Home Blog Page 76

ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करणाऱ्या अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0

ऑपरेशन सिंदूरविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी करणारे अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवार, २० मे रोजी सुनावणी करणार आहे. प्राध्यापकांना त्यांच्या फेसबुक पोस्टसाठी ताब्यात घेण्यात आले होते, ज्याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणी केलेली संयुक्त लष्करी कारवाई होती.

रविवारी अटक करण्यात आलेल्या महमूदाबादने आपल्या अटकेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवले आणि या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.

रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टवरून हरियाणामधील भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा मोर्चाचे सरचिटणीस योगेश जठेरी यांनी महमूदाबादविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जठेरी हे सोनीपतमधील एका गावाचे सरपंच आहेत. वृत्तानुसार, ४२ वर्षीय प्राध्यापकाला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) धार्मिक श्रद्धा आणि इच्छाशक्तीचा अपमान करण्याशी संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे.

त्याच्यावरील आरोपांपैकी एक म्हणजे बीएनएसचे कलम १५२, जे भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांना गुन्हेगार ठरवते. रविवारी संध्याकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे महमूदाबादचे वकील कपिल बालियान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, अशोका विद्यापीठाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

“आम्हाला कळवण्यात आले आहे की प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना आज सकाळी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. विद्यापीठ तपासात पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत राहील,” असे विद्यापीठाच्या निवेदनाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे.

अली खान महमूदाबाद अशोका विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवतात. तो मोहम्मद आमिर मोहम्मद खान यांचा मुलगा आहे, ज्यांना राजा साहेब महमूदाबाद म्हणून ओळखले जाते, ज्यांनी शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत सरकारने जप्त केलेली त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता परत मिळवण्यासाठी जवळजवळ चाळीस वर्षे कायदेशीर लढाई लढली.

महमूदाबादचे वडील हे महमूदाबादचे शेवटचे सत्ताधारी राजा आणि भारताच्या फाळणीपूर्वी मुस्लिम लीगचे दीर्घकाळ कोषाध्यक्ष आणि प्रमुख वित्तपुरवठादार मोहम्मद आमिर अहमद खान यांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांची आई राणी विजया ही पद्मभूषण जगत सिंग मेहता यांची मुलगी आहे, ज्यांनी १९७६-७९ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केले.

‘स्थानिक’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा मैदानात; एकीकरण अनौपचारिक चर्चा? दिशा निवडणूक रणनितीसाठी ३ दिवस बैठका

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. काही राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बदल होताना पाहायला मिळत आहेत. तर काही बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आखत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील आता मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षाच्या मॅरेथॉन बैठका होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येत्या २६, २७ आणि २८ मे रोजी सलग तीन दिवस महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठका मुंबईत होणार आहेत. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सल्लामसलतीसाठी या बैठका घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकांचा मूळ उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रीत असणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आणि इतर प्रमुख शहरांतील महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका आणि उमेदवारी ठरवण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

सध्या पक्षामध्ये दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन लढाव्यात असं काही नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर बरोबर जाणं योग्य नसल्याचं काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन्ही बाजू शरद पवार ऐकून घेणार असल्याचं बोललं जात आहे.

एकीकरणावर चर्चा होणार

२८ मे रोजी होणाऱ्या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या चर्चेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेषतः दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येऊ शकतात का, यावरही या बैठकीत अनौपचारिकरीत्या चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे २८ तारखेला होणारी बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि निवडणूक रणनिती यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

राज्यात पूर्वमोसमी ‘या’ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पावसाचा धडाका पुण्यातही पावसाचा इशारा; राज्यात कुठे, कसं असेल हवामान?

0

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा धडाका सोमवारीही सुरुच राहिला. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (ता. २०) तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावरही मंगळवारी मुसळधार सरी कोसळू शकतात. यासह राज्याच्या उर्वरित भागांतही यलो ऍलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सकाळी उन्हाचा चटका व दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पावसामुळे उकाडा व तापमानात चढ-उतार सुरु आहेत. सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळराव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, बीड, जालना, बुलडाणा व वाशीममध्ये सोमवारी पावसाची नोंद झाली.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान पुन्हा एकदा ब्रह्मपुरी येथे नोंदवण्यात आले. ब्रह्मपुरी येथे ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. याशिवाय चंद्रपूर, नागपूर, जळगाव येथे तापमान ४० अंशांहून अधिक होते. मात्र विदर्भाचा अपवाद वगळता उर्वरित राज्यातील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.

मंगळवारचा अंदाज काय?

मंगळवारी तळकोकण, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव व लातूर येथे हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

नाशिकमध्ये पावसाचा कहर

पूर्वमोसमी पावसामुळे गेल्या १४ दिवसांत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे भाजीपाला पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

‎सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

‎पुणे (३४.८-२४), अहिल्यानगर (३२.८-२२.४), ‎‎धुळे (३९-१९.५), जळगाव (४०.२-२५.७), ‎जेऊर (३४.५-२२.५), ‎कोल्हापूर (३३.१-२१.८), ‎महाबळेश्वर (२६.३-१८.५), ‎मालेगाव (३५.४-२२.२), ‎नाशिक (३३.२-२४.७), ‎निफाड (३४.६-२३.८), ‎सांगली (३३.३-२१.८), ‎सातारा (३३.३-२१.८), ‎सोलापूर (३६.८-२४.४), डहाणू (३६-२७.७), ‎रत्नागिरी (३४.३-२४.६), ‎छत्रपती संभाजीनगर (३३-२४), ‎धाराशिव (३६.२-२०), ‎परभणी (३७.१-२४.५), ‎अकोला (३९.८-२६.६), अमरावती (३८.४-२६.७), ‎‎‎बुलढाणा (३५.४-२५), ‎ब्रह्मपुरी (४१.२-२७.९), ‎चंद्रपूर (४१-२६.६), ‎गडचिरोली (३९.२-२५), ‎गोंदिया (३७.६-२५.८), ‎नागपूर (४०.८-२८.३), ‎वर्धा (३९.५-२८.२), ‎यवतमाळ (३९-२५.४).

सोलापुर टॉवेल कारखान्यात अग्नितांडव! 8 जणांचा मृत्यू 12 तासांनी सापडले 5 जणांचे मृतदेह; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

0

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रिज या टॉवेल कारखान्याला रविवारी (ता. १९) पहाटे चारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. पहाटेच्या गाढ झोपेतील आठ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यात आगीमुळे बाहेर पडता न आल्याने पाच जण बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन बसले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. १२ तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले. आग आटोक्यात यायला १३ तास लागले, त्यासाठी अग्निशामकच्या ८२ गाड्या पाणी फवारावे लागले.

रविवारी पहाटे पावणेचार ते चारच्या सुमारास सेंट्रल टॉवेल कारखान्याला आग लागली होती. चारच्या सुमारास १०१ वरून कॉल आला आणि काहीवेळात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुरवातीलाच अग्निशामकच्या जवानांनी खिडकी फोडून पाणी फवारायला सुरवात केली. यावेळी तीन कामगारांचे मृतदेह एका खोलीत सापडले. दुसरीकडे धूर, अंधारामुळे कारखाना मालकाच्या कुटुंबातील लोकांना बाहेर पडता आले नाही. त्यांच्या खोलीत मात्र आग पोचली होती. त्यामुळे सुरवातीला गुदमरून मृत्यू पावलेले पाच जण होरपळलेल्या स्थितीत आढळले. शेवटी सापडलेल्या पाच जणांचे मृतदेह तीन रुग्णवाहिकांमधून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले, त्यावेळी रुग्णालयात नातेवाइकांची मोठी गर्दी होती.

कारखान्याच्या आगीत ‘या’ आठ जणांचा मृत्यू

टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी (वय ७८) यांच्यासह नातू अनस मन्सुरी (वय २४), सून शिफा मन्सुरी (वय २३), पणतू युसूफ अनस मन्सुरी (१ वर्ष) यांचा समावेश आहे. याशिवाय कारखान्यातच राहायला असलेले कामगार मेहताब बागवान (वय ५१), आयेशा बागवान (वय ४५), हीना बागवान (वय ३५) व सलमान बागवान (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.

