Home Blog Page 162

मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला

0

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांसाठी महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे.या शहरात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी अर्थखात्याने निधीची तरतूद करत या प्रकल्पांना गती देण्याचं काम केले आहे.

अजित पवारांनी अर्थसंकल्पात सांगितले की, मुंबई, नागपूर, पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात आलेत. या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होतील.

नागपूर मेट्रोचा ४० किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ७०८ कोटी रुपये किंमतीचे ४३.८० किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. याठिकाणाहून एप्रिल २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचं नियोजन असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली.

दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किलोमीटर असून त्याचे सुमारे ३ हजार ३६४ कोटी रुपये खर्चाचे काम २०२८ अखेर पूर्ण करणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

अर्थसंकल्पातील मुख्य घोषणा

  • स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार
  • उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार
  • पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार ५१५ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार
  • गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करणार
  • मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय
  • वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार

घरकूल योजनेतील निधीत वाढ; नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. निवडवणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंल्पात पूर्ण होणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यात घरकूल योजनेतील निधीत वाढ करण्यचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सर्व घरांवर सौरउर्जा प्रकल्प बसवले जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

घरकूल योजनेत ५० हजार रुपयांची वाढ

‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. यावेळी अजित पवार म्हणाले की, “राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण ४४ लाख ७ हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहेत.” लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.

लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा! टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी करणार करार

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. निवडवणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंल्पात पूर्ण होणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपयांचं आश्वासनाची पूर्तता आज होणार का? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. पण, त्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाला ५२६ कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सध्याचा काळ हा एआयचा आहे, आता राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करता यावा यासाठी अजित पवार यांनी एआय संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे. याशिवाय शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार २.० च्या टप्प्यातील कामं मार्गी लागणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

कृषीक्षेत्र एआयसाठी नवं धोरण, जलयुक्त, शेतकऱ्यांसाठी ९ हजार ७१० कोटींची तरतूद

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाला ५२६ कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सध्याचा काळ हा एआयचा आहे, आता राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करता यावा यासाठी अजित पवार यांनी एआय संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे. याशिवाय शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार २.० च्या टप्प्यातील कामं मार्गी लागणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यात परकीय गुंतवणूक वाढली : अर्थमंत्री

राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात राज्यात ४० लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे. रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्न होत आहे. ५० लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारने ठेवलं आहे. त्यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार आङे. देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा १५.४ टक्के आहे. लवकरच महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण जाहीर केलं जाणार आहे. सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

येत्या पाच वर्षात वीज खरेदीत १ लाख ५ हजार कोटींची बचत होईल. अर्थात वीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांसाठी येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार आहे.

मुंबई वाहतूक कोंडी कमी करण्यास ६४ हजार कोटींचे प्रकल्प

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात २०२५-२६ या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी सुरुवातीलाच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिली.

सध्या मुंबईतील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तासन तास वाहन रस्त्यावरतीच असतात. अनेकांना मिनिटांचा प्रवास काही तासांवर जातो. दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. ययाशिवाय पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तर तळेगाव ते चाकण उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं.

लाडक्या बहिणींना मिळणार एआयचं प्रशिक्षण

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिक्षणाबाबत मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2025-26 या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारचे हे पहिलेच पूर्ण अधिवेशन आहे. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधित मोठ्या घोषणा झाल्या आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विकास वाढत असताना त्याच्या शिक्षणासंबंधित मोठी घोषणा झाली. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीच्यावतीने 10 हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर वाढवण्यासाठी 500 कोटीचे बजेट देण्याची घोषणा झाली.

