मुंबई दि. २७ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून, धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमेनिमित्त बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी या मालिकेचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जेरबाई वाडिया रोड, नायगाव (परळ), मुंबई येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार असून पुढे ही प्रवचनमालिका नियमितपणे पार पडणार आहे.
सदर प्रवचन मालिकेचे अध्यक्षस्थान बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज य. आंबेडकर हे भूषविणार असून, कार्याध्यक्ष लक्ष्मण रा. भगत यांच्या शुभहस्ते प्रवचन मालिकेचेवउद्घाटन होणार आहे. उपसभापती विनोद स. मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, खजिनदार नागसेन सु. गमरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वर्षावास प्रवचन मालिकेतील पहिले पुष्प बुधवार दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आदरणीय प्रा. संदेश वाघ यांच्या हस्ते गुंफले जाणार असून ते “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानातील योगदान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने दि. १० ऑक्टोबर ते दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रामणेर शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी समितीच्या अध्यक्ष अथवा चिटणीस यांच्याशी +९१ ९८६९३७२९३४ / +९१ ९९३०८७०९०१ / +९१ ९३२२७०१३७१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
सदर प्रवचन मालिकेत बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, उपासक-उपासिका, संस्थेचे पदाधिकारी तसेच बौद्ध धम्मप्रेमी बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वर्षावासाच्या निमित्ताने धम्मश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात चिटणीस मनोहर बापू मोरे यांनी केले आहे.











