Home Blog Page 26

वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा विक्रमी प्रवास – दोन दिवसांत ५.४५ लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

0

पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे प्रमुख रस्ते बंद असतानाच पुणे मेट्रोने प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली आहे. २० आणि २१ जून या दोन दिवसांत तब्बल ५.४५ लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला, अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली.

शुक्रवार (२० जून) रोजी पुणे मेट्रोने ३,१९,०६६ प्रवाशांची विक्रमी एकदिवसीय वाहतूक केली.

  • लाइन 1 (पीसीएमसी ते स्वारगेट): १,५०,३८५ प्रवासी
  • लाइन 2 (वनाज ते रामवाडी): १,६८,६८१ प्रवासी

शनिवारी (२१ जून) ही प्रवासीसंख्या जरी थोडी घटली तरीही ती सरासरीच्या दुप्पट होती — २,२६,६०० प्रवासी.

  • लाइन 1: १,१३,३६६
  • लाइन 2: १,१३,२३४

पुणे शहरात वारी मिरवणुकीमुळे मध्यवर्ती भागांतील रस्ते, तसेच पिंपरी-चिंचवडशी जोडणारे रस्ते बंद होते. परिणामी अनेक वारकरी आणि नागरिकांनी मेट्रोचा वापर केला. पेठ भागांमध्ये खासगी वाहने बंद असल्याने सार्वजनिक वाहतूकच एकमेव पर्याय ठरली.

पुणे मेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले, “खूपशा वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी यावेळी मेट्रोचा वापर केवळ गरजेपोटीच नाही, तर पहिल्यांदाच मेट्रोचा अनुभव घेण्यासाठीही केला.” यंदा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा नवीन टप्पा सुरू झाल्याने अनेक वारकरी आणि स्थानिकांनी त्याचा फायदा घेतला.

“दैनंदिन नागरी प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता” – नवल किशोर राम

0

पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विविध भागांना भेटी देत थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. “मोठमोठ्या प्रकल्पांपेक्षा नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

दैनंदिन समस्यांना प्राधान्य

गटार, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत अतिक्रमणे, पाण्याची गळती, साचलेले पाणी आणि स्वच्छता — या रोजच्या समस्या सुटल्याशिवाय “निवासयोग्य पुणे” हे स्वप्न साकार होणार नाही, असे राम म्हणाले.

स्वच्छ पुणे अभियान

पुण्यात स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत त्यांनी ‘स्वच्छ पुणे अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली. नागरिक, NGO आणि उद्योगपती यांच्या सहभागातून हे अभियान राबवले जाणार असून, कचरा संकलन आणि सफाई कामाचे थेट निरीक्षण करणारे ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ तयार केले जाणार आहे.

अतिक्रमणविरोधी मोहीम

ऑक्टोबरपासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू होणार आहे. ही मोहीम केवळ अतिक्रमण हटवण्यासाठी नव्हे तर ती पुन्हा होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था

पुण्यात नव्या आजारांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य हा प्राधान्यक्रम ठरेल. खासगी रुग्णालयांनी गरीब रुग्णांबाबत सहानुभूती दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ 10 टक्के विद्यार्थी आहेत. त्यामुळे लवकरच मॉडेल स्कूल सुरू करून त्या खासगी शाळांशी स्पर्धा करतील इतकं दर्जेदार शिक्षण देण्यात येईल, अशी योजना आहे.

प्रलंबित प्रकल्प आणि दीर्घकालीन योजना

मेट्रो, रिव्हरफ्रंट, JICAसारख्या प्रकल्पांवर काम सुरू असून ते वेळेत पूर्ण करणे हे राम यांचे ध्येय आहे. याशिवाय, विलीनीकरण झालेल्या गावांमध्ये ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाइन, काँक्रीट रस्ते यांची योजना आखली जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन

पुणे शहरात २,४०० किमी रस्त्यांपैकी फक्त ३१८ किमीवरच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईन आहेत. त्यामुळे पूर, आगीच्या घटना आणि साथीच्या रोगांसाठी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन उभे करण्यात येणार आहे.

