Home Blog Page 201

IPL 2025 चं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? अंतिम सामना कुठे? 2 संघांना धक्का!

0

क्रिकेट चाहत्यांना सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ आपल्या देशाला चॅम्पियन करण्यासाठी आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हेच एकमेकांविरुद्ध खेळणारे खेळाडू आयपीएलनिमित्ताने एकत्र खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दुबईत 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. त्यानंतर आता आयपीएलच्या या आगामी हंगामाच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हंगामाला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हंगामाचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? अंतिम सामना कुठे होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे.

स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडून येत्या आठवड्याभरात आयपीएवलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं या स्पर्धेचं वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जातं? याकडे लक्ष असणार आहे.

अंतिम सामना कुठे?

रिपोर्ट्सनुसार, या 18 व्या मोसमातील अंतिम सामना हा कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच प्लेऑफमधील पहिले 2 सामने हे राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहेत.

दिल्ली आणि राजस्थानला झटका!

रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या पहिल्या मोसमातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांना प्रत्येकी 2 सामने घरच्या मैदानाऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागणार आहेत. राजस्थान एकूण सामन्यांपैकी 5 सामने हे घरच्या मैदानात खेळेल. तर उर्वरित 2 सामने कुठे होणार हे निश्चित नसल्याचं म्हटलं जात आहे.

तसेच दिल्लीला 2 सामने घरच्या मैदानाऐवजी वायझॅगमधील एसीए-वीडीसीए स्टेडियममध्ये खेळायचे आहेत. दिल्लीने गेल्या हंगामातही काही सामने हे वायझॅगमध्ये खेळले होते.

मेगा ऑक्शनमध्ये 639.15 कोटी खर्च

दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दुबईत 24 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी 2 दिवसीय मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेगा ऑक्शनमधून एकूण 10 फ्रँचायजींनी 182 खेळाडूंना बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं होत. 10 फ्रँचायजींनी एकूण 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च केले. तर 375 खेळाडू हे अनसोल्ड ठरले.

रिंकू कोल्हापूची सून? आर्चीचा खऱ्या आयुष्याचा परश्या कोण? बड्या नेत्याचा युथ आयकॉन मुलगा Photo ने चर्चा

0

‘सैराट’ चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सैराटमधील आर्चीच्या भूमिकेने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या सोशल मीडिया पोस्टची, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सैराटमध्ये परश्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परश्या कोण? हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना प्रचंड इच्छा असते, अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे.

स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केला आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी,रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे वेगळंच वाटत आहे, म्हणत जोडा छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्याने लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय? असे म्हणत या व्हायरल फोटोवर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. थोडक्यात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून रिंकूच्या मनात चाललंय काय? असा प्रश्न आता तिचे चाहते विचारू लागलेत.

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वतः उभे राहणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांचे तीन बडे शिलेदार दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना पुन्हा वेग

0

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या तीन पक्षांमध्ये अचंबित वाटणाऱ्या राजकीय हालचाली घडला. सकाळी मनसे नेते राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे तीन मोठे शिलेदार दुपारी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणात या गोष्टींची चर्चा सुरु झाली असून वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे हे शिलेदार सागर बंगल्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचे तीन प्रमुख शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी दाखल झाले. त्यात मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांचा समावेश होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दादारमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट झाल्याचे खासगीरित्या या नेत्यांकडून सांगण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी ही भेट होती. भेटीनंतर या तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. अंबादास दानव यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात ही भेट होती की इतर कोणते राजकीय कारण होते? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे-फडणवीस भेटीचा अर्थ काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट या सर्व घडामोडींचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक होती, असे आता भजपा नेते सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. परंतु राजकीय निरीक्षक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच विधानसभा निवडणुकी निकालाबाबत शंका उपस्थित केली होती.

इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?

0

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी 19 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले. नाशिकमधून दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्या नंतर नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांची नियुक्ती अवघ्या 24 तासात रद्द करण्यात आली होती. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्याप पालकमंत्रिपदाचा वाद सुटलेला नाही. नाशिकमध्ये पालकमंत्री नसल्याने नाशिकची डीपीडीसी बैठक गेल्या रखडली आहे. मात्र, आज मंगळवारी (दि. 11) उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक डीपीडीसी बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजनांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन दोन आठवडे उलटला आहे. भाजपने नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असताना, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटही आपला दावा सोडायला तयार नसल्याने पालकमंत्रिपदाचा पेच सुटण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यातच राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे अपेक्षित असले तरी पालकमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने प्रशासकीय पातळीवरही अनास्था निर्माण झाली आहे.

अजित पवार घेणार नाशिक डीपीडीसी बैठक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांच्या बैठका उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वतीने घेण्यात येत आहेत. आज राज्यातील विविध विभागांच्या बैठका अजित पवार घेत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजित पवार नाशिक जिल्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार असून या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाचे आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले….

0

महायुतीतील वादामुळे अद्याप पालकमंत्रीपदाचा फैसला न झालेल्या रायगड जिल्ह्यातील नियोजन समितीची या बैठकीला अदिती तटकरे वगळता रायगड जिल्ह्यातील अन्य आमदार उपस्थित नसल्याने वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही ऑनलाईन बैठक झाली. मात्र, या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार असलेल्या भरत गोगावले, महेंद्र दळवी आमि महेंद्र थोरवे उपस्थित नव्हते. आम्हाला या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असा दावा महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केला. यावरुन वादंग निर्माण होताच अजित पवार यांच्या कार्यालयाकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले होते. रायगडचे मंत्री म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भरत गोगावले या बैठकीसाठी आले नाहीत. तर नाशिकच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी दुपारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाभुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या विरोधामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळाला नव्हता. परंतु, आता अजित पवार यांनी अदिती तटकरे यांना सोबत घेऊन रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

रायगड जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीला अजित पवार, अदिती तटकरे आणि शासकीय अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मला कळाली. अजित पवार यांच्या दालनात ही बैठक झाली. रायगड जिल्ह्याच्या विकासाबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र, आम्ही सर्व आमदार रायगडमध्ये असून आम्हाला बैठकीचे निमंत्रण नव्हते. आजची बैठक अधिकृत होती तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवायला पाहिजे होते. आम्हाला बैठकीची ऑनलाईन लिंकही पाठवण्यात आली नाही. पण आम्हाला बैठकीची कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मिळाले महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आरोपींना मिळाले आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे होणार आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजीचे हे सीसीटीव्ही फुटेच आहेत.

संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा ९ डिसेंबर २०२४ चा संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती सीआयडीकडून घेतली. त्यानंतर ते म्हणाले, मोबाईलचा डाटा रिकव्हर झाला आहे. तो डाटा सीआडीकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईल बाबत तपास सुरु आहे. तो डाटासुद्धा रिकव्हर झाला आहे. तसेच सर्व आरोपींवर खुनाचे गुन्हे आणि मकोका लावण्यात आले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक झाली आहे. आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

बीड पोलीस आक्रमक, 310 शस्त्र परवाने रद्द
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई केली. पहिल्या टप्प्यात 100, दुसऱ्या टप्प्यात 60, तिसऱ्या टप्यात 23 तर चौथ्या टप्प्यात 127 परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी हा दणका दिला आहे.

मुंबई ते पुणे जाणाऱ्यांसाठी अलर्ट, रस्ता 6 महिन्यांसाठी बंद, मग कोणता पर्यायी मार्ग?

0

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आगामी 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. हा महामार्ग जड, अवजड, प्रवासी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. अर्थात हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. तर त्याचा एक भाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामुळे वाहतूक कोंडीची भीती आहे. वेळेत मुंबईत पोहचण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग माहिती असणे आवश्यक आहे.

का बंद होत आहे हा महामार्ग?

Hindustan Times च्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर एक नवीन उड्डापुल आणि एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्यातील एक भाग पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRDC) कळंबोली सर्कल येथे नवीन फ्लाईओव्हर आणि अंडरपास तयार करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमुळे कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. वाहतूक अडथळा दूर होईल.

केव्हा बंद होईल मुंबई-पुणे एक्सप्रेसवे?

Free Press Journal च्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा एक भाग हा आजपासून 11 फेब्रुवारीपासून पुढील जवळपास 6 महिने बंद असेल. अर्थात हा एक्सप्रेसवे हा पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा पनवेल येथे मुंबईकडे जाणाराच रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मग पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जाणारी पनवेल, गोवा आणि जवाहर लाल नेहरु पोर्ट ट्रस्ट कडून जाणारी सर्व वाहनं ही कोनफाटा ते NH48 कडून जातील. ही सर्व वाहनं पुढे पलास्पे सर्कल येथून त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जातील.

पुणे ते मुंबई आणि तळोजा, शिळफाटा, कल्याणकडे जाणारी सर्व वाहनं ही पनवेल-सायन हायवेवर 1.2 किमी सरळ जाऊन पुरुषोत्तम पेट्रोल पंप उड्डाणपुलाच्या खालून रोडपली आणि NH48 ने पुढे जातील.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील पहिला 6 मार्गिकेचा महामार्ग आहे. तो जवळपास 94.5 किमी लांब आहे. मुंबई-पुणेमधील दळणवळणाचा कालावधी या महामार्गाने जवळपास 2 ते 2.5 तासाने कमी झाला आहे. 2002 मध्ये हा एक्सप्रेसवे सर्वांसाठी खुला करण्यात आला होता.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीची मोठी घोषणा! नक्की काय?

0

बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. गतविजेता राहिलेल्या पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. त्यामुळे टीम इंडियाचे संपूर्ण सामने हे दुबईत होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने पार पडणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रपुमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहेत.

टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे 23 फेब्रुवारीला होणार्‍या महामुकाबल्याकडे लागून राहिलं आहे. या 23 तारखेला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. या सामन्यात अंपायर कोण असणार? याबाबत अंतिम निर्णय झाला आहे.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात अंपायर कोण?

भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. या अशा सामन्यात एक निर्णय ही गेमचेंजर ठरु शकतो. त्यामुळे पंचांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे आयसीसीने या सामन्यासाठी अनुभवी पंचांची नियुक्ती केली आहे. पॉल रायफल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोघे फिल्ड अंपायर असणार आहेत. मायकल गॉफ टीव्ही अंपायर असणार आहेत. तर एड्रियन होल्डस्टॉक हे फोर्थ अंपायर असतील. तर डेव्हिड बून मॅच रेफरी असतील. हे चौघेही अनुभवी पंच आहेत. या चौघांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. त्यानुसारच या चौघांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिजवान (कॅप्टन), सलमान अली आगा, बाबर आजम, फखर जमां, सऊद शकील, कामरान गुलाम, खुशदिल शाह, तैयब ताहिर, उस्मान खान, फहीम अशरफ, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस राऊफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि अबरार अहमद.

प्रयागराजला जात असाल तर आहात तिथेच थांबा, नाहीतर माघारी परता; पेट्रोल, डिझेल संपले, १५ फेब्रुवारीपर्यंत न येण्याचे आवाहन

0

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच व्हीव्हीआयपींचे येणे-जाणे, झालेली चेंगराचेंगरी यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. ही एवढी वाढली की प्रयागराजपासून चारही बाजुंना सुमारे ३०० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जणूकाही संपूर्ण देशातील वाहने प्रयागराजकडेच निघाली आहेत. या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजकडे न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रयागराजचे संगम स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. आधीच आलेल्या भाविकांना रस्ते मार्गाने पाठविण्यात येत आहे. अनेकांना तर जिल्ह्याच्या सीमेवरूनच माघारी पाठविण्यात येत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांची तर परिस्थिती न सांगण्यासारखी झाली आहे. अनेकांच्या क्लच प्लेट खराब झाल्या आहेत. अनेकांचे इंधन संपत आले आहे. एवढेच नाही तर वाटेत असलेल्या पेट्रोल पंपांवरही इंधनाची मोठी टंचाई भासू लागली आहे.

पेट्रोल, डिझेलचे टँकर वाटेतच वाहतूक कोंडीत अडकले आहेत. यामुळे इंधनाचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. ट्रेनची तिकीटे मिळत नसल्याने लोक मिळेल त्या वाहनाने प्रयागराजला निघाले होते. यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. अनेकांनी कार तिथेच सोडून पायी जाण्यास सुरुवात केली आहे. पाच तासांच्या रस्त्याला १७ तास झाले तरी लोक पोहोचू शकलेले नाहीत.

इंजिन तापल्याने आणि एसीच्या वापरामुळे तीन गाड्यांना आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत. एका घटनेत अग्निशमन दलाने गाडीच्या काचा फोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. यात दोनजण भाजले आहेत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र, ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रयागराज-मिर्जापुर हायवेवरून करछनाच्या दिशेने वळविण्यात आले. यामुळे ही परिस्थिती ओढविली आहे. वाराणसी, जौनपुरी, कानपूर, रीवा, अयोध्या प्रतापगड आदी मार्गांवरही १०-१० किमीसाठी अख्खा दिवस वाया जात आहे.

माघी अमावास्या, पर्वच्या वेळी होणारी गर्दी ठीक होती. परंतू, सामान्य दिवसांनाही झालेली वाहतूक कोंडी भयंकर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रयागराजच्या सीमेबाहेरील गावांमध्येही काही किमीपर्यंत वाहने अडकली आहेत. गुगल मॅपवरून पर्यायी रस्ते शोधत वाहने या गावांमध्ये गेली होती. तिथेही अशीच परिस्थिती आहे.

मोदी-शहांची कुटनीती फसली, पहिल्यांदाच 10 वर्षांत ओढवली ही नामुष्की!; तिकडे पंतप्रधान एकदाही गेले नाहीत 19 आमदारांची नाराजी

0

देशाच्या राजकारणात 2014 नंतर फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेच कुटनीतीत सर्वांना भारी पडले. या काळात झालेल्या 3 लोकसभा निवडणुकांसह राज्यांच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला सत्ता मिळवून दिली. पंतप्रधानांचा चेहरा, मतदारांना खेचणारी भाषणे आणि शहांचा रणनीती सातत्याने कामी आली. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीतील त्यांचे निर्णयही भल्या-भल्या राजकीय विश्लेषकांना चकित करणारे ठरले. आपले निर्णय, धोरणे त्यांनी यशस्वी करून दाखवली. या दोघांवर नुकतीच एक मोठी नामुष्की ओढवली आहे.

देशात भाजपची अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे. मागील 10 वर्षांत पक्षाने काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अचानक राजीनामा देण्याचे फर्मान सोडले. त्या आदेशाचे पालन करत कुठेही बंडखोरीची भाषा न करता या मुख्यमंत्र्यांनी लागलीच राजीनामे देत नेत्यांचा मान राखला. ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांना या पदावर संधी देण्याचा त्यांचा निर्णय कधीच पक्षाच्या अंगलट आला नाही.

काही नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून दोन-दोन टर्म संधी दिली. पण कधीही एखाद्या राज्यातील कायदा-सुववस्था बिघडल्याने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर आली नव्हती. आता पक्षाच्या इतिहासात या घटनेचीही नोंद होणार आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूरही करण्यात आला असून सिंह यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोदी-शहांवर पहिल्यांदाच आपल्या मुख्यमंत्र्यांना अशा पध्दतीने पायउतार होण्यास सांगण्याची वेळ आल्याची चर्चा आहे. मणिपूरमध्ये एनडीएचे बहुमत आहे. पण हिंसाचाराच्या घटनांमुळे पक्षातील अनेक आमदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेले होते. यापार्श्वभूमीवर विरोधकांना सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी सुरू केली होती. तसे झाले असते तर कदाचित भाजपचे सरकार कोसळले असते, असे राजकीय विश्लेषक सांगतात. ही नामुष्की ओढवू नये, म्हणून तातडीने सिंह यांचा राजीनामा द्यावा लागला.

बिरेन यांच्यावर पक्षातील 19 आमदारांसह इतर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याविरोधातील आमदारांचा रोष वाढत चालला होता. राज्यातील मैतई आणि कुकी समाजातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. मागील दोन वर्षांपासून राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या असून त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक महिने इंटरनेट सेवा बंद होती. विकासकामांवर विपरित परिणाम झाला. अनेक दिवस जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे राज्यातील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले.

विरोधकांकडून अनेक महिन्यांपासून सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. तसेच पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा करावा, अशी मागणीही होत होती. पण हिंसाचारग्रस्त भागात पंतप्रधान एकदाही गेले नाहीत, त्यावरही विरोधक हल्ला चढवत होते. तरीही पक्षाकडून सिंह यांचा राजीनामा घेण्याचे धाडस केले जात नव्हते. पण मोदी-शहांची ही कुटनीती फसली. अखेर पक्षातूनही दबाव वाढू लागल्याने मोदी-शहांना मोठं पाऊल उचलणं भाग पडले आणि त्यांनी सिंह यांचा राजीनामा घ्यावा लागला. या राजीनाम्यामुळे मणिपूरमधील हिंसाचार कमी होणार की नाही, हे लवकरच समजेल. पण भाजप आता सिंह यांच्या जागी कोणला संधी देणार, त्यासाठी कोणते निकष लावणार, यामध्ये दोन्ही नेत्यांचा खरा कस लागणार आहे.

मणिपूरमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कुणीही बसले तरी हिंसाचारासाठी कारणीभूत असलेला आरक्षणाचा मुळ मुद्दा अजूनही तसाच आहे. त्यावर मार्ग निघेपर्यंत हिंसाचाराच्या घटना घडतच राहणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मोदी-शहांपुढील आव्हान संपलेले नाही. राज्य कुणाच्याही ताब्यात दिले तरी त्यांनाच पुढील किमान अडीच वर्षे राज्यात सत्ता टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार, हे निश्चित.