Home Blog Page 135

प्रशांत कोरटकरने ‘त्या’ ५ जणांची अडचण वाढवली, पोलिसांना नावं सांगितली, समोरासमोर चौकशीही होणार!

0

प्रशांत कोरटकर याच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ झालीय.कोरटकर याला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट करत एक गाडीही जप्त केलीय. एका बाजूला पोलिसांची तपासात प्रगती सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रेमींच्या रोषाचा सामनाही कोरटकरला करावा लागत आहे. प्रशांत कोरटकर याची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे कोरटकर याचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे.

दरम्यान कोरटकर विरोधातला रोष आजही पाहायला मिळाला असून कोर्टाच्या इमारतीतच एका वकिलाने त्याच्या विरोधात हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादीच न्यायालयाला दिली त्यामुळे त्याच्या मित्रांच्या अडचणीत वाढ झालीय.

कोण आहेत कोरटकरला मदत केलेले त्याचे मित्र?

नागपूरचा प्रशिक पडवेकर

चंद्रपुरचा धीरज चौधरी

इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी

तेलंगणा मधील करिमनगरचा साईराज शेटकर

अशा पाच मित्रांनी फरार काळात कोरटकरला मदत केली. या मित्रांच्या मदतीने कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता. यावेळी तो धीरज चौधरी याची MH 34 CD 7720 ही कार वापरत होता. त्यामुळे पोलिसांनी ही कार आता जप्त केलीय. दरम्यान इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केलंय.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या मागणीवरून न्यायालयाने दोन दिवसांची आणखी कोठडी वाढवून दिली आहे.या दरम्यान कोरटकर आणि त्याच्या मित्रांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तर तो राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कोणी पुरवली याची माहिती पोलीस संकलित करणार आहे. त्यामुळे कोरटकर तर अडचणीत आलाय मात्र त्याच्या मित्रांच्या अडचणीही आता वाढल्या आहेत.

भाजपाचे 5 आमदार तरी मंत्रीपद नाही साधे महामंडळ देखील नसल्याने अस्वस्थता त्यातच आमदार सुहास कांदे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

0

नांदगाव मतदार संघातील शिंदे सेनेचे उमेदवार सुहास कांदे यांची शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळवल्यानंतर भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात भाजपाची सत्ता आणि नाशिकमधून तर पाच आमदार असून मंत्रीपद तर सोडाच साधे महामंडळ देखील मिळालेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक मध्ये भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे सात तर शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ॲड. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळाले. दादा भुसे यांना सुरवातीलाच शालेय शिक्षण मंत्रीपद मिळाले. मात्र, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्या नावाची केवळ चर्चाच होत राहीली. शिंदे सेनेचे दोनच आमदार असताना दोघांनाही मंत्रीपदाचा मान मिळाल्याने भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत कुरघोडीत जाणिवपूर्वक नाशिकमधील भाजपाच्या आमदारांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मुंबई पोलिसांच्या दुसऱ्या समन्सनुसार कुणाल चौकशीला सामोरं जाणार पण हे ‘सुरक्षा कवच’ अगोदरच घेतलं

0

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वादात सापडलेला कॉमेडियन कुणाल कामरा अखेर पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे. कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं होतं. मुंबई पोलिसांनी कुणालला 31 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचं दुसरं समन्स बजावलं होतं. या समन्सला कुणालने प्रतिसाद दिला आहे. कुणाल 31 मार्चच्या पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. मद्रास हायकोर्टाकडून कुणाल कामराला अटकपूर्व जामिनासाठी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे.

मुंबईत सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि पोलिसांची कारवाई पाहता कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. कुणाल कामरा याने अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याच्याकडून आज सकाळीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेच दुपारी त्याच्या अर्जावर सुनावणी पार पडली.

कोर्टात कुणालचा दावा काय?

“मी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. मी 2021 पासून तामिळनाडूतच राहत आहे. पण मुंबई पोलिसांकडून अटकेची शक्यता असल्याने आपल्याला अटकपूर्व जामीन हवा”, अशी मागणी कुणाल कामराने आपल्या याचिकेत केली होती. तसेच त्याच्या वकिलांनी कोर्टातदेखील तसाच युक्तिवाद केला. कोर्टाने त्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतली.