सामर्थ्यवान प्रशासन

“चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी संरक्षण देईन आणि त्यांचे मनोबल उंचावेल,” असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी नियमित संवाद ठेवण्याचा संकल्प केला आहे.

पुणेकरांना संदेश

“मी तुमच्यासाठी आलो आहे. तुमच्या समस्या ऐकायला आणि सोडवायला तयार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन पुणे अधिक सुंदर, समावेशक आणि प्रतिसादक्षम बनवूया,” असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला.

वैष्णवांची मांदियाळीचे हिंगणे होम कॉलनीत बंडूशेठ तांबे यांच्याकडून आदरपूर्वक स्वागत

0

कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात सालाबाद प्रमाणे याही वर्षी वारकरी 20 जून व 21 जून2025 रोजी मेळावा संपन्न झाला. साधू संत येती घरातच दिवाळी दसरा याच उत्साह बंडूशेठ तांबे यांनी केलेला आदरपूर्व स्वागत आणि घराघरात सुरू झालेली लगबग यामुळे होम कॉलनी परिसरात एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेलं होतं. भव्य दिव्य अशा मंडपात् वारकऱ्यांच्या सोबत् कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व परिसरातील नागरिकांनी तसेच महिला पुरुष तरुण मुलं मुली या सर्वांनी फुगडी झिम्मा  कीर्तन भजन भारुड इत्यादी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. वारकऱ्यांचे वास्तव्य होम कॉलनी सभागृहात करण्यात आले होते.

आरोग्य सेवा फाउंडेशनच्या लहान मुलांनी आई-वडिलांची सेवा आजी-आजोबांची सेवा कशी करावी या उद्देशाने वारकरी बंधू भगिनींची तेल मालिशची सेवा देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन माननीय श्री रामराव कदम ,अशोक कदम, सोपान कावळे, कल्याण कदम व श्रीमती कुसुम नामदेव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमरीत्या केले त्याचप्रमाणे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वतीने सुद्धा वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार मोफत देण्यात आले त्याचप्रमाणे वारजे येथील आदर्श पतसंस्थेच्या वतीने सर्व वारकऱ्यांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन आनंद उर्फ बंडूशेठ तांबे व दिंडी चालक हरिभक्त परायण माननीय श्री विश्वंभर घुमरे महाराज यांनी  मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात किंग ऑफ किंग ग्रुप कर्वेनगर दहीहंडी उत्सव समिती, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा, हिंगणे होम कॉलनी विकास मंच , महाराष्ट्राची रणरागिनी महिला संघटना यांनी मोलाचे योगदान दिले.

याच दिवशी जागतिक योगा दिन असल्यामुळे कमिन्स कॉलेजच्या वतीने तसेच माजी नगरसेविका वृषालीताई दत्तात्रय चौधरी यांच्या वतीने योग गुरु संजय तापकीर यांनी अतिशय छान योगसाधना वारकऱ्यांना प्रात्यक्षिक करून शिकविली. या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत,  वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  श्री गणेश खीरीड, आरोग्य निरीक्षक श्री घटकांबळे साहेब आरोग्य  निरीक्षक श्री राजेश आहेर साहेब स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री माणिक शेठ दुधाने, माजी नगरसेविका वृषालीताई चौधरी, माजी स्वीकृत नगरसेवक दत्ताभाऊ चौधरी, माजी नगरसेवक सुशीलजी मेंगडे, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक माननीय श्री  सुनील तोडकर, पत्रकार माऊली म्हेत्रे, पत्रकार धनराज माने, वाय एम सी कॉलेज ग्रुपचे सदस्य बंडूशेठ हरपुडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभेच्या उपाध्यक्ष सौ तेजलताई दुधाने, मयूर दुधाने, ज्येष्ठ शिवसैनिक जगदीश दिघे ,वैशाली जगदीश दिघे, रत्ना कट्ट्याचे संस्थापक सदस्य सुनील तोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा  संघटक सचिव राजू गाडेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला व योगा ग्रुप चे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

इलणे गावचे सुपुत्र विनोद मोरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सेवा संघ, दापोली, मंडणगड-मुंबई, बौद्ध सेवा संघ, इलणे शाखा मुंबई, बौद्धजन पंचायत समिती, मध्यवर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती मा. विनोद सुदाम मोरे, मुक्काम गाव इलणे, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी यांची बॉम्बे हॉस्पिटलमधून सीनिअर टेक्निकल ऑफिसर म्हणून ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर १८ जून २०२५ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्ती आणि वाढदिवस असा दुहेरी कार्यक्रम इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी महामानवांना पुष्पहार अर्पण करून मा. विनोद मोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विशाखा मोरे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरवात केली तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी सुमधुर व गोडवाणीने धार्मिक विधी पूर्ण करीत त्यांनी आपल्या पहाडी आवाजात, प्रभावी भाषाशैलीत कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि सरचिटणीस राजेश घाडगे या दोघांनी अत्यंत लाघवी भाषाशैलीत विनोद मोरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा लिखित जीवनपट निर्माण केला तर मंगेश पवार यांनी त्या लिखित जीवनपटाचे वाचन सभागृहात करीत विनोद मोरे यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला, सदर कार्यक्रमात विनोद मोरे यांची आई सुरेखाताई मोरे, पत्नी विशाखा मोरे, तीन भाऊ, तीन मुले, सुना, नात असा मोठा परिवार सोबतच इलणेकर भावकी, विविध संघटना, बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात सभापती आनंदराज आंबेडकर बोलत असताना “विनोद मोरे यांनी सदर ३९ वर्षांच्या सेवेत काय कमावलं तर त्यांनी माणसे कमावली, माणुसकी जपली, अनेकांना मदत केली, रोजगार दिले, रुग्णांची सेवा केली सोबतच सामाजिक, शैक्षणिक अश्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला, लहानपणी गावी शिक्षण घेत असता भावकीमध्ये चिटणीस पदापासून ते अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच इलणे केंद्रात सरचिटणीस पदापासून अनेक उच्चपद तसेच बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली, मंडणगड येथे सरचिटणीस, अध्यक्ष, सभापती अशी अनेक पद त्यांनी भूषविली सोबतच शैक्षणिक क्षेत्रात ही त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे, बौद्धजन पंचायत समितीच्या इमारत बांधणीच्या कार्यात ही त्यांचे मोठे योगदान आहे, समितीच्या अगणित सभांचे नेतृत्व त्यांनी करीत आपली कणखर भूमिका मांडत जनमानसात जागृती निर्माण केली व स्मारकनिधीसाठी त्यांना प्रवृत्त केले. बौद्धजन पंचायत समितीमध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी सरचिटणीस, उपकार्याध्यक्ष, उपसभापती असा कार्यभार प्रामाणिकपणे पार पाडला त्यांनी सच्चामनाने बौद्धजन पंचायत समितीवर प्रेम केलं व आपलं योगदान दिले ते असेच पुढे रहावे व त्यांची साथ समितीला अशीच लाभत रहावी” असे गौरवोद्गार काढून त्यांच्या अद्भुतपूर्व योगदानाबद्दल कृतघ्नता व्यक्त करीत त्यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या मंगलकामना देत पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तद्नंतर इलणे सेवा संघाचे अध्यक्ष मोरे साहेब, अनिल मोहिते, दिलीप रुके, विकासक महेंद्र कांबळे, गटप्रतिनिधी विकास गायकवाड, प्रकाश अहिरे, वंचीत बहुजन आघाडीचे मुंबई चिटणीस सरदार भाई, सम्यक कोकण कला संस्थेचे मंदार कवाडे व सहकारी, जयंती उत्सव मंडळाचे भागूराम पवार व सहकारी, बॉम्बे हॉस्पिटलचे त्यांचे सहकर्मचारी व जवळचे स्नेही संजीवनी यादव, जनार्दन मुरडकर, उपकार्याध्यक्ष एच.आर.पवार, अशोक कांबळे, दापोली मुंबई संघाचे सभापती महेंद्र चाफे, विनोद मोरे यांचे जवळचे स्नेही उमाकांत जाधव, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे यांनी आपले विचार मांडीत विनोद मोरे यांना शुभेच्छा दिल्या, सदर कार्यक्रमास कार्यकारी मंडळाचे सर्वच विश्वस्त, सर्वच उपकार्याध्यक्ष, अतिरिक्त चिटणीस, चिटणीस, सर्वच व्यवस्थापक मंडळ, कार्यकारी मंडळ, आजी माजी सर्व कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव, आणि सहकारी, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव आणि सहकारी, विवाह मंडळाचे रघुनाथ घाडगे, साळवी व सहकारी, संस्कार समितीचे मंगेश पवार, मनोहर बा. मोरे व सहकारी, पतपेढीचे किशोर मोरे व सहकारी व सर्वच समित्यांचे, शिवडी गटक्रमांक १३ चे माननीय कार्यकर्ते, विनोद मोरे यांचा गटक्रमांक ४३ चे कार्यकारिणी मंडळ आणि स्थानिक शाखा व स्थानिक शाखेचे अध्यक्ष दिनेश हाटे व सहकारी, बॉम्बे नेव्हल डॉक कर्मचारी, बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारी विविध क्षेत्रातील विविध संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांनी अक्षरशः गर्दी केली होती ज्यामुळे हॉलही अपुरा पडला होता अनेकांना शुभेच्छापर विचार व्यक्त करण्यास वेळ देता आला नाही त्याबद्दल विनोद मोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली, सरतेशेवटी प्रचंड गर्दी असूनही अक्षरशः पायऱ्यांवर उभे राहून ही कार्यक्रमास उपस्थिती दिली व अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने शांततेत कार्यक्रम पार पाडला त्यामुळे सदर कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आभार मानून मंगेश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

कोथरूडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत म्हातोबा गडावर वृक्षारोपण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न

0

पुणे : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेतून साकारलेल्या एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आज पुणे शहरातील कोथरूड मध्य मंडलातर्फे म्हातोबा गडावर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनंदनीय उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.

संपूर्ण देशात पर्यावरण संरक्षणाची आणि वृक्षारोपणाची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना मांडली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रेरणा देणे हा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची निर्मिती करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून आज कोथरूडमधील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

म्हातोबा गडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याने वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले के. संतोष जगदाळे व के. कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ पण वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कै. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, कन्या आसावरी जगदाळे, के. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, चिरंजीव कुणाल गणबोटे इ. उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी भाजप कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांनी केली होती. श्री. कोंढाळकर यांनी यावेळी बोलताना, “आमच्या मंडलाला मुरली अण्णा आणि चंद्रकांत दादांचे मार्गदर्शन लाभले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज लावलेली ही रोपे केवळ झाडे नाहीत, तर ती भविष्यासाठीची गुंतवणूक आहेत,” असे देखील नमूद केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कोथरूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या कुटुंबासह येऊन वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. लहान मुलांनीही उत्साहाने झाडे लावली, ज्यामुळे त्यांच्यातही पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण झाली. उपस्थित सर्वांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची ग्वाही दिली. हा कार्यक्रम केवळ एक वृक्षारोपण सोहळा नसून, पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

तिसऱ्या भाषेसाठी कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

0

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह तिसरी भाषा शिकणे बंधनकारक आहे. मात्र, कन्नड, तेलुगू, तामिळ, उर्दू आणि गुजराती अशा भाषांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता भासत असल्याने राज्यातील शालेय शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.

