पुणे शहरात आजपासून (ता. १५) पाणीकपात होणार अशी घोषणा आयुक्त नवल किशोर राम यांनी केली होती. मात्र, त्यानंतर २४ तासांच्या आत महापौर मंजूषा नागपुरे यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. आयुक्त राम यांच्या निर्णयामुळे प्रशासनातील अधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक आयोजित केली. त्यास स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप उपस्थित होते. धरणात जवळपास ५८ टक्के पाणीसाठा आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यांत पाऊस पडणार आहे. तसेच सध्या खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडले जात आहे. असे असताना पुणेकरांवर पाणीकपात लादणे योग्य नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली. महापौर नागपुरे यांनी आयुक्त राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी बुधवारपासून होणारी पाणीकपात रद्द केली. खडकवासला धरणाच्या कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे. अशा वेळी पुणेकरांवर पाणीकपात करणे योग्य नाही, असे सांगून बुधवारपासून होणारी पाणीकपात रद्द केली आहे. या निर्णय प्रक्रियेत प्रशासन व सत्ताधारी यांच्यातील गोंधळ समोर आला असला तरी या निर्णयाने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, २२ जुलैनंतर पावसाचा व धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पावसाने ओढ दिल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पाने तळ गाठल्याने महापालिकेने १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पण शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्याने पाणीकपात १२ जुलैपर्यंत मागे घेतली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात धरणाच्या पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा १२ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. पण पुढील काळात पाऊस किती पडेल, धरणात किती पाणी जमा होईल याचा अंदाज घेणे आवश्यक आहे. अजूनही धरणे १०० टक्के भरलेली नाहीत. त्यामुळे बुधवारपासून (ता. १५) पाणीकपात सुरू केली जाईल, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले होते.
”पुण्यात सध्या पाणीकपातीची गरज नाही. नागरिकांना रोज नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुढील आठवड्यात हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार पावसाचा अंदाज व खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा किती असेल यावर पुढील निर्णय घेण्यासाठी २२ जुलैनंतर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली जाईल.”
– मंजूषा नागपुरे, महापौर