मद्रास कोर्टाचा दिलासा

सुनावणीअंती मद्रास हायकोर्टाने कुणाल कामरा याला अंतरिम दिलासा दिला आहे. कुणालला 7 एप्रिलपर्यंत अटक करु नये, असे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले. हे आदेश 7 एप्रिलपर्यंतच लागू असतील. या दरम्यान कुणाल कामरा याने मुंबईत जातीने हजर राहून तिथल्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा, असं देखील मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

कुणाल 31 मार्चला पोलीस चौकशीला सामोरं जाणार

कुणाल कामरा येत्या 31 मार्चला मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार, असं कुणालच्या वकिलांनी मद्रास हायकोर्टात आश्वासन दिलं. तसेच कुणाल मुंबईत जामीन अर्जासाठी रितसर याचिका दाखल करेल, अशी देखील माहिती कुणालच्या वकिलांनी केली. दरम्यान, कुणालच्या विरोधात मुंबईत खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुणालची 31 मार्चला चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर काय कारवाई होणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

विधिमंडळ समितींच्या नियुक्तीसाठी अजित दादांचं ठरलं! …यांना चार हात लांब ठेवलं, भुजबळांनाही स्थान नाही दिलं,

0

मुंबई : विधिमंडळाच्या समितींमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या वादग्रस्त नेत्यांना दूर ठेवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवाय धनंजय मुंडेंचं रिक्त झालेलं मंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हं दिसत आहेत.

राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या आणि त्या समित्यांवरील प्रमुखांची नावे नुकतीच जाहिर झाली आहेत. या समितींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडेंचे नाव जोडल्यामुळे राष्ट्रवादीला त्याची झळ बसली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली कोअर कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीत धनंजय मुंडेंना स्थान दिल्याने मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून “राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठीशी घालते” अशा प्रकराच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी जाणीवपूर्वक विधिमंडळाच्या गठीत समितींमध्ये धनंजय मुंडेंना चार हात लांब ठेवणेच योग्य समजले.

भुजबळांनाही मंत्रिपदापासून लांब ठेवले

तर, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना, धनंजय मुंडेंच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर नेमणुक होऊन पुनरुज्जीवन मिळेल अशी आशा असतानाच त्यांचा मोठा अपेक्षा भंग झाला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद स्वतःकडेच ठेवलं. राष्ट्रवादी पक्षाचा ओबीसी नेत्याचा चेहरा म्हणून ख्यातनाम असलेल्या छगन भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने भुजबळांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लांब ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची अजित दादांनी पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात आणखी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं…; मालवणी पोलिसांचा दावा

0

सेलिब्रेटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं १४ मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळं आता यातील आरोप-प्रत्यारोप आणि तपास अधिकाऱ्यांचे दावे यामुळं या प्रकरणाचं पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे.

मालवणी पोलिसांचा दावा काय?

दिशा सालियान प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिनं आत्महत्या केल्याच नमूद करण्यात आलं होतं. यामध्ये तिनं कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये त्यांना पैसे देऊन ती वैतागली होती.

याबाबत तिनं आपल्या मित्रांकडं देखील भाष्य केलं होतं. यामुळं प्रचंड तणावात आणि डिप्रेशनमध्ये असल्यानं दिशा सालियानं हिनं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं, असं विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

राणेंना सहआरोपी करा – अंधारे

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “एखाद्याच्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्यात काही बरं-वाईट झालेलं असेल तर याबाबत न्याय मागण्याचा हक्क कुटुंबियांना नक्कीच आहे. पण एकीकडं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल होतो, इतरही अनेक कारण समोर येत आहेत. यामध्ये आता आर्थिक ताणतणावातून डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं टोकाचं पाऊल उचललेलं असू शकतं, असंही म्हटलं आहे.

पण यामध्ये राजकीय भांडवल केलं जातं हे निश्चित वाईट आहे. याप्रकरणातील तपासातून आणखी सत्य बाहेर येईल. आदित्य ठाकरेंचा यामध्ये काय संबंध आहे? उगाच राजकारणासाठी संबंध जोडणं आणि एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं राणेंनी आता थांबवावं. अन्यथा पुरावे असूनही दडवत असल्याप्रकरणी राणेंना यामध्ये सहआरोपी करावं, अशी मागणी यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.

