Home Blog Page 119

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना नानाकडेच पण ‘ब’ वर्गाकडे विशेष लक्ष; बदललेली गणिते तारेवरची कसरत?

0

मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडल्यानंतर संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांची आज बहुमताने अध्यक्ष पदाची निवड पार पडत असली तरी सुद्धा 21 संचालकांच्या मंडळामध्ये विशेष जिव्हाळ्याची असलेली ब वर्गाची जागा धोक्यात आली आहे की काय अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांना अपेक्ष प्रमाणे मध्ये न मिळता सुमारे 1000 कमी मिळालेली मते विचारात घेता त्यांच्या पसंतीच्या ब वर्गाच्या जागेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन विदुराजी उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये सन २०२५-२०३० करिता संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले असून आज दुपारी 1 वाजता नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या नवनियुक्त सदस्यांचा विचार करता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या नियोजनामध्ये माजी माजी आमदार यांच्या संमतीने प्राबल्य तयार करण्यात आले आहे. आपल्या राजकीय वजनाचा वापर करून अत्यंत हुशारीने संस्थापकांच्या ताब्यातून अलगद साखर कारखाना मिळवला ही सुरू झालेली नवी चर्चा प्रत्यक्षात काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील केंद्रीय मंत्री 5 आमदार आणि माजी आमदार विद्यमान खासदार अशी भलीमोठी मांदीयाळी असतानाही सर्वाधिक सदस्य संचालक करण्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांनी बाजी मारली आहे.

संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे अधिकृत विजयी उमेदवार-

गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे

१ नवले विदुराजी विठोबा (संस्थापक)

२ भुजबळ चेतन हुशार (नानासाहेब नवले)

३ जाधव दत्तात्रय गोपाळ (राष्ट्रवादी)

गट क्र. २ पौड – पिरंगुट

१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (राष्ट्रवादी )

२ गायकवाड यशवंत सत्तू  (राष्ट्रवादी)

३ उभे दत्तात्रय शंकरराव (भाजप )

गट क्र. ३ तळेगाव वडगाव

१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव (भाजप)

२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (राष्ट्रवादी)

३ काशिद संदीप ज्ञानेश्वर (भाजप)

गट क्र. ४ सोमाटणे – पवनानगर

१ कडू छबुराव रामचंद्र (राष्ट्रवादी)

२ लिम्हण भरत मच्छिंद्र (राष्ट्रवादी)

३ बोडके उमेश बाळू (राष्ट्रवादी)

गट क्र. ५ खेड- शिरूर- हवेली

१ लोखंडे अनिल किसन (नानासाहेब नवले)

२ कातोरे विलास रामचंद्र (राष्ट्रवादी)

३ काळजे अतुल अरूण (भाजप)

४ भोंडवे धोंडीबा तुकाराम (भाजप)

महिला राखीव

१ अरगडे ज्योती केशव (शिवसेना)

२ वाघोले शोभा गोरक्षनाथ (राष्ट्रवादी)

अनुसूचित जाती / जमाती

भालेराव लक्ष्मण शंकर (राष्ट्रवादी)

इतर मागासवर्ग 

कुदळे राजेंद्र महादेव (राष्ट्रवादी )

विमुक्त जाती/भटक्या जमाती

कोळेकर शिवाजी हरिभाऊ ( राष्ट्रवादी)

मोठी बातमी, 31 पोलीस जखमी, नाशिकमध्ये मध्यरात्री काय घडलं? अनधिकृत दर्ग्याच तोडकाम

0

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज पहाटेपासून सुरुवात झाली आहे. मात्र हे अनधिकृत बांधकाम तोडण्याआधी रात्रीच्यावेळी तिथे हिंसाचार झाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या ठिकाणी झालेल्या या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 57 संशयास्पद मोटरसायकली पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. बांधकाम काढण्यासाठी पथक आलं होतं. मात्र याचवेळी एका जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आले होते. मात्र त्यांनाही जुमानलं नाही. प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्याच नुकसान केलं. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिस्थिती शांत आहे.

500 पोलीस पण जमाव मात्र 400 च्या वर

वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा दिला होता. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही बदल केला आहे.

