जरांगे पाटलांची गलिच्छ भाषा आणि सरकारची लाचार मांडीबहाद्दुरी; ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोलेपाटील व मंगेश ससाणे यांचा जोरदार हल्लाबोल!

0
5

मराठा आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे हे सातत्याने सर्व राजकीय मर्यादा ओलांडून गलिच्छ व आई-माईवरून शिवीगाळ करत आहेत आणि राज्य सरकार मात्र त्यांच्यासमोर लाचार झाले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोलेपाटील आणि मंगेश ससाणे यांनी आज जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात राज्य सरकार, महायुतीचे नेते आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा कडक शब्दांत समाचार घेण्यात आला आहे.

प्रसिद्धी पत्रकातील प्रमुख मुद्दे व आक्रमक मागण्या:

लाचार नेत्यांचे आणि जरांगेंच्या शिवीगाळीचे काय? जरांगे जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “तुमच्या आईच्या नवऱ्याच्या पण एवढ्या नोंदी नाहीत” अशी खालच्या पातळीवरील भाषा वापरतात, तेव्हा त्यांना मांडीवर बसवून लाड पुरवणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे यावर काय म्हणणे आहे? १३ तासांच्या उपोषणात जरांगे उठताना-बसताना एका मांडीवर प्रसाद लाड आणि दुसऱ्या मांडीवर विखे पाटील यांना घेऊन बसले होते. आता जरांगे अत्यंत घाण भाषेत आई-माईवरून शिव्या देत आहेत, तर आता या नेत्यांना कसं वाटतंय? सरकारची अवस्था ‘दुखणे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी झाली आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

२५ आमदार पाडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान: जरांगे म्हणतात की चंद्रशेखर बावनकुळेंमुळे तुमचे २५ आमदार पाडणार. आमचे जरांगे यांना थेट आव्हान आहे की, त्यांनी एवढ्या मोठ्या बाता मारण्यापेक्षा आधी एका ग्रामपंचायतीचा सरपंच तरी बनून दाखवावा.

फडणवीस, बावनकुळे निष्क्रिय; ओबीसींची केवळ उपेक्षा: ओबीसींच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे पूर्णपणे निष्क्रिय भूमिका घेत आहेत. आरक्षणासाठी ओबीसी समाजातील १६ तरुणांनी आत्महत्या केल्या, पण त्यांना न १० लाख रुपये मिळाले, न कोणती सरकारी नोकरी मिळाली. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण शेवटच्या घटका मोजत आहे आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला याचे काहीही देणेघेणे नाही. बोगस कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होत असताना या समितीची साधी बैठक होत नाही.

सर्व लाड जरांगेचे पुरवायचे आणि वरून जरांगेच्या आई-माईवरून शिव्या खाऊन घ्यायच्या—वाह देवेंद्रजी!

अधिक वाचा  शिवसेना चिन्ह ‘सुप्रीम’ सुनावणी सुरू असताना पक्षांतर बंदी कायद्यात बदल? अध्यक्ष नार्वेकरांचे वक्तव्य शिंदेसेनेचं भवितव्य धोक्यात?

अडीचशे जाती बाहेर काढण्याचे थेट ‘ओपन चॅलेंज’: हा माणूस (जरांगे) म्हणतो मी अडीचशे जाती बाहेर काढेन! जर जरांगे यांच्यात हिंमत असेल तर २५० किंवा २५ सोड, एका वर्षात केवळ एक जात बाहेर काढून दाखवावी—आम्ही आयुष्यभर तुमचे कार्यकर्ते बनून राहू. आणि जर हे जरांगेंना जमले नाही, तर त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये आपल्या मिशा काढून फिरावे. हे चॅलेंज जरांगे स्वीकारणार का?

अर्धन्यायी संस्था आणि कायदेशीर यंत्रणेवर दबाव: ज्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला अर्धन्यायी (Quasi-Judicial) दर्जा आणि नागरी न्यायालयाचे (Civil Court) अधिकार आहेत, त्या समितीतील अधिकाऱ्यांना जरांगे धमकावत आहेत. सुनावणी आणि युक्तिवादानंतर ज्यांचे खोटे पुरावे सिद्ध झाले अन् प्रमाणपत्रे अवैध ठरली, त्यांनाही वैधानिक ठरवण्यासाठी हे प्रशासनावर दबाव आणत आहेत.

‘तंगड्या वर करून पडणाऱ्यांचे’ बेगडी धैर्य: जरांगे सतत “मी मरायला भित नाही” अशा डरकाळ्या फोडतात. परंतु, दोन तास उन्हात बसले की सात-सात दिवस गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तंगड्या वर करून उताणे पडतात, असा घणाघाती टोलाही पत्रकात लगावण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मुजोर व जातीवादी नेता: महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासामध्ये मनोज जरांगे यांच्यासारखा अत्यंत जातीवादी, मुजोर आणि शिवराळ नेता कधीही झाला नाही. “एकनाथ शिंदे मराठा आहेत म्हणून साथ दिली, अजित पवार मराठा आहेत म्हणून साथ दिली” असे उघडपणे म्हणणारे जरांगे आता शिंदेंना विचारतात की “तुमच्या ऑफिसमध्ये ओबीसींचे काय काम?” जरांगेंना जर एवढाच मराठावाद करायचा असेल तर त्यांनी मराठवाड्याचा वेगळा देश किंवा राज्य घोषित करून स्वतःला तिथला राजा किंवा मुख्यमंत्री घोषित करावे, म्हणजे तरी महाराष्ट्राला कायमची शांती लाभेल.

“ओबीसींवर होत असलेला हा बेकायदेशीर अन्याय आणि प्रशासनावरील जरांगेंची गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने तात्काळ या शिवराळ भाषेची व बेकायदेशीर दबावाची दखल घेतली नाही, तर ओबीसी समाज याला चोख प्रत्युत्तर देईल,” असा इशारा मृणाल ढोलेपाटील आणि मंगेश ससाणे यांनी दिला आहे.