महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवार, 14 जुलैची रात्र चांगलीच चर्चेत राहिली आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची बैठक झाली. मात्र या भेटीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. दोन्ही विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना या बैठकीत खलबतं झाल्याची चर्चा रंगली. असं असतानाच आता या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी रात्री राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार हे फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहितीही पुढे आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारपासून ते गुरुवारपर्यंत तरी ‘रात्रीस खेळ चाले’ असं म्हणण्यासारख्या राजकीय हलचाली सुरु आहेत. या साऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आतापर्यंत 4 पक्ष, 3 बैठका 3 बंगले अन् महत्त्वाचे नेते राहिले आहेत.
मंगळवापसून आजपर्यंत नेमकं काय काय घडलंय पाहूयात…
सुनेत्रा पवारांना न सांगता ‘वर्षा’वर भेट
मंगळवारी झालेल्या भेटीदरम्यान, सोमवारपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार आहे त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, असं फडणवीसांनी या बैठकीत तटकरे आणि पटेल यांना सांगितलं. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे तटकरे आणि पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली याबाबतची कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना नव्हती, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्ष या दोन्ही नेत्यांवर नाराज झाल्याची माहिती समोर आल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये किती विसंवाद आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. मात्र या घडामोडींदरम्यान अचानक बुधवारी सुनेत्रा पवारांनी या दोन्ही नेत्यांना भेटीसाठी बोलावून घेतलं.
‘देवगिरी’वर बोलवून तटकरेंना विचारला जाब
बुधवारी दुपारी सुनेत्रा पवार यांनी तटकरे यांना ‘देवगिरी’वर बंगल्यावर बोलावून घेतले. राष्ट्रवादीची तातडीची बैठक पार पाडली. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित होते. ‘वर्षा’ बंगल्यावरील या बैठकीची माहिती पक्षाला का देण्यात आली नाही असा प्रश्न सुनेत्रा पवार यांनी विचारल्याचे समजते. यावर तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना, डिलिमिटेशन बिलाला पवार गट पाठिंबा देणार हे सांगण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आले होते, असं सांगितलं. मग याबाबतची माहिती का दिली नाही? असा प्रतिप्रश्न तटकरेंना करण्यात आला.
फडणवीसांनी पार्थ पवारांना दिला शब्द
‘देवगिरी’वरील ही बैठक झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने पार्थ पवार यांना निश्चिंत राहण्याचं आश्वासन दिले. यापुढे मुख्यमंत्र्यासोबत कोणतीही बैठक असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कळवलं जाईल आणि त्यांना प्रत्येक बाबीत लूपमध्ये ठेवलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.
शिंदेंना भेटले जयंत पाटील
राष्ट्रवादी विलीनीकरण आणि डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार ही चर्चा जोर धरू लागलेली असताना भेटीची सत्र कायम असल्याचं दिसत आहे. काल रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी ‘नंदनवन’वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी, “माझ्या वैयक्तिक कामासाठी भेट घेतली,” असं पाटील म्हणाले आहेत. “नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं,” असं जयंत पाटील म्हणाले.