मर्जीतील ठेकेदारासाठी महाराष्ट्रात काम केल्याची सक्ती; राज्यातील एक ते दोन कंपन्या या निविदेसाठी पात्र ठरणार

0

पुणे महापालिकेने कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यासाठी १३९.९२ कोटीची निविदा काढली आहे. पण यात जास्त स्पर्धा होऊ नये यासाठी सात वर्ष महाराष्ट्रात काम केल्याचा अनुभव अनिवार्य केला आहे. त्यामुळे राज्यातील ठरावीक एक ते दोन कंपन्या या निविदेसाठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये स्पर्धाच होणार नाही. राज्यातील एका मंत्र्याच्या जवळच्या एजन्सीचा फायदा करून देण्यासाठी निविदेतील अटी व शर्ती तयार केल्या आहेत. या निविदेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी याचिकाकर्त्याने वकिलामार्फत महापालिकेला नोटीस बजावली आहे.

पुणे महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय, क्रीडांगण, नाट्यगृह, दवाखाने, रुग्णालय, जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, उद्यान यासह अन्य ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्‍यकता असते. महापालिकेत कायम सेवेतील सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्याने कंत्राटी पद्धतीने बहुउद्देशीय कामगार या नावाखाली सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. सुरक्षा विभागाने पुढील तीन वर्षासाठी ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे. तीन वर्षासाठी १५६५ सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिका तब्बल १३९. ९२ कोटी रुपये मोजणार आहे. ठरावीक ठेकेदारांनाच पायघड्या घालण्यासाठी तीन वर्षाची निविदा काढली जात असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते.

महापालिकेच्या या निविदेतील अटी शर्तींच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. यासाठी वसीम शेख यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. या निविदेसाठी ज्या अटी व शर्ती निश्‍चित केल्या आहेत, त्यामध्ये ठेकेदाराला महाराष्ट्रात काम केल्याचा सात वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य केले आहे. ही अट संशयास्पद असून, ठरावीक कंपन्यांनाच काम कसे मिळेल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही निविदा काढताना सुनियोजित पद्धतीने सुमारे ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या हिताला बाधा येणार असल्याने हा व्यापक जनहिताचा मुद्दा असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

ही तर चलाखी

सुरक्षा रक्षकांची नेमणूक करताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्‍या नियमानुसार काम करणे आवश्‍यक आहे. पण त्यातून पळवाट काढण्यासाठी बहुउद्देशीय कामगार या नावाखाली निविदा काढली असून, ही प्रशासनाची चलाखी आहे. महापालिका शब्द बदल करून कायद्याची दिशाभूल करू शकत नाही असे ही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

”सुरक्षा विभागाने काढलेल्या निविदेतील अटी शर्तींमध्ये जर ठेकेदारांचे आक्षेप असतील तर त्यावर प्री बीड बैठकीमध्ये चर्चा करून योग्य तो बदल केला जाईल.” – पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तब्बल दीड तास राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचे कारण काय, याबद्दल भाष्य केले.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तब्बल दीड तास एकमेकांशी चर्चा करत होते. ही चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे-शिवसेना युतीबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. आज कोणतीही युती, महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळी ही सदिच्छा भेट होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
“आज खरं म्हणजे राज ठाकरेंनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यासाठी मी आलो होतो. गेले काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर एक दोन महिन्यांपासून भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारुया असं आमचं सुरु होतं. त्यामुळे मी आज आलो. ही सदिच्छा भेट होती. स्नेहभोजनही झालं. गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राज साहेबांचे अनुभव. आम्ही बाळासाहेबांसोबत एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. अनेक बाळासाहेबांच्या जुन्या घटनांवर बरीच चर्चा आणि गप्पा झाल्या. अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला हेच कळलं नाही. ही सदिच्छा भेट होती. याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही”, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

“आज सकाळी मी सिमेंट क्राँकीटचे रस्ते पाहिले, त्याबद्दलही राज ठाकरेंनी विचारणा केली. सरकारचं काम कसं चाललंय, मुंबईतील रस्त्यांची काम कशी चालली आहेत याबद्दलही विचारले. अनेक विकासकामांबद्दलही चर्चा झाली. पण राजकीय चर्चा कोणतीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये आमचा एवढा वेळ कसा गेला हे कळलं नाही. ही वस्तूस्थिती आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही
“तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे नेते आहोत. आम्ही मनात एक पोटात एक ओठात एक ठेवणारे लोक नाही. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्या काळात राज ठाकरे आणि मी कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्या काळातील काही घडामोडी, काही आठवणींनाही उजाळा दिला. बाळासाहेबांबद्दल जास्त आठवणी आणि अनुभव हा राज ठाकरेंकडे आहे. त्याबद्दलही आम्ही मोठ्या प्रमाणात चर्चा केली. ही खूप चांगली सदिच्छा भेट झाली. चर्चाही झाली. त्यामुळे यात कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही”, असे शिंदेंनी स्पष्ट केले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही
“आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीचे सरकार आहे. मी नेहमी जाहीरपणे सांगतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. यापुढेही येणाऱ्या निवडणुकीत महायुती चांगलं यश मिळवेल. त्यामुळे महायुती आहेच. आता निवडणुकांवर चर्चा करण्याची वेळ नव्हती. आम्ही नेहमी तयारीतच असतो. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना ही नेहमी काम करत असते. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही”, असा टोला एकनाथ शिदेंनी लगावला.

राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते
“आता जवळपास निवडणुका नाही. त्यामुळे निवडणुकांचा माहोल तयार झाल्यावर युती, महायुती ही चर्चा तेव्हा होते. पण आज कोणतीही युती, महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळी ही सदिच्छा भेट होती. जेवणाचे निमंत्रण होते. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे हे लोकसभेत मोदींसोबत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही”. त्यांनी काम करावं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

‘छत्रपती’चा कारभारी होण्यास इच्छुकांची रेकॉर्डब्रेक गर्दी, शेवटच्या दिवशी २६१ जणांचे अर्ज उमेदवारी संख्या ६०० वर

0

बारामती कोट्यावधींचे कर्ज असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा नवा कारभारी होण्यासाठी इच्छुकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि १५) अखेर ६०० नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि १५) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी ७ ते १५ एप्रिल २०२५ होता आज अखेर ६०० अर्ज दाखल (नामनिर्देशन पत्र) अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आजपर्यंत ३३९ जणांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी २६१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती झाली आहे. अजित पवार यांनी जाचक यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी दिली आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक होण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. उमेदवारांच्या अर्जाचा उच्चांक झाला आहे.

बुधवार (दि १६) पासुन अर्जाची छाननी सुरु होणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कृती समितीचे नेते यांच्याबरोबर अडचणीतील छत्रपती सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच जाचक आगामी पाच वर्ष नेतृत्व करतील, अशी घोषणा केली आहे. त्याला काही स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच काही अपक्षांचे पॅनल देखील निवडणुकींच्या रींगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या १०० दिवस आढावा 6 दिग्गज मंत्री फेल; उपमुख्यमंत्री शिंदेंची धक्कादायक कामगिरी

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या आढावा कामगिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा दिग्गज मंत्री त्यांना नेमलेल्या लक्षवेधी कामगिरीत मागे पडले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणखीन पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली असल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महायुतीतील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यात मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करू शकले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आढावा बैठकीत त्यांना त्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे‌. तसेच त्यांचा रिपोर्ट त्यांनी दिल्लीलाही धाडल्याचे सांगण्यात येते. आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कामगिरी अन्य मंत्र्यांच्या लक्ष्यापेक्षा मागे पडलेले‌ आढळल्याने धक्का बसला. तसेच अन्य ज्येष्ठ मंत्रीही त्यांचे टार्गेट पूर्ण करु शकले नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट समज न देता विशेष काळजी घेऊन सूचना दिल्या आहेत. शंभर दिवसाच्या कामगिरीत अन्य मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक झाली आहे.

टार्गेट पूर्ण करणारे मंत्री

टार्गेट पूर्ण करणाऱ्या मंत्र्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांची नावे समाविष्ट आहेत असेही म्हटल्याचे समजते.

राणे, नाईकही असमाधानकारकमध्ये

असमाधानकारक मंत्र्याच्या यादीत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक व बंदरे मंत्री नितेश‌ राणे यांची नावे असल्यामुळे मंत्रालयीन कर्मचारी आश्चर्यचकीत झाल्याचे वाटत होते. विधीमंडळ वा अन्य ठिकाणचा त्यांच्या कामांत ते अग्रेसर असल्याचे म्हटले जाते. मग त्यांच्या खात्याच्या कार्यक्षमतेत अन्य मंत्र्यांच्या कामगिरीच्या तुलनेत ते मागे पडले असल्याची शक्यताच नसल्याचे त्यांचे मत असल्याची चर्चा दबक्या आवाजात मंत्रालयांत होती. परंतु मंत्र्यांच्या चर्चेनुसार वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही.

एकनाथ शिंदेंना मुदतवाढ

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीत स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच त्यांना नेमून दिलेल्या कामाच्या लक्ष्यापासून मागे‌ पडले आहेत. पंधरा दिवसांची मुदत त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे पण त्यांच्याकडील अन्य मंत्र्यांच्या कामाच्या रगाड्यात तसेच अभ्यांगतांची त्यांच्याकडे कामासाठी वाढलेली गर्दी यामुळे शिंदेंना आणखीन काही दिवसांची मुदतवाढ त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देणं भाग पडणार असल्याचेही बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंसह शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही खात्याच्या कामगिरीत त्यांची पिछाडी झाल्याचे दिसून येत आहे. परिवहन व पाणीपुरवठाची प्रत्यक्ष नेमलेली कामे अनुक्रमे २५ व ४० टक्क्यापर्यंतच लक्ष्य त्यांना गाठण्यात यश आल्याचे‌ म्हणण्यात‌ आले आहे. या खात्यांचा बहुतकरुन खेडेगावांशी जास्ती संपर्क असल्यामुळेही मंत्री सुपर‌ असूनही खात्यातील अधिकाऱ्यांची पूर्ण क्षमता नसल्याने त्यांचे टार्गेट पुढे सरकले नसल्याचेही नमूद केल्याचे समजते. शिक्षणमंत्री भुसेंचे काम पंधरा दिवसांत‌ पूर्ण होण्यासारखे असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.

रायगड पालकमंत्रीपद व लाडकी बहिण यामुळे राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या महिला व बालकल्याण विकासच्या मंत्री आदिती तटकरे या त्यांच्या खात्याचे टार्गेट नियोजीत वेळेत गाठू‌ शकल्या नाहीत. त्या फारशा मागे पडल्या नसल्या तरी त्यांच्याकडील खात्याचे महत्व लक्षांत घेता त्यांना नेमलेले टार्गेट आता त्यांनी पूर्ण करावे असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या टार्गेट गाठू‌ न शकल्याने थेट कान टोचले नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रमाणे मार्गदर्शक सूचनाही केल्या‌ आहेत‌.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना पुरस्कार; शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव

0

सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

पुण्यात शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मुंबईत आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण 89 पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करणयात येणार आहे. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी 3 लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

पुरस्कराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.

2001 पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 1979 ते 1982 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 8 वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. 1978 मध्ये केंद्र शासनाच्या अर्जून पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

हवामान विभागाची शुभवार्ता! दणकून ‘कोसळ’धार अवघा महाराष्ट्र चिंब होणार मॉन्सून पहिल्या टप्प्याचा अंदाज जाहीर

0

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०५ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (ता. १५) मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८७० मिलिमीटर आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

मॉन्सून हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वि-धृविता (इंडियन ओशन डायपोल – आयओडी) आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३३ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता ३० टक्के आहे. तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर भारताचा अति उत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि तसेच तमिळनाडू राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी ते सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. मे अखेरीस हवामानाचा विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस पडला होता.

महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचे संकेत

यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मे अखेरीस सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण आणखी स्पष्ट होऊ शकेल.

अंदाज चार वेळा खरा ठरला

गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनविषयी एप्रिल महिन्यात वर्तविलेला अंदाज चारवेळा खरा ठरला आहे. गेल्यावर्षी हवामान खात्याने १०६ टक्के पर्जन्यमानाचे भाकीत वर्तविले होते आणि प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस पडला होता. केंद्र सरकारच्या वसुंधरा विज्ञान मंत्रालयाने २०२२ मध्ये निश्चित केलेल्या दीर्घकालीन सरासरीनुसार ८७० मिमी पर्जन्यवृष्टी सामान्य मानली जाते. हवामान खात्याकडून मे महिन्यात मॉन्सूनविषयीची माहिती अद्ययावत करण्यात येईल.

‘एल निनो’ तटस्थ राहणार

विषुववृत्तीय प्रशांत महसागराचे तापमान सरासरीवर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे. उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यानच्या कालावधीत यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल – आयओडी) सध्या तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ही स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ आणि तटस्थ स्थिती, युरेशियातील कमी हिमाच्छादन, हिंद महासागरातील धन आणि तटस्थ ‘आयओडी’ हे घटक मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जातात.

विजेची मागणी वाढणार

देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उन्हाळ्याची स्थिती असून एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याचे दिवस सर्वाधिक असतील. पारा वाढल्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर दबाव येईल आणि पाण्याचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा महापात्रा यांनी दिला. मॉन्सूनच्या मोसमात पर्जन्यवृष्टीचे दिवस कमी होत चालले असून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे दुष्काळ आणि पुराची स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

मॉन्सूनची शक्‍यता पावसाचे प्रमाण शक्‍यता- 

९० टक्‍क्‍यांहून कमी – २ टक्के

९० ते ९५ टक्के – ९ टक्के

९६ ते १०४ टक्के – ३० टक्के

१०४ ते ११० टक्के – ३३ टक्के

११० टक्‍क्‍यांहून अधिक – २६ टक्के

राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?

0

महाराष्ट्रासमोर पाणीसंकट उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिना उलटला नाही आणि पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.

राज्यात एकूण २ हजार ९९७ धरणे आहेत, ज्यात लहान ते मोठ्या संरचनांचा समावेश आहे, ज्यांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता ४० हजार ४९८ दशलक्ष घनमीटर आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातील धरणांत फक्त ३० हजार ०३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांत ३५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. हे प्रमाण किंचित चांगले असले तरी अधिकारी सावध आहेत.

अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्य सरकार ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ७ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या २२३ टँकर कार्यरत आहेत, जे १७८ गावे आणि ६०६ वाड्यांमध्ये पाणी पोहोचवत आहेत.

कुठे किती पाणी शिल्लक?

दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती ५०.०९ टक्के पाणीसाठ्यासह सर्वात स्थिर स्थितीत आहे. जुलैल्या मध्यपर्यंत अमरावतीकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असे सांगण्यात येत आहे. कोकणात ४९.९६ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर, नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे ४१.४९ टक्के आणि ४३.९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाड्यातील जलशयांची पाण्याची पातळी ४०.४९ टक्क्यांवर घसरली आहे.

नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन

वाढते तापमान आणि पावसाला अजून वेळ असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. तर, अधिकारी सर्व प्रदेशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

जयंत पाटलांना दे धक्का, भाऊच भाजपात; राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोठ्या नेत्यांचीही बीजेपीत एंट्री

0

लोकसभा निवडणुकांपासूनच सुरू झालेलं राज्यातील मोठमोठ्या पक्षातील इनकमिंग-आऊटगोईंग अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्या निकालांनंतरही मविआतील अनेक नेत्यांनी आपापले पक्ष सोडत महायुतीमध्ये प्रवेश केलेला दिसून आला. तीच प्रोसेस अद्यापही सुरू असून महायुतीमध्ये विशेषत: भारतीय जनता पक्षामध्ये येणं-जाणं कायम आहे. यावेळी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीतील काही मोठ्या नेत्यांना पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडूरंग बरोरा यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून ते भाजपात दाखल झाले आहेत. कपिल पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला असून बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच रायगडमध्येही भाजपने मोठी खेळी केली असून शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपात जाणार आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडित पाटील यांचाही आज भाजपात प्रवेश होणार असल्याचे वृत्त असून हा जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तिसऱ्यांदा पक्ष बदलून पांडुरंग बरोरा भाजपवासी

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पांडूरंग बरोरा यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून कपिल पाटील यांच्या पुढाकारानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम करत भाजपात एंट्री केली. मंगळवारी पार पडलेल्या या प्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाची शहापुरातील ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच स्थानिक राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजकीय समीकरणे बदलणार ?

शहापूर मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे होता. मात्र अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. मात्र यावरील शिवसेनेचा दावाही कमी झाल्याचे बोलले जाते. त्यात आता माजी आमदार आणि दावेदार असलेले पांडूरंग बरोरा भाजपात गेल्याने भविष्यात या मतदारसंघावरही भाजप दावा करणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीला शह देणार की काय अशी चर्चा आत्ता रंगू लागली आहे.

जयंत पाटीलांनाही मोठा धक्का, बंधू भाजपावासी

भाजपमध्ये अनेकांची एंट्री होत असून नेते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटलांचे बंधू व माजी आमदार पंडित पाटील यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. तसेच रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे, कारण माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपात जाणार आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आज दोन्ही पक्ष प्रवेश होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात हे पक्षप्रवेश पार पडतील अशी माहिती समोर आली आहे.