Home Blog Page 68

या राज्यांमध्ये काल मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

0

मागील काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान, आता मान्सून काल केरळमध्ये पोहोचला. मान्सून आता इतर राज्यांमध्ये पोहोचला आहे. ही एक चांगली बातमी आहे. मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सून पोहोचण्यासाठी अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून रविवारी अरबी समुद्र, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधीपासून सुरू होणार?

“मान्सूनची उत्तरेकडील सीमा देवगड, बेळगावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, आयझॉल, कोहिमा येथून जाते. पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

कोकण किनारी आणि मुंबईसह पश्चिम महाराष्टात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. नैऋत्य मान्सून शनिवारी केरळला धडकला, २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर त्याचे सर्वात पहिले आगमन, जेव्हा तो २३ मे रोजी दक्षिणेकडील राज्यात धडकला होता. साधारणपणे, नैऋत्य मान्सून १ जून रोजी केरळमध्ये सुरू होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. तो १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो. तो साधारणपणे ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात आणि ११ जून रोजी मुंबईत पोहोचतो.

पुणे हादरलं..! तिहेरी हत्याकांडात आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले

0

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या अमानुष तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे हादरून गेला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रोजी खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावचे हद्दीत एक महिला व तिचे दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा खून करून त्यांना पेटवून दिलेले आहे. सदर महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असून लहान मुलाचे वय अंदाजे चार वर्षे लहान बाळाचे वय अंदाजे दीड वर्षे असे आहे. पुणे – अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव खंडाळे परिसरात ही घटना घडली.

ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तीन जळालेल्या मृतदेह आढळले. सकाळी कामावर येणाऱ्या कंपनीच्या कामगारांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. रांजणगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी ते रुग्णालयात पाठवले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुले (एक मुलगा व एक मुलगी) यांचा समावेश आहे. या तिघांना अन्यत्रून येथे आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पावसामुळे आग पूर्णपणे न लागल्याने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले.

ओळख अद्यापही अज्ञात

या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन पोलिस या खूनामागील नेमकी कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस तपास सुरु, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

ही घटना अत्यंत अमानुष आणि संतापजनक असून, नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! समस्या निराकरणास नोडल अधिकारी नेमा; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0

हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुड सह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसा मुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना ना. पाटील यांनी यावेळी दिली.

कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती ना. पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच,मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.

यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना ना. पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

अखेर न्याय मिळाला… भीम पराक्रमी खेळाडूचं भारत अ संघात पुनरागमन 9 वर्षांआधी ब्रिटिशांनाच धडकी भरवली

0

मुंबई: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला आहे. शुभमन गिलला संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघात काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. काही खेळाडूंचा कमबॅकही झालेला पाहायला मिळत आहे. करुण नायरला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली आहे. तब्बल 9 वर्षानंतर करुण नायरला पुन्हा संघात संधी मिळाली आहे.

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका अनेक प्रकारे महत्त्वाची असणार आहे. या दौऱ्यात भारत अ संघाचे नेतृत्व सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन करेल आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय अनेक तरुण खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, असा एक खेळाडू देखील आहे जो 9 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे. या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करून भारत अ संघात आपले स्थान निर्माण केले आहे. करुण नायरला भारताच्या मुख्य संघातही आता स्थान मिळाले आहे.

अखेर, अनुभवी फलंदाज करुण नायर भारतीय संघात परतला आहे. करुण नायरची भारतीय संघात परतण्याची नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. करुण नायरने इंग्लंडविरुद्ध 2016 ला त्रिशतक मारले होते. या इतक्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघातून ड्रॉप करण्यात आले होते. आता पुन्हा इंग्लंडविरुद्धच त्याला संघात स्थान मिळाले आहे. गेले कित्येक वर्ष तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. यावर्षी करुण आयपीएलमध्येही खेळताना दिसला. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात करुणला 50 लाख रुपयांना विकत घेतले.

2024-25 मध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भासाठी करुण नायर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 836 धावा केल्या. या देशांतर्गत हंगामात, त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट-वन क्रिकेटमध्ये एकत्रितपणे 1600हून अधिक धावा केल्या, ज्यामध्ये 9 शतकांचा समावेश होता. दुसरीकडे, तो 2023 आणि 2024 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळला आणि दहा सामन्यांमध्ये 56.61 च्या सरासरीने 736 धावा करण्यात यशस्वी झाला

अजित पवारांचा VIDEO व्हायरल….रूमाल काढला अन् थेट सोफा पुसायलाच सुरुवात; निवेदकाची दिलगिरी

0

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि स्वच्छतेच्या आग्रहासाठी ओळखले जातात. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरात स्वच्छता नसेल तर अजित पवार यांनी अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचे पाहायला मिळते. मात्र आज एका कार्यक्रमादरम्यान सोफ्यावर असलेली धूळ स्वत: स्वच्छ करत अजित पवारांनी आयोजकांना स्वच्छतेचे धडे दिले.

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांसह मान्यवरांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोफ्यावर काहीशी धूळ होती. नीटनेटकेपणाची आवड असलेल्या अजित पवारांना ही बाब खटकली. त्यांनी अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना याबाबत न सांगता स्वत:च रूमाल घेऊन धूळ साफ केली. अजित पवारांनी स्वत: रुमालाने सोफा पुसल्याचं पाहून उपस्थित असलेल्या इतर नेत्यांसह अधिकाऱ्यांचेही चेहरे ओशाळले. निवेदकाने या प्रकाराबाबत अजित पवारांची दिलगिरीही व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथं पोलिसांच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनावेळी सोफा अस्वच्छ असल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: रुमालाने सोफा पुसून केली स्वच्छता.

pic.twitter.com/Xrma7PZZ4w

कार्यक्रमात काय म्हणाले अजित पवार?

नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना अजित पवार यांनी भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या काही दिवसांपूर्वीच्या नाराजीवर भाष्य केलं. “आज मी बरोबर 9 वाजता उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या ठिकाणी मी लवकर पोहोचलो असतानाही थांबलो. कारण 1 मे ला झेंडावंदन होतं आणि झेंडावंदन करून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना रिसिव्ह करायला जायचं होतं. आम्हाला झेंडावंदन करून सीएम, दोन्ही डीसीएम, गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागतं. मात्र त्या दिवशी एका व्यक्तीने मला उद्घाटनाला भेट द्या म्हणून विनंती केली. त्याला मी सकाळची साडे सहाची वेळ दिली. पण दुर्दैवाने मी तिथं सव्वासहाला गेलो आणि इतक्या सकाळी कोणी येणार नाही म्हणून उद्घाटन करून घेतलं. तर आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या. उद्घाटनाची वेळ साडेसहा सांगितली आणि 6 :20 ला का उद्घाटन केले म्हणून त्यांनी विचारणा केल्यानंतर आम्ही चूक दुरुस्त केली आणि पुन्हा उद्घाटन केलं. आज लवकर आलो तरी थांबलो. पत्रिका मागवली तर त्यात नऊची वेळ होती, म्हणून 9 वाजेपर्यंत आपण थांबलो,” असं अजित पवार म्हणाले.

चेहऱ्यावर लघवी, अत्याचारानंतर पीडित महिलेला उपचार नाही असे व्हायरसचं गंभीर इंजेक्शन; भाजप आमदारावर खळबळजनक आरोप

0

बेंगळुरू : बेंगळुरूमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार एन. मुनिरत्ना यांच्यावर सामुहिक अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका ४० वर्षीय महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला आहे. त्या महिलेला बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एन. मुनिरत्ना यांच्याशिवाय महिलेने इतर चौघांनाही सहआरोपी केलं आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

एका महिलेने आमदार मुनिरत्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्ये तिच्यावर मुनिरत्ना यांनी वेशावृत्तीचा आरोप केला होता. वैयक्तिक दुश्मनीतून त्यांनी मला तुरुंगात पाठवलं, असा आरोप महिलेने केला आहे. आमदारांनी तिला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असं तिचं म्हणणं आहे. जेलमधून सुटल्यानंतर आमदाराने पुन्हा तिला त्रास दिला, असा दावा महिलेने केला. त्यांच्या माणसांनी तिच्यावर खुनाचा आरोप लावला. त्यामुळे तिला पुन्हा तुरुंगात जावं लागलं. मात्र, एका महिन्यातच तिला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली.

महिलेने तक्रार केली, की जर ती त्याच्यासोबत मुनिरत्न याच्या कार्यालयात गेली, तर तिच्यावरील प्रलंबित खटले मागे घेतले जातील. आरोपीने तिला फसवून आमदाराच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. यांच्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत लैंगिक शोषण झालं, असे तिने तक्रारीत म्हटलं आहे.

एफआयआरमध्ये असं लिहिलं की, आमदाराने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आरोपीकडून तिच्यावर बलात्कार केला. नंतर, मुनिरत्न यांनी तिच्या चेहऱ्यावर लघवी केली. त्यानंतर तिच्या शरीरात एक पदार्थ, इंजेक्शन टाकलं आणि त्यामुळे ती आयुष्यभर पीडित राहील असंही तिला सांगितलं. पोलिसांनी हे प्रकरण एफआयआरमध्ये नोंदवलं आहे. एफआयआरमध्ये असंही म्हटलं आहे की आमदाराने तिला घटनेबद्दल कोणालाही सांगण्यास मनाई केली आणि नंतर सहकाऱ्यांना तिला घरी परत सोडण्याचे निर्देश दिले.

महिलेवर उपचार सुरू

१४ जानेवारी २०२५ रोजी महिलेला पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. रक्ताच्या तपासणीनंतर तिला एक व्हायरल झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिला एक गंभीर आजार झाला आहे. FIR मध्ये नोंद आहे की, मेडिकल तपासणीत तिला असा आजार झाल्याचं समजलं, ज्यावर उपचार नाही. पीडित महिलेला खूप त्रास होत होता. तिला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे तिने १९ मे च्या रात्री झोपायच्या गोळ्या खाल्ल्या. तिच्या शेजारच्या व्यक्तीने तिला बघितलं आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे तिचा जीव वाचला.

सिने दिग्दर्शक ते राजकीय नेते

मुनिरत्न नायडू हे कर्नाटकात सिने दिग्दर्शक होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. २०१३, २०१८, २०२० आणि २०२४ मध्ये राजराजेश्वरी नगरमधून आमदार म्हणून निवडले गेले. मार्च २०१८ मध्ये, सीआयडीने इतर अधिकाऱ्यांसह मुनिरत्न यांच्याविरुद्ध १५०० कोटी रुपयांचं फेक बिल बनवून पेमेंट मिळल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं होतं.

वैष्णवीचा मृतदेह पाहण्यास 25 कार्यकर्त्यांसह रुग्णालयात गेला अन्…, राजेंद्र हगवणे बद्दल धक्कादायक माहिती समोर

0

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. मात्र वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर फरार होते, त्यांना नंतर अटक करण्यात आली. दरम्यान 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर वैष्णवीचा मृतदेह औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 17  मे रोजी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात आला होता, त्याचवेळी त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तिथूनच तो फरार झाल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंब आणि जालिंदर सुपेकर यांचे जवळचे संबंध आहेत. हगवणे कुटुंब सुपेकर यांचा त्यांच्या सूनांना धाक दाखवायचं, हगवणे कुटुंबाची सून मयुरीच्या आईने याविरोधात महिला आयोगाला एक पत्र देखील लिहिलं होतं, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी गेले असताना कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं होतं. निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीनं धमकी दिली होती, या निलेश चव्हाणला देखील सुपेकर यांनीच बंदुकीचं लायन्स दिल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे. सुपेकर पाठिमागे होते म्हणूनच हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांचा छळ केला. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत, जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, अशा स्वरुपाचे गंभीर आरोप दमानिया यांनी यावेळी केले आहेत.

महाराष्ट्र व्हिजन ते गुंतवणूक, सरन्यायाधीश गवई यांची भेट; नीती आयोग बैठकीत फडणवीसांच्या भाषणाचे हे मुद्दे….

0

नुकतीच नीती आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली.

फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे ……

भारतीय सैन्य दल आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल हृदयपूर्वक आभार आणि अभिनंदन. मोदीजींच्या दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प यातून अधोरेखित होतो.

राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकार सुद्धा महाराष्ट्र 2047 असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले.

आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालीन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035 साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे.

विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नवीन उद्योग धोरणाचा उद्देश जीडीपीत उत्पादन क्षेत्राचे योगदान 20 टक्क्यांच्या वर आणणे हा आहे. मैत्री 2.0 ही सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, ईव्ही, सेमिकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर्स यासारख्या नवक्षेत्रांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

2024-25 या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील 50 टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरु झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे.

विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, विविध सुधारणा आणि रोजगार वाढविण्यावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टर रोड आदी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत क्षेत्रातील क्रांतीला गती देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे क्षेत्रीय विकासाला चालना देणार असून, त्यासाठी आम्ही पंतप्रधान महोदयांचे आभारी आहोत, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची देखील भेट घेतली. त्यांना विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार तसेच, भारतीय संविधान याविषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

रिसॉर्ट बुकींग अन् जेवणाचे ‘डब्बे’ काँग्रेसच्या ‘या’ माजी मत्र्यांच्या मुलाची हगवणेची मदत; या ‘शौक’मुळे घट्ट मैत्री

0

वैष्णवी हगवणेने तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. त्यांनी गेल्या 7 दिवसांमध्ये वेगवेगळी ठिकाणे बदलली आहेत. दरम्यान, त्यांना एका काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाने मदत केल्याचे सोमर आले आहे.

कोणी बुक केलं रिसॉर्ट?

राजेंद्र हगवणे फरार असलेल्या 7 दिवसांपैकी एक दिवस महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये राहिले होते. राजेंद्रसोबत आणि दोन साथीदार होते. या रिसॉर्टचं बुकींग कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत, म्हणून प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्टमधील दोन रूम बुक केल्या होत्या. हे गेस्ट राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार होते. वाचा: वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?

कधी गेले होते रिसॉर्टवर?

राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार होता. 19 तारखेच्या मध्यरात्री पासून तो साथीदारांसोबत हेरिटेज रिसॉर्टवर थांबला. त्यानंतर 21 तारखेला तो तेथून निघाला. दिवसभर तो रिसॉर्टवर थांबत नसे. केवळी रात्री झोपण्याच्या वेळी तो रिसॉर्टवर यायचा. तसेच या रिसॉर्टवर जेवण घेऊन प्रीतम पाटील येत असल्याचे समोर आले आहे.

राजेंद्र हगवणेचे कर्नाटक कनेक्शन काय?

राजेंद्र हगवणेचे कर्नाटकातील काँग्रेस कनेक्शन समोर आले आहेत. काँग्रेसच्या माजी मंत्राच्या मुलाने राजेंद्र हगवणेला आसरा दिला होता. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलाने हेरिटेज रिसॉर्ट बुक केल्याची माहिती समोर आली. राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील यांची घोडे पाळण्यातून मैत्री झाली होती. अनेकदा त्यांच्या भेटीगाठी होत असत असे म्हटले जाते.

“दादांचा आदेश आहे, मुंबईत या…” : तटकरेंचा राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांना निरोप; अस्वस्थता वाढली!

0

विदर्भामधील नागपूर आणि अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (27 मे) मुंबईला बोलावले आहे. मागील काही दिवसांपासून स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्याची होणारी मागणी होत असतानाच विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला मिळालेला थंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद स्वबळावर लढायची की स्वतंत्रपणे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. विदर्भात भाजप फार काही जागा सोडणार नाही याची कुणकुण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे. हे बघता अनेकांचा आग्रह स्वबळाचा आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये अमरावती आणि नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वबळाची भावना बोलून दाखवली.

दुसरीकडे पदाधिकारी गांभीर्याने सदस्य नोंदणी करीत नसल्याने राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांनी याच मेळाव्यात जाहीपरणे सर्वांना फटकारले. या सगळ्यानंतर निवडणुकीसाठी स्थानिकांनी केलेल्या तयारीचा आढावा आणि कोणी काय केले याची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले आहे. या बैठकीत अजित पवार यांच्याकडूनही पटेल यांच्याप्रमाणेच कानउघडणी होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल म्हणाले, फक्त टाईट कपडे घालून चालणार नाही तर पक्षात राहायचे असेल तर पक्षाचे कामही करावे लागले. सुमारे 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. यानंतरही विदर्भात राष्ट्रवादी वाढली नाही. एकेकाळी राष्ट्रवादीचे 11 आमदार निवडून आले आहेत. आता विदर्भात फक्त 6 आमदार शिल्लक आहेत. पक्षाचे काम कोणी करत नाही, अनेक जण फक्त मुंबईत दिसतात, ग्राऊंडवर काम शून्य अशा शब्दात त्यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, आमदार संजय खोडके यांनी सुद्धा वेगळ्या शब्दात अशाच आशयाचे मत व्यक्त केले. त्यांनी तर आपण मेहनत घेत नाही असे स्पष्टपणेच सांगितले. सोबतच आघाडी आणि महायुतीमुळे राष्ट्रवादीला लढण्यासाठी विदर्भात फार स्कोप नाही, त्यामुळे पक्ष वाढत नसल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्या असा सल्ला दिला. माजी वनमंत्री आणि गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना थेट तोफ डागली.

विधानसभेत बंडखोरांना ताकद दिल्याचा आरोप करून गडचिरोलीत महायुतीची गरज नाही, राष्ट्रवादी स्वबळावर लढेल असे जाहीर करून टाकले. एका बाजूला नेते आणि पदाधिकारी स्वबळासाठी आग्रही आहेत आणि दुसऱ्या बाजूला सदस्य नोंदणीही थंड आहे. या विरोधाभासात केवळ स्वबळाची मागणी करून चालणार नाही, तर आधी पक्षवाढीसाठी कष्ट घ्यावे लागले, अशी कानउघडणी अजित पवार करण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळावारी मुंबई येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.