Home Blog Page 212

केळी वाहतुकीतून रेल्वे मालामाल; सहा महिन्यातच 3 कोटींहून अधिकचे उत्पन्न

0

केळीने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मालामाल केले आहे. जळगावची केळी साता समुद्रापार पोहचली आहे. केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावेर तालुक्यातून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत २९ रॅक शेतमाल भरण्यात आला. तो केवळ दिल्लीच्या मार्केटला नेला असून १ लाख १४ हजार ६७५ क्विंटल एवढा शेतमाल होता. त्याच्या वाहतुकीमधून रेल्वेला ३ कोटी ४५ लाख ८७ हजार ५७७ रुपयाचे उत्पन्न मिळाले. यामध्ये रावेर व निंभोरा या दोन रेल्वे मालधक्क्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी पावणेचार कोटींचे उत्पन्न

देशात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणार्‍या जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका आघाडीवर आहे. केळीच्या हंगामात आवक बेसुमार वाढते, त्यामुळे रोड वाहतुकीतून परराज्यातील बाजारपेठांमध्ये केळी कमी वेळेत व कमी खर्चात पाठवणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला रेल्वे नेहमीच धावते. रेल्वेच्या माध्यमातून जलद आणि तुलनेत कमी खर्चात मालाची निर्यात करणे सोपे झाले आहे. तर केळी वाहतुकीतून रेल्वे सुद्धा मोठा महसूल मिळाला आहे.

गेल्या वर्षी २०२३ मध्येही ३४ रॅकच्या माध्यमातून १ लाख २३ हजार ६९० क्विंटल शेतमाल वाहतूक केला होता. त्यामधून रेल्वेला ३ कोटी ७३ लाख ६ हजार ७१६ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. तो हंगाम देखील एप्रिल ते सप्टेंबरापर्यंतचा होता. त्यानंतर कुठलाही माल रेल्वेने वाहतूक केला नाही.उत्पादन जास्त असल्यामुळे केळी शेतात तुंबते त्यामुळे परिणाम होऊन भाव कमी मिळतो. यातून शेतकरी नाडला जातो. त्यावर रेल्वेने उपाय केला आहे.

रेल्वेमधून केळी दिल्लीला

यावेळेस फळ बागायतदार सोसायटीच्या माध्यमातून रेल्वेतून केळी दिल्ली व उत्तर भारतात पाठवण्यात आली. दिल्ली स्थानकावर शेतमाल पोहोचल्यास तेथील स्थानिक व्यपारी उत्तर प्रदेश, हिमाचल, कुल्लू मनाली व इतर भागात केळी विक्री करतात. दरवर्षी मार्च महिन्यापासून नवती केळीच्या कापणीला सुरुवात होते. तर एप्रीलमध्ये कापणीचे प्रमाण वाढते. उन्हात वाहतूक करताना केळी काळी पडून खराब होण्याची भीती असते. तर रोडवेजमधून वाहतुक करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या मालात वरचा माल काळा पडून नुकसान होते. म्हणून एप्रिलपासून परिस्थिती व आवक पाहून रेल्वेमधून केळी दिल्लीला रवाना केली जाते.

“तो मला गावला तर..”; राहुल सोलापूरकरांविरोधात शिवसैनिकाचा संताप

0

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारींनी अपमान केला होता, त्याच पद्धतीने संघाशी संबंधित या व्यक्तीने महाराजांचा अवमान केला आहे. सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही, तर त्यांनाही आम्ही काळं फासून उत्तर देणार. शिवसेनेनं ठरवलं तर त्यांना रस्त्यावरही उतरू देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका शिवसेना शहरप्रमुखांनी मांडली. सोलापूरकरांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

“राहुल सोलापूरकर मला गावला, तर मी त्याला सोडणार नाही. त्याच्या तोंडाला काळं फासणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा कसली देता? त्याच्यावर कारवाई करायचं सोडून घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत”, असं आक्रमक वक्तव्य ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने या आंदोलनात केलंय.

राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

राहुल सोलापूरकर काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

अमेरिकेतून बाहेर काढलेले लोक C-17 ने आज भारतात परतणार, त्यात महाराष्ट्रातले किती? त्यांचं पुढे काय होणार?

0

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना देशाबाहेर काढलय. यात 104 लोकांची ओळख पटली आहे. या सगळ्या लोकांना C-17 या अमेरिकी सैन्य विमानाने भारतात पाठवण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी पंजाबच्या अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर C-17 लँड करेल. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितलं की, अमेरिकेतून पाठवलेल्या या अवैध प्रवाशांना राज्य सरकारचे लोक रिसीव करतील. ओळख आणि अन्य कागदपत्रांसंदर्भात विमान तळावर काऊंटर बनवण्यात आले आहेत.

अमृतसर प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, अमेरिकी विमानाने येणाऱ्या सर्व लोकांच्या कागदपत्रांची अमृतसर विमातळावर तपासणी करण्यात येईल. इमीग्रेशनशिवाय गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाईल. गुन्हेगारी रेकॉर्ड आढळला, तर विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल. या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो. सूत्रांनुसार अमेरिकेतून डिपोर्ट होणाऱ्या या भारतीयांमध्ये काही असे लोक सुद्धा असू शकतात, जे भारतात गुन्हा करुन अमेरिकेत पळून गेलेले असतील.

अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले किती जण?

अमेरिकेतून पाठवण्यात आलेल्या या भारतीयांना घेऊन अमेरिकेच सैन्य विमान दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अमृतसर इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड होईल. या विमानात 200 पेक्षा जास्त भारतीय असल्याची पृष्टी करण्यात आली आहे. यात 104 लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. Gujrat-33, Punjab-30, UP-03, Haryana-33,Chandigarh-02, Maharashtra- 03 लोक आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात घेऊन येणारं हे पहिलं विमान आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार असे जवळपास 18 हजार भारतीय आहेत.

Icc Champions Trophy 2025 स्पर्धेतून कॅप्टन आऊट होणार! हेड कोचकडून मोठी अपडेट

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. अवघ्या काही दिवसांनंतर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एकूण 8 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. तसेच या संघात बदल करण्यासाठीही अवघे काही दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात बदल करावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागण्याची अधिक शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडू शकतो, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यामुळे संघात बदल करावा लागू शकतो. पॅटला घोट्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पॅट चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पूर्णपणे फिट होईल, याबाबत शक्यता फार कमी आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे हेड कोच अँड्रयू मॅक्डॉनल्ड यांनी दिली आहे. अँड्रयू मॅक्डॉनल्ड हे सध्या ऑस्ट्रेलिया टीमसह श्रीलंका दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. स्टीव्हन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करत आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर श्राीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियासाठी श्रीलंकेविरुद्धची ही एकदिवसीय मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहे. मालिकेला 12 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. तर 14 फेब्रुवारीला मालिकेची सांगता होईल.

मिचेल मार्श आऊट

दरम्यान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श याला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मिचेलला पाठीच्या त्रासामुळे या स्पर्धेला मुकावं लागलं आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.

कोणत्या बड्या नेत्यांशी अण्णा हजारांचे हितगूज? उद्धव ठाकरे यांच्याशी नाही जुळले सूर, PM मोदींविषयी म्हणाले काय?

0

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी अनेक मुद्यांवर रोखठोक मतं मांडली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय, महाकुंभातील चेंगराचेंगरी, मोदी सरकारच्या कार्यकाळाविषयी थेट भाष्य केले. दिल्ली विधानसभा निवडणूक आणि महाकुंभाविषयी अण्णा हजारे यांनी त्यांचे मत मांडले आहे. राजकारणात नैतिकता आणि त्याग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

हा तर लोकांचा विश्वास

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार मोठ्या विजयासह सत्तेवर आले. त्यावर अण्णांनी भाष्य केले. लोकांच्या विश्वासामुळेच सरकार सत्तेवर आल्याचा दावा त्यांनी केला. कोणताही पक्ष वा संघटनेत आचार, विचारची शुद्धता, त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. त्यांचे समर्थन करते, मतं देते, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत मोठे विधान

राजकारणात योग्य दृष्टिकोन आणि नैतिकतेची गरज असते. जेव्हा लोक त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालणारे नेते पाहतात. तेव्हा त्यांचे समर्थन करतात, असा दावा त्यांनी केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, आपण त्यांच्या जवळ सुद्धा जात नसल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली. राजकारणाशी आपले काही देणे घेणे नाही, असे ते म्हणाले. मी कोणत्याच पक्षाशी जोडलेलो नाही. पण कुठे चूक दिसत असेल तर आवाज उठवतो, सल्ला देत नाही, असे ते म्हणाले.

अध्यात्माची वेगळी व्याख्या

अण्णा हजारे यांनी धार्मिक दृष्टिकोनावर मत मांडलं. अध्यात्म माणसाला बदलू शकत नाही. केवळ गळ्यात माळ घातली, ती जपली म्हणजे माणूस धार्मिक होतो असे नाही. तर दु:खी आणि पीडितांची सेवा करणे हे खरं धार्मिक कार्य असल्याचे ते म्हणाले. हीच देवाची पूजा आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे जगण्याचे ध्येय माहित असेल तर समाज आणि देशाला फायदा होऊ शकतो.

पंतप्रधान मोदींची केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. त्यांनी अनेक चांगले कायदे आणले. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवला. कायदे कठोर असेल तर समाजात सुधारणा होते, असे अण्णा म्हणाले. तर महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत, लोकांचा जसा चष्मा तसे दिसते असे ते म्हणाले.

देशातील सर्वात श्रीमंत ‘ही’ आहे महापालिका, 8 राज्यांपेक्षा जास्त बजेट; गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांची वाढ

0

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी १ फेब्रुवारीला संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अद्याप कोणत्याही राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर झालेला नाही. पण देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या महापालिकेचे बजेट हे ८ राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की ही महापालिका नेमकी कोणती? कोणत्या राज्याची? याचे आर्थिक बजेट नेमकं किती? तर याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

देशातील सर्वात मोठी महानगरपालिका ही दुसरी तिसरी कोणतीही नसून मुंबई महानगरपालिका आहे. ज्याचे पूर्ण नाव बृहन्मुंबई महानगरपालिका असे असून आज मुंबई महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 74 हजार 427 कोटी रुपयांचा आहे. मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेचा बजेट ६५ हजार १८० कोटी इतका होता. म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील अनेक राज्यांचे बजेट मुंबई महापालिकेइतकेही नव्हते.

‘या’ 8 राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट जास्त

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यानंतर आता विविध राज्यांचे बजेट येण्यास सुरुवात होईल. याचा अर्थ असा की २०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प कोणत्याही राज्यासाठी आलेला नाही. २०२५ या आर्थिक वर्षासाठी बीएमसीचे बजेट ६५,१८०.७९ कोटी रुपये होते. जर आपण राज्यांबद्दल बोललो तर, २०२५ च्या आर्थिक वर्षात हिमाचल प्रदेशचे बजेट ५८,४४३.६१ कोटी रुपये होते. तर मेघालयाचे ५२,९७४ कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशात ३४,२७० कोटी रुपये, त्रिपुरात २२,९८३ कोटी रुपये, मणिपूरमध्ये २९,२४६ कोटी रुपये, मिझोरममध्ये १३,७८६ कोटी रुपये, नागालँडमध्ये १९,४८५ कोटी रुपये आणि सिक्कीममध्ये १३,५८९ कोटी रुपये होते.

राज्य आर्थिक वर्ष 2024-25 चे बजेट (कोटी रुपयांमध्ये)

गोवा 24,751

अरुणाचल प्रदेश 34,270

मणिपूर 29,246

मेघालय 52,974

मिझोराम 13,786

नगालँड 19,485

सिक्कीम 13,589

त्रिपुरा 22,983

बेस्ट बससाठी १००० कोटी रुपयांची

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका संस्था मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट बस सेवेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बेस्ट बस ही लोकल सेवेनंतर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. यात सुमारे ३,००० बसेस आहेत. या बसमधून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. मुंबई महानगर पालिकेकडून 2012-13 पासून जानेवारी 2025 पर्यत बेस्ट उपक्रमास 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्या खात्यासाठी किती कोटींची तरतूद?

तसेच रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 5100 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025- 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी आहे. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये असेल.

आंबेडकरांच्या मृत्यूस जबाबदार कोण? 1954 1956 जे काँग्रेसने जाणीवपूर्वक केले: राज्यसभेत अनिल बोंडेंचा दावा

0

भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधताना बोंडे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी डमी बापू, लिब्रांडू असे शब्द वापरल्याने राज्यसभेत वादही निर्माण झाला.

अनिल बोंडे यांनी राज्यसभेत मंगळवारी 17 मिनिटे भाषण केले. बोंडे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. जवळपास 17 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील विकासासह दिल्लीतील असुविधांचा उल्लेख करून त्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला. तसेच आंबेडकरांच्या मृत्यूबाबतही त्यांना दावा केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडणुकीविषयीच्या धनंजय कीर यांच्या लेखनाचा संदर्भ देताना बोंडेनी सांगितले की, पंतपधान नेहरू असताना निवडणूक आयोगाने आंबेडकरांची 78 हजार मते अवैध ठरवली होती. नेहरू दोनदा विरोधात प्रचारासाठी गेले होते. जयप्रकाश नारायण यांनीही संशय व्यक्त केला होता. आंबेडकरांना केवळ प्रचार करून हरवले नाही तर 78 हजार मते अवैध ठरवून हरवण्यात आले.

एकदा पराभव झाल्यानंतर आंबेडकर आजारी पडले होते, त्यांना डायबिटीज सुरू झाला. भंडाराच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला. तिथेही पंतप्रधान प्रचाराला गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तोपंत ठेंगडे यांनी आंबेडकरांचा प्रचार केला होता. 1954 मध्ये पराभवाचा मोठा धक्का आंबेडकरांना बसला होता. हा धक्का बसल्यानंतर 1956 मध्ये आंबेडकर हे जग सोडून गेले. ते दोन पराभव त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते, असे बोंडे म्हणाले.

आंबेडकरांच्या मृत्यूलाही हे दोन पराभव जे काँग्रेसने जाणीवपूर्वक केले होते, तेच जबाबदार होते. महाराष्ट्रात जे बोलले जात होते तेच मी सांगत आहे, असा मोठा दावा बोंडे यांनी यावेळी केला. बोंडे यांनी विरोधकांवर टीका करताना लिब्रांडू या शब्दाचा वापर केल्याने गोंधळ निर्माण जाला. गोपालदास नीरज यांचा संदर्भ देत बोंडे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर खूपसारे लिब्रांडू… असे बोंडे म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्य त्याविरोधात आक्रमक झाले होते.

वाद होताच बोंडे यांनी लिब्ररल हा शब्द वापरला. उपसभापतींनी विरोधी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गोंधळातच बोंडे यांनी पुढे आपले भाषण सुरू ठेवले. पुरस्कार वापसीवरून बोंडे यांनी विरोधकांवर टीका केली.

त्यानंतर काही वेळात तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी बोंडे यांनी उच्चारलेल्या त्या शब्दावर आक्षेप घेतला. तो शब्द सभागृहाचा अपमान करणारा असल्याचे गोखले म्हणाले. अशा शब्दांचा सभागृहात वापर व्हायला नको, अशी नाराजीही गोखले यांनी व्यक्त केली. त्यावर उपसभापतींनी रेकॉर्ड तपासून तो शब्द असंसदीय असेल तर कामकाजातून वगळण्यात येईल, असे स्पष्ट केले.

अमेरिकी लष्कराचे विमान भारताकडे झेपावले; अवैध प्रवासी भारताकडे रवाना, पण फक्तं याच भारतीयांना परत घेण्याची तयारी

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अशा २०५ भारतीय प्रवाशांना घेऊन अमेरिकी लष्कराचे एक विमान रवाना झाले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार हे विमान २४ तासांत भारतात पोहोचेल. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अवैध प्रवाशांना परत त्यांच्या-त्यांच्या देशांत पाठवले जात असल्याच्या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती देण्यास अमेरिकी प्रशासनाने नकार दिला आहे. भारतातील अमेरिकी वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीच्या तपासाची माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, अशा अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढले जात असल्याचे सांगितले. अमेरिकी सीमांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचा दावा या अधिकाऱ्यांनी केला.

ट्रम्प यांनी दिले होते आश्वासन

अमेरिकेतील अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी कठोर कारवाईचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी दिले होते. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार ही कारवाई सुरू झाली आहे.

मोदी व ट्रम्प यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांबाबत चर्चा केली होती. अशा फक्तं १८ हजार अवैध प्रवासी भारतीयांना परत घेण्याची तयारी भारताने दर्शवली होती.

मात्र, या लोकांना परत भारतात प्रवेश दिला जात असताना त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारी कागदपत्रे आवश्यक असल्याची भूमिका भारताने घेतली आहे. कारण, अशा अवैध प्रवाशांचा संबंध संघटित गुन्हेगारीशी असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

राष्ट्रीयत्व सिद्ध व्हायलाच हवे

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी गेल्या २४ जानेवारी रोजी म्हटले होते की, अशा भारतीयांना परत घेण्याची आमची तयारी आहे; परंतु, त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारी कागदपत्रे अमेरिकेने द्यायला हवीत.

अमेरिका आक्रमक का?

अमेरिकेत नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने आलेले सुमारे १.४ कोटी लोक अवैधरीत्या वास्तव्यास आहेत. यात सुमारे १८ हजार भारतीयांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ५३८ अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली होती.

यात काही संशयित दहशतवादी, गुंड टोळ्यांचे सदस्य आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे गुन्हेगार होते. त्यामुळे हा मुद्दा देशाच्या सुरक्षिततेशी जोडून ट्रम्प प्रशासनाने अशा अवैधरीत्या राहणाऱ्या सर्वच नागरिकांना त्या-त्या देशांत परत पाठवण्याचे आक्रमक धोरण अवलंबले आहे.

पुन्हा केजरीवाल यांची स्वबळाची हॅट्‌ट्रिक की सत्तांतर? विधानसभेसाठी दिल्लीमध्ये आज मतदान

0

दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज (ता. ५) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून सुमारे कोट्यवधी मतदार सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीत यावेळी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होत असली तरी खरा मुकाबला ‘आप’ आणि ‘भाजप’मध्ये होणार आहे.

मागील सलग दोन निवडणुकांत आम आदमी पक्षाने बहुमताचे सरकार बनविले होते. त्यामुळे यावेळची निवडणूक जिंकत हा पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याची हॅट्‌ट्रिक साधणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुटी

मागील म्हणजे २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकत विधानसभेवर कब्जा केला होता. त्यावेळी भाजपला अवघ्या ८ जागा जिंकता आल्या होत्या तर काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सरकारी-खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

यमुना नदीचे प्रदूषण तसेच अन्य स्थानिक मुद्द्यावरून यावेळचा प्रचार गाजला होता. किमान ५५ जागा जिंकत पुन्हा सत्ता काबीज करू असा विश्वास आप नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी ”आप” चे जहाज यमुना नदीत बुडणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

यांचे भवितव्य पणाला

अरविंद केजरीवाल (आप)

मुख्यमंत्री आतिशी (आप)

मनीष सिसोदिया (आप)

सत्येंद्र जैन (आप)

प्रवेश वर्मा (भाजप)

रमेश बिधुडी (भाजप)

संदीप दीक्षित (काँग्रेस)

अलका लांबा (काँग्रेस)

मतदानाची व्याप्ती

१.५६ कोटी – एकूण मतदार

१३ हजार ७६६ – दिल्लीतील मतदान केंद्रे

७३३ – केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सोय

२२० – निमलष्करी दलाच्या तुकड्या

३५ हजार ६२६ – पोलिस, अन्य कर्मचारी

१९ हजार – होमगार्ड

देवाभाऊ ‘वर्षा’वर कधी राहायला जाणार?; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, …..इतक्या वेड्या चर्चा, उत्तरही देऊ नये

0

मुंबई : मुख्यमंत्र्‍यांसाठी असलेलं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारुन 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण, अद्यापही तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहत आहेत. त्यामुळे, वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री राहात नसल्यावरुन राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा घडत आहेत. त्यातच, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत  यांनी आज वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. आता, संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. तसेच, माझ्या मुलीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावरील जादटोण्यासंदर्भात गंभीर दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊतांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री व सध्या वर्षा निवासस्थानी राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलं. या गोष्टींचा सर्वात जास्त अनुभव त्यांनाच आहे, असे शिंदेंनी म्हटलं. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती देत, आपण वर्षा बंगल्यावर राहण्यास कधी जाणार हे स्पष्ट केलं. ”एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथं जायचं आहे, तिथं बंगल्यावर काही छोटी-मोठी कामंही होणार आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी 10 वी मध्ये शिकत आहे, ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिथं शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथं लगेच शिफ्ट झालो नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, इतक्या वेड्यासारख्या चर्चा, माझ्या स्तराच्या माणसाने अशा प्रश्नावर उत्तरही देऊ नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.

काय म्हणाले होते संजय राऊत

भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे