“आता तर लोकांची खात्री पटली आहे की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!”; शिंदे गटाचे टीकास्त्र

0
52

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष शमताना दिसत नाही.दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता तर लोकांची खात्री पटली आहे की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली, असा दावा शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर आणि स्पष्ट भाष्य केले.

आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असा दावा दीपक केसरकर यांनी दिला.

अधिक वाचा  गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा अन् यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा; वाहतूक कोंडीपासून सुटका

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत सन २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावे. कारण त्यांनीच बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. लोकांना संघर्ष करायला लावायचे, त्यांचे अहित करायचे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. जनतेने समजून घेतले पाहिजे की हा विरोध राजकीय आहे, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; ना-हरकत प्रमाणपत्रासह या अधिकारातही केली मोठी कपात

दरम्यान, महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचे योगदान जनतेला देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल? हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी टीकाही दीपक केसरकर यांनी केली.