अग्निशामकचे २ जवान भाजले; गुदमरल्याने एकजण रुग्णालयात

टॉवेल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या हाताला भाजले आहे. फायरमन पंकज चौधरी यांनाही दोन-तीन ठिकाणी आगीने जखमा झाल्या आहेत. फायरमन समीर पाटील यांना आग आटोक्यात आणताना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

१२ तासांनी आग पुन्हा भडकली, अन्‌…

पहाटे चार ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. सगळे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला नेल्यावर पाऊण तासांनी पुन्हा आग भडकली आणि आगीच्या ज्वाळा सगळीकडे दिसू लागल्या. कारखान्याची रचना खूपच गुंतागुंतीची होती. त्यामुळे अग्निशामकचे बंब दोन्ही बाजूंनी घुसून पाणी मारत होते. कारखान्याच्या समोरील दोन बाजू मशिनरीने पाडून आग विझविण्याचे काम करावे लागले. कारखान्याच्या भिंतीला लागूनच पाच-सात फुटावर विजेचा ट्रान्स्फॉर्मर होता.

बाहेर पडण्यासाठी धडपडणारे तिघे गुदमरले

टॉवेल कारखान्याला आग लागल्यानंतर त्याच ठिकाणी राहणाऱ्या बागवान कुटुंबातील तिघेजण खोलीतून बाहेर आले. खिडकीजवळ येत असताना धुरामुळे ते गुदमरले. तिघेही त्याच ठिकाणी खोलीत बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. आग त्यांच्या खोलीपर्यंत पोचली नव्हती, पण धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृतांच्या कुटुंबास केंद्र-राज्याकडून मदत

महाराष्ट्रातील सोलापुरातील आगीच्या दुर्घटनेत जीवितहानीबद्दल दुखः झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल संवेदना, जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र कोठे यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आईच्या कुशीत होता एक वर्षाचा युसूफ

आगीच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या उस्मान मन्सुरी यांच्या नातवाची सून शिफा यांचा युसूफ अवघ्या एक वर्षाचा होता. आग लागल्याने आता बाहेर पडू किंवा नाही, याची त्यांना खात्री नव्हती. आग आटोक्यात येईल आणि सगळेजण वाचावे म्हणून ते प्रार्थना करीत होते. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कारखान्यात आग पसरली. घरातून बाहेर येण्याच्या मार्गावर टॉवेल व कच्चा माल होता. त्यालाच आग लागल्याने कोणालाच बाहेर पडणे शक्य नव्हते. शिफाने एक वर्षाचा युसूफ कुशीत घेतला, पण आग त्यांच्या बेडरूममध्ये व बाथरूमपर्यंत पोचली आणि पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.

दोन कामगार, दोन वॉचमन वाचले

टॉवेल कारखान्यात काम करणारे दोन कामगार आग लागताच तेथून बाहेर पडले. तर दोन वॉचमन देखील आग लागल्यावर तेथून बाहेर पडले. काही क्षणात आग भडकल्याने बागवान कुटुंबातील सदस्यांना देखील मन्सुरी यांना बाहेर काढता आले नाही आणि स्वत:लाही बाहेर येता आले नाही. या आगीत कारखान्यातील संपूर्ण कच्चा व पक्का माल जळून खाक झाला आहे. कारखान्यातील घरावर केलेले टेनिस कोर्ट देखील जळाले आहे.

पुन्हा हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड पसरणारा कोरोना विषाणू घातक? नवीन व्हेरियंटचं नाव सांगत केलं डॉक्टरांनी ‘असं’ केले आवाहन

0

कोव्हिड विषाणूमुळे हजारो लोकांचे जीव गेले. अशा कोव्हिड विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढले असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात देखील कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पण सध्या या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहे त्याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. झिरपे यांनी याबाबत माहिती देत हा नवीन विषाणू धोकादायक नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जेवढी चर्चा त्या देशांमध्ये कोव्हिड बाबत नाही तेवढी आपल्या देशात होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

सध्या हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढत असून भारतात देखील चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. झिरपे म्हणाले की, या तीन देशांमध्ये कोव्हिडचे रुग्ण हे वाढत आहे. कोव्हिड विषाणूचे नवनवीन व्हायरस हे येत राहतील पण घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सध्या जो नवीन विषाणू आहे तो अत्यंत विक आहे. जसं आपल्याला सर्दी, खोकला होतं तसं हे विषाणू असून प्रत्येक वेळेस आपण भीती बाळगत नाही तर याबाबत काळजी घेत असतो. तशीच परिस्थिती या कोव्हिड विषाणूच्या बाबत आहे.

या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहे. त्याच कारण आहे की ते कोव्हिडची चाचणी करत आहे. म्हणून तिथे रुग्ण हे वाढत आहे. आपल्या इथे देखील हजारो रुग्ण असू शकतात पण आपण जर चाचणी केली तर ते रुग्ण आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक चाचणी केलेला रुग्ण हा गंभीर नसतो तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला रुग्णालयाची गरज भासते असं नाही. हा नवीन विषाणू ओमायक्रॉनच नवीन व्हायरस असण्याची शक्यता आहे. पण याला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं यावेळी डॉ. झिरपे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, नव्या विषाणूच्या बाबतची चर्चा ही फक्त भारतात असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये याबाबत कोणतीही चर्चा नाही. कोव्हिड हा एक व्हायरस असून असे अनेक व्हायरस असून आपल्याला याबाबत काळजी आयुष्यभर घ्यायची आहे. जर कोणालाही सर्दी, खोकला झाल्यास त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी ही घेतली पाहिजे. तसेच अशा वेळी गर्दीत जाणे टाळणे आणि मास्कचा वापर करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही त्रास झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे खूपच गरजेचं आहे. सध्या हे काही कोव्हिड बाबत भीती व्यक्त केली जात आहे. अफवा पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील यावेळी डॉ. झिरपे यांनी केलं आहे.

पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे

0

जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीच देत फिरायचं का? असा सवाल करीत ही गुंडगिरी निर्माण झालेलं विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही. त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी जरांगे पाटील यांनी शिवराज याची भेट घेतली. शिवराजच्या अंगावरील बेदम मारहाण केलेले व्रण पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जिवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले. मात्र, लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला.

पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

शिवराज दिवटे हल्ला प्रकरणात पाच जणांना संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी अटक करून परळी न्यायालयात हजर केले. त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा अल्पवयीन मुलांना बीडच्या बाल न्यायालयात हजर करून त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी संभाजीनगर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले.

सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू

मी भेट देणार आहे. आमची दहशत कमी झालेली नाही, हे दाखविण्यासाठी अशी मारहाण केली आहे. संतोष देशमुख यांचा तर बळी घेतलाच, पण हादेखील पार्ट टू होण्यापासून वाचला. सोमवारी डीपीसीच्या बैठकीआधीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू. दिवटे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीच आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश द्यावेत.

            – सुरेश धस, आमदार, आष्टी

प्रशासनाचा वचक राहिला नाही

वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या लोकांच्या बदल्या झाल्याशिवाय परळीतील गुंडगिरी कमी होणार नाही. तसेच एसपी लेव्हलची स्वतंत्र व्यक्ती परळी व परिसरासाठी आवश्यक आहे, तरच येथील गुंडगिरी कमी होईल. सत्तेच्या जिवावर गुंडगिरी व मस्ती सुरूच आहे. कायद्याचा धाक नसल्याने व्हिडीओ व्हायरल करून मारहाण केली जाते. या गुंडगिरीवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.

– बजरंग साेनवणे, खासदार बीड

अवघ्या २३व्या वर्षी नवविवाहितीने आयुष्य संपवलं राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा ‘फरार’ पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप चित्रा वाघ हे म्हणाल्या….

0

मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (२४) हिने आत्महत्या केली की, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. अशातच या घटनेवरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मुलाला घेऊन पलायन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलीस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे.

हत्या झाल्याचा संशय –

प्राथमिकदृष्ट्या ही घटना आत्महत्येसारखी वाटत असली, तरीही शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या स्पष्ट खुणा पाहता, ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास खुनाच्या अनुषंगाने सुरू केला आहे. बावधन पोलिसांनी डॉक्टरांचा अहवाल प्राप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक अहवाल, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान याबाबत बोलताना भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, ”दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या २३व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं – कारण हुंड्याची छळवणूक…! दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे. वैष्णवी ही हगवणेंची सून होती. या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा, सासू, नणंद अटकेत आहेत. तर दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत. ते ही लवकरच पकडले जातील.”

धक्कादायक! यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं थेट हाफिज सईदशी कनेक्शन? पेहलगामचा अँगलही समोर; ३ राज्यात कारवाईत 12 हेर पकडण्यात यश

0

पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानचे कंबरडं मोडलं. पण या हल्ल्यानंतर सक्रीय झालेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिची कसून चौकशी केली जात असून ज्योती मल्होत्राचं दहशतवादी हाफिज सईदशी कनेक्शन उघड झाले असून पेहलगाम हल्ल्यातील तिच्या सहभागाचा अँगलही आता आला समोर आहे. यामुळे आता देशातच एकच खळबळ उडाली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानविरोधात कारवाई केली होती. यानंतर देशातील हालचालींवर तपास यंत्रणा आणि सायबर सुरक्षा विभागाने बारीक लक्ष ठेवले आहे. यादरम्याम यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 10 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या 10 जणांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर सर्वांची कसून चौकशी केली जातेय.

ज्योती मल्होत्राला अटक करून चौकशी केल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि चौकशीतून ज्योती हेरगिरीसाठी थेट पाकिस्तानमधील मुरीदकेमध्ये गेल्याचेही समोर आले आहे. फक्त ती तेथे जाऊन आली नसून तिने तेथे 14 दिवसांचे प्रशिक्षणही घेतल्याची माहिती आता उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईदच्या सपंर्कात गेल्याचेही आता उघड झाले आहे. याची कबुलीच तिनेच दिल्याचेही आता बोललं जातंय.

मुरिदके इथं होती 14 दिवस

सध्या ज्योती मल्होत्राची चौकशी IB आणि स्थानिक पोलिस करत असून आता एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स चौकशी करणार आहे. ज्योतीने दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय असलेल्या मुरिदके येथे जाऊन प्रशिक्षण घेतलं होतं. ती तेथे 14 दिवस होती. तर हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली असून तशी कबुली तिनेच दिली आहे.

पेहलगाम हल्ल्याचा अँगल

दरम्यान ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून आता पेहलगाम हल्ल्याचा अँगलही आला समोर येत असून ती हल्ल्याच्याआधी पहलगाम येथे गेली होती. ती येथे हल्ल्याच्या तीन महिने आधी गेली होती. तर ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिश या कर्मचाऱ्याच्या हनीट्रॅपमध्ये अडकली आहे. तर दानिश इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी निगडीत आहे.

ज्योतीवर गुप्तचर विभागाची होती नजर

पाकिस्तानसाठी हेरगिरी आरोपानंतर ज्योती मल्होत्रा प्रकाश झोतात आली आहे. पण ती गुप्तचर विभागाच्या आधीच रडारवर असल्याचे माजी डीजीपींनी सांगितलं आहे. ज्योती मल्होत्रा सारख्या लोकांवर सुरक्षा एजन्सींचे बारीक लक्ष असतं. जे वारंवार पाकिस्तान, चीन आणि आता बांगलादेश सारख्या शत्रू राष्ट्रांना किंवा त्यांच्या उच्चायुक्तालयांना भेट देतात. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली ज्योतीला 17 मे रोजी अटक करण्यात आली होती. ती याआधीच सुरक्षा एजन्सींच्या रडारवर होती, हे आता समोर आले आहे.

11 दिवसांत 12 हेर पकडले

पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने हेरगिरांकडे विशेष लक्ष दिल्याचे आता उघड होत असून यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर अनेकांचा भांडा फोड झाला आहे. तीन राज्यात केलेल्या कारवाईत 11 दिवसांत एकूण 12 हेर पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. या सर्वच हेरगिरांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

भीमनगर रहिवाशांना आहे तिथेच घरे देऊन न्याय द्यावा: समाजसेविका मेधा पाटकरांची मागणी

0

पुणे: झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे. भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी देविदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

भीमनगरच्या पुनर्वसनासाठी भक्ती इंटरप्राईजेस या संस्थेने भीमनगर वासियांना मोठमोठी आश्वासने दिली. आहे त्याच जागेवर चांगली घरे देण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे वस्तीतील 70 टक्के कुटुंबांची सहमती मिळण्यापूर्वीच 50 कुटुंबांना वारजे येथे पाठवण्यात आले. त्यापैकी पंधरा कुटुंब भीम नगर मध्ये परत आली. या कुटुंबांना ज्या ठिकाणी पाठविण्यात आले, ती इमारत सदर विकासकाने नव्हे तर महापालिकेने बांधलेली असल्यामुळे उर्वरित 35 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली. एक प्रकारे ही भीमनगरवासियांची फसवणूकच आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा विकास हक्क हस्तांतरणात केला जातो. विकास मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन गरिबांना दूर कुठेतरी नेऊन टाकतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळवण्यासाठी पात्र, अपात्र ठरवताना काही अपात्रांना पात्र तर पात्रांना अपात्र ठरविले जाते, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. त्यावर, काही राजकीय नेते आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संगणमत करून विकासकाने घरे न बांधताच शेकडो कोटीचा टीडीआर घोटाळा केल्याचे भीमनगरच्या रहिवाशांनी पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

ज्याप्रमाणे जुन्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे नागरवस्त्यांना देखील स्वयंव विकासाचा हक्क आहे. मात्र, पुढारी, अधिकारी आणि विकासक यांची अभद्र युती हा हक्क झोपडवासियांना मिळू देत नाहीत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.

भीमनगरच्या आंदोलक आणि रहिवाशांना आपला पाठिंबा जाहीर करून पाटकर म्हणाल्या की, भीमनगरमधील रहिवाशांपैकी 90 टक्के रहिवासी दलित आणि कष्टकरी आहेत. ते संविधानाला अनुसरून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महापालिका, तक्रार निवारण प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग यांच्याकडून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देखील मेधा पाटकर यांनी केली.

राहुल डंबाळे म्हणाले, भीमनगर ही राज्यातील एकमेव वस्ती अशी आहे की त्या जागेचा सात – बारा रहिवाशांच्या नावे आहे, तरीही स्थानिक पुढारी, एसआरए मधील भ्रष्ट अधिकारी आणि महापालिका प्रशासन संगणमताने ही जागा बिलडच्या घश्यात घालून स्थानिकांना विस्थापित करत आहेत. या प्रकरणात सर्व संबंधित अधिकारी, बिल्डरवर अॅट्रॉसिटी गुन्हा दखल करावा अशी मागणी डंबाळे यांनी केली. या प्रसंगी स्थानिक राहिवाश्यांनी आपल्या अडचणी मांडल्या, तसेच जे विस्थापित नवीन ठिकाणी राहायला गेले त्यांना येणाऱ्या समस्या ही यावेळी मांडण्यात आल्या.

भव्य आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबिराने शिवसेना अल्पसंख्यक शहर प्रमुख अशफाक भाई मोमीन यांचा वाढदिवस साजरा

0

पुणे – शिवसेना अल्पसंख्यक शहर प्रमुख मा. अशफाक भाई मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा नगर गुलटेकडी पुणे परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात लहान मुलांना खाऊ वाटप, तसेच ३०० ते ४०० ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात परिसरातील महिला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. कार्यक्रमात मा. आमदार रवींद्र धंगेकर, मा. नगरसेवक अजय भोसले, मा. सुधीर कुरूमकर, राजू मुलानी, अकबर शेख, अनवर मोमीन, शोयब लांडगे, अजरुद्दीन सैय्यद, अहमद मैलाना,मोठ्या संख्येने शिवसैनिक आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी अशफाक भाई मोमीन यांचे अभिनंदन केले असून, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेली सामाजिक बांधिलकीची भूमिका वाखाणण्याजोगी असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य नियोजनातून पार पडले असून, यामुळे समाजात आरोग्यप्रती जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

तद्प्रसंगी मा. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचे उद्घाटन मा. अजय बापू भोसले शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे शहर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.