक शाखाही उघडली नाही. त्यांनी पक्ष संघटनेसाठी कोणतं काम केलं नाही,असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गोऱ्हेंनी त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे ह्या पक्षात कोणाला वाढू देत नाहीत. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघत. आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या नीलम गोऱ्हेंनी कुठून आणल्या? व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कारचं कलेक्शन किती होतं. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे, नाहीतर नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा चालू असणार , असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्र्याशी पंगा घेत दिला प्रतिष्ठेला धक्का, गजानन मारणेवरच पोलिसांनी लावला मोक्का, नेमकं प्रकरण काय?

0

काही दिवसांपूर्वी पुण्यात पुन्हा एकदा गजानन मारणे टोळीचा  उन्माद दिसून आला होता. केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे ही आरोपी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आयटी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती.

नेमकं काय झालं होतं?

देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला, असं म्हणत जोग यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

गजा मारणेचा भाचा फरार

मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: जोग यांची भेट घेतली अन् विचारपूस केली होती. या प्रकरणात पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. त्यामुळे आता मामा भाचे अडचणीत सापडल्याचं चित्र पहायला मिळतंय.

पुणे पोलिस डोळे बंद करून बसलेत का? – मुरलीधर मोहोळ

दरम्यान, पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं? माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, अशा शब्दात मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सुचना दिल्या होत्या.

केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कोथरूडमध्ये पुन्हा कोयते रक्ताने माखले, मध्यरात्री 10 जणांकडून बदला, तरुण जागीच मृत

0

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करत कोयता गँगला चाप बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयता हल्ल्याची घटना सुरूच आहेत. रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा कोयता हल्ल्याने पुणे हादरलं आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात रविवारी मध्यरात्री दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केले आहेत.

हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील प्राईम लोकेशन असलेल्या कोथरुड भागात खूनाची ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिनेश भालेराव (वय २७), सोहेल सय्यद (वय २४), राकेश सावंत (वय २४), साहिल वाकडे (वय २५) बंड्या नागटिळक (वय १८), लखन शिरोळे (वय २७) अनिकेत उमाप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तर गौरव अविनाश थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रविवारी मध्यरात्री तो कोथरुडच्या शास्त्रीनगर भागात होता. यावेळी घटनास्थळी आलेल्या दहा जणांनी धारदार कोयते आणि तलवारीने गौरववर हल्ला केला. काही कळायच्या आत हा हल्ला झाल्याने गौरव स्वत:ला वाचवू शकला नाही. या हल्ल्यात तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत आणि हल्लेखोरांमध्ये नेमका वाद काय होता? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. पोलीस हत्येचा कारणाचा आणि आरोपींचा शोध घेत आहेत. पण मध्यरात्री अशाप्रकारे टोळक्याने तरुणाची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

एक भुवई तिरकस उंचावत पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा किंग कोहलीचा मोठेपणा “भर मैदानात केले कौतुक!”

0

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताने अत्यंत संयमी खेळ करत पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आधी गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाचं कंबरडं मोडलं, त्यानंतर विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद चर्चेत आहे. एका बाजूला मैदानातील वर्तनामुळे त्याच्यावर टीका चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याचं कौतुकही होत आहे. शतकवीर विराट कोहलीने देखील अबरारच्या कोट्यातील १० षटकं पूर्ण झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन केलं, त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी त्याची पाठ थोपटली. त्यामुळे विराटवरही त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिल व विराट कोहली या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी ६९ धावांची भागिदारी केली. मात्र १०० धावा पूर्ण झालेल्या असताना शुबमन गिल अबरार अहमदच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर एक भुवई तिरकसपणे उंचावून अबरारने शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. मैदानात त्याने केलेली ही कृती कॅमेरात कैद झाली. यानंतर अबरारला लोक चांगलंच ट्रोल करू लागले आहेत. त्याच्या गोलंदाजीचं कौतुक होत असतानाच त्याच्या कृतीने मात्र भारतीय चाहते चांगलेच संतापले.

विराटची खिलाडूवृत्ती

मैदानातील त्या कृतीमुळे टीका होत असली तरी अबरारने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती हे नाकारून चालणार नाही. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळेच अबरारची १० षटकं पूर्ण झाल्यानंतर विराटने त्याची पाठ थोपटली. अबरारने या सामन्यात त्याच्या कोट्यातील १० षटकांत केवळ २८ धावा देत एक गडी बाद केला. त्याच्यासमोर भारतीय फलंदाज अडखळत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळेच विराटने त्याचं कौतुक केलं. विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून त्याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एकटा अबरार भिडला

अबरारव्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले खरे मात्र, त्याच्या ८ षटकात भारतीय फलंदाजांनी ७४ धावा लुटल्या. तर, खुशदील शाहने ७.३ षटकांत ४३ धावा देत १ बळी घेतला. इतर गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.

शिवरायांच्या किल्ल्यांची जागतिक स्तरावर दखल घेणार; यादीत ‘या’ 12 किल्ल्यांची नावं

0

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तर, त्यांचा वास्तवाने पावन झालेले गड-किल्ले महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाहीत. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांना आता जागतिक दर्जा मिळू शकतो. यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी आग्रही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी होत आहे. गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला तर जागतिक पातळीवरील पर्यटक महाराष्ट्रात गडकिल्ले पाहण्यासाठी येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथादेखील जगासमोर येईल.

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (मराठा मिलीटरी लँडस्केप ऑफ इंडिया) या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे. गेले कित्येक वर्षे हे किल्ले ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. मोगल आणि इतर परकिय आक्रमणांमुळं काही किल्ल्यांची पडझड झाली आहे. या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी पुरातत्व विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. रायगडावर पुरातत्व विभागाकडून कित्येक वर्षांपासून ही कामे सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या राज्यांतील किल्ल्यांचाही समावेश आहे. शिवाजी महाराज यांनी समुद्रातदेखील किल्ल्यांची उभारणी केली.

पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज, ठोठावणार पुन्हा न्यायालयाचा दरवाजा, मूर्तीकारांची न्यायलयात धाव

0

मुंबई महानगरपालिकेने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्तींना बंदी असणार आहे. माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचे सावट आहे. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. मात्र POP मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या या निर्णयाने मूर्तीकार मात्र नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता मूर्तीकार संघटना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. बंदीऐवजी वेगळे पर्याय उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्तींवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटनेने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर 2020 साली बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. पण उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून 100 टक्के पीओपीबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने 30 जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. भाद्रपदातील गणेशोत्सवातही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने आतापासून नियोजन सुरू केले आहे.

गणेशोत्सवाला अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी असला तरी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. यासंदर्भात एक परिपत्रकही काढण्यात आलं होतं. सार्वजनिक उत्सव २०२५ पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या होत्या.

उच्च न्यायालयाच्या आणि पालिकेच्या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळेही संभ्रमात आहेत. मात्र यात सर्वात पहिला फटका पीओपीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना बसणार आहे. त्यामुळेच पीओपीबंदीच्या निर्णयाविरोधात आपली बाजू मांडण्यासाठी मूर्तिकारांनी पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. बंदीऐवजी वेगळे पर्याय उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे.