Home Blog Page 28

भारती विद्यापीठ यशवंतराव मोहिते महाविद्यालय 1978 ते 1983 बॅच विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार

0

भारती विद्यापीठाचे यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचे 1978 ते 1983 मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच भुकूम येथील श्री चंद्रकांत भरेकर व विठ्ठल भरेकर यांच्या तन मन आयुर्वेदिक रिसॉर्ट फार्म हाऊसवर अतिशय उत्साहात आनंदात संपन्न झाला. मुंबई, सांगली, सातारा, करमाळा, मांडवगण फराटा, पुणे, नवी मुंबई, वरळी, जामखेड व पुणे जिल्ह्याच्या व शहराच्या विविध भागातून सर्व विद्यार्थी मित्र या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले होते.

प्रत्येकाने आपली ओळख व कॉलेज नंतरचा आपला जीवनपट आपल्या भाषणातून नमूद केला, या विद्यार्थ्यांमधून अनेक जण विविध पदावर काम करून रिटायर सुद्धा झाले, कुणी सामाजिक कार्यात कोणी राजकारणात, कोणी पोलीस खात्यात, कोणी महसूल खात्यात कोणी, खाजगी व्यवसायात आपापले योगदान देऊन आपला जीवनपट आपल्या भाषणातून मांडण्याचा प्रयत्न केला, अतिशय सुंदर उत्साहवर्धक आणि नवचैतन्य निर्माण करणारा असा हा मेळावा आयुष्यभर सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने संपन