‘हॅलो, गौरीचे आई-बाबा मी तुमच्या मुलीची हत्या केलीय’, जावयाच्या फोनने एकच खळबळ, काय आहे प्रकरण?

0

बंगळुरुत पत्नीची निर्घृण हत्या करुन पुण्यात पळून आलेल्या आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राकेश असं आरोपीच नाव आहे. राकेशने विष प्राशन करुन स्वत:च जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरवरुन माग काढत सातारा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. राकेशने पत्नीची निर्घृण हत्या केली. नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला व तो पुण्याला निघून आला.

राकेशने बायकोच्या पालकाना फोन करुन तिची हत्या केल्याची माहिती दिली, त्यानंतर हा गुन्हा उजेडात आला. 32 वर्षाची पीडित गौरी अनिल सांबेकर मास मीडिया आणि कम्युनिकेशनची पदवीधर आहे. ती बेरोजगार होती. घरीच होती. राकेश एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होता. राकेश आणि गौरी हे मूळचे महाराष्ट्रातले. हुलीमाऊ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोड्डाकन्नाहल्ली येथे ते मागच्या दोन महिन्यांपासून राहत होते.

नंतर तिचा गळा चिरला

पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश आणि गौरी सतत भांडायचे. भांडणाच्यावेळी गौरी राकेशला मारहाण करायची. 26 मार्चला दोघांध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात राकेश चाकू घेऊन आला, त्याने गौरीला पोटात भोसकलं नंतर तिचा गळा चिरला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला व पुण्याला निघून आला.

संपूर्ण शरीरावर जखमा

“हुलीमाऊ पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घर बंद होतं. सूटकेस बाथरुममध्ये आढळली. FSL टीमने सूटकेस उघडली. त्यात गौरीचा मृतदेह होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या” असं पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितलं. राकेश गुन्हा करुन फरार झालेला. पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या सीडीआर वरुन पुणे पोलिसांना अलर्ट केलं. त्यांनी राकेशला अटक केली. पुढील चौकशीसाठी हुलीमाऊ पोलिसांची टीम पुण्यावरुन त्याला बंगळुरुला घेऊन आली.

प्रिती झिंटाला इतक्या कोटींची कर्जमाफी, मोठी माहिती समोर

0

अभिनेत्री प्रिती झिंटा आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील 18 कोटींच्या कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून अभिनेत्री प्रीती जिंटाला 1.5 कोटी कर्ज माफी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लाच घेऊन विविध लोकांना 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज मंजूर केल्याच्या आरोपाखाली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे.

तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेला अभिनेत्री प्रिती झिंटाच्या बँकेसोबतच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सांगितले की, 7 जानेवारी 2011 रोजी झिंटाला 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र 31 मार्च 2013 रोजी हे कर्ज एनपीए म्हणून घोषित करण्यात आले.

कर्जाची रक्कम 10.74 कोटी रुपयांमध्ये निश्चित करण्यात आली आणि 1.55 कोटी रुपयांची कर्ज माफी तिला देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. 5 एप्रिल 2014 रोजी ही रक्कम भरण्यात आली , असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

फेब्रुवारीमध्ये, केरळच्या काँग्रेस युनिटने आरोप केला होता की, भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बँकेने 18 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र उत्तरात, झिंटा हिने स्पष्ट केले की, बँकेकडे 12 वर्षांपूर्वी बँकेत ओव्हरड्राफ्ट सुविधा होती, जी एका दशकापूर्वी पूर्णपणे परतफेड करण्यात आली होती.

बँकेच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना फायदा झाला या दाव्याला नकार देत, तिने सांगितले की तेव्हापासून तिचे खाते बंद करण्यात आले आहे. एका आर्थिक दंडाधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्याकडे बँकेकडून कागदपत्रे आहेत आणि ते त्याचा अभ्यास करत आहेत.

प्रिती झिंटा हिचे सिनेमे

प्रिती झिंटा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता अभिनेत्री लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘लाहोर 1947’ सिनेमात प्रिती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात प्रिती हिच्यासोबत अभिनेते सनी देओल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वडिलांच अफेअर, दिशा सालियान केसमध्ये नवीन अँगल, थोडक्यात समजून घ्या

0

महाराष्ट्रात पाच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. हाय कोर्ट या केसवर काय भूमिका घेते? त्यावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता दिशा सालियान प्रकरणात वडिलांच्या अफेअरचा नवीन अँगल समोर आलाय. त्याशिवाय मालवणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट 24 पॉइंटमध्ये समजून घ्या.

दिशा सालियनची आत्महत्याच

आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती.

वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना पैसे देऊन थकली होती.

वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशाने मित्रांना सांगितलं होतं.

दिशाचा प्रियकर रोहन राय, मित्रमैत्रिणी आणि आई-वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता.

प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात होती.

मुंबई पोलिसांकडून 4 जून 2021 रोजी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा SIT ची स्थापना. अहवाल अद्याप प्रलंबित.

8 जून 2020 रोजी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी दिशाच्या फ्लॅटवर.

पार्टी सुरु असताना दिशाला लंडनमधल्या एका मित्राचा कॉल आला.

कॉल आल्यानंतर दिशा बेडरुममध्ये गेली.

काहीवेळाने सगळेजण तिच्याशी बोलायला बेडरुममध्ये गेले. पण ती टेन्शनमध्ये होती.

दिशाला काहीवेळ एकटं सोडून सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले.

काहीवेळाने दिशाने बेडरुमचा दरवाजा बंद करुन स्वत:ला आतमध्ये बंद करुन घेतलं.

बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला जात नसल्याने सर्वांनी मिळून दरवाजा उघडला.

दिशा बेडरुममध्ये सापडली नाही. ती बाथरुममध्येही नव्हती.

बेडरुमच्या बाल्कनीतून डोकावून पाहिल्यानंतर दिशा जमिनीवर पडल्याच दिसून आलं.

त्यानंतर दिशाला जवळच्या एव्हरशाइन नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं.

त्यानंतर तुंगा हॉस्पिटल आणि नंतर शताब्दी रुग्णालयात नेलं.

दिशाचा मृत्यू झाला, त्यावेळी कोविड मोठ्या प्रमाणात होता.

अनेक हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात नव्हतं.

कोव्हीड चाचणीसाठी दिशाचा स्वॅब घेण्यात आला.

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 11 तारखेला तिचं पोस्टमार्टम करण्यात आलं.

डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा झाल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याच अहवालात नमूद करण्यात आलं.

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या विद्यमाने प्रदीप मोहिते स्मरणार्थ मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न

0

मुंबई दि. २८ (रामदास धो. गमरे) सामाजिक बांधिलकी, मूल्य आणि कर्तव्ये जपत समाज कल्याणकारी कार्य करण्यास अग्रेसर संस्था म्हणजे अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्था सदर संस्थेच्या वतीने संस्थेचे सल्लागार दिवंगत श्री. प्रदीप तु. मोहिते यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील ५५ वे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरसोमवार दि. २४ मार्च २०२५ रोजी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा कार्यालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसाहत (भोईवाडा बेस्ट कामगार वसाहत), जेरबाई वाडिया रोड परेल, भोईवाडा मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरात मोफत मधुमेह, रक्तदाब, इलेक्ट्रिककार्डिओग्राम (ECG) तपासणीसह विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार पद्धती मार्गदर्शन करण्यात आले होते, सदर शिबिरास मुंबईच्या महापौर मा. सौ. श्रद्धा जाधव, मा. नगरसेवक श्री.सुनील मोरे, शिवआरोग्य सेना महाराष्ट्र सरचिटणीस श्री. जितेंद्र दगडू दादा सकपाळ, शिवडी विभागातील समाजसेविका सौ. रिया बावकर, सौ. योगिता काटे (वॉर्ड महिला वॉर्ड अध्यक्षा भाजप), उद्योजक श्री. रूपेश तरल, शिवसेना (शिंदे गट) चे युवा नेते निलेश राणे, सौ. वसुधा वाळुंज, सौ. सुवर्णा सावंत, सौ. पूजा बोटवाला युनिकेअर हेल्थसेंटरचे श्री. रमेश कांबळे, आंबेडकरी चळवळीत ज्येष्ठ कार्यकर्ते चिंतामण खरे, बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग गटक्रमांक १३ चे कार्याध्यक्ष संतोष दामाजी जाधव, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३७२ चे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, शिवप्रसाद गृहनिर्माण संस्थेचे श्री कमलनाथ केरकर, हरिश्चंद्र पांचाळ, आगरी समाज विकास संघाचे कोषाध्यक्ष श्री अनिल तांडेल, रेशनिंग कृती समितीचे संदीप सुमन, राकेश सकपाळ, श्रीमती. योगिनी राऊत ताई (मनसे उपशाखा अध्यक्ष), शिव आरोग्य सेना शिवडी श्री. अनंत कोटकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.

तसेच या उपक्रमास अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान मुंबई जिल्हा अध्यक्ष मान. संदिप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कु. सिद्धांत मोहिते, कु. प्रणित वीर, कु. सौरभ मोहिते, संकेत जाधव, कु. सम्यक मोहिते, प्रज्वल सकपाळ, स्नेहल मोहिते, भक्ती तांडेल, सोनल कांबळे, रेश्मा सकपाळ, मीनल असगोलकर, युनिकेअर हेल्थ सेंटर, आचरेकर डेकोरेटर्सचे प्रोप्रा. दिनेश आचरेकर ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ह्या आरोग्य शिबिरास स्थानिक मान्यवरांनी, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली ह्या सर्वांचे आणि संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, बकिंगहॅम पॅलेसचे निवेदन जारी

0

ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे कॅन्सरवर उपचार घेत असून, त्याच्या दुष्परिणामांमुळे त्यांची तब्येत बिघडली आहे, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली. त्याचवेळी त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यासंदर्भात वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.

राजा डॉक्टरांच्या देखरेखीखाली

कॅन्सरवर उपचार सुरू असताना राजा यांना तात्पुरते दुष्परिणाम जाणवले, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात काही काळ निरीक्षणाखाली राहावे लागले, मात्र काळजी करण्याचे कारण नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महाराजांचा दुपारचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर 78 वर्षीय ब्रिटीश राष्ट्रप्रमुख क्लेरेन्स हाऊस येथील आपल्या घरी परतले.

प्रकृती आता स्थिर

खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार आजचे दैनंदिन वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. राजा यांना तात्पुरते आणि तुलनेने सामान्य दुष्परिणाम जाणवले, परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे बीबीसीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

चार्ल्सयांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ आपली आई आणि देशाची लाडकी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सावलीत व्यतीत केला आहे, त्यांच्या निधनानंतर 8 सप्टेंबर 2022 रोजी ते राजा झाले.

कॅन्सर फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आला

किंग चार्ल्स यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना आपल्या कर्करोगाचा खुलासा केला होता. तत्पूर्वी, त्यांना सौम्य प्रोस्टेट वाढीच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

कर्करोगाचा प्रकार आणि टप्प्याबद्दल संभ्रम

किंग चार्ल्स यांनी आपल्या कॅन्सरचा खुलासा केला जेणेकरून या आजाराबद्दल कोणतीही अटकळ बांधली जाऊ नये आणि यामुळे प्रभावित झालेल्यांमध्ये जनजागृती व्हावी. मात्र किंग चार्ल्स कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत, याचा खुलासा बकिंगहॅम पॅलेसने अद्याप केलेला नाही.

एक दिवस अगोदर एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी किंग चार्ल्स लंडनच्या सॉमरसेट हाऊसमध्ये एका प्रदर्शनात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी बकिंगहॅम पॅलेसमधील रिसेप्शनला हजेरी लावली. परंतु अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

मात्र, आता किंग चार्ल्स क्लॅरेन्स हाऊसमध्ये विश्रांती घेत असून खबरदारी म्हणून त्यांच्या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार उद्याच्या डायरीत नोंदवलेल्या घटनांचे वेळापत्रकही बदलण्यात येईल, असे बकिंगहॅम पॅलेसने म्हटले आहे.