यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात येत्या आठवड्यात पावसाची शक्यता विविध हवामान शास्त्रीय मॉडेलमधून वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असून, यंदा त्या तुलनेत दोन दिवस उशिराने मॉन्सून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानवर सध्या अँटी सायक्लोनची (जास्त दाबाची) स्थिती असून, या भागात सलग पाच दिवस कोरडे हवामान नोंदले गेले आहे.
उपग्रहीय चित्रामधून या भागावरील वातावरणात बाष्पाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. ही स्थिती मॉन्सून या भागातून बाहेर पडल्याचे दर्शवते. परतीच्या मॉन्सूनची दक्षिणसीमा सध्या रामगड, मोहनगड, फलोदी, खाजुवाला येथून जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या आणखी काही भागांसह सौराष्ट्र, कच्छ आणि पंजाबच्या काही भागांतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे शनिवारी रात्री उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. वायव्येकडे सरकताना येत्या २१ सप्टेंबरपर्यंत हे क्षेत्र तीव्र (डिप्रेशन) होणार असून, २२ सप्टेंबरला त्याचे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते. २३ सप्टेंबरला दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ सरकताना यावर्षीचे पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
राज्यात अनुकूल स्थिती
‘आयएमडी’च्या जीएफएस मॉडेलमधून वर्तविण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ ओडिशा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडून मध्य प्रदेशकडे सरकू शकते. तसे झाल्यास २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.