‘आम्हाला कारनामे माहित नव्हते…’, ललित मोदीला मोठा झटका

0

फरार बिझनेसमॅन ललित मोदीने लंडन स्थित भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला. त्याला प्रशांत महासागरातील एक देश वनुआतूची नागरिकता मिळाली आहे. पण आता त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. वनुआतू सरकारने ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी उच्चस्तरीय बैठक केली. आम्हाला ललित मोदींच्या कारनाम्यांबद्दल माहित नव्हतं, असं वनुआतू सरकारने म्हटलय. वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी नागरिकता आयोगाकडून ललित मोदीला जारी करण्यात आलेलं पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ललित मोदीमुळे वनुआतूच्या गोल्डन पासपोर्ट कार्यक्रमावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपातील देश वनुआतूवर कारवाई करु शकतात असं म्हटलं जात होतं.

माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदीने भारतीय नागरिकता सोडण्यासाठी अर्ज केलाय अशी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली होती. त्याने लंडन येथील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले होते. “सध्याचे नियम आणि प्रक्रियेतंर्गत याची चौकशी होईल. वनुआतुची नागरिकता त्याने मिळवल्याच आम्हाला सांगण्यात आलय. आम्ही कायद्यानुसार त्याच्याविरोधात खटला सुरु ठेऊ” असं रणधीर जायसवाल म्हणाले होते. ललित मोदी 2010 साली भारतातून पळून गेला, तेव्हापासून तो लंडनमध्ये आहे.

वनुआतू हा देश कुठे आहे?

वनुआतू दक्षिण प्रशांत महासागरातील एक देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आणि न्यूझीलंडच्या उत्तरेला, ऑस्ट्रेलिया आणि फिजी यांच्यामध्ये हा देश आहे. पोर्ट विला ही वनुआतूची राजधानी आणि तिथलं सर्वात मोठ शहर आहे. वीजा इंडेक्सनुसार वानुअतुचा पासपोर्ट धारक 56 देशांमध्ये विनाविजा प्रवास करु शकतो. जागतिक क्रिकेटमध्ये इंडिनय प्रीमियर लीग स्पर्धेने एक वेगळी ओळख बनवली आहे. या आयपीएलची कल्पना याच ललित मोदीची होती. फुटबॉलच्या धर्तीवर त्याने या क्रिकेट लीगची सुरुवात केली.

भारताच्या विजयानंतर शोएब अख्तरचा व्हीडिओ व्हायरल; “…समजण्या पलीकडचं आहे”

0

टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने जून 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता अवघ्या काही महिन्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारतीय संघाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सर्वाधिक तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अख्तरने या व्हीडिओत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्देशून अनेक प्रश्न केले आहेत.

अंतिम सामन्यातील विजयानंतर बक्षिस वितरण करण्यात आलं. उपविजेता न्यूझीलंडच्या खेळाडूंना तसेच पंचांना स्मृतीचिन्ह देण्यात आलं. तसेच भारतीय खेळाडूंना मेडल देण्यात आले. या बक्षिस वितरण समारंभात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते. पाकिस्तानकडे या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद होतं. त्यानंतरही सामन्यााला आणि बक्षिस वितरणासाठी पाकिस्तानकडून (Pcb) एकही सदस्य का नव्हता? जागितक स्तरावरील स्पर्धेत यजमानांचा एकही सदस्य का नव्हता? हे माझ्या समजण्या पलीकडचं आहे, असं म्हणत शोएबने प्रश्न उपस्थित केले आहेत. शोएबने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

शोएब अख्तर काय म्हणाला?

“भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मी या सामन्यात एक विचित्र गोष्ट पाहिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही नुमाइंदा (सदस्य) इथे उपस्थित नव्हता. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान होता. त्यानंतरही पाकिस्तानचा एकही सदस्य नव्हता. ही गोष्ट माझ्या समजण्या पलीकडील आहे की पाकिस्तानकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि ट्रॉफी देण्यासाठी कुणी का आला नाही? ही जागतिक स्तरावरील स्पर्धा होती. इथे तुम्हाला असायला हवं होतं. मात्र त्यानंतरही यजमानांकडून एकही सदस्य नव्हता”, असं म्हणत शोएबने पीसीबीला अनेक प्रश्न केले आहेत.

अख्तरकडून पीसीबीला प्रश्न

यजमान या नात्याने संबंधित क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्य महत्त्वाच्या सामन्याला हजर असतात. तसेच इतर क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित असतात. भारत-पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीत. मात्र त्यानंतरही 5 मार्चला बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी लाहोरमध्ये उपस्थित होते. मात्र अंतिम सामन्यात यजमान पीसीबीचे पदाधिकारी आणि सदस्यांपैकी कुणीही उपस्थित न राहिल्याने अख्तरने आश्चर्य व्यक्त केलंय. आता पीसीबी किंवा पाकिस्तानच्या माजी खेळाडंकडून अख्तरला कोण उत्तर देतं का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.

काँग्रेसला मोठा धक्का; रविंद्र धंगेकरांचा निर्णय फायनल, काँग्रेस सोडताना दुःख होतंय…

0

रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर हे वृत्त खरं होताना दिसतंय. धंगेकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार असून काँग्रेस सोडताना दुःख होतंय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकर हे पक्षाला रामराम करून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. गेल्या वर्षी धंगेकरांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर अंतर्गत गटबाजीची चर्चा काँग्रेसच्या गोटात फिरत होती. या सर्व पार्श्वभूमीवर धंगेकर आता काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनीही धंगेकरांची भेट घेतली होती. त्यांना खुली ऑफर देण्यात आल्याचेही वृत्त होते. मात्र योग्य वेळ आली की आपण बोलू असे स्पष्टीकरण धंगेकर यांनी दिले होते. अखेर आता ती वेळ आल्याचे दिसत असून धंगेकरांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय फायनल झाल्याचे वृत्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं असून काँग्रेस सोडताना दुःख होतं आहे, असे ते म्हणाल्याचे समजते. एकनाथ शिंदेंनी मला मदत केली, असेही ते म्हणाले. आज संध्याकाळी 7 वाजता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले धंगेकर ?

पक्ष सोडण्याच्या पार्श्नभूमीवर धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.’ सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी बैठक, चर्चा झाली. मी मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घेणं हे प्रचंड कठीण असतं. या पक्षासोबत मी गेली 10-12 वर्ष काम करतोय. पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. 8-10 वर्षांत आपण एकमेकांचे सहकारी होतो, कुटुंबातले होतो. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. लोकसभा असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरपर्यंत, सर्वांनीच माझ्यामागे प्रचंड ताकद उभी केली. निवडणूक यंत्रणेत सर्वांनीच भाग घेतला. मी निवडणूक हरलो, हा वेगळा विषय पण सर्वांनीच कष्ट केले, त्यांची जी ताकद माझ्या पाठिशी उभी केली’, असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं.

‘पक्ष सोडताना खूप दुःख होतंय, मीही माणूसच आहे. मतदारांशीही मी चर्चा केली, आमच्याकडे काम कोण करणार, असा सर्वांचा सवाल होता. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही’, असंही धंगेकर म्हणाले. मागच्या काही दिवसांत मी दोन-तीन वेळा एकनाथ शिंदे यांची कामानिमित्त भेट घेतली होती, उदय सामंत यांचीही भेट झाली. एकदा तुम्ही आमच्या सोबत काम करा, असं ते मला वारंवार सांगत होते. कामं तर करायची आहे, पण सत्तेशिवाय कामं होत नाहीत. अखेर सर्वांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला, शिंदे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं आहे. मी एकनाथ शिंदेंकडे काहीही मागितलेलं नाही. आज संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि फायनल निर्णय घेऊ असे धंगेकरांनी नमूद केलं

बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट ! चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून

0

केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) संदर्भात पंजाबसह 9 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूने भारतात प्रवेश केला आहे जे लोक संक्रमित चिकन खातात त्यांना विषाणूची लागण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

‘जानेवारी 2025 पासून, सरकारी मालकीच्या पोल्ट्री फार्मसह 9 राज्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सर्व सरकारी, व्यावसायिक आणि घरामागील कुक्कुटपालनांना जैवसुरक्षा उपाय मजबूत करावे लागतील.’ असे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

सर्व शासकीय पोल्ट्री फार्मचे जैवसुरक्षा लेखापरीक्षण लवकरात लवकर करून त्यात उणिवा तातडीने दूर करण्यात याव्यात, असे केंद्र शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि असामान्य मृत्यूची वेळेवर अहवाल देण्यासाठी पोल्ट्री फार्म कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम सुरू केले जावेत, असेही त्यात नमूद करण्यात आलं आहे. राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष दिल्यास एव्हीयन फ्लूचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असे केंद्राने म्हटले आहे.

बर्ड फ्लूचे लक्षण

बर्ड फ्लूची लक्षणे विशेषत: H5N1 सारख्या स्ट्रेनची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण बहुतेक वेळा ती सामान्य इन्फ्लूएंझा सारखीच असतात. डोळे लाल होणं, ताप, खोकला, थकवा, स्नायूंमध्ये वेदन, गळ्या खवखव, मळमळ, उलटी , जुलाब, गॅस्ट्रोचा त्रास, नाक बंद होणं, श्वास घेण्यास त्रास अशी बर्ड फ्लूची लक्षणं जाणवू शकतात.

बर्ड फ्लूचा संसर्ग कसा होतो?

बर्ड फ्लू, किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झा, हा प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करते, परंतु विशिष्ट परिस्थितीत मानवांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. संक्रमित पक्षी किंवा दूषित वातावरणाच्या थेट संपर्कात आल्याने हा विषाणू पसरतो. ज्या व्यक्ती संक्रमित पक्षी हाताळतात किंवा पोल्ट्री फार्मशी जवळच्या संपर्कात असतात त्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा होऊ शकतो. नीट न शिजवलेले चिकन खाल्ल्यानेही हा विषाणू संसर्ग माणसांमध्ये पसरू शकतो.

बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाय

पक्ष्यांना स्पर्श केल्यानंतर किंवा बर्ड फ्लूचे विषाणू असलेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपले हात नेहमी साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा. एव्हीयन इन्फ्लूएन्झाच्या संपर्कात असलेल्या प्राण्यांशी संपर्क टाळा. बर्ड फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वैद्यकीय मदत घ्या. चिकन आणि अंडी व्यवस्थित शिजवून खा. गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच रोहित शर्माने गौतम गंभीरबाबत काय ते सांगून टाकलं, ……जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत स्पर्धा तरीही

0

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. 12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. खरं तर आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीनंतर गौतम गंभीरचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या प्रशिक्षकपदावर टीका होत होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर टीकारांनी हद्द ओलांडली होती. पण गौतम गंभीरने शांतपणे टीम इंडियाच्या बांधणीत हातभार लावला. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत स्पर्धा जिंकण्याचं मोठं आव्हान होतं. पण भारताने त्याची उणीव भासू दिली नाही. अंतिम सामन्यापर्यंत भारताने पाच सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत 3 सामने , उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. तसेच आतापर्यंत केलेल्या टीकांना विजयाने उत्तर दिलं आहे. विजयानंतर रोहित शर्माने मन मोकळं केलं.

‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही आमच्या पद्धतीने निकाल मिळणे ही एक उत्तम भावना आहे, आम्ही हा सामना कसा खेळलो याबद्दल खूप आनंदी आहे. हे माझ्यासाठी स्वाभाविक नाही पण ते असे काहीतरी आहे जे मला खरोखर करायचे होते. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला संघाचा पाठिंबा हवा असतो आणि ते माझ्यासोबत होते २०२३ च्या विश्वचषकात राहुल द्रविडने पाठिंबा दिला आणि आता गौतम गंभीर खंबीरपणे उभा राहिला.’ असं रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दित भारताने पहिलं जेतेपद मिळवलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भाराताने 49 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने हा सामना 4 विकेट आणि 6 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 76 धावा केल्या.

“रोहितची खेळी… सलामी शतकी भागीदारी…. स्फोटक सुरुवात” न्यूझीलंड कर्णधार सँटनर हिटनमॅनच नाव घेत काय म्हणाला?

0

टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा याने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितने सर्वाधिक 76 धावांची स्फोटक खेळी केली. तसेच रोहितने शुबमन गिल याच्यासह 105 धावांची सलामी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. रोहितने स्फोटक सुरुवात करुन दिली. त्यामुळे टीम इंडिया पावरप्लेमध्ये न्यूझीलंडवर वरचढ राहिली. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने पराभवानंतर पावर प्लेचा मुद्दा धरुन प्रतिक्रिया दिली. तसेच रोहितच्या खेळीचाही उल्लेख केला.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 116 बॉलमध्ये 105 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शुबमन गिल 31 धावांवर आऊट झाला. तसेच त्यानंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. विराट कोहली 1 धाव करुन आऊट झाला. तर त्यानंतर रोहित आऊट झाला. रोहितने 76 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 76 रन्स केल्या.

मिचेल सँटनर काय म्हणाला?

“बॅटिंग करण्यासाठी पावरप्ले सर्वात चांगली वेळ होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी पावर प्लेचा पूर्ण फायदा घेतला. रोहितची खेळी शानदार होती. रोहितच्या खेळीमुळे आम्ही बॅकफुटवर गेलो. मात्र खेळ कधीही बदलू शकतो, हे आम्हाला माहित होतो. त्यामुळे आम्ही विकेट्स घेत राहिलो आणि सामन्यात कायम राहिलो”, असं सँटनरने म्हटलं.

रोहित शर्मा ‘मॅन ऑफ द मॅच’

दरम्यान रोहित शर्मा महाअंतिम सामन्यात सामनावीर ठरला. रोहितने केलेल्या वादळी खेळीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रोहितची आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याची सातवी वेळ होती. मात्र रोहितला याआधी एकदाही अंतिम सामन्यात अर्धशतकही करता आलं नव्हतं. मात्र यंदा रोहितने अर्धशतक करत इतिहास बदलला.

जे काही आहे ते सुरु राहील,…. अफवांना हवा देऊ नका, रोहित शर्माचं वनडेतील निवृत्तीच्या चर्चेवर मोठं वक्तव्य

0

भारतानं न्यूझीलंडला 4 विकेटनं पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा तसा निर्णय घेऊ शकतो अशा अफवांना चर्चा आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद संपवताना रोहितनं निवृत्तीवर मोठं भाष्य केलं.

रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यानंतर रोहितनं पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषद संपवताना रोहित शर्मानं निवृत्तीबाबत आवर्जून भाष्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही, अफवांना हवा देऊ नका, असं रोहित म्हणाला.

रोहित शर्मानं फायनलमध्ये 76 धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. वनडे मध्ये चांगली कामगिरी करत असल्यानं बरेचसे खेळाडू वनडे वर्ल्ड कपच्याच टीममधील होते, असं रोहित शर्मा म्हणाला.

रोहितनं केएल राहुल संदर्भात देखील भाष्य केलं. रोहित शर्मानं केएल राहुल फलंदाजी करताना किती संयमी असतो हे पाहिलं आहे. त्याच्या संयमाचा फायदा करुन घेण्यासाठी त्याला मधल्या फळीत स्थान दिलं. उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीतील लढतील त्याची खेळी महत्त्वाची असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. केएल राहुलच्या कामगिरीसाठी आनंदी असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

मी आज देखील कोणती वेगळी गोष्ट केली नाही. गेल्या तीन ते चार सामन्यात जे करत आलोय तेच केलं. पॉवरप्लेमध्ये धावा करणं महत्त्वाचं आहे हे माहिती आहे. पॉवरप्लेनंतर धावा करणं आव्हानात्मक असतं हे माहिती होतं, त्यामुळं सुरुवातीलाच आक्रमक खेळणं गरजेचं असतं, असं रोहित शर्मानं म्हटलं.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तर, भारतानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.

विधानसभा मदतीची परतफेड ११०० कोटींची साखरपेरणी; सत्ताधाऱ्यांच्या आठ कारखान्यांना सरकारच्या हमीने कर्ज

0

विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सत्ताधाऱ्यांशी सबंधित आठ साखर कारखान्यांसह एकूण नऊ कारखान्यांना तब्बल ११०४ कोटींच्या कर्जाची खिरापत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी केंद्र आणि राज्य सरकारने सातत्याने साखर उद्योगाच्या अडचणीची भूमिका घेतल्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी साखर कारखान्यांना विश्वासात घेत अडचणीतील कारखान्यांना मदत करण्याची ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विरोधी पक्षातील कारखानदारांना बरोबर घेत अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांशी सबंधित १३ साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे ‘मार्जिन मनी’ कर्ज उपलब्ध करुन दिले. काही कारखानदारांना निवडणुकीत मदतीच्या अटीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याची पूर्तता करताना आठ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून ‘मार्जिन मनी’ कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून संबंधित कारखान्यांचा कर्ज प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामध्ये सत्ताधारी भाजपशी सबंधित तीन, शिंदे गटाशी सबंधित तीन, तर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसशी सबंधित प्रत्येकी एका साखर कारखान्याचा समावेश आहे. ज्या कामांसाठी हे कर्ज मागण्यात आले आहे, त्यासाठीच याचा वापर करण्याचे बंधन कारखान्यांवर असेल.

कुणाचा फायदा?

●राजेंद्र पाटील येड्रावकर (शिंदे गट) शरद सहकारी साखर कारखाना १८८.४६ कोटी

●संजय मंडलिक (शिंदे गट) सदाशिवराव मंडलिक कारखाना १३९ कोटी

●चंद्रदीप नरके (शिंदे गट) कुंभी कासारी कारखाना १३३.४४ कोटी

●अमल महाडिक (भाजप) छत्रपती राजाराम कारखाना १६५ कोटी

●हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) आजरा सहकारी कारखाना १२२.६८ कोटी

●दिलीपराव देशमुख (काँग्रेस) मारुती महाराज कारखाना १०९ कोटी

●विवेक कोल्हे (भाजप) शंकरराव कोल्हे कारखाना ११४ कोटी, गणेश साखर कारखाना ७४ कोटी

●शिवेंद्रराजे भोसले (भाजप) अजिंक्यतारा साखर कारखाना ३९ कोटी

अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असून ‘मार्जिन मनी लोन’च्या निकषात बसणाऱ्या कारखान्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. अटींची पूर्तता केल्यावर कारखान्यांना कर्ज उपलब्ध होईल.

बाबासाहेब पाटील, सहकारमंत्री

भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना तरुणावर चाकूने सपासप वार, पुण्यातील घटना

0

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. देशभरात विजयाचा जल्लोष सुरू आहे. पण पुण्यात विजयी जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजयी जल्लोष सुरू असताना पुण्यात एका टोळक्याकडून एक तरुणावर चाकूने सपासप वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष सुरू होता. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून फटाके फोडत होते तर कुठे डिजेच्या तालावर नाचत होते. अशातच पुण्यातील एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. जल्लोष दरम्यान टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण करण्यात आली. ४ ते ५ जणांनी चाकू, बेल्टने या तरुणाला मारहाण केली. मारहाण करत या तरुणाला गंभीर जखमी केलं. चाकुने बेल्टने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचा सामना दुबईत पार पडला. या क्रिकेट सामन्यात भारत विजयी होताच पुण्यातील मावळात घराघरात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून हातात तिरंगा घेऊन भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.