Home Blog Page 129

पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा 18 धावांनी उडवला धुव्वा, धोनी असूनही पराभव

0

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने 18 धावांनी हा सामना जिंकला. पंजाब किंग्सचा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. प्रभसिमरन सिंग खातंही न खोलता बाद झाला. त्यानंतर एकेरी धावा करत तंबूत परतण्याची शर्यत लागली. श्रेयस अय्यर 9, मार्कस स्टोयनिस 4, नेहल वढेरा 9 ग्लेन मॅक्सवेल 1 धाव करून बाद झाला. पण एका बाजूने प्रियांश आर्यने झंझावाती खेळी केली. त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारत 103 धावांची खेळी केली. तर तळाशी असलेल्या शशांक सिंग आणि मार्को यानसेने जबरदस्त खेळी केली. शशांकने नाबाद 52 आणि मार्को यानसेनने नाबाद 34 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात सावध झाली. पण आक्रमक खेळी करण्यात अपयशी ठरले.

रचिन रवींद्र आणि डेवॉन कॉनवेने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्र 36 धावांवर असताना स्टंपिंग झाला. त्यानंतर आलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड काही खास करू शकला नाही. फक्त एक धाव करून बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवेची जोडी जमली. पण वेगाने धावा काही करता आल्या नाहीत. त्यामुळे धावा आणि चेंडूंचं अंतर वाढलं. शिवम दुबे 27 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आला. तर डेवॉन कॉनवेचा स्ट्राईक रेट पाहता शेवटच्या षटकापूर्वी त्याला रिटायर्ट आऊट केलं. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. महेंद्रसिंह धोनी 12 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 27 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्स 20 षटकात फक्त 201 धावा करून शकला आणि 18 धावांनी पराभव झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना

चांदणी चौक अनाधिकृत होर्डिंग बेकायदेशीर वृक्षतोड; उद्यान विभाग पोलीस परवाना नसतानाही व्यवसाय सुरूच

0

महापालिका अधिकाऱ्यांशी संगणमत मग नियमांशी किती पायमल्ली केली तरी चालतं! नेमका हाच प्रकार चांदणी चौकमध्ये आकाश चिन्ह विभागाच्या वतीने परवानगी देताना राजरोसपणे सुरू असून याबाबत कितीही तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा कारवाई न करता संबंधित व्यावसायिकाला अभय देण्याचे अजब काम आजही राजरोस सुरू आहे. पुणे महापालिका हद्दीतील अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही आकाश चिन्ह विभागातील लागेबांधे असलेल्या अधिकाऱ्यांची मर्जी राखत चांदणी चौक परिसरात धोकादायकपणे अनाधिकृतपणे परवानगी देण्यात आलेल्या फलकाचा व्यवसाय जोरात सुरू आहे.

पुणे चांदणी चौकालगत लोहिया जैन अवेन्यू, उजवी भुसारी कॉलनी, एचडीएफसी बँके बाहेर पौड रोड कोथरूड बहुमजली इमारतीच्या शेजारी संबंधित व्यावसायिकाने अनधिकृत होर्डिंग उभारले असून यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जात असतानाही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. याबाबत अर्जदार जयदीप पडवळ दि. ०३/०६/२०२४ रोजी आपल्या खात्याकडे संबंधित अनधिकृत जाहिरात फलकाबाबत लेखी तक्रार करण्यात आली होती. संबंधित जाहिरात व्यवसायकाने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड केली होती. त्याप्रमाणे वृक्ष प्राधिकरण विभागाकडून पंचनामा करून संबंधित व्यवसायिकाला नोटीस काढून आपल्या खात्याकडे तसा लेखी अहवाल सादर केला होता परंतु आकाश चिन्ह विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याऱ्यांनी आर्थिक व्यवहार केल्याने त्या गार्डन विभागाच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन अप्रत्यक्षरीत्या त्या जाहिरात व्यवसायिकाला मदत केली असल्याचाही आरोप अर्जदाराच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित व्यावसायिकाने या ठिकाणी होर्डिंग लावताना पुणे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि पुणे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना कोणत्याही प्रकारचे परवानगी न घेता संबंधित ठिकाणी होर्डिंग उभे करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. मुळात चांदणी चौकातील वाऱ्याचा वेग लक्षात घेता संबंधित रस्त्यावरील हे होर्डिंग धोकादायक होण्याची शक्यता असल्यामुळेच पुणे पोलिसाच्या वाहतूक विभागाचे परिणाम हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. याच कारणास्तव पुणे पोलिसांच्या वतीने परवाना नाकारण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या ‘आकाश चिन्ह’ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने या भागात होर्डिंग लावण्याचा प्रकार केला आहे.

पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना २०२२च्या नियमावलीनुसार त्या जाहिरात व्यावसायिकावर कारवाई होणे अपेक्षित असतानाही जाणीवपूर्वक नियमावलीला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना २०२२च्या नियमावलीनुसार संबंधित जाहिरात व्यवसायिकावर आणि सहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बोगस मतदानाचा सुळसुळाट; पराभूत उमेदवार बाळासाहेब भिंताडेची न्यायालयात याचिका

0

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मर्या. कासारसाई दारुंब्रे ता. मुळशी जि. पुणे संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम संबंधित निवडणुकी निर्णय अधिकारी यांच्याकडून केले जात असताना प्रत्यक्ष उस उत्पादक गट क्र.१ हिंजवडी-ताथवडे या मतदार संघातून निवडणूक जाहीर झाल्यानंतरही लोकशाहीची हत्या करण्याचा भीम पराक्रम सत्ताधारी पक्षाकडून केला जात असताना डोळेझाकपणे या सर्व प्रकाराला पाठिंबा देण्याचे कामही राजरोसपणे करण्यात आल्याने प्रत्यक्ष मतदानाच्या दरम्यान बोगस मतदान व मयतांचेही मतदान नोंद झाल्याचा आरोप अपक्ष निवडणूक लढणारे बाळू भिंताडे यांनी केला आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक सन २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधी जाहीर झाल्यापासून ही निवडणूक एकतर्फी करण्यासाठी सर्वपक्षीय आमदार आणि संस्थापक अध्यक्ष नाना नवले यांनी संपूर्ण सभासदांच्या मनाविरुद्ध मनमानी कारभार करणाऱ्या लोकांची संगत करत ही निवडणूक प्रक्रिया सदोष करण्यास मदत केली. सर्वपक्षीय इच्छुकांची बैठक बोलावत सुमारे 100 लोकांचे उमेदवारी अर्ज एकाच दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त (खाजगी कार्यालयाच्या प्रांगणात) जमा करण्याचे काम केले. त्यावेळी समक्ष तीन ते चार विद्यमान खासदार संस्थापक अध्यक्ष विदुराजी नाना नवले या सर्व लोकांची मूकसंमती होती. त्यानंतरही सभासद हितार्थ काही निवडक मंडळींनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनाही प्रचंड बाहुबली त्रासाला सामोरे जावे लागले काही उमेदवारांना तर रात्री अपरात्री राहत्या घरातून उचलून नेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. मुळात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास शासकीय निर्णयाप्रमाणे जी मुदत देण्यात आली होती त्यावेळी सुमारे 70 ते 80 अर्ज बाकी असतानाही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अंतिम यादी जाहीर न करता यांच्या या भाऊबली कृत्यास पाठिंबा देण्याचे काम केले आहे. मुळात निर्णय प्रक्रिया तटस्थ राबविण्यात आली असती तर दोन पॅनल मध्ये सरळ सरळ लढती शक्य होत्या परंतु सत्ताधारी संचालक मंडळाच्या सोबतीस विद्यमान आमदारांनी आपले मोहरे पॅनलमध्ये दाखल केल्यामुळे अंतिम यादी सुमारे 36 तासानंतर उशिरा जाहीर करण्यात आली. सभासद हितार्थ बंडखोरी झालेली असताना सुद्धा मुख्य प्रचाराच्या दरम्यानही अपघाताने ही निवडणूक लागली आहे असाच अपप्रचार सत्ताधारी संचालक मंडळाकडून करण्यात आला.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना एकतर्फी आपल्या ताब्यात हवा असा अतोनात प्रयत्न करूनही सभासदांकडून करवी अपक्ष उमेदवार बाळू भिंताडे यांना वाढता पाठिंबा लक्षात घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुद्धा ही बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा पराक्रम करण्यात आले आहेत. अपक्ष उमेदवार असलेल्या गट क्रमांक एक वगळता अन्यत्र मतदानाची टक्केवारी कमी राहण्याची शक्यता असताना अचानक खेड तालुक्यांमध्ये अन हवेली तालुक्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मयत मतदारांची ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. ज्या सभासदांच्या घरातील मयत सदस्य अशी नोंद असताना ही त्यांच्या नावे संबंधित मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक 25 इंदोरी-अ.  येथे 338 पैकी 299 मतदानाची नोंद झाली आहे त्यामध्ये प्रत्यक्षात मयत असलेल्या मतदारांनीही मतदान केले असल्याचे सिद्ध झाले आहे. तर मतदान केंद्र क्रमांक 26 इंदोरी-ब  येथेही 339 पैकी 178 विक्रमी मतदान नोंद झाले आहे. याबरोबरच 40 मरकळ अ     572 पैकी 333 व 41 मरकळ-ब  येथे 468 पैकी 288 अशी झालेली मतदानाची नोंद बेकायदेशीर मतदान झाल्याच्या आरोपाला पुष्टी देत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात येत आहे. या सर्व प्रकारच्या विरोधात पराभूत उमेदवार बाळू भिंताडे यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला असून या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात उद्या याचिका दाखल होणार आहे.

उमेदवाराला मिळालेली एकूण वैध मते

उस उत्पादक गट क्र. १ हिंजवडी-ताथवडे

नवले विदुराजी विठोबा (८५२४) विजयी

जाधव दत्तात्रय गोपाळ(८३८०) विजयी

भिंताडे बाळु दत्तात्रय (२५०५) पराभूत

भुजबळ चेतन हुशार (७१८९) विजयी एकूण वैध मतपत्रिका ९५१५

 उमेदवाराला मतदान केंद्रानुसार मिळालेली मते-

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार उमेदवाराचे नाव-

ऊस उत्पादक गट क्र 2 पोड-पिरंगुट

ढमाले धैर्यशिल रमेशचंद्र

गायकवाड यशवंत सत्तू

उभे दत्तात्रय शंकरराव

ऊस उत्पादक गट क्र. 3 तळेगाव-वडगाव

दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम

भेगडे बापुसो जयवंतराव

काशिद संदिप ज्ञानेश्वर

ऊस उत्पादक गट क्र. ४ सोमाटणे-पवनानगर

कडू छबुराव रामचंद्र

लिम्हण भरत मच्छिंद्र

बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब

ऊस उत्पादक गट क्र.५ खेड-हवेली-शिरुर

लोखंडे अनिल किसन

भोंडवे धोंडिबा तुकाराम

कातोरे विलास रामचंद्र

काळजे अतुल अरुण

महिला राखीव- 

अरगडे ज्योती केशव

वाघोले शोभा गोरक्षनाथ

अनुसूचित जाती/जमाती-  भालेराव लक्ष्मण शंकर

इतर मागासवर्ग-  कुदळे राजेंद्र महादेव

विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र-  कोळेकर शिवाजी हरिभाऊ

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय भाजपा शीतयुद्ध चव्हाट्यावर, मेधाताईंनी कान टोचले तर धीरज घाटेंचाही जोरदार पलटवार

0

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहून थेट सोम्या-गोम्या असा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेच कान टोचले आहेत. त्यामुळे भिसे मृत्यू प्रकरण आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे हा वादच समोर आला आहे. दरम्यान या पत्रानंतर धीरज घाटेंची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

मेधा कुलकर्णींनी लिहिलेलं पत्र काय?

मा. धीरज घाटे, शहराध्यक्ष, पुणे शहर भाजपा

गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबाविषयी आहेत. असा प्रसंग कुणावरही येऊ नये.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपला सविस्तर खुलासा केला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला आणि इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करुन कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे तपशील खुलाशात आहेत. त्याची शहानिशा करुन चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे.

परंतु यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे? याची माहिती करुन न घेता भाजपाच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आत्ता बोलत नाही कारण तो आपला विषय नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रति निष्ठा आहे, प्रेम आणि आशीर्वादही आहेत. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही. आंदोलन करण्याच्या सभ्य पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरुन ठरेल असं मला वाटतं. इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात हे खरं असलं तरीही चांगले डॉक्टर अस्तित्वात आहेत यावर माझा भरवसा आहे, हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते. कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेलं मोडतोडीचं उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. या संदर्भात नागरिकांचे नाराजीचे फोन मला सातत्याने येत आहेत. दिल्लीतील अधिवेशनातून परतल्यावर मी याबाबत माहिती घेतली.

पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते आणि त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो. शिवाय वड्याचे तेल वांग्यावर काढल्याने विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते.

राजकीय व्यक्तींनी कायमच कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाम्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचं कार्य आपण शहराध्यक्ष या नात्याने कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना त्यांच्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रतेने वापर कर्यास सांगाल अशी अपेक्षा करते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर ती दुरुस्त करणं आवश्यक आहे. हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सद्सद् विवेक बुद्धीवर सोडते आहे. असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं आहे. दरम्यान याबाबत धीरज घाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

धीरज घाटे काय म्हणाले?

या पत्राबाबत प्रतिक्रिया देताना धीरज घाटे म्हणाले, मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिलं आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे. मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत ह्या गोष्टी बोलायला हव्या होत्या, पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होतं, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे, असंही घाटे यांनी स्पष्ट केलं आहे.

वडील केंद्रीय मंत्री करोडोंची संपत्ती राजघराण्याची पार्श्वभूमी, पण भाजीपाला विकतोय, कंपनी मूल्यांकनही 150 कोटी…

0

मुंबई : अब्जोंची संपत्ती,राजघराण्याची पार्श्वभूमी, आणि देशाचे केंद्रीय मंत्री वडील. या सर्व गोष्टी असल्यावर, अनेकांना वाटतं की अशा व्यक्तींना कशाचीच कमी नसते आणि संघर्ष करायची गरजही उरत नाही. मात्र या पारंपरिक समजुतीला छेद देत, महाआर्यमन सिंधिया नावाचा एक युवक आजच्या तरुणांसाठी नवा आदर्श ठरत आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र असलेल्या महाआर्यमन यांनी आपल्या आयुष्यात केवळ राजघराण्याचा वारसा वापरून प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा, काहीतरी ठोस करून दाखवण्याची वाट निवडली. त्यांनी 2021 मध्ये ‘MyMandi’ नावाचा स्टार्टअप सुरू केला, जो ताज्या फळभाज्या आणि भाजीपाल्याचा थेट पुरवठा ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.

‘My Mandi’ थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत

या स्टार्टअपने मधली दलालीची साखळी तोडून शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आदर्श मार्ग निर्माण केला आहे. महाआर्यमन यांनी स्वतः सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये जाऊन भाज्या खरेदी केल्या, पुरवठा साखळी समजून घेतली आणि अनेक वेळा शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

त्यांच्या या प्रयत्नांमुळे My Mandi केवळ एक व्यवसाय न राहता, शाश्वत विकास आणि ग्रामीण सक्षमीकरणाचं उदाहरण बनलं आहे. उद्योगजगतातील दिग्गजांनीही हे ओळखलं इतकंच नाही तर दिवंगत रतन टाटा यांनी देखील ‘MyMandi’ मध्ये गुंतवणूक करून या उपक्रमाला मान्यता दिली.

विदेशी शिक्षण, पण देशासाठी योगदान

महाआर्यमन यांचे शिक्षण दून स्कूल आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटीत झाले असून, त्यांनी ‘Boston Consulting Group’ आणि ‘SoftBank’ सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. पण त्यांच्या मनात भारतातील ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, आणि म्हणूनच त्यांनी कॉर्पोरेट जगतापासून दूर जाऊन शेती आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं ठरवलं.

