Home Blog Page 115

फडणवीस सरकारचा बाजार समित्यांबाबत एकच मोठा निर्णय; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही झोपच उडाली

0

महायुती सरकारने राज्यातील ज्या 65 तालुक्यांत बाजार समित्याच नव्हत्या. अशा तालुक्यांत नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी त्यांचा शेतमाल शेजारच्या तालुक्यातील बाजार समितीत जाऊन विकावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर वाहतुकीचा आर्थिक बोजा पडत होता. मात्र, या शेतकऱ्यांचा अर्थिक खर्च वाचावा, त्यांना त्यांच्याच तालुक्यात शेतमाल विकता यावा, या उदात्त हेतूने समित्यांचे विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

वास्तविक पाहता नाव शेतकऱ्यांचं असलं तरी हित मात्र कार्यकर्त्यांचं पाहिलं जाणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी महायुती सरकारने ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. मात्र, ज्या इतर तालुक्यांना सोबत घेऊन एका तालुक्यात बाजार समिती आहे. त्याच तालुक्यात नव्याने बाजार समिती होणार आहे. त्यामुळे संबंधित समितीवरील संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते. याची शक्यता दाट आहे. त्यामुळे नेत्यांची देखील डोकेदुखी आगामी काळात वाढणार आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, भुदरगड आणि कागल तालुक्यातील अर्धा भाग असा साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. तर गडहिंग्लज बाजार समिती ही आजरा आणि चंदगड तालुका इतके कार्यक्षेत्र आहे. पण राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार गडहिंग्लजमधून आजरा आणि चंदगडची बाजार समिती स्वतंत्र होणार आहे.

तर कोल्हापूर बाजार समितीतून शाहूवाडी, गगनबावडा येथे बाजार समिती नव्याने होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची बाजार समिती ही केवळ करवीर तालुक्यापुरती तर गडहिंग्लजची बाजार समिती त्याच तालुक्यापुरती मर्यादित राहणार आहे. याशिवाय वडगाव, जयसिंगपूर या दोन बाजार समित्या आहेत; पण त्यांचे विभाजन या नव्या आदेशात केलेले नाही.

एकीकडे महायुतीचे राजकारण पाहता लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते नाराज होत या ना त्या पक्षात गेले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या डोळ्यावर दुय्यम फळातील कार्यकर्ता नाराज होऊ नये यासाठी महायुती सरकारने विशेष काळजी कार्यकर्त्यांची घेतलेली या निमित्ताने दिसते. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना अशा बाजार समितीवर नियुक्त करून त्यांची राजकीय हौस मिटवण्याची जोडणे या निमित्ताने केली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर जिल्हा बँक, गोकुळ आणि सोप्या असलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात स्वतः नेते किंवा त्यांचे बगलबच्चे, नातेवाईक यांनाच संधी दिली आहे. बाजार समित्या यापासून अपवाद वगळता दूर होत्या. त्यामुळेच कोल्हापूर असो किंवा अन्य समित्यांत कार्यकर्त्यांना संधी दिली गेली. आता नव्या बाजार समित्यांची स्थापनाही त्याच कारणासाठी झाली आहे.

तालुक्यात विकास सोसायटी असेल किंवा दूध संस्थेच्या संचालक, सभापतींना मोठा सन्मान असतो. नव्या बाजार समित्यांमुळे अशा पदांपासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण अन्य संस्थांप्रमाणे याठिकाणीही नेत्यांचे डावे-उजवे, नातेवाईक यांची वर्णी लावू नये, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात या समित्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतरच त्यासंदर्भातील स्पष्टता दिसेल.

कोल्हापूरसाठी होणार चुरस

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या साडेसहा तालुक्यांची आहे. या साडेसहा तालुक्यांमधून अनेक संचालक आहेत. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे कोल्हापूर गगनबावडा आणि शाहूवाडी नवीन बाजार समित्या होणार असल्याने पूर्वीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला इच्छुकांची अधिक पसंती आहे.

सभापतींच्या दिमतीला गाडी, समितीचा प्रशस्त आवार, त्यामुळे संचालकांना मिळणारा सन्मान या बाबी लक्षात घेता आता करवीरपुरतेच अस्तित्त्व असलेल्या, पण सुस्थितीत आणि प्रस्थापित असलेल्या कोल्हापूर बाजार समितीत जाण्यासाठी राजकीय पातळीवर चुरस दिसणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मंत्री अतुल सावे यांना झटका, आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मंजूर कामांना स्थगिती

0

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का दिला आहे. मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. भाजप आमदार तुषार राठोड यांनी अतुल सावे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केले होती. त्यांच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.

अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील कामांना मंजुरी दिली. पण आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना स्थगिती दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेता अतुल सावे यांनी तांडा वस्तीच्या कामांना मंजुरी दिल्याची तक्रार तुषार राठोड यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे अतुल सावे यांच्यासाठी धक्का मानला जातोय.

सरकारमध्ये काय सुरु?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन आतापर्यंत चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. सुरुवातीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याने सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. पण भाजपदेखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने अखेर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला.

यानंतर जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच बघायला मिळाली. एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं होतं. पण ते खातं देखील भाजपच्या वाटेला गेलं. यानंतर पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच बघायला मिळाली. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे महायुतीत सातत्याने नाराजी असल्याच्या किंवा मतभेद असल्याचे वृत सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात भाजप VS काँग्रेस यांच्यात राडा, भाजपचे आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांनी केलं स्थानबद्ध

0

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. नॅशनल हेराल्ड आरोप प्रकरणावरुन भाजप युवा मोर्चाकडून पुण्यातील काँग्रेस भवनच्या समोर जावून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवन जवळ दाखल झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौक येथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहेत. भाजप युवा मोर्चाने दिलेल्या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडे लाठ्या-काठ्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते आले तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस सध्या परिस्थिती हाताळत आहेत. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप कार्यकर्त्यांनी याआधीदेखील काँग्रेस कार्यालयावर जावून आंदोलन केलं आहे. अशाप्रकारच्या आंदोलनातून काँग्रेस कार्यालयात तोडफोडीची देखील घटना याधी घडली आहे. त्यामुळे यावेळी भाजप युवा मोर्चाकडून इशारा मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील भाजपचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले बघायला मिळाले. काँग्रेस कार्यकर्ते लाठ्या-काठ्या घेऊन सज्ज राहिले. आंदोलकांना जशासं तसं उत्तर देऊ असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

भाजपचे आंदोलक प्रचंड आक्रमक

भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाच्या दिशेला निघाले. ते मोर्चा घेऊन बालगंधर्व चौक येथे आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी हातात पोस्टर आणले होते. तसेच त्यांनी राहुल गांधी यांचा सोबत आणलेलं पोस्टर फाडलं. याशिवाय राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने नॅशनल हेराल्ड प्रकरणाबाबत जनतेला चुकीची माहिती देणं बंद करावं, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली. आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांनी आंदोलकांना केलं स्थानबद्ध

पोलिसांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व चौक परिसरात बॅरिकेट्स लावले होते. यावेळी काही आंदोलक एवढे आक्रमक झाले की, ते पोलिसांना न जुमानता बॅरिकेट्स बाजूला करुन पुढे जाऊ लागले. पण पोलिसांनी तातडीने त्यांना रोखलं. पोलिसांनी आंदोलकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भाजपच्या आंदोलकांना केलं. यानंतर आंदोलकांनी बालगंधर्व चौकात बसून निषेध व्यक्त करण्याची भूमिका घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण इथेच बसून आंदोलन करत असल्याचं भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी जाहीर केलं. यामुळे मोठा अनर्थ टळला.

बीडमध्ये ‘लाडक्या वकील बहिणी’चं रक्त साकळेपर्यंत मारहाण नावं समजली; दादागिरी महागात, कठोर कलमे

0

बीड :  ध्वनी प्रदूषणामुळे आवाज कमी करावा या मागणीची तक्रार केल्याच्या कारणास्तव संतापलेल्या गावच्या सरपंचासह 10 साथीदारांनी गावातील महिलेलाच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.सध्या मारहाण करणारे दहा जण फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या आणि तालुक्यातील सनगाव येथील रहिवासी अॅड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिलेने सनगाव गावात ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. महिलेला मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याचा राग मनात धरून याच गावचे सरपंच अंजान आणि त्याच्या 10 कार्यकर्त्या्ंनी ज्ञानेश्वरी मारहाण केली.

शेतात महिलेसोबत नेमकं काय घडलं? 

महिला शेतात कैऱ्या आणण्यासाठी जात असतांना बांधाजवळ गेली असता सहा आरोपींनी हातात काळ्या रबरी पाईप घेतले आणि इतर तीन आरोपी हातात लाकडी काठ्या घेऊन तिच्याजवळ आले. तू या पूर्वी गावातील पिठाच्या गिरण्या आणि मंदिरावरिल भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास तसेच तुझ्या आईची कोर्टात सुरु असलेली 307 ची केस का काढून घेत नाहीस अशी विचारणा केली. तू जर यापुढे आमच्या विरुध्द तक्रार देशील का असे म्हणून त्यांनी हातातील काठ्या व रबरी पाईपने पाठीवर, मानेवर कमरेवर दोन्ही पायाचे पाठीमागील पायावर मारहाण करत गंभीर दुखापत केली.

शेतात महिलेचा विनयभंग

तसेच तीन आरोपींनी तिच्या हाताला धरुन बाजूला नेत विनयभंग केला. एका आरोपीने तिला खल्लास करुन टाका असे म्हणत घाणेरड्या शिव्या दिल्या. तसेच तिचे चुलते योगीराज अंजान व चुलती अर्चना अंजान यांनाही मारहाण झाल्याची तक्रार महिलेने केली आहे.

दहा जणांची नावं समोर

या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान सपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव , मृत्युजय पांडुरंग अंजान , अंकुश बाबुराव अंजान , सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे सर्व राहणार सनगाव ता. अंबाजोगाई, बीड या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एक महिला दिन स्वयंपुर्णतेचा! खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आरी वर्क किट प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा

0

जागतिक महिला दिन संपन्न झाला असून जगभरात हा दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच अनुषंगाने आपल्या वारजे-कर्वेनगर प्रभागातील भगिनींनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यात सहाय्य व्हावे, यासाठी आपण ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंतरंगी डिजायनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी अर्थात आरी वर्क प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. गेल्या एक महिन्यापासून सुरू या शिबिरात तब्बल ४०० भगिनींनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत उपक्रम यशस्वी केला. अत्यंत एकाग्रता आणि चिकाटी मनी ठेवून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या भगिनींना पाठबळ मिळावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहताना आमचाही खारीचा वाटा असावा, हा विचार करत आरी वर्क किट आणि प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांनी वेळात वेळ काढत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली आणि आमच्यासह भगिनींना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावरती माजी नगरसेविका लक्ष्मी देवराम दुधाने, स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

एकही धागा चुकल्यास पुन्हा नव्याने हे काम करावे लागते, अशी हस्तकला या भगिनींनी आत्मसात केली असून आपली प्राचीन भारतीय संस्कृती जपत प्रचंड रोजगार निर्मिती होईल, अशी आशा वाटते. याबद्दल आदरणीय सुप्रियाताई यांनी माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने आणि स्वप्निल देवराम दुधाने यांच्या टीमचे मनसोक्त कौतुक करत भविष्यातही असे अधिकाधिक उपक्रम आयोजित करावे, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चंचलाताई भोसले आणि सहकारी भगिनी प्रियंकाताई भोसले यांचे विशेष सत्कार करत प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष श्री. गिरीशजी गुरनानी, महिला अध्यक्षा प्रियांकाताई तांबे, कोथरूडचे माजी युवक अध्यक्ष श्री. प्रमोदजी शिंदे, पुणे शहराच्या महिला सरचिटणीस संगीता ताई लिंबोळे, प्रभागातील सहकारी पल्लवी ताई शेडगे, सुनीता ताई पवार, माझे सहकारी मित्र आणि कर्वेनगर वारजे प्रभागाचे अध्यक्ष सूत्रसंचालक किशोरजी शेडगे तसेच अनेक भगिनी माता उपस्थित होत्या.

माफी मागा ते 36 हजार कोटी आम्हाला द्या; बांगलादेशने आता पाकिस्तानकडे मोर्चा वळवला! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

0

तब्बल15 वर्षांनंतर गुरुवारी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा झाली. या काळात बांगलादेशने अनेक न सुटलेले मुद्दे उपस्थित केले. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दीन यांनी 1971 च्या अत्याचारांसाठी पाकिस्तानकडून औपचारिक माफी मागण्याची मागणी केली. बांगलादेशने म्हटले आहे की पाकिस्तानने 1971 च्या संयुक्त मालमत्तेतून बांगलादेशला त्यांचा हिस्सा 4.3 अब्ज डॉलर्स (36 हजार कोटी रुपये किंवा 52 हजार कोटी बांगलादेशी टका) द्यावा, जेव्हा दोन्ही देश एक होते. यासोबतच, 1970 मध्ये बांगलादेशला (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) चक्रीवादळात मदत केल्याबद्दल मिळालेले 200 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2400 कोटी रुपये) देखील द्यावे लागतील.

3 लाख ‘बिहारी’ परत करण्याचा मुद्दाही उपस्थित

बांगलादेशने ढाका छावण्यांमध्ये राहणाऱ्या 3 लाखांहून अधिक अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्याचा मुद्दाही उपस्थित केला. बांगलादेशात त्यांना ‘बिहारी’ म्हणतात. ते मूळचे उर्दू भाषिक मुस्लिम स्थलांतरित आहेत जे 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशातून पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) मध्ये स्थायिक झाले. 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धानंतर, या लोकांनी पश्चिम पाकिस्तानशी निष्ठा दाखवली, ज्यामुळे त्यांना बांगलादेशमध्ये भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागला. त्यांना ‘पाकिस्तान समर्थक’ मानले गेले आणि त्यांच्यावर सूड उगवण्यात आला. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांना हिंसाचार, बलात्कार आणि खूनांना सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय लष्कर आणि रेडक्रॉसने त्यांच्या संरक्षणासाठी ढाका आणि इतरत्र अनेक तात्पुरती मदत छावण्या उभारल्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून, लाखो लोक मदत छावण्यांमध्ये दयनीय परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांना पाकिस्तानने दत्तक घेतलेले नाही किंवा बांगलादेशने त्यांना पूर्ण नागरिकत्व दिलेले नाही.

पाकिस्तानला बांगलादेशचा मुख्य शेजारी म्हटले

एका पत्रकाराने जशीम उद्दीन यांना विचारले की ढाका पूर्वी भारताकडे झुकत होता तसाच आता पाकिस्तानकडे झुकत आहे का? यावर त्यांनी सांगितले की, बांगलादेश पाकिस्तानशी आदर आणि परस्पर फायद्याच्या आधारावर संबंध प्रस्थापित करण्याचा मानस ठेवतो. ते म्हणाले की, बांगलादेश आपल्या परराष्ट्र धोरणानुसार सर्व शेजारी देशांशी संबंध वाढवण्यावर भर देतो. पाकिस्तान हा दक्षिण आशियातील बांगलादेशच्या प्रमुख शेजारी देशांपैकी एक आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार 27 आणि 28 एप्रिल रोजी बांगलादेशला भेट देतील. आमना बलोच म्हणाल्या की, दोन्ही देशांदरम्यान लवकरच थेट विमानसेवा देखील सुरू होईल.

पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांनी मोहम्मद युनूस यांची भेट घेतली

जशीम उद्दीन यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्ष आमना बलोच यांच्यासोबत परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत (एफओसी) नंतर माध्यमांना सांगितले की, आम्ही पाकिस्तानसोबत ऐतिहासिकदृष्ट्या न सुटलेले मुद्दे उपस्थित केले आहेत. बांगलादेशी परराष्ट्र सचिव म्हणाले की, आम्ही म्हटले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या निराकरण न झालेले प्रश्न सोडवण्याची ही योग्य वेळ आहे. परस्पर हित आणि हितासाठी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

भारत-पाकिस्तान युद्धाची सुरुवात बांगलादेशी लोकांच्या अत्याचाराने झाली

पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला. पूर्व पाकिस्तानातील लोक बंगाली बोलत होते. स्त्रिया पूर्वी साड्या नेसत असत. पश्चिम पाकिस्तानचे सरकार चालवणारे नेते त्यांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक मानत होते. पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या 55 टक्के होती आणि त्यांच्या बजेटपैकी 80 टक्के पश्चिम पाकिस्तानमध्ये खर्च होत असे. जेव्हा पूर्व पाकिस्तानातील लोकांनी आवाज उठवला तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्यांचा आवाज दाबला. या भेदभावामुळे संतप्त होऊन पूर्व पाकिस्तानातील लोकांनी बांगलादेश नावाच्या वेगळ्या राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी सैन्य दररोज कुठे ना कुठे नरसंहार करत होते. 25 मार्च 1971 रोजी पाकिस्तानने त्यांच्या पूर्वेकडील भागात कथित बंडखोरी चिरडण्यासाठी कर्फ्यू लागू करून ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले. जनरल टिक्का खान यांना याची जबाबदारी देण्यात आली.

1971 च्या युद्धाची सुरुवात बांगलादेश मुक्ती युद्ध म्हणून झाली

पहिल्याच दिवशी, पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशचा झेंडा घेऊन जाणाऱ्या सर्व लोकांना मारले. रात्रीच्या वेळी सैन्याने ढाका विद्यापीठावर हल्ला केला. दोन दिवसांत पाकिस्तानी सैन्याने दीड लाखाहून अधिक लोकांना ठार मारले. पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या क्रूरतेमुळे, भारतीय सैन्याने 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. भारत आणि पाकिस्तानमधील 1971 च्या युद्धाची सुरुवात बांगलादेश मुक्ती युद्ध म्हणून झाली. 13 दिवस चाललेल्या युद्धानंतर, 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले. भारतीय सैन्याने सुमारे 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना कैद केले होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, नेत्याची होणारी बायको कोण?

0

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे आज (शुक्रवारी) न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत.

भाजप नेते दिलीप घोष त्यांच्या ज्वलंत भाषणांमुळे अनेकदा चर्चेत असतात.त्यांची वधू रिंकू मजुमदार आहे, दक्षिण कोलकाता येथील भाजप महिला मोर्चाच्या त्या नेत्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कोलकात्यातील न्यू टाउन येथे मॉर्निंग वॉक दरम्यान भेटले होते. भाजप नेते दिलीप घोष लग्न करणार आहेत आणि या बातमीने बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घोष एकटे पडले होते. त्याच कठीण काळात ज्या महिलेने त्यांना साथ दिली ती त्यांची जोडीदार आहे, असे वृत्तांमधून समोर आले आहे.

हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला असला तरी, राज्य भाजपचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणात गप्प राहिले आहेत.विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले नाही.

वृत्तानुसार, शुक्रवारी कोलकाता येथील दिलीप यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात त्यांचे लग्न होणार आहे. रिंकू मजुमदार त्याची वधू होणार आहे. ती भाजपचीही सदस्य आहे. दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. वृत्तानुसार, रिंकू यांनी पहिल्यांदा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाल्यानंतर त्या त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या, त्यांना साथ दिली. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही.

रिंकू मजुमदार कोण आहे?

रिंकू मजुमदार घटस्फोटित असून एका मुलाची आई आहे. त्यांचा मुलगा कोलकात्यातील साल्ट लेक येथील सेक्टर पाचमधील एका आयटी कंपनीत काम करतो. रिंकू अलीकडेच 3 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर पाहिले गेले होते, ज्यामुळे या नवीन नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळकटी मिळाली.

रिपोर्ट्सनुसार, रिंकू न्यूटाऊनमधील भाजप महिला मोर्चाची नेत्या आहेत. दिलीप घोष यांनीच त्यांना पार्टीत आणले. आईच्या विनंतीवरून दिलीप घोष यांनी लग्नाला होकार दिल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप घोष ईडन गार्डन्सवर आयपीएल सामना पाहण्यासाठी गेले होते.त्यानंतरच चर्चा सुरू होत्या. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की रिंकू यांनी स्वतः दिलीप घोष यांची आई पुष्पलता घोष यांच्याशी बोलून लग्नासाठी त्यांना तयार केले.

सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

0

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. सध्या समोरच्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते उगाच वाद घालत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले. ते शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या कुणाला उद्योग नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते त्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. तो टिकला पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्षे दिल्लीत हे प्रकरण पडून होतं, ते कोणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने, मोदी साहेबांनी दाखवला. त्याचे कार्यक्रमही आम्ही घेतले. आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्याप्रकारची वास्तू तयार करण्याचे ठरवले आहे. सगळा आराखडा तयार आहे, निधीची कुठलीही कमतरता नाही. हे करत असताना जगात मॅक्झिमम भाषा इंग्रजी ही चालते. त्यामुळे तुमच्या आमच्या घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात शिरायचं नाहीय. बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात. त्याच्यात ते वेळ घालवतात. इंग्रजी ही जगात सर्वत्र चालते, त्यामुळे तीदेखील आली पाहिजे. तिन्ही भाषेला महत्त्व आहे. पण शेवटी स्वत:ची मातृभाषा तिला नंबरच एकचं स्थान आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी काय म्हटले?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

पुण्यात खळबळ! बहिणीच्या प्रियकराची सर्वांदेखत हत्या, भाऊ आणि आईनेच भाजी मंडईतच…

0

पुण्यात एक अंगावर शहरे आणणारी घटना घडली आहे. बहिणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच भावाने आईला हाताशी घेत तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील चंद नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या भावाने आई आणि मित्रासह तिच्या प्रियकराला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या बॉयफ्रेंडची आणि तिच्या भावात खून्नस होती. वर्षभरापासून आरोपीच्या डोक्यात हा राग होता. याच रागातून त्याने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. पुण्यातील चंदन नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे ११ दरम्यानची घटना घडली आहे. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. प्रदीप अडागळे असं मृत तरुणाचे नाव आहे तर ऋषी काकडे असं आरोपीचे नाव आहे.

प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे यांच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस होती. बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघामध्ये वादावादी व्हायची. काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडीमध्ये ऋषी काकडे त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली. यात प्रदीप गंभीर जखमी झाला होता. रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आल होत. मात्र आज सकाळी साडे सहा दरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला आहे.

‘शेवटी मदांध तख्त फोडते मराठी’; शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची बॅनरबाजी, राज ठाकरेंचा स्पष्ट इशारा

0

इयत्ता पहिलीपासूनच शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून आता राड ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही…’, असं म्हणत दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करत विरोधप्रदर्शन करण्यात येत आहे.

परिसरातील अतिशय दर्शनीय स्थळी मनसेनं ठळक भाषेत हे बॅनर लावल सर्वसामान्यांसह प्रशासनाचंही याकडे लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांना आव्हान केलं आहे. हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या बॅनरच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

पक्त बॅनरच नव्हे, तर एक पोस्टकार्डवजा बॅनरसुद्धा तयार करत त्यावर मनसेच्या वतीनं अतिशय बोलका मजकूर लिहिण्यात आला आहे.

‘मा. मुख्यमंत्री व मा. मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय…

हिंदीकरणाच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल! मराठी साहित्यिकांची दूरदृष्टी!!

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी…

पण, या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत’, असं या पोस्टकार्डवजा बॅनरवर ठकणावून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान या निर्णयाचं वृत्त जाहीर होताच राज ठाकरे यांनी स्वत: व्यक्त होत समाज माध्यमांच्या माध्यमातूनही आपली परखड भूमिका स्पष्ट करत हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? असा खडा सवाल केला होता.

‘बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही’, असं त्यांनी लिहिलं होतं. तेव्हा आता मनसे आणि महाराष्ट्रातील जनमानसाचा होणारा विरोध पाहता या निर्णयावर शासन पुनर्विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईत मनसेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून, त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. हिंदी भाषा अनिवार्य केल्याबद्दल मनसेच्या पुढील रणनितीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.