२० पेक्षा जास्त विद्यार्थी जर हिंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही तिसरी भाषा निवडतील, तर संबंधित भाषेचा शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु सध्या तामिळ, तेलुगू, उर्दू, कन्नड अशा भाषांमध्ये D.Ed. किंवा B.Ed. पूर्ण केलेल्या शिक्षकांची संख्या अत्यल्प असल्याने तज्ज्ञ शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा विचार सुरू आहे.

२० पेक्षा कमी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण
तिसरी भाषा निवडणाऱ्यांची संख्या २० पेक्षा कमी असल्यास, त्यांना बालभारतीच्या माध्यमातून ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर्सद्वारे शिक्षण दिले जाईल.

राजकीय वाद आणि प्रशासनाची गोंधळाची स्थिती
शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असल्या, तरीही बहुतेक विद्यार्थ्यांनी अजून तिसरी भाषा निवडलेली नाही आणि पाठ्यपुस्तकांचे वाटपही झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत शिक्षण आयुक्त आणि संचालकांना मार्गदर्शन करताना भुसे म्हणाले, “हिंदी लादली जाणार नाही, विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा निवडण्याचा अधिकार असेल.” मात्र इतर भाषांसाठी शिक्षकांची नेमणूक कशी करायची याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

तिसरी भाषा बदलण्यावरही संभ्रम
विद्यार्थ्याने जर पहिल्या वर्षी कन्नड भाषा घेतली असेल, तर दुसऱ्या वर्षी तो भाषा बदलू शकतो का? यावरही अद्याप निर्णय झाला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की २३ जूनपूर्वी यावर निर्णय घेतला जाईल, कारण त्यानंतर राज्यातील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु होतील.

शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले, “राज्य अभ्यासक्रमानुसार इयत्ता १ ते ५ मध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा असेल. मात्र, इतर भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या भाषेची निवड करता येईल. हिंदी सक्तीची नाही. विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा कशी निवडावी आणि त्याची प्रक्रिया कशी असावी, यावर विचार करण्यासाठी शुक्रवारी सर्व शिक्षण संचालकांची बैठक घेण्यात येणार आहे.”

डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया नियंत्रणात; वर्षभराच्या मोहिमेनंतर पुणे महानगरपालिकेची यशस्वी कामगिरी

0

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या डासजन्य रोगांवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे ही यशस्वी घसरण झाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

आकडेवारीत स्पष्ट घट

  • जानेवारी ते जून २०२५ दरम्यान फक्त ८ डेंग्यू आणि ८ चिकनगुनिया रुग्ण PMC क्षेत्रात नोंदवले गेले.
  • मलेरिया रुग्णांची एकही नोंद नाही.
  • २०२४ मध्ये याच कालावधीत डेंग्यू – ३८२, चिकनगुनिया – ४८३ आणि मलेरिया – ५ रुग्ण होते.

उपाययोजना आणि मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये

१. डास नियंत्रण विभागाचा डेटा-आधारित दृष्टिकोन
अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी ही घसरण सिस्टमॅटिक नियोजन आणि अंमलबजावणीचे फळ असल्याचे सांगितले.

२. डास निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना:

नकाशीकरण व फवारणी – नोव्हेंबर २०२४ पासून डास प्रजनन स्थळांचे अद्ययावत नकाशीकरण करून कीटकनाशक फवारणी करण्यात आली.

स्थायी आणि तात्पुरत्या प्रजनन स्थळांची नोंद:

  1. स्थायी स्थळे: ३३,४७४
  2. तात्पुरती स्थळे: ३७,८७४

जैविक उपाय: १८१ ठिकाणी गप्पी माशांची केंद्रे तयार करण्यात आली आणि २,५१८ ठिकाणी stagnant पाण्यात गप्पी मासे सोडण्यात आले.

जलपर्णी काढून टाकणे: पाण्याच्या स्रोतांमधील जलपर्णी हटविण्यासाठी राज्य जलसंपदा विभागासोबत समन्वय.

जनजागृती अभियान:

  • जागतिक मलेरिया दिन (२५ एप्रिल)
  • राष्ट्रीय डेंग्यू दिन (१६ मे)
  • पालखी मार्गांवर माहिती फलक, बॅनर, हँडबिल वाटप.

कायदेशीर कारवाई व दंड:

  • ८१४ घरांना नोटीस
  • ₹९६,३०० दंड वसूल
  • प्रजनन स्थळे तात्काळ नष्ट.
  • तीन वर्षांतील संसर्ग नकाशीकरण व मायक्रोप्लॅनिंग.
  • पावसाळा तयारी: सर्व जलसाच्यांवर कीटकनाशक फवारणीचे नियोजन.

लवकर निदान आणि उपचार:

  • आशा वर्कर्सकडे रक्त स्लाईड किट्स.
  • नमुने कसबा पेठ येथील मलेरिया केंद्रात तपासले जातील.

खाजगी क्षेत्राशी समन्वय:

सर्व खासगी रुग्णालये आणि लॅबना तपशील वेळेवर पुणे महापालिकेला देण्याचे निर्देश.

  1. डेंग्यू चाचणीसाठी ₹६०० ची कमाल मर्यादा.
  2. नागरिकांसाठी पुणे महापालिकेचे आवाहन
  3. दर आठवड्याला ‘कोरडा दिवस’ पाळावा.
  4. घराजवळील साचलेले पाणी काढून टाकावे.
  5. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.

दिवसा सुद्धा डास प्रतिबंधक जाळी किंवा साधने वापरावीत, कारण डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारा Aedes aegypti डास दिवसा चावतो.

पुणे महापालिकेची वचनबद्धता
मोसम बदलतानाही पुणे महापालिका सतत निरीक्षण ठेवून डासजन्य रोग नियंत्रणात यश राखण्याचा निर्धार करत आहे.

आषाढी वारी २०२५: दिवे घाटाच्या टोकावर प्रवेश बंद; २२ जूनला सकाळी १२ वाजेपर्यंत निर्बंध

0

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, २२ जून रोजी दिवार घाटावरच्या उंच भागावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे रस्ता घसरणारा झाला असून, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

संयुक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, “२२ जून रोजी मध्यरात्री १२ ते दुपारी १२ या वेळेत दिवे घाटाच्या टोकावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे, कारण घाटात रस्ते घसरतात आणि भूस्खलनाचा धोका आहे.”

वारी मार्ग आणि पोलिसांची खबरदारी

  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २२ जूनला भैरोबा नाला ते सासवड (Dive Ghat मार्गे) असा प्रवास करणार आहे.
  • लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे गर्दी आणि धोका लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लावले आहेत.

कायदेशीर तरतुदी

  • भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पोलिसांनी प्रवेशबंदीचा आदेश जारी केला आहे.
  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांचे नागरिकांना आणि वारकऱ्यांना आवाहन
संयुक्त आयुक्त शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सर्वांनी पोलिसांशी सहकार्य करावे आणि २२ जून रोजी दिवार घाटाच्या टोकावर जाणे टाळावे. पालखी मार्गावर सुरक्षिततेसाठी सर्व तयारी करण्यात आलेली आहे.”

पालख्यांच्या आगमनाने पुणे भक्तिमय वातावरणात न्हालं

0

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल झाल्या आणि संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, “हरी नाम” घेणाऱ्या वारकऱ्यांना जल्लोषात स्वागत केले.

जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे स्वागत
दुपारी २ वाजता खडकीतून पुण्यात प्रवेश केल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५ वाजता इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोहोचली. पोलिस सुरक्षा आणि स्वयंसेवकांच्या मदतीने हजारोंच्या गर्दीतून पालखी पुढे सरकली. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नानापेठ येथे ही पालखी शुक्रवार व शनिवार मुक्कामी आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रवास
आळंदीहून सकाळी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी ३ वाजता विश्रांतवाडी येथे दाखल झाली. इथं भारतीय लष्कराच्या जवानांनी फळं आणि पाणी वाटून स्वागत केले.

संध्याकाळी ७.३० वाजता पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोहोचली. वारकऱ्यांनी ‘हरीपाठ’ म्हणत उर्जेने भरलेला उत्साह दाखवला. पालखी उशिरा रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पोहोचली.

विठूरायासाठी पुणेकरांची सेवाभावी भूमिका
पुण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांसाठी पुणेकरांनी मनापासून सेवा केली.

  • पिण्याच्या पाण्याचे टँकर,
  • नाश्ता वाटप,
  • फळे वितरण,
  • मोफत आरोग्य तपासण्या,
  • मोबाईल अँब्युलन्स,
  • विद्यार्थ्यांकडून मोफत केस कापण्याची सेवा

अशा विविध सेवांचा लाभ वारकऱ्यांना मिळाला.

भजन-भारुडांनी गाजवले पुण्याचे रस्ते
नांदेड जिल्ह्यातील नायगाव दिंडीचे बालिराम बांदेरवार यांनी जंगल महाराज मंदिरासमोर सादर केलेले भारूड ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शहरात अनेक ठिकाणी भजन, हरीपाठ आणि गजराने वातावरण भक्तिमय झाले.

भिडे गुरुजींच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झाला तणाव
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पालखीच्या रथाचे लगाम हाती घेतल्यावर, काही वारकऱ्यांनी आक्षेप घेतला. यानंतर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून भिडे गुरुजींना व इतरांना रथातून खाली उतरवले आणि स्थिती नियंत्रणात आणली.

६,५०० पोलिसांचा बंदोबस्त; CCTV चा वापर
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, आणि वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची आखणी केली होती.

  • ६,५०० पोलिस कर्मचारी मार्गावर तैनात
  • CCTV द्वारे संपूर्ण मार्गाचे निरीक्षण
  • दिंड्यांना मार्गदर्शनासाठी विशेष पोलिस पथके नियुक्त होती.

“कोहलीला बाजूला करत, ‘प्रिन्स’ शुबमन गिल झाला नवा किंग !” – युवराज सिंहकडून कौतूक; कर्णधार म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये शानदार शतक

0

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि नवोदय कर्णधार शुबमन गिल याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात शानदार शतक झळकावून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यान थेट घोषणाच केली, “कोहलीला बाजूला करत, प्रिन्स शुबमन गिल झाला नवा किंग !”

गिलने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचं पारंपरिक चौथे स्थान सांभाळत, इंग्लंडच्या आघाडीच्या गोलंदाजांवर जबरदस्त फटकेबाजी केली. हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने झळकावलेले शतक हे त्याचे SENA देशांतील पहिले कसोटी शतक ठरले.

गिलने आपली नैसर्गिक शैली कायम ठेवत कोणत्याही दबावाखाली न खेळता सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स, जोश टंग आणि क्रिस वोक्स यांसारख्या गोलंदाजांना त्याने संधी दिली नाही.

युवराज सिंगकडून कौतूक
युवराज सिंगने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत गिलचे कौतुक करताना लिहिले: “काही गोष्टी नियतीनेच लिहिलेल्या असतात. पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून परदेशात शतक – अभिनंदन @ShubmanGill! तू जबाबदारी काय असते ते समजतोस आणि बॅटनेच उत्तर दिलेस. आणखी शतकांसाठी शुभेच्छा!”

गिल व युवराज यांच्यात घनिष्ठ नाते असून युवराजने त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच गिलला मार्गदर्शन केले आहे.