अजितदादांसमोरच गावकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?

0
47

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आजच देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे.

अजित पवार जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोगमध्ये पोहोचले तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रम झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा केला आहे, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.

अधिक वाचा  ‘एसआयआर’साठी दोन लाख मतदारांना आजपासून नोटिसा; या कागदपत्रांची पडताळणी २ महिन्यांत २ लाख सुनावण्या आव्हान

यावेळी बोलताना एका ग्रामस्थानं म्हटलं की, ‘माझं म्हणण असं आहे की आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहखातं आहे. चांगलं म्हणून त्यांचं नाव आहे, देशभरात महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा दबदबा आहे. मात्र तेरा दिवस झाले तरी यांना तीन आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काय? असा सवाल या ग्रामस्थाने उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तुम्हाला शब्द देतो या प्रकरणातील मास्टर मांइड सुटणार नाही.

दरम्यान अजित पवार यांच्या आधीच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की या घटनेच्या खोलात गेलं पाहिजे, या घटनेचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  गणितज्ञ प्रा. भापकर यांना काश्मीरमध्ये ‘उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ’ पुरस्कार