Home Blog Page 112

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावणीवेळी काय काय घडलं?

0

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपात पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या लुनावणीदरम्यान पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. जोपर्यंत पूजा खेडकर ही याप्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम असेल. आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. पूजा खेडकर हजर राहील, चौकशीत सहकार्य करेल, असे खेडकरांच्या वकिलांतर्फे सांगण्यात आलं.

पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दिल्ली पोलिसांकडून पूजाच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तुम्ही तिला चौकशीसाठी का बोलावलं नाही असा सवाल न्यायालयाने विचारला असा आम्हाला तिची कोठडीत चौकशी करायची आहे. सर्वसाधारण चौकशीसाठी बोलवायचं नाहीये, असे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण असल्याचंही दिल्ली पोलिसांनी नमूद केलं.

कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, वकिलांचा युक्तिवाद

पूजा खेडकर प्रकरणात 15 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती, मात्र पूजाला अटक करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने पूजा खेडकर प्रकरणात आज म्हणजे 21 एप्रिलची सुनावणीची तारीख दिली होती. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात बरेच युक्तिवाद झाले. पूजा खेडकर यांच्या बाजूने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांचे चिरंजीव श्रेयस लळीत बाजू मांडण्यासाठी उभे राहिले. पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती, मात्र तिची कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी केला.

यूपीएससीचा जामीनाला विरोध

पूजा खेडकर हिने मोठी फसवणूक केली असून तिच्या कस्टोडियल तपासाची गरज असल्याचा युक्तिवाद युपीएससीच्या वकिलांनी गेल्या सुनावणीत केला होता. मात्र, आम्ही तपासात सहकार्य करायला तयार असल्याचं सांगत पूजा खेडकर यांच्या वकिलाने कस्टोडियलला विरोध केला.

आत्तापर्यंत काय घडलं ?

15 जानेवारी 2025: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या बेंच ने पूजा खेडकर यांना 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं.

दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस जारी करून खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उत्तर मागितलं होतं.

14 फेब्रुवारी 2025 : सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पूजा खेडकर हिला अटकेपासून संरक्षण दिलं. तसंच पूजा खेडकर हिला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.

काय आहे प्रकरण ?

पूजा खेडकर वर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेंम्पट मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर प्रकरणात प्रथमदर्शी “मोठा कट” असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं.

यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली आहे

मात्र पूजा खेडकर हिने सर्व आरोप फेटाळले आहे.

पुढील सुनावणी कधी ?

दरम्यान 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील, असे न्यायालयाने नमूद केलं.

पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळणार? मॅक्रॉन यांच्यावर नेतन्याहू का भडकले? जाणून घ्या सविस्तर

0

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकतेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका वक्तव्यावर टीका केली, ज्यात मॅक्रॉन म्हणाले की, पॅलेस्टिनी राज्याची मान्यता काही दिवसांतच दिली जाईल. नेतन्याहू म्हणाले की, मॅक्रॉन इस्रायलला नष्ट करण्याच्या उद्देशाने राष्ट्राच्या कल्पनेला प्रोत्साहन देत आहेत. तर दुसरीकडे मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना शुक्रवारी लिहिले की, “ज्याप्रमाणे मी इस्रायली लोकांच्या शांतता आणि सुरक्षिततेत राहण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो, त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनच्या राज्य आणि शांततेच्या कायदेशीर अधिकाराचे मी समर्थन करतो. दोन देशांच्या तोडग्याला फ्रान्सने दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे.” असंही ते म्हणालेत.

फ्रान्स पॅलेस्टाईनला मान्यता देणार
मॅक्रॉन यांनी बुधवारी फ्रान्स 5 टेलिव्हिजनला सांगितले की, जून 2025 मध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत फ्रान्स अधिकृतपणे पॅलेस्टाईनला मान्यता देऊ शकतो. मॅक्रॉन म्हणाले की, शांततेला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपण मान्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि येत्या काही महिन्यांत आम्ही ते करू, असे ते म्हणाले.

‘आम्ही इस्रायलच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणार नाही.’
मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी नेते गप्प होते. त्याला त्यांनी ज्यूंचा नरसंहार म्हटले. नेतन्याहू म्हणाले, “वास्तवापासून दुरावलेल्या भ्रमांमुळे आम्ही आमचे अस्तित्व धोक्यात आणणार नाही आणि पॅलेस्टिनी राष्ट्राच्या स्थापनेबद्दल नैतिक व्याख्याने स्वीकारणार नाही, ज्यामुळे इस्रायलचे अस्तित्व धोक्यात येईल, विशेषत: कोर्सिका, न्यू कॅलेडोनिया, फ्रेंच गयाना आणि उर्वरित भूमीच्या मुक्तीस विरोध करणाऱ्यांकडून.” ज्याचे स्वातंत्र्य फ्रान्ससाठी धोक्याचे ठरणार नाही.

मॅक्रॉन यांचा पलटवार
त्यानंतर मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना शुक्रवारी लिहिले की, “ज्याप्रमाणे मी इस्रायली लोकांच्या शांतता आणि सुरक्षिततेत राहण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो, त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनच्या राज्य आणि शांततेच्या कायदेशीर अधिकाराचे मी समर्थन करतो.” ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यासह दोन देशांच्या तोडग्याला फ्रान्सने दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. सध्या 150 देश पॅलेस्टाइनला मान्यता देतात.

मॅक्रॉन म्हणाले की, शांततेला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपण मान्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि येत्या काही महिन्यांत आम्ही ते करू, असे ते म्हणाले.

पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन

0

पोप फ्रान्सिस यांचं वॅटिकन सिटीमध्ये निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वॅटिकन सिटीमधून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस 88 वर्षांचे होते. एकदिवस आधीच त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांची भेट घेतली होती. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जगभरातील 1.4 अब्ज कॅथोलिक शोकसागरात बुडाले आहेत.

पोप फ्रान्सिस मागच्या आठवड्यात सेंट पीटर्स स्क्वायर येथे रविवारच्या पारंपारिक प्रार्थनेच आणि कॅथोलिक चर्चमध्ये जयंती वर्ष साजरं करण्याच्या सामूहिक प्रार्थनेच नेतृत्व करु शकले नव्हते. कारण त्यांची तब्येत खराब होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे आधीपासून अनेक ठरलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले. कारण डॉक्टरांनी 88 वर्षाच्या पोप यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. वॅटिकनकडून शनिवारी संध्याकाळी एक अपडेट देण्यात आली. त्यात म्हटलेलं की, दीर्घकाळापासून त्यांना श्वसनाचा त्रास होत आहेच. पण आता त्यांची हालत अजून खराब झाली आहे.

कोल्हापुरात ‘दाभोलकर हत्या आणि मी’, जामीनातील आरोपी विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे!

0

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून जामिनावर बाहेर असलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन होत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या विक्रम भावे यांना यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, आपण आणि इतर काहीजण या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा भावे यांनी या पुस्तकातून केला आहे.

विक्रम भावे यांच्या म्हणण्यानुसार, ‘दाभोळकर हत्या आणि मी’ हे पुस्तक केवळ त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचं चित्रण नसून, हे एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा दस्तावेज आहे. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे :

तपासाची दिशा आधीच ठरवली गेली?

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीरपणे हिंदुत्ववाद्यांवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तपासाची दिशा आधीच ठरवून टाकली गेल्याचा आरोप भावे यांनी केला आहे.

लोकशाहीला धक्का देणारा अनुभव :

हिंदुत्ववाद्यांना या प्रकरणात केवळ त्यांच्या विचारधारेसाठी लक्ष्य करण्यात आलं, असा भावे यांचा दावा आहे. हा अनुभव केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरही प्रश्न उपस्थित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा आहे का?”

केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे एवढे भयंकर परिणाम भोगावे लागले, यावर आश्चर्य व्यक्त करत भावे विचारतात की, “या देशात हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा ठरत आहे का?”

वेब सिरीजसारखा अनुभव :

या प्रकरणातील अटक, चौकशी आणि तुरुंगातील अनुभव इतका नाट्यमय होता की, तो एखाद्या वेब सिरीज किंवा कादंबरीची कथा वाटावी, असं भावे पुस्तकात नमूद करतात.

प्रत्यक्ष आणि पडद्यामागचं वास्तव :

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात प्रत्यक्ष काय घडलं आणि पडद्यामागे काय घडत होतं, याचा सविस्तर लेखाजोखा या पुस्तकात देण्यात आला आहे, असं भावे सांगतात.

या पुस्तकामुळे पुन्हा एकदा डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची चर्चा रंगणार असून, यामधून नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, या पुस्तकातील दाव्यांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर काय प्रतिक्रिया उमटतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण नेमकं काय?

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सातच्या सुमारास पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते आणि अंधश्रद्धेविरोधात कठोर कायदा आणण्याच्या मागणीसाठी त्यांनी लढा दिला होता.

त्यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने प्रथम पुणे पोलिसांकडे सोपवली होती. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात काहीजणांना अटक झाली असून, सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही व्यक्तींवर संशय घेतला गेला. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! खेळाडू मालामाल! ही नावं वगळली या नव्या चेहऱ्यांचा समावेश संपूर्ण यादी

0

भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष संघासाठी 2024-25 वर्षासाठीचा केंद्रीय करार जाहीर केला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत लागू राहणार आहे. यंदा जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण 34 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू A+ ग्रेडमध्ये आहेत.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या कराराची घोषणा केली असून, यामध्ये खेळाडूंना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आलं आहे – A+, A, B आणि C.

भारतीय संघातील चार वरिष्ठ खेळाडूंना A+ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. हे खेळाडू वर्षभरात सर्वाधिक सामने खेळतात व संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावतात.

रोहित शर्मा

विराट कोहली

जसप्रीत बुमराह

रवींद्र जडेजा

A ग्रेड (10 खेळाडू) :

मोहम्मद सिराज

केएल राहुल

शुभमन गिल

हार्दिक पांड्या

मोहम्मद शमी

रिषभ पंत

B ग्रेड (5 खेळाडू) :

सूर्यकुमार यादव

कुलदीप यादव

अक्षर पटेल

यशस्वी जायस्वाल

श्रेयस अय्यर

C ग्रेड (15+ खेळाडू) :

रिंकू सिंग

तिलक वर्मा

ऋतुराज गायकवाड

शिवम दुबे

रवी बिश्नोई

वॉशिंग्टन सुंदर

मुकेश कुमार

संजू सॅमसन

अर्जदिप सिंग

प्रसिध कृष्णा

रजत पाटीदार

ध्रुव जुरेल

सरफराज खान

नितीश रेड्डी

ईशान किशन

अभिषेक शर्मा

आकाश दीप

वरुण चक्रवर्ती

हार्षित राणा

केंद्रीय कराराची ही यादी खेळाडूंच्या कामगिरी, सातत्य आणि संघासाठी त्यांच्या योगदानाच्या आधारावर ठरवली जाते. यामुळेच काही नावं यंदा वगळली गेली असून काही नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. संघात चांगली स्पर्धा निर्माण होत असल्याचं संकेत यामधून मिळतात.

ग्रामदैवत म्हातोबाच्या मूळ ठिकाण पायवाट सुकर; ना. चंद्रकांतदादा पाटलांच्या पुढाकाराने पायऱ्यांची पुनर्बांधणी

0

कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणे अधिक सुकर झाले आहे. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली असून, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा यांचे एआरआय टेकडीवरील मूळ ठाणे असून, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची अतिशय दुरवस्था झाली होती. सदर पायऱ्या अतिशय जीर्ण आणि भग्न झाल्याने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती. सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करुन; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी; अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती.

त्यामुळे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत; या पायऱ्यांची पुनर्बांधणी केली असून; घडीव दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे वैभव देखील वाढले असून; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की मंदिर हे सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचं केंद्र आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या एकत्रिकरणातून सामाजिक ऐक्य जपले जाते. राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना; अनेक मार्ग उभारले. पण मी लहानपणापासून ज्या देवस्थानात जायचो; त्या कोल्हापूरमधील तळे माऊली मंदिराकडे जाणारा मार्ग तयार केला.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघातील म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे हे काम करुन; म्हातोबांच्या चरणी अर्पण करतो. भविष्यात ही या परिसराच्या विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा; त्यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही यावेळी दिली. दरम्यान, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल म्हातोबा सेवक संघाच्या वतीने समाधान व्यक्त केले.

ताई अण्णांच्या दबावातही दादांचे कोथरूडवर अधिराज्य?; कोथरूड नवनियुक्त मंडल अध्यक्ष ‘टीम दादा’ची छाप

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ असा नाम उल्लेख जरी झाला तरी महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण करण्यामध्ये या विधानसभा मतदारसंघाने यश मिळवल आहे. महाराष्ट्र राज्यात आदर्शवत वाटावं असा मतदारसंघ बनवण्यामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे विचार आचार आणि उपक्रम हे कायमच चर्चेत राहत असतात. कोथरूड विधानसभा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते) अशी भलीमोठी जंत्री असली तरी सुद्धा संघटन परवांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्त यांचा विचार करता कोथरूड विधानसभा मतदारसंघावर विद्यमान नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्वाधिक पदाधिकारी संपर्क जर कोणत्या नेत्यांचा असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त चंद्रकांत दादा पाटीलच असे कार्यकर्त्यांकडून गर्वाने सांगितले जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संपर्क साधत चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने यश मिळवले. (विशेष म्हणजे भूमिपुत्र असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापेक्षाही जास्त मते) त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी संघटन आपल्या ताब्यात नाही अशा ठिकाणी आपली यंत्रणा सक्रिय करण्याचा संकल्प करत कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुन्हा नव्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी बांधण्यास सुरुवात केला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

आगामी काळामध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून हितसंबंधाच्या लोकांचा दबाव येणार हे ग्राह्य धरत संपूर्ण मतदारसंघांमध्ये आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या संघटन पर्व निवडीमध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपला वरचष्मा कायम राखला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बाणेर बालेवाडी पाषाण या भागामध्ये संघटनात्मक पातळीवर आपली पकड घट्ट नसल्याची जाणीव झाल्यानंतर या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना विविध स्तरावरती पाठबळ देत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बहुमोल योगदान दिले. त्यामुळेच प्रचंड नाराजी असतानाही या भागातून भारतीय जनता पक्षाला पर्यायाने विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना प्रचंड मते मिळाली. आगामी काळातील धोका लक्षात घेऊन या संघटनपर्वाच्या निमित्ताने ‘दबंगवृत्ती’च्या स्वहितार्थ भूमिका घेणाऱ्या युवा चेहऱ्यांचा पक्का कार्यक्रम करत श्री लहू बालवडकर- कोथरूड (उत्तर)मंडल, अशी नियुक्ती करून त्या भागातही संघटनात्मक कार्य किती महत्त्वाचे आहे आणि आगामी काळामध्ये पक्षांमध्ये त्याला अतिउच्च स्थान राहणार याची जाणीव करून दिली. तर केंद्रीय मंत्री यांच्या मर्जीनुसार विधानसभा मतदारसंघातील श्री निलेश कोंढाळकर यांची -कोथरूड (मध्य) मंडल म्हणून झालेली नियुक्ती जरी वेगळी वाटत असली तरी सुद्धा झालेल्या मतांचा विचार करता या निवडीमध्येही दादांची छाप प्रकर्षाने जाणवते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत प्रभावी मतदान असलेल्या प्रभात 13 या भागावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वर्चस्व असल्याचे बोलले जात असताना या मुख्य प्रभागावरती आपली पकड मजबूत करण्यासाठी योग्य आखणी करत श्री कुलदीप सावळेकर – (कर्वेनगर -एरंडवणा) मंडल यांची नियुक्ती झाल्याने पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघावरती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे इच्छा आहे की काय अशी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका

0

पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 5 विकेट्सने मात केली. पावसामुळे 14 ओव्हरच्या झालेल्या या सामन्यात आरसीबीने पंजाबला विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 12.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहजपणे पूर्ण केलं. आरसीबीचे फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आरसीबीला घरच्या मैदानात सलग आणि एकूण तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला पंजाबला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तसेच आरसीबी पराभवानंतर टॉप 3 मधून बाहेर झाली आहे.

आरसीबीने घराबाहेरील सर्व सामने जिंकले आहेत. मात्र घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीला विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला पंजाबने आरसीबीवर मात करत या मोसमातील पाचवा विजय साकारला. पंजाब अशी कामगिरी करणारी दिल्लीनंतर दुसरी टीम ठरली आहे. पंजाबने या पाचव्या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम राखला आहे. पंजाब या विजयासह पुन्हा टॉप 2 मध्ये पोहचली आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा पंजाबच्या तुलनेत चांगला असल्याने ते नंबर 1 आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्याआधी दुसऱ्या क्रमांकावर होती. गुजरातने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीनेही तितकेच सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेटमुळे आरसीबी जीटीमागे आहे. तर लखनौ सुपर जायंट्स 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

गतविजेता केकेआर सहाव्या स्थानी

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या स्थानी आहे. केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मुंबईनेही 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. पलटण सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र केकेआरचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षा चांगला आहे.

राजस्थान रॉयल्स आठव्या स्थानी आहे. राजस्थानने 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सची स्थिती राजस्थान रॉयल्सप्रमाणेच आहे. या तिन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे येऊ शकतात एकत्र, ‘ही’ आहेत पाच कारणं! जाणून घ्या सविस्तर

0

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अलिकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुंबई तसेच इतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता आमच्यातली भांडणं खूप छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या भूमिकेचे ठाकरे गटानेही स्वागत केले आहे. आम्ही राज ठाकरेंच्या विधानाकडे सकारात्मकपणे पाहतोय, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात खरंच युती होऊ शकते का? असा प्रश्न विचारला जात आहे. या दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यासाठीची पाच कारणं कोणती आहेत? ते जाणून घेऊ या…

1) राजकीय वर्चस्व आणि सत्तेची आस
राजकारण्यांना सत्ता नेहमीच प्रिय असते. सत्तेत येण्यासाठी ते नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत तर सत्ताकारणासाठी महाराष्ट्रात सर्वांनाच चकीत करून टाकणारे प्रयोग झाले आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे काँग्रेस-शिवसेना हे महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत. तर दुसरीकडे कधीकाळी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपावर टीका करणारे राज ठाकरे यांनी पुन्हा महायुतीला पाठिंबा देताना आपण पाहिलंय. सत्तेत येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षाची दोन शकलं केली. अजित पवार यांनीदेखील राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्यामुळे राजकारणात सत्तेचं गणित साधण्यासाठी कोणताही प्रयोग कधीही केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अनाकलनीय घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी ते आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एकत्र येऊ शकतात, तशी शक्यता नाकारण्याचे काही कारण नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटानेदेखील राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागतच केले आहे. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघतो, असं ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात सत्तेपर्यंत पोहोचण्याचा एकमेव उद्देश समोर ठेवून मनसे आणि ठाकरे गट अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2) बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे घराणं
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा नेहमीच आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढेच चाललो आहोत, असे सांगत आलेला आहे. दुसरीकडे राज ठाकरे हेदेखील बाळासाहेब ठाकरे यांना पूज्यनीय मानतात. राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बराच काळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांनीदेखील बाळासाहेबांच्या विचारधारेवरच त्यांचा मनसे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरी त्यांच्या नावाचा दबदबा आजही तेवढाच आहे. त्यांच्यामुळे ठाकरे या आडनाला मिळालेलं वाजन अजूनही कमी झालेलं नाही. हेच ठाकरे आडनाव राज आणि उद्धव यांच्यातील एक समान धागा आहे. ते दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे एकाच घराण्यातून येत असल्याने आणि दोन्ही पक्ष बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असल्याने ते भविष्यात एकत्र येण्यास काहीही हरकत नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

3) मराठी अस्मिता
शिवसेना हा पक्ष मुळात मराठी अस्मिता समोर ठेवूनच मुंबई, उपनगर आणि नंतर महाराष्ट्रभर वाढलेला आहे. मुंबईत परप्रांतीयांचे वाढणारे प्रमाण आणि त्यातून मराठी माणसांची होणारी कुचंबना रोखण्यासाठी शिवसेनेने सुरुवातीच्या काळात मोठे काम केलेले आहे. आजही मुंबईचं मराठीपण टिकून राहावं यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील असते. दुसरीकडे राज ठाकरे यांनी जेव्हापासून मनसे हा पक्ष स्थापन केलेला आहे. तेव्हापासून त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलवून धरलेला आहे. मनसेचे आतापर्यंत मराठी माणसांना न्याय मिळावा म्हणून मुंबई, उपनगर तसेच महाराष्ट्रभर आंदोलन केलेले आहे. दुकानांवरील मराठी पाट्या, बँकेचे मराठी भाषेतील व्यवहार अशा मागण्या मनसेने मोट्या नेटाने लावून धरलेल्या आहेत. म्हणजेच मराठी अस्मिता हा मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचा समान धागा आहे. आता लवकरच मुंबई पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे हाच मराठी अस्मितेचा मुद्दा लक्षात घेऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4) हिंदुत्त्वाचा मुद्दा
मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्त्वाचा मुद्दादेखील मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील समान धागा आहे. शिवसेना पक्षाने सुरुवातीला मराठी माणसांना न्याय मिळावा हा उद्देश समोर ठेवून मुंबई, ठाणे तसेच उपनगरांत काम केले. मराठीचा मुद्दा समोर ठेवून या पक्षाने तेव्हा मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलून शिवसेना पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार केला. बाळासाहेबांचा हाच विचार आता उद्धव ठाकरे पुढे घेऊन जाताना दिसतायत. आम्ही अजूनही हिंदुत्त्व सोडलेलं नाही, असे उद्धव ठाकरे ठणकावून सांगताना दिसतात. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीदेखील सुरुवातीला मराठीचा मुद्दा घेऊन नंतर हिंदुत्त्वाला जवळ केलेलं आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्त्वाच्या विचारधारेला मान्य करणारे आहेत. त्यामुळेच या हिंदुत्त्वाच्या समान धाग्याला लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5) नव्या समीकरणाची आस
राज्यात सुरुवातीला युती आणि आघाडीचं राजकारण होतं. शिवसेना आणि भाजपा यांच्याविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे निवडणूक लढवायचे. त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडी हे नवे समीकरण उदयास आले. राज्यात महायुतीने विकासकामं केली नाहीत, असा आरोप सातत्याने होते. तसेच महाविकास आघाडीनेही सत्तेत येऊन फारसा विकास केला नाही, राजकीय विरोधक म्हणतात. असे असताना आता मनसे आणि ठाकरे यांची युती भविष्यात सकारात्मक चित्र निर्माण करू शकेल. मनसे आणि ठाकरे एकत्र आलेच तर महापालिका आणि आगामी काळात होणाऱ्याा निवडणुकांत काहीतरी नवा निकाल येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते. म्हणजेच नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने लोकांमध्ये नवी आस निर्माण होऊ शकते. मतदार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी मोठ्या निवडणुकांतही या युतीला मतदान देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होणार का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. मात्र दोन्ही बाजूंनी दाखवण्यात आलेल्या सकारात्मकतेमुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी नवं पाहण्याची आस लागलेल्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवातून सांगतोय, मागच्या पाच वर्षात रुटीन बदललं अन्… अमित शाहांनी सांगितला फिटनेस मंत्रा

0

जर देशातील तरुणांना निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर त्यांना त्यांची दिनचर्या बदलावी लागेल. मी हे माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगत आहे. नवी दिल्लीत जागतिक यकृत दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शाह यांनी हे सांगितले. अमित शाह म्हणाले की, देशातील तरुणांना अजूनही 40-50 वर्षे जगायचे आहे आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यायचे आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शरीरासाठी दोन तास व्यायाम आणि मनासाठी सहा तास झोप राखून ठेवावी.

मला आज कोणत्याही प्रकारच्या औषधाची गरज नाही

अमित शाह म्हणाले, मे 2020 पासून आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला आहे. आवश्यक प्रमाणात झोप, पाणी आणि आहार आणि नियमित व्यायामाने मला खूप काही दिले आहे. आज मी तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलोपॅथिक औषधांपासून आणि इन्सुलिनपासून मुक्त आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा अनुभव शेअर करण्यासाठी मी आज इथे आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाल्या, आपली आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत असली पाहिजे

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या म्हणाल्या की, आज, यकृत दिनानिमित्त, आपण देशातील कोणालाही आरोग्य सेवेसाठी संघर्ष करावा लागू नये अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. आपली राजधानी दिल्ली केवळ येथे राहणाऱ्या लोकांच्या उपचारांसाठी नाही. देशभरातून आणि जगभरातून लोक येथे येतात. आपल्या आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणे ही आपली जबाबदारी बनते.

नायब राज्यपाल म्हणाले, दिल्लीच्या नवीन सरकारची धोरणे चांगली आहेत

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना म्हणाले, “मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या नवीन सरकारने त्यांच्या धोरणांमध्ये आणि अजेंड्यात आरोग्यसेवेला प्राधान्य दिले आहे. मागील सरकारच्या धोरणांमुळे दिल्ली मागे पडली होती. सक्सेना पुढे म्हणाले, आयएलबीएस ही एकमेव संस्था आहे ज्याने देशात आणि परदेशात आपला ठसा उमटवला आहे. आयएलबीएसला गेल्या दशकाहून अधिक काळ यकृत रोगांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सहयोग केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे.