पुणे विमानतळ परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, विमानतळ टर्मिनल परिसरात १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या खासगी चारचाकी वाहनचालकांवर आता ₹५०० दंड लावण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव दिल्ली मुख्यालयाकडे पाठवण्यात आला होता आणि तिथून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते. अनेक प्रवासी आणि वाहनचालक आपली वाहने तासन्तास पार्क करून ठेवतात, ज्यामुळे इतर वाहनांना आणि प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबणाऱ्या वाहनांना ₹५०० दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
एक विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते नियमांची अंमलबजावणी करणार असून नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
या निर्णयाचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले आहे. स्नेहा पटेल, या पुणे येथील नियमित प्रवासी म्हणाल्या, “हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं. मी स्वतः अनेक वेळा टर्मिनलसमोरील ट्रॅफिकमुळे पिकअपसाठी उशीर झालेला अनुभवला आहे. हा नियम काटेकोरपणे राबवला गेला तर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि संपूर्ण विमानतळ अनुभव अधिक सुलभ होईल.”
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर मोठी दुर्घटना घडली आहे. तळेगावजवळील इंद्रायणी नदीवर असलेला ३० वर्षे जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. वीकेंड असल्याने या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक पर्यटक पूलावर उभे असतानाच पूल कोसळून अनेकजण थेट नदीच्या प्रवाहात पडले. काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत स्वत:ला काठावर आणले, तर इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
या संदर्भात माहिती देताना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे अधिक्षक म्हणाले की, “आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एका व्यक्तीचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. दोन मृतदेह हाती लागले आहेत.”
मावळचे आमदार सुनील शेलके यांनी सांगितले की, “हा पूल अतिशय जुना असून त्याची नियमित देखभाल होत नव्हती. दुर्घटनेच्या वेळी सुमारे १०० लोक पूलावर उपस्थित होते. अनेकजण नदीत पडले पण काही जण काठावर पोहचू शकले.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून ते म्हणाले, “या दुर्घटनेबाबत मला अतिशय दुःख झाले आहे. मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या दुर्घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही नागरिक वाहून गेले असण्याची भीती आहे. मी पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी सर्व मदत पाठवण्याची तयारी दाखवली आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी पावसाळ्याच्या काळात पर्यटनस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
जखमींचे उपचार पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये सुरू असून, गंभीर जखमींची विशेष काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राजकारण आधीच तापले आहे. राजकीय पक्षांनी आधीच राजकीय समीकरणे ठरवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करू शकतो. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय निर्णय घेतील? ते महाविकास आघाडीचा भाग म्हणून ही निवडणूक लढवतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील राजकीय पक्ष कोणती पावले उचलतील, हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती केली तर महाविकास आघाडीचे काय होईल, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
तर दुसरीकडे, काका-पुतण्यांनी हातमिळवणी केली तर महायुतीच्या युतीचे काय होईल? असा सवाल उपस्थित होत आहे. अलिकडच्या घटनांवरून असे दिसून येते की आगामी बीएमसी निवडणुका लक्षात घेता युतीच्या समीकरणांमध्ये बदल होऊ शकतात.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्यात संभाव्य युतीची चर्चा आहे. याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ज्यामुळे मनसे आणि भाजपमधील समीकरणेही बदलू शकतात असे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राज्यात आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीची सत्ता आली आणि कधी नव्हे ती राजकीय समीकरणं पाहायला मिळाली. अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाजही फोल ठरले होते. दरम्यान राज्यात पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात. स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी युती करु शकते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नवं धोरण स्विकारलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी शरद पक्षाने नवं धोरण स्विकारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवर भाजपा वगळता कुणाशीही युती करु शकते. महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंशी युतीचाही पर्याय खुला आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छूक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही.
सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं असता म्हणाल्या की, “26 वर्षांपासून स्थानिक नेते ठरवतील हेच आमचं ठरलेलं आहे. तेव्हा जायचं की नाही हे नेते ठरतात. कार्यकर्ते हेच शरद पवारांची ताकद आहे. सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. मी तुम्हाला अधिकार देतो, निर्णय घ्या सक्षम व्हा अशी त्यांची भूमिका असते “. दरम्यान यावेळी त्यांना अजित पवारांसोबतच्या युतीसंदर्भात विचारलं असता पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे ठरवू असं उत्तर त्यांनी दिलं.
पुणे : पाषाणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मालपाणी इस्टेट चा पाषाण मधील सर्वे नंबर १३०/२, १३०/३, १३०/४, १३०/५ मधील M Soul Strings हा प्रकल्प कायदेशीर बाबींच्या मुळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिका बांधकाम विभाग अधिकारी यांनी मुंबई प्रातिक अधिनियमाचा गैरवापर नियमांचे उल्लघन करून ले -आउट मंजूर करण्यात आला आहे. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरामध्ये मालपाणी इस्टेटच्या वतीने भव्य गृह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तानाजी रामचंद्र निम्हण यांच्या वडिलोपार्जित वहिवाटीची जागा त्यांची परवानगी न घेता घेण्यात आली असल्याचे तानाजी निम्हण यांनी प्रकल्पाबाहेर फलक लावून जाहीर केले आहे.
पुणे महापालिका बांधकाम विभागाने कमेन्नसमेंट सर्टिफिकेट सिसी/२५५८/२३ दिनांक ११/१/२०२४ रोजी आराखडा मंजूर करून दिला आहे. सदरील मिळकतीत आमचा वडिलोपार्जित मालपाणी इस्टेटच्या M Soul Strings या गृह प्रकल्पासाठी पुणे महापालिकेला बनावट दस्ताच्या आधारे तानाजी रामचंद्र निम्हण यांची परवानगी न घेता मालपाणी व इतर काही जणांनी पालिकेची बांधकाम परवानगी मिळवली आहे. एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही (, सोनिग्रा व माजी मंत्री कै. चंद्रकांत छाजेड यांचे पुत्र आनंद छाजेड, तानाजी निम्हण) यांची भागीदारीतील बांधकाम कंपनी 2005 साली सुरू करण्यात आली होती. कंपनी स्थापन करताना घातलेल्या अटी शर्ती यांचे पालन न करतात तानाजी निम्हण यांची वडिलोपार्जित जागा त्यांची परवानगी न घेता व मोबदला न देता मालपाणी इस्टेटला देण्यात आली.
वडिलोपार्जित जागा देण्याचे अधिकार नसताना कायदेशीर बाबींचे संगनमताने उल्लंघन करत एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने भागीदार तानाजी निम्हण यांची मोठे आर्थिक फसवणूक झाली असल्याची बाब समोर आली आहे. पाषाण बागेतील मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पात वाढीव बांधकाम मिळण्यासाठी एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या वतीने पूर्वी केलेल्या प्रकल्पांचे एकत्रीकरण (अमलगमेशन), जुन्या सभासदांच्या अतिरिक्त टीडीआर चा गैरवापर, मंजूर प्लॅनमध्ये पालिकेची दिशाभूल करून मुख्य रस्ता प्रकल्पालगत असल्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने योग्य दखल न घेतल्यास या भागामध्ये लाखो स्क्वेअर फुटचे बेकायदेशीर बांधकाम झटपट विकून मोठी आर्थिक उलाढाल करून ‘मालपाणी’कमावण्याची मानसिकता संबंधित व्यावसायिकाची दिसत आहे. मुळ मालकाची कोणत्याही प्रकारची सही संमती न घेता मालपाणी इस्टेट यांनी चालविलेले बेकायदेशीर व्यवहार करण्याच्या तयारीत असल्याने सदरील बेकायदेशीर व्यवहार हे वरीत थांबविण्यात यावेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात असल्यामुळे मालपाणी इस्टेटचा बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील M Soul Strings बांधकाम प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुळ मालक व कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची सही समती न घेता केलेले दस्त अथवा व्यवहार नियमबाहय ठरविण्यात यावेत सदर मिळकतीबाबत मे न्यायालयात प्रकरण प्रलंबीत असेपर्यंत मिळकतीबाबतचे कोणतेही व्यवहार हे मालपाणी इस्टेट यांनी करू नयेत अशी त्यांना समज देण्यात यावी अशी लेखी मागणी पुणे पोलीस आयुक्त व पुणे महापालिका आयुक्त यांना जागामालक यांनी केली आहे.
हिंजवडी फेज २ मधील सारथी सोव्हरिन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या १,००० पेक्षा अधिक रहिवाशांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) तक्रार दाखल करून, त्यांचा एकमेव मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर मोठा सिंकहोल (जमिनीखाली खचलेला भाग) पडल्याने संपूर्ण संपर्कच तुटला आहे.
सोसायटीने ११ जून रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५० हून अधिक फ्लॅट्सना जोडणारा हा एकमेव रस्ता अनेक वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत आहे, ज्यामध्ये खोल खड्डे, पाण्याचा योग्य निचरा न होणे आणि रस्त्यावर अंधारमय परिस्थिती यांचा समावेश आहे. सिंकहोलमुळे रस्ता पूर्णपणे वापरण्यायोग्य राहिलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण परिसर अडकल्यासारखा झाला आहे.
निवेदनातील प्रमुख तक्रारी –
आपत्कालीन सेवा अडथळ्यात – अँब्युलन्स व अग्निशमन सेवा सोसायटीपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
दैनंदिन जीवन विस्कळीत – विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रोज कामावर जाणारे नागरिक त्रस्त.
सुरक्षेचा अभाव – रस्त्यावरील अंधार आणि खराब रस्ते अपघातांना आमंत्रण देत आहेत.
मलबा फेकण्याची समस्या – दोन्ही बाजूंनी बांधकामाचे अवशेष टाकले जात आहेत, ज्यामुळे दृश्यअडथळे निर्माण झाले आहेत.
रहिवाशांची पीएमआरडीएकडे मागणी –
तात्काळ रस्त्यावरील अडथळा हटवून तात्पुरता संपर्क प्रस्थापित करावा.
रस्त्याचे कायमस्वरूपी पुनर्बांधणी व स्ट्रीट लाइट्स बसवाव्यात.
कामकाजाची पारदर्शकता राखण्यासाठी एक संपर्क अधिकारी नेमावा.
पर्यायी तात्पुरता रस्ता उपलब्ध करून द्यावा.
सोसायटीचे सचिव संदीप पेडणेकर म्हणाले, “हा विषय केवळ आमच्यापुरता मर्यादित नाही. पुढे अनेक सोसायट्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. एकंदर १०,००० पेक्षा जास्त कुटुंबांना या रस्त्याचा फायदा होणार आहे, त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी उपायासाठी पीएमआरडीएकडे धाव घेतली आहे.”
PMRDA चे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी Pune Pulse शी बोलताना सांगितले की, “रस्ता हस्तांतरण आणि अधिग्रहण प्रक्रियेला वेळ लागू शकतो. सध्या आम्ही तात्पुरता मार्ग उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दीर्घकालीन उपाययोजना देखील लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून राबवण्यात येणार आहेत.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याचे आयोजन भारतात होईल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींसह BCCI ला आशा होती. ICC चे चेअरमन म्हणून जय शहा यांच्या निवडीनंतर या शक्यतेला बळ मिळाले होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ही आशा धुळीस मिळाली आहे. एक अहवाल सांगतो की, WTC चे पुढील तीनही फायनल्स इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, ICC ने WTC च्या पुढील तीन आवृत्त्यांचे फायनल्स इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 2021 आणि 2023 मधील फायनल्स अनुक्रमे साउथॅम्प्टन व लंडन (द ओव्हल) येथे खेळवण्यात आले होते. चालू सत्रातील फायनलही इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होत आहे.
टेलिग्राफच्या माहितीनुसार, हा ट्रेंड 2031 पर्यंत म्हणजे WTC च्या सहाव्या फायनलपर्यंत कायम राहणार आहे. यासंदर्भात ICC ने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला तोंडी कळवले आहे. या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब ICC ची वार्षिक परिषद जुलैमध्ये सिंगापूर येथे होईल, तिथे होईल.
BCCIची मागणी फेटाळली
भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढील तीन फायनल्सपैकी किमान एक फायनल भारतात आयोजित करण्याची मागणी ICC कडे केली होती. मात्र, ती मागणी मान्य केली गेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, भारतात WTC फायनल पाहण्यासाठी BCCI आणि क्रिकेटप्रेमींना किमान 2033 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
इंग्लंडची निवड का?
इंग्लंडमध्ये होणाऱ्या फायनल्ससाठी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद ही एक प्रमुख कारणीभूत बाब आहे. मागील दोन फायनल्स ‘सोल्ड आउट’ झाले होते आणि भारतीय संघ सहभागी असल्याने इंग्लंडमधील भारतीय प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. विशेष म्हणजे, चालू फायनलमध्ये भारत सहभागी नसतानाही (ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका) प्रेक्षकवर्ग प्रचंड दिसून आला, हे इंग्लंडच्या यशस्वी आयोजनाचे लक्षण मानले जात आहे.
भारतीय क्रिकेट संघात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कसोटी संघाचे नेतृत्व आता युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असून, २० जूनपासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत गिल पहिल्यांदाच भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. मालिकेपूर्वीच त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमठवत अर्धशतक ठोकले आहे.
टीम इंडिया आणि इंडिया-ए यांच्यात १३ जूनपासून बेकनहॅम येथे तीन दिवसीय इंट्रा-स्क्वॉड प्रॅक्टिस मॅच सुरू झाली आहे. यामध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील मुख्य भारतीय संघ आणि अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया-ए संघ एकमेकांसमोर आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्ध नुकतीच मालिका खेळलेल्या इंडिया-ए संघाला या सामन्याद्वारे वरिष्ठ संघासमोर आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.
या सामन्याचे मीडिया कव्हरेज बीसीसीआयने रोखले होते, त्यामुळे पहिल्या दिवशी खेळलेल्या सामन्याचे तपशील समोर आले नव्हते. मात्र, दिवसाअखेर बीसीसीआयने सोशल मीडियावर माहिती दिली की, शुभमन गिलने जबरदस्त फॉर्म दाखवत अर्धशतक ठोकले. त्याच्या जोडीला के.एल. राहुलनेही जबरदस्त फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. दोघांचे हे फॉर्म हेडिंग्ले कसोटीआधी भारतीय संघासाठी सकारात्मक संकेत आहेत.
फक्त फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही भारताचा अनुभव बोलका ठरला. शार्दुल ठाकुरने या सामन्यात सर्वाधिक विकेट घेत प्रभावी कामगिरी केली.
तरीही, गिलची परदेशातील कामगिरी आजवर सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे त्याची कर्णधार म्हणून चाचणी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांची फलंदाजीसुद्धा कसोटीला लागणार आहे. आगामी हेडिंग्ले कसोटीत आणि पुढील चार सामन्यांत तो असा दमदार फॉर्म टिकवून ठेवतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असेल.
क्रिकेटमध्ये एखादा चेंडू किंवा ओव्हर संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकतो, याचं जिवंत उदाहरण तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये गुरुवारी पाहायला मिळालं. तिरुपूर आणि सलेम यांच्यात रंगलेल्या सामन्यात तिरुपूरचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज ए. ईसाकीमुथु याने सामना फिरवणारा सर्वात लांब आणि महागडे १९वे षटक टाकले.
सलेमला जिंकण्यासाठी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ३१ धावांची गरज होती. तिरुपूरच्या कर्णधार साई किशोरने १९वी ओव्हर ईसाकीमुथुच्या हवाली केली. सलेमकडून भूपतीकुमार आणि हरीशकुमार फलंदाजी करत होते. त्यांनी पहिल्या पाच चेंडूंमध्ये एक षटकार आणि दोन चौकारांसह १७ धावा घेतल्या. पण खरा नाट्यपूर्ण क्षण ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आला.
ईसाकीमुथुला शेवटचा वैध चेंडू टाकण्यासाठी तब्बल ५ वेळा प्रयत्न करावे लागले. त्यात ४ नो-बॉल्स होते. या गोंधळाचा फायदा घेत सलेमच्या फलंदाजांनी एकाच चेंडूत ८ धावा काढल्या.
यानंतर सलेमला शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ ६ धावा हव्या होत्या. तिरुपूरकडून टी. नटराजनने अखेरची ओव्हर टाकली, पण सलेमने एक चेंडू राखूनच ४ गडी राखून विजय मिळवला.
ईसाकीमुथुने फेकलेल्या ११ चेंडूंची ओव्हर TNPL इतिहासातील सर्वाधिक लांब व महागडी ओव्हर ठरली. या एकट्या ओव्हरमध्ये त्याने २५ धावा दिल्या. संपूर्ण सामन्यात त्याने ४ ओव्हरमध्ये ५३ धावा दिल्या व एकही विकेट मिळवली नाही. सामन्यात सर्वाधिक धावा लुटवणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. या ओव्हरमुळे तिरुपूरने हातात असलेला विजय गमावला, तर सलेमने संधीचा पुरेपूर फायदा घेत शानदार पुनरागमन करत सामना जिंकला.
गेल्या अनेक वर्षांपासून, एकाच गायकाचे वेगवेगळ्या प्रकारचे संगीत अल्बम YouTube वर आले आहेत, ज्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या गायकाने केवळ रोमँटिकच नाही, तर दुःखी बेवफाईची गाणी देखील गायली आहेत, जी लोक खूप ऐकतात. त्या गायकाचे नाव जुबिन नौटियाल आहे, ज्याने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.
१४ जून १९८९ रोजी डेहराडून येथे जन्मलेले जुबिन नौटियाल आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तो पहिल्यांदा ‘एक्स फॅक्टर’ (२०११) मध्ये दिसला. पण या शोमध्ये त्याला सोनू निगमने नाकारले. पण जुबिनने हिंमत गमावली नाही आणि त्याच्या आवाजावर कठोर परिश्रम केले आणि आज प्रत्येकजण त्याच्या आवाजाच्या जादूखाली आहे. लोकांनी YouTube वर जुबिन नौटियालची ५ बेवफाईची गाणी खूप ऐकली आहेत.
बेवफा से प्यार किया
हे गाणे २५ मे २०२३ रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले होते. या गाण्यात गौतम विज आणि रिवा किशन सारखे कलाकार दिसले होते. हे गाणे जुबिन नौटियालने गायले होते, तर त्याचे संगीत आदित्य देव आणि पायल देव यांनी दिले होते. या गाण्याचे बोल मनोज मुंताशीर यांनी लिहिले होते. या गाण्याला आतापर्यंत ४१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
बेवफा तेरा मासूम चेहरा
हे गाणे १६ नोव्हेंबर २०२० रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाले होते, ज्याला आतापर्यंत ४४५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे जुबिन नौटियालने गायले होते आणि त्याच्यासोबत रोचक कोहली होता. या गाण्याचे बोल रश्मी विराग यांनी लिहिले आहेत आणि त्याचे संगीत रोचक कोहलीने दिले आहे. या गाण्यात करण मेहरा, इहाना ढिल्लन आणि अमरदीप फोगट सारखे कलाकार दिसले होते.
वफा ना रास आयी
हे गाणे २३ एप्रिल २०२१ रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले. हे गाणे जुबिन नौटियालने गायले आहे, तर त्याचे संगीत मीत ब्रदर्स यांनी दिले आहे आणि गीत रश्मी विरागने लिहिले आहे. या गाण्यात हिमांशू कोहली, आरुषी निशंक आणि रोहित सुचांती सारखे कलाकार दिसले.
बेदर्दी से प्यार का
हे गाणे ८ जून २०२१ रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाले होते, ज्याला आतापर्यंत ३९१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात गुरमीत चौधरी, शरिन आणि कशिश सारख्या अभिनेत्री दिसल्या. या गाण्याचे संगीत मीत ब्रदर्स यांनी दिले आहे आणि ते मनोज मुंताशीर यांनी लिहिले आहे. हे गाणे देखील वेदनादायक आणि बेवफाईवर आधारित आहे.
दिल लौटा दो
हे गाणे १६ ऑगस्ट २०२१ रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले. हे गाणे जुबिन नौटियाल आणि पायल देवने गायले आहे. हे गाणे कुणाल वर्मा यांनी लिहिले आहे आणि संगीत पायल देवने दिले आहे. या गाण्यात सनी कौशल आणि सैयामी दिसले. या गाण्याला आतापर्यंत १७० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे गाणे प्रत्येक तुटलेल्या मनाच्या प्रेमीच्या हृदयाला स्पर्श करते.