Home Blog Page 37

दराच्या पेचात अडकली नुकसान भरपाई, एक लाख हेक्टरवरील पिकांची हानी; कृषी विभागाने मागितले मार्गदर्शन

0

एक मार्च ते १० जून या काळात राज्यातील शेतकऱ्यांची एक लाख हेक्टरवरील पिकांचे अवकाळी व मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. काही जिल्ह्यांनी जुन्या व नव्या दराप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे पेचात सापडलेल्या कृषी विभागाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई नेमकी कोणत्या निर्णयानुसार द्यायची, याचे सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे. निकषांतील बदलांमुळे मार्च ते मे महिन्यातील बाधित शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही.

राज्यातील १९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अवकाळी व मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे काही जिल्ह्यांनी पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत, पण त्यात जुन्या शासन निर्णयानुसार दोन हेक्टरपर्यंत मदत मागण्यात आली आहे. कारण, ३० मे रोजी सरकारने बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जिरायती जमिनीसाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायती जमिनीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांचीच मदत अपेक्षित आहे. या शासन निर्णयापूर्वी बाधित क्षेत्राची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत होती आणि त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपयांची मदत अपेक्षित होती. मात्र, आता शासन निर्णयातील बदलामुळे कृषी विभागाचे अधिकारी देखील पेचात सापडले आहेत. खरीप २०२६ च्या हंगापासून हा निर्णय लागू राहील, असे त्या शासन निर्णयात नमूद आहे.

‘ई-पीक पाहणी’वर नोंद असलेल्यांनाच भरपाई

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्रात जाऊन ज्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे, त्याची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, यापुढे कृषी विभागाच्या ई-पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांच्या ज्या पिकांची नोंद आहे, तीच ग्राह्य धरली जाणार आहे. सातबारा उताऱ्यावर व या ॲपवरील पिकांची नोंद एकच असेल तरच शेतकऱ्यास भरपाई किंवा पीकविमा मिळणार आहे.

वडील क्लास -१ अधिकारी, आई प्राध्यापिका तरी दर्जदार शिक्षणासाठी मुलीचा ZP शाळेत प्रवेश

0

बीड: दर्जेदार जिल्हा परिषद शाळा डावलून अनेक पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. मात्र, याला देशमुख दाम्पत्य अपवाद ठरले आहे. अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये जेष्ठ अधिव्याखाता श्रीकिशन देशमुख आणि लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्राध्यापक किरण तौर देशमुख यांनी आपल्या सानिका या पाच वर्षीय मुलीचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शहरापासून जवळ गुजर पंचशील नगर शाळेत पहिलीच्या वर्गात आज, सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी सानिकाचा प्रवेश झाला.

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत असताना अशा प्रकारचा निर्णय ज्येष्ठ अधिव्याखाता श्रीकृष्ण देशमुख यांनी घेतला. ही बाब कौतुकास्पद मानली जात आहे. विशेष बाब, म्हणजे श्रीकिशन देशमुख यांच्या पत्नी किरण तौर देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात. सधन असताना देखील देशमुख दाम्पत्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सानिका या मुलीचा प्रवेश माजलगाव शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या सावरगाव केंद्र अंतर्गत गुजर पंचशील नगर येथील शाळेत घेतला आहे. तिला शाळेत येणजाणे करण्यासाठी रिक्षाची देखील सोय त्यांनी केली आहे. उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या निर्णयाचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कौतुक होत आहे.

मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी

इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी मशीन सारखे घडवले जातात. त्यामुळे लहान मुलांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. माझे शिक्षण देखील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.

– श्रीकिशन देशमुख , सानिकाचे वडील

भुशी डॅम १५ दिवस अगोदर ओव्हर फ्लो! ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

0

पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण हे १६ जून रोजी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. मागील महिनाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता.लोणावळ्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळ पर्यंत १४३सेंमी(५. ६३ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच सहारा पुल धबधबा व भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. सकाळच्या वेळेत धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा आनंद अाज (सोमवारी) पर्यटकांना घेता आला. मागील आठवड्यांपासून पर्यटक भुशी धरण भरण्याची वाट पाहत होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करत होते. मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतिक्षा संपवली.

 मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे. संततधार कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरातील धबधबे मोठ्याप्रमाणात वाहू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरणही ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. धरण‍ाच्या सांडव्यावरुन पायर्‍यांवर पाणी वाहू लागले आहे. पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील दोन वीकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी जोरात पाऊस असल्याने अनेकांना वाटत होते की भूशी धरण अोव्हरफ्लो होईल मात्र भुशी धरण भरलेलं नसल्यामुळे पर्यटकांना हवा तसा आनंद घेता आला नाही. पण आता भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.आज (सोमवारी) धरणाच्या पायर्‍यांवरून पाणी अोसांडून वाहताच पर्यटकांनी यथेच्छ भिजण्याचा आनंद घेतला असून येथील लहान मोठ्या व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

बाप म्हणाला मला चिंता, मुलगी म्हणाली मी पप्पा! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

0

‘मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन’ असे म्हटले जाते. पण, या बुरसट वाक्प्रचाराला बाजूला सारून अक्षराने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी वडिलाला मोठा आधार दिला. यामुळे मुलीही काही कमी नसतात, हे यातून स्पष्ट होते.

काळ बदलला असल्यामुळे आता आधुनिक पद्धत समोर आली असून, बहुतांश शेतकरी यंत्राच्या साह्याने शेती करू लागला आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगाम सुरू असून, पेरणीची लगबग सुरू आहे. परंतु, अशा लगबगीत आपले कसे होईल?, सोयाबीन लागवड वेळेवर होईल का?, मजूर मिळतील का?, मिळाले तर किती मजुरी मागतील?, असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी अंकुश खिल्लारी यांना सतावत होते. अशावेळी मुलगी अक्षराला वडिलाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसल्या. यावेळी तिने बाबा चिंता कशाला करता?, असे म्हणत टोकणयंत्राचे एक टोक स्वतःच्या हाती घेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी बापाला मोठा आधार दिला. आपल्या मुलीचा पराक्रम पाहून कपाळावर उमटलेल्या चिंतेच्या रेषा काही क्षणांतच गायब झाल्या.

माशांना पोहणे शिकवायचे नसते…

पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरणीसाठी ट्रॅक्टरची मजुरीचा खर्च, खत, बियाणे जास्त लागतात. त्यामुळे खर्चही वाढत जातो. याउलट गादीवाफा (बेड) जोडवळ पद्धतीने टोकण केल्यास ट्रॅक्टर मजुरी व खत बियाणांच्या खर्चात मोठी बचत होते. दुसरीकडे उत्पन्नही वाढून मिळते. पाण्याचा निचरा होत असल्याने अतिवृष्टी, सतत पावसामुळे पिकाची नासाडी होत नाही. त्यामुळे सध्या बरेच शेतकरी टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीवर भर देत आहेत. हे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्षरा खिल्लारी हिला ज्ञात असल्याने तिने आपल्या कष्टकरी शेतकरी वडिलाला मदत करण्याचे ठरविले आणि मुलगीही कमी नाही हे दाखवून दिले.

पाच तासांत तीन एकर सोयाबीन लागवड…

वडिलांना बेडवर टोकणयंत्र धरले तर समोर बांधण्यात आलेली काढीची एक बाजू हातामध्ये धरून अक्षराने एका शेतमजुरासोबत टोकणयंत्र ओढणे सुरू केले. सकाळी साडेअकरा वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पाच तासांमध्ये तीन एकरांवर सोयाबीनची लागवड केली.

मोसमी वाऱ्यांची आगेकूच; संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मोसमी पावसाने व्यापला

0

मागील अनेक दिवसांपासून प्रवास मंदावलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी अखेर आगेकूच केली. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मोसमी पावसाने व्यापला आहे. तर, विदर्भातील बहुतांश भाग मोसमी पावसाने व्यापला. दरम्यान, मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

यंदा मोसमी पाऊस लवकर म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली. केरळच्या बहुतेक भागासह उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत मोसमी वारे धडकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी मोसमी पावसाचे राज्यात म्हणजेच, देवगड तसेच कर्नाटक आणि संपूर्ण गोव्यात आगमन झाले.

लगेचच दुसऱ्या दिवशी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला. मात्र २६ मेनंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला होता. मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नव्हती. त्यानंतर साधारण २० दिवसांनी म्हणजेच सोमवारी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली.

मोसमी पावसाने सोमवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला असून विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. याचबरोबर सौराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मोसमी पावसाने प्रगती केली आहे. दरम्यान, अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. विदर्भातील काही भागात मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा सोमवारी गुजरातमधील वेरावल, भावनगर आणि वडोदरा, तर मध्य प्रदेशातील खरगोन, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगडमधील दूर्ग, ओडिशातील बारगर आणि चांदबली तसेच पश्चिम बंगालमधील बालूरघाट भागात होती. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने मोसमी पाऊस पुढील एक दोन दिवसांत विदर्भाचा उरलेला भाग व्यापेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशतील आणखी काही भागात पाऊस दाखल होईल.

पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा काही भाग, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. परिणामी पावसाचा जोर वाढलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे भागात मंगळवारपासून गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जागृती आणि सृजनशीलता वाढवत डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल सुरू

0

कर्वेनगर प्रभागातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला. पुणे शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपप्रशासकीय अधिकारी श्री. धनंजय परदेशी, वारजे कर्वेनगर परिसराच्या पर्यवेक्षिका अरुणा राईंज, सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय चौधरी, कार्यक्रमाच्या नियोजन कर्त्या मुख्याध्यापिका सौ. लीना देशमुख, सूत्रसंचालिका सहशिक्षिका राजश्री भोसले, आभार मानताना शिक्षिका प्रीती थोरात तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल ज्युनिअर केजी ते इयत्ता चौथी या वर्गांतील मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना सर्व चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून अनोख्या पद्धतीने शैक्षणिक वर्षांत प्रवेश केला. विद्यार्थी वर्गातील जागृती आणि सृजनशीलता वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम मुलांच्या तसेच पालकांच्या विशेष पसंतीस उतरल्याने परिसरात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.

याप्रसंगी मुलांचे स्वागत व मुलांना पाठ्यपुस्तके-शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यासाठी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) मा. श्री. ओमप्रकाश दिवटे सरांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षक वृंदाला मार्गदर्शन केले. शाळेचा आजवरचा प्रवास तसेच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक महापालिका आयुक्त श्री. दीपक राऊत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास ज्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर शैक्षणिक संकुल सत्यात उतरले त्या माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष श्री. स्वप्नील दुधाने यांनीही उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला.

शेती म्हणजे व्यवसाय! Go Farmly च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवसंजीवनी

0

नारायणगावमध्ये शेतकरी मेळावा; आधुनिक शेतीच्या नवदिशा, प्रशांत गवळींच मार्गदर्शन

समर्थ क्रॉप केअरचे संचालक प्रशांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगावमधील गो फार्मली कार्यालयाजवळ भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्दिष्ट होते की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल आणि शेतीमध्ये किफायतशीरतेने उत्पादन कसे वाढवता येईल यावर चर्चा करणे.

प्रशांत गवळी यांनी आपल्या साध्या भाषेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पारंपरिक पद्धतींमधून बाहेर येत, कसे आधुनिक शेती तंत्र अंगीकारता येईल, त्यातून नफ्याचे गणित कसे उभे करता येईल याचे मार्गदर्शन त्यांनी केले. शेतीचं योग्य मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कसे करावे याचेही सखोल मार्गदर्शन यावेळी त्यांनी दिले.

त्यांनी Go Farmly अ‍ॅप बद्दल माहिती देताना, शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे फायदे सांगितले. शेती उत्पादनांची विक्री, ट्रेडिंग आणि कायदेशीर बाबतीत खबरदारी यावर देखील त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

तसेच, तरुणांनी शेतीकडे वळावे, ही परंपरा टिकवावी आणि नव्या युगातील डिजिटल शेती व अ‍ॅग्रीटेक उपायांचा वापर करून आपल्या क्षेत्रात भरभराट करावी असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी बांधवांनी देखील त्यांच्या प्रश्नांची विचारणा करत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शंकांचे निरसन करत, गवळी यांनी उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा दिली. शेती ही केवळ पिढीजात परंपरा नसून, ती नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी ठामपणे सांगितले.

शार्दुल ठाकुरसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? शुभमन गिल नीतीश रेड्डीला ठेवणार का बाहेर?

0

“रंग जमा है, रंग जमेगा!” – या ओळी सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या अष्टपैलू शार्दुल ठाकुर याच्यासाठी सार्थ ठरत आहेत. इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये त्याने केलेल्या १२२ धावांच्या खेळीने सर्वांची नजर त्याच्या कामगिरीकडे वळवली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

जर शार्दुलला अंतिम संघात स्थान दिलं गेलं, तर नीतीश कुमार रेड्डी याला बाहेर बसावं लागू शकतं. कारण दोघांचं संघातील स्थान अष्टपैलू म्हणून सारखंच आहे. नीतीशने ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावलं असलं, तरी सध्याचा फॉर्म आणि इंग्लंडमधील अनुभव शार्दुलच्या बाजूने झुकतो आहे.

शार्दुलला संघात घेण्याची कारणं:

  • अप्रतिम फॉर्म – नुकत्याच इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये १२२ धावांची स्फोटक खेळी.
  • इंग्लंडमधील अनुभव – इंग्लंडमध्ये आधी ३ कसोटी सामने खेळले आहेत.
  • प्रेशरमध्ये परफॉर्म करण्याची क्षमता – रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन यांच्यासारखे अनुभवी खेळाडू अनुपस्थित असल्यामुळे अनुभवी अष्टपैलूची गरज.

नीतीश रेड्डीला बाहेर ठेवण्यामागचं कारण:

  • इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
  • सध्याच्या फॉर्ममध्ये शार्दुल अधिक प्रभावी.
  • संघातील ताळमेळ राखण्यासाठी एकच अष्टपैलू पुरेसा.

शुभमन गिलचा निर्णय ठरणार निर्णायक
भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल आपल्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच संघ निवडणार आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या निवडीबाबत शार्दुलचा अनुभव आणि फॉर्म पाहता, गिल त्याला संधी देण्याची शक्यता अधिक आहे.

डिसेंबर २०२३ नंतर प्रथमच शार्दुल ठाकुरला भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळणार आहे. घरगुती आणि काउंटी क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने ही संधी मिळवली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शार्दुलला संधी मिळाल्यास, तो फलंदाज व गोलंदाज म्हणून भारतीय संघासाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.

वाघोली पोलिस ठाणं – छताशिवाय प्रशासन! खुल्या आकाशाखाली काम करत आहेत अधिकारी, मूलभूत सुविधा नाहीत

0

उद्घाटनाच्या गाजावाज्यानंतरही ठाण्याची स्थिती बिकट, तरुण समाजकार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना जर स्वतःच्याच कामाच्या जागी बसायला जागा, प्यायला पाणी, वावरण्यासाठी छप्पर नसेल, तर काय म्हणावं? पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्याची ही विदारक स्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकाऱ्यांना उघड्यावर, उन्हातान्हात, खुर्च्या टाकून काम करावं लागत आहे.

उद्घाटन मोठं, पण अंमलबजावणी शून्य!
वाघोली पोलिस ठाण्याचं स्वतंत्र उद्घाटन ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात झालं. पुण्यातील नांदेड सिटी, बाणेर, खळदपाडळ, फुरसुंगी, खराडी, आंबेगाव आणि वाघोली — या सात नव्या पोलिस ठाण्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शिवाजीनगर मुख्यालयात पार पडला. परंतु प्रत्यक्षात वाघोली पोलिस ठाण्याची अवस्था अजूनही ‘चौकी’पेक्षा फार वेगळी नाही.

अधिकारी कोणत्या अडचणींना सामोरे जात आहेत?

  • कर्मचारी कमतरता – ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे, परिणामी ताणतणाव वाढतोय.
  • मूलभूत सुविधा नाहीत – स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, बसण्यासाठी योग्य जागा, नागरिकांसाठी समुपदेशन कक्ष… काहीच नाही!
  • ढासळलेली पायाभूत व्यवस्था – अर्धवट उभारणी, छप्पर नसलेली जागा, कुठेही नागरिकांची गोपनीयता राखली जात नाही.
  • खुल्या आकाशाखाली कार्यालय – काही खुर्च्या टाकून अधिकारी तक्रारींची नोंद घेतात.

स्थानिक युवकांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत
वाघोलीतील तरुण समाजसेवक ओंकार तुपे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ही स्थिती पाहून आश्चर्यचकित झाले. ठाणे अमलदार फाईल्स घेऊन बाहेर बसलेले दिसले. “हे अधिकारी रात्रंदिवस सेवा देतात, पण त्यांना स्वतःसाठी नीट जागा नसेल तर हे दुर्दैवच आहे. आम्ही फोटो मुख्यमंत्र्यांना मेल केले आणि त्वरित कारवाईची मागणी केली,” असं तुपे म्हणाले.

“या अवस्थेमुळे पोलिसांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्याचे त्रास होण्याची शक्यता वाढते. अशा तणावाखाली सतत काम करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं,” असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिस उपायुक्तांचं स्पष्टीकरण
पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी परिस्थितीची कबुली दिली. ते म्हणाले, “सध्या जे ठिकाण वापरात आहे ते पूर्वीची चौकी होती. नव्या ठाण्याच्या इमारतीसाठी जागा मंजूर झाली आहे. मोजमाप प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, तात्पुरती जागा शोधत आहोत.”

“एक पोलिस ठाणं म्हणजे फक्त ऑफिस नाही, तिथे पार्किंग, मुद्देमाल साठवण्यासाठी जागा, तक्रारी घेण्याची सोय लागते. त्यामुळे तीव्र गरज आहे की ठोस उपाययोजना त्वरीत राबवाव्यात,” ते पुढे म्हणाले.

काय गरज आहे?

  • नवीन इमारतीचे त्वरित काम सुरू करणे
  • तात्पुरती जागा देऊन सन्मानजनक कामकाज सुरू ठेवणे
  • मूलभूत सुविधा जसे की पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वेटिंग एरिया उपलब्ध करून देणे
  • कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे

उद्घाटनानंतर वर्ष उलटूनही वाघोली पोलिस ठाणं अद्याप उघड्यावरच काम करतंय. पोलिसांप्रमाणेच त्यांच्या कार्यस्थळालाही सुरक्षितता आणि सन्मान हवा. हा मुद्दा केवळ प्रशासनाचा नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचा आहे.

महाराष्ट्रात बेरोजगारीचा भीषण स्फोट: २०२५ मध्ये ७१ लाखांहून अधिक बेरोजगार तरुण नोंदणीकृत

0

शिक्षण घेतलेले लाखो तरुण-तरुणी रोजगाराच्या प्रतिक्षेत, सरकारी आकडेवारीने उघड केला वास्तवाचा चेहरा

एकीकडे देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गरिबी आणि बेरोजगारी कमी होत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र बेरोजगारीने भीषण रूप धारण केल्याचे धक्कादायक वास्तव राज्य सरकारच्या आर्थिक पाहणीतून समोर आले आहे. २०२५ च्या जानेवारी महिन्यापर्यंत राज्यातील तब्बल ७१.७ लाख बेरोजगार युवकांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडे नोंदणी केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ पटीने वाढ
२०२४ मध्ये बेरोजगारांची नोंदणी फक्त १०.२१ लाख होती. त्यामानाने २०२५ मध्ये ही संख्या सात पट अधिक वाढली आहे, हे राज्यातील रोजगार व्यवस्थेतील अपयशाचे स्पष्ट लक्षण आहे.

शिक्षण असूनही बेरोजगारी: उच्चशिक्षितही रांगेत
नोंदणीकृत बेरोजगारांमध्ये शिक्षणाची विविध पातळी असलेले उमेदवार आहेत. त्यामध्ये:

  • १८,००,९७१ बेरोजगारांनी माध्यमिक शिक्षणाआधीच शिक्षण सोडले आहे, त्यापैकी ४.३८ लाख महिला आहेत.
  • १० वी उत्तीर्ण बेरोजगारांची संख्या १४.४७ लाख असून, त्यात ४.३४ लाख महिला आहेत.
  • १२ वी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या १५.५७ लाख आहे.

या व्यतिरिक्त तांत्रिक शिक्षण घेतलेले आणि उच्चशिक्षित उमेदवार देखील रोजगाराच्या शोधात आहेत:

  • इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी डिप्लोमा धारक – ३.०४ लाख (त्यात १.६२ लाख महिला)
  • पदवीधर (इंजिनीअरिंग, मेडिकल, इतर) – ९.८६ लाख (त्यात ३.४३ लाख महिला)
  • पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार – १.८८ लाख (त्यात ७०,०९५ महिला)

रोजगार आहेत, पण भरती नाही!
कौशल्य विकास आणि रोजगार आयुक्तालयाच्या माहितीनुसार, नोंदणी आणि रोजगार यामध्ये मोठा तफावत आहे.

२०२४ मध्ये:

  • नोंदणी – १०.११ लाख
  • रिक्त पदांची नोंद – १०.९३ लाख
  • प्रत्यक्ष भरती – फक्त २.२७ लाख
  • बेरोजगार राहिले – ७.६३ लाख

२०२३ मध्ये:

  • नोंदणी – ६.६४ लाख
  • रिक्त पदांची नोंद – ८.८१ लाख
  • प्रत्यक्ष भरती – २.६३ लाख
  • बेरोजगार राहिले – ६.२७ लाख

ही आकडेवारी पाहता सरकारी व खाजगी क्षेत्रात रिक्त पदे असतानाही उमेदवारांची भरती केली जात नाही, हे वास्तव उघड होते.

सरकारच्या योजना अपुऱ्या?
राज्य सरकारने ‘महाजॉब पोर्टल’, ‘कौशल्य विकास अभियान’ आणि ‘स्टार्टअप सर्मथन योजना’ यांसारख्या विविध योजना राबवल्या आहेत. मात्र, या योजना प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उद्योग क्षेत्रात मागणीपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार उपलब्ध आहेत, पण रोजगार संधी मर्यादित आहेत. यामुळे शिक्षण प्रणाली आणि औद्योगिक गरजांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसतो.

राज्य सरकारने उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगार मेळावे, ऑनलाईन नोकरी संधी पोर्टल्स आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्या योजना यशस्वी ठरण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रशिक्षण, उद्योग-शिक्षण संलग्नता आणि सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक आहे.