सध्या पाच शहरांमध्ये विस्तारलेली सेवा

आज ‘MyMandi’ भारतातील 5 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. हजारो शेतकरी, ग्राहक आणि विक्रेते यांना जोडणारे हे एक मजबूत नेटवर्क बनले आहे. आतापर्यंत स्टार्टअपने 1.2 मिलियन डॉलरहून अधिक निधी उभारला असून कंपनीचे मूल्यांकन 150 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

एक फोन आला अन् त्यानंतर गोळी झाडून घेतली, आयुक्त मनोहरेंच्या नातेवाईकांचा दावा; काय घडलं?

0

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. यामुळे कवटीचा भाग फुटून त्याचे काही तुकडे मेंदूत घुसले.त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी मनोहरे यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे. मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेला तीन दिवस झाले असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, मनोहरे यांनी असं का केलं याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही.

बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांना दावा केला की, मनोहरे यांना कुणाचा तरी फोन आला. त्यावर बोलल्यानंतर काही वेळातच त्यांनी गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. फोन नेमका कुणाचा होता? फोनवर मनोहरे नेमकं काय बोलले याचा तपास पोलीस करत आहेत.

मनोहरे यांचे दोन्ही फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. फोनचा डेटा तपासला जाणार आहे. याशिवाय इतर माहिती मिळते का हे पाहिल्यानंतरच नेमकं स्पष्ट होऊ शकेल. मनोहरेंना फोन कोणाचा आला? फोनवर काय बोलणं झालं, त्या फोन कॉलमुळेच मनोहरेंनी हे पाऊल उचललं का यादृष्टीने पोलीस तपास करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मनोहरे यांच्यावर लातूरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रविवारी एअर अॅम्ब्युलन्सने मनोहरे यांना मुंबईला हलवण्यात आलं. गोळी झाडून घेतल्यानंतर कवटीच्या हाडाचे तुकडे मेंदूत अडकले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी अद्याप मेंदूच्या खाही भागात संवेदना कमी आहेत. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकीळा बेन रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली.

तातडीच्या उपचारांसाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेकडून खासगी रुग्णालयांना नोटीस

0

पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार न केल्याने तनिषा भिसे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली. पैशांच्या मागणीवरून रुग्णाचा जीव गेल्याच्या या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्याविरुद्ध तीव्र आंदोलने केली.

दरम्यान, रुग्णालयाने या प्रकरणाची दखल घेत तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर पुणे महापालिकेला अखेर जाग आली आणि महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना ताटकळत ठेवून रुग्णालये अनामत रक्कम भरण्यासाठी रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करतात. उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ येते. तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर या प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्ट झाले.

त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. तातडीच्या उपचारांसाठी नातेवाईक त्यांच्या रुग्णांना घेऊन येतात, त्यावेळी त्यांच्याकडून अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नये. रुग्णावर तातडीने उपचार करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीना बोराडे यांनी सांगितले.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालये यांना संबंधित नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा द्यावी व जीवित रक्षणासाठीच्या सुवर्णकालिन उपचार पध्दतीचे, निकषांचे पालन केले जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.

टोल फ्री क्रमांकावर करा संपर्क

रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन ने केल्यास या १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाकडून ८९ रुग्णालयावर कारवाई

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील ८६० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८९ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, संबंधित रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे.

वित्त विभागाच्या मंत्रालयातील सर्व विभागांना सूचना; पहिल्या 9 महिन्यांत ६० टक्के निधी खर्च करा त्यामुळे…

0

अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी वर्षभर खर्च करायचा नाही आणि आर्थिक वर्ष संपत आले की निधी खर्च करण्यासाठी धावपळ करायची हे चित्र बदलण्यासाठी वित्त विभागाने सर्व विभागांना नियोजित पद्धतीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वित्त विभागाने याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात पहिल्या नऊ महिन्यांत (डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत) सर्व विभागांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधी पैकी ६० टक्के निधी खर्च करण्याबाबतची सूचना सर्व विभागांना केली आहे.

वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय वार्षिक तरतुदींपैकी पहिल्या नऊ महिन्यांत ६० टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व विभागांना अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या एकूण वार्षिक तरतुदीच्या ६० टक्के निधी खर्च करावा लागणार आहे. याशिवाय आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी, जिल्हा वार्षिक योजना याचा खर्चही डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ६० टक्के करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे तरतूद केलेला निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च होऊ शकेल आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच मार्च महिन्यात निधी खर्च करण्यासाठी सर्व विभागांकडून केली जाणारी धावपळ आणि त्यामुळे वित्त विभागावर येणारा ताण कमी होऊ शकेल.

या कारणांमुळे वित्त विभागाने घेतला निर्णय

वेतनविषयक खर्च वगळता उर्वरित बाबींचा खर्च आर्थिक वर्षाच्या कालावधीत समप्रमाणात केला जात नाही. निधी उपलब्ध असूनही प्रक्रियेअभावी तो खर्च करता येत नाही. परिणामी बहुतांश तरतुदी वर्षभर अखर्चित राहतात व आर्थिक वर्षाच्या अखेरच्या कालावधीत पुरेशा तयारीशिवाय खर्च केला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पीय तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटच्या खर्च होते. यात वित्तीय शिस्तीचे पालन केले जात नाही, तसेच विकासकामांची प्रगती राखली जात नाही. त्यामुळे वित्त विभागाने हा निर्णय घेतला आहे. निधी खर्च करण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी अशा सूचना दिल्या आहेत.

राज्यमंत्र्यांकडे खूप खाती पण जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच नाहीत

0

राज्यात सहा राज्यमंत्री आहेत, प्रत्येकाकडे सहा खाती आहेत, पण समाधान तेवढेच, कारण त्यांना जादा अधिकार कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रिपद हे केवळ शोभेचे असल्याची भावना राज्यमंत्री कार्यालयात व्यक्त होत आहे. सूत्रांनी सांगितले, राज्यमंत्र्यांचाही सन्मान राखला जाईल अशा पद्धतीने त्यांना अधिकार प्रदान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तुम्ही असे अधिकार दिले नाही तर मीच राज्यमंत्र्यांना अधिकार देईन अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. त्यानुसार काही कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कुठले अधिकार दिले याची परिपत्रक काढले, पण अगदीच किरकोळ अधिकार दिल्याचे स्पष्ट झाले.

पूर्वी राज्यमंत्र्यांना साधारणत: ते ज्या विभागातून येतात त्यापुरते जादाचे अधिकार दिले जात. तशी पद्धत यावेळी आणली असती तर राज्यमंत्र्यांना किमान त्यांचा मतदारसंघ ज्या महसूल विभागात आहे त्यापुरते तरी जादाचे अधिकार मिळाले असते. काही कॅबिनेट मंत्र्यांनी तर अशी कंजूषी केली की राज्यमंत्र्यांना ज्या विषयाचे अधिकार दिले त्याबाबत निर्णय घेण्यासाठी फाईल आपल्याकडेच येईल, असे आदेश काढले.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू

मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांच्या राज्यमंत्र्यांना इतर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा जादा अधिकार दिले. मात्र, कॅबिनेट मंत्री मनाचा तेवढा मोठेपणा दाखवायला तयार नाहीत. काही राज्यमंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या खात्यांना राज्यमंत्री नाही

जलसंपदा, पशुसंवर्धन, उत्पादन शुल्क, उद्योग, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य, वने, पर्यावरण, मत्स्य व्यवसाय, क्रीडा, ओबीसी कल्याण.

धोरणात्मक प्रक्रियेत स्थानच नाही

धोरणात्मक निर्णयांची कोणतीही माहिती राज्यमंत्र्यांना दिली जात नाही. या संबंधीच्या फायलींचा प्रवास राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री ते मुख्यमंत्री असा झाल्यास धोरणात्मक निर्णयांच्या प्रक्रियेत राज्यमंत्र्यांनाही स्थान असेल. यावेळचे सहाही राज्यमंत्री हे अभ्यासू आहेत, आपापल्या विभागाच्या कामकाजात रस घेऊन कामही करत आहेत, पण फारसे अधिकार नाहीत अशीच त्यांची भावना आहे.

केवळ वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांबाबतचे अधिकार

आस्थापनेच्या पातळीवर विचार करता राज्यमंत्र्यांना केवळ वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.

म्हणजे शिपाई, कारकून, अव्वल कारकुनांपर्यंतच्या बदल्या, पदोन्नती, अन्य बाबीच राज्यमंत्र्यांच्या अखत्यारित असतील. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा अधिकार तेवढा राज्यमंत्र्यांना देण्याची भूमिका कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली आहे.

हे आहेत 6 राज्यमंत्री

आशिष जयस्वाल, योगेश कदम, पंकज भोयर,

इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ हे सहा राज्यमंत्री आहेत.

हे मंत्री ज्या पक्षांचे आहेत त्या पक्षांच्या कॅबिनेट मंत्र्यांनीही त्यांना अधिकार देताना हात आखडता घेतला असल्याचे चित्र आहे. आपल्यावरील अन्यायाबाबत कोणतेही राज्यमंत्री उघडपणे बोलायला तयार नाहीत.

महाबोधी महाविहार वैशाख पौर्णिमेपर्यंत मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन; बिहार आणि केंद्र सरकारला इशारा देत आंबेडकरी तोफ कडाडली

0

मुंबई दि. ६ (रामदास धो. गमरे) “महाबोधी महाविहार मुक्त व्हावे यासाठी सिलोन देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे जननायक भन्ते अनागारिक धम्मपाल यांनी सन १८९१ महाबोधी सोसायटीची स्थापना करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सुरवात केली त्यावेळी तेथील तत्कालीन महंत घमंडगिरी यांनी भन्ते अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांना अतोनात त्रास दिला, विहारात असणाऱ्या ५ बुद्धमूर्ती व त्यांची आई महामाया यांना ५ पांडव व द्रौपदी बनवून त्यांना भ्रष्ट व विद्रुप केले, अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांनी १८९३ साली १६०० वर्षे पूर्वीची जुनी बुद्धमूर्ती वरच्या माळ्यावर बसवण्याचा प्रयत्न केला असता महंत घमंडगिरी व त्याच्या साथीदारांनी अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांना बेदम मारहाण केली ज्यात अनागारिक धम्मपाल यांच्या दोन सहकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला त्याविरुद्ध कोर्टात केस दाखल केल्यानंतरही मनुवादी सरकारच्या संगनमताने कोर्टाने आरोपी महंत घमंडगिरी व त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांनी ही आंदोलन सुरू ठेवले परंतु मनुवादी सरकारने ते ही दडपशाही पध्दतीने वारंवार दडपण्याचा प्रयत्न केला आजही भारत आणि जगभरातील भन्तेजींच्या नेतृत्वाखाली उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सूरु आहे, सन १९५० ला भारतीय संविधान लागू होऊन मागील जुने कायदे रद्दबाद झाले असताना ही बौद्धगया मंदिर कायदा १९४९ याचा आधार घेत ब्राम्हण पंडित महाबोधी महाविहारात बौद्ध धम्म, विचारांची अवहेलना करीत पशुबळी, कर्मकांड, पिंडदान करीत आहे, देश-विदेशातून येणारा करोडो रुपयांचा निधी लाटण्याकरता भगवान गौतम बुद्धांना विष्णूचा अवतार आहे अशी भाकडकथा निर्माण करून निधी लुटला जातोय म्हणून १९४९ चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही आमची साधी मागणी आहे आमचा लढा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नसून तो केवळ आमचे विहार आमच्या ताब्यात द्या याकरता असून तो केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून तो जागतिक पातळीवर पोहोचला असून युनोने ही त्याची दखल घेतली आहे म्हणून बिहार सरकार व केंद्र सरकारला महामोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वैशाखी पौर्णिमेपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त करून आम्हा बौद्धांच्या ताब्यात द्या वैशाखी पौर्णिमेपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त न झाल्यास पुन्हा तीव्र महाआंदोलन करणार” असा कडक इशारा बिहार व केंद्र सरकारला महाबोधी महाविहार मुक्ती महाआंदोलनावेळी उपस्थित जनसागराला संबोधित करत असताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने निघालेल्या या महामोर्चात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी आणि इतर धार्मिक, सामाजिक, राजकीय संस्था आणि पक्षांच्या पाठिंब्याने बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राणीची बाग (भायखळा) ते आझाद मैदान असा महामोर्चा समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सदर महामोर्चा काढण्यात आला. महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सदर महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले सदर सभेचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, मनिषा आंबेडकर, अमन आंबेडकर, जेष्ठ साहित्यीक ज. वि. पवार, रिपब्लिक विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे, बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, माजी उपकार्याध्यक्ष विवेक पवार, किशोर मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई अध्यक्ष विलास वानखेडे, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, अशोक सोनोने तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते, भन्ते शांतिरत्न आणि त्यांचा संघ, भन्ते लामा यांची विशेष उपस्थित प्रामुख्याने होती, सदर महामोर्चास रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग अश्या संपूर्ण कोकणातून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता ज्याने केंद्र व राज्य सरकारला धडकी भरली म्हणून मुंबई पोलिसांना पुढे करून सदर महामोर्चा दडपण्याचा निंदनीय प्रयत्न सरकारने केला, जागोजागी नाकाबंदी करून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली, गाड्यांना पुढे जाऊ दिले नाही त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी केंद्र, राज्य शासन व मुंबई पोलिसांचा निषेध केला तसेच सरकारने इतकी दडपशाही व दंडेलशाही वापरून ही त्याला न जुमानता छातीचा कोट करून भीमसैनिकांनी सदर महामोर्चास उपस्थिती लावून सदर महामोर्चा यशस्वी केल्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले.

सदर सभेत भिक्षु संघाच्यावतीने भन्ते शांतिरत्न, भन्ते लामा, विनोद मोरे, विजय वानखेडे, राजेंद्र पातोडे, विवेक पवार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी ही आपले विचार व्यक्त केले. भीमराव आंबेडकरांनी आपले विचार मांडत असताना “सम्राट चंद्रगुप्त मोर्या याने जगभरात राज्य केले व त्यानंतर १४ राज्य १४ बौद्ध राजांनी या देशात ८४,००० बौद्ध लेण्या, स्तूप, शिल्प बांधली असा सुवर्ण बौद्धकाळ या देशाने पाहिला आहे, जेथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्याठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार निर्माण केले परंतु बामणी पंडितांनी त्यावर अतिक्रमण करून बुद्धाची अवहेलना सुरू केली आहे, त्याठिकाणी जे भन्तेजी आंदोलनास बसले आहेत त्यांच्यावर सरकार दबाब आणून रातोरात त्यांना चांगल्या जागेवरून उचलून घाणीत त्यांना बसवले आहे, मी स्वतः त्याठिकाणी जाऊन आलोय आणि परत तिथे जाणार आहे, काही दिवसांनी बिहारमध्ये निवडणूका होणार आहेत त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन महाबोधी महाविहार हा विषय घेऊन लढावं लागेल आणि आपलं विहार आपल्या ताब्यात घ्यावं लागेल महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी ही तिथे यावे” असे प्रतिपादन केले. सम्यक कोकण कला संस्था आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीने महाकवी विष्णू शिंदे यांनी महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी हिंदी गीत सादर केले.

आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सदर महामोर्चास समाजातील अनेक स्तरातील लोकांनी पाठिंबा देत जवळपास अडीच तास मुंबई रोखुन सरकारला बौद्ध धम्माची ताकद दाखवुन दिली, मुस्लिम बांधवांनी ही सदर मोर्चास भरभरून प्रतिसाद देत शिवरायांचा मावळा व बाबासाहेबांचा अनुयायी रियाज मुकादम या मुस्लिम बंधूने आपला संपूर्ण मुस्लिम समाज शेवटच्या क्षणापर्यंत सदर महामोर्चास पाठिंबा देईल असे जाहीर केले सरतेशेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून आनंदराज आंबेडकरांनी महामोर्चाची सांगता केली.