खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चारही धरणांत एक हजार ४३१ एमसीएफटी (सुमारे १.४३ टीएमसी) पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा १४.९५ टीएमसीवर (५१.३० टक्के) पोहोचला.पाण्याच्या वाढत्या आवक वाढल्यामुळे खडकवासला धरणातून पहाटे टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला. गुरुवारी (ता. ८) पहाटे २७ हजार २०३ क्यूसेकपर्यंत नेण्यात आला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.
खडकवासला धरणसाखळीतील पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभर चांगला पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत येथे ५० मिलिमीटर, वरसगाव येथे ४७ मिलिमीटर, टेमघर येथे ६६ मिलिमीटर, तर खडकवासला येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी चारही धरणांत मिळून सुमारे १.४३ टीएमसी पाण्याची आवक झाली.धरणांत वाढणारी आवक लक्षात घेऊन खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मंगळवारी मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. रात्री १२ वाजता ८४२ क्युसेक असलेला विसर्ग रात्री १ वाजता एक हजार ६८४ क्युसेक, रात्री १.३० वाजता तीन हजार ४२४ क्युसेक, रात्री २.३० वाजता सहा हजार ६३४ क्युसेक, पहाटे ३.१५ वाजता १४ हजार ३९३ क्युसेक, पहाटे ३.४५ वाजता २२ हजार ८८० क्युसेक आणि सकाळी ५.३० वाजता २७ हजार २०३ क्युसेक इतका करण्यात आला.
त्यानंतर दुपारी बारानंतर धरणातील पाणीपातळी लक्षात घेऊन तो १८ हजार २७१ क्युसेकपर्यंत कमी केला, तर रात्री ८ वाजता १५ हजार १५७ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला.पाऊस कमी झाल्यामुळे रात्री दहा वाजता हा विसर्ग सहा हजार २९६ वर आणण्यात आला आणि रात्री साडे दहा वाजता पूर्णपणे बंद केला. विसर्गातून ०.२६ टीएमसी पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले.नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुठा नदीपात्रातील विसर्गात परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात किंवा नदीकाठावर जनावरे, वाहने असल्यास त्या तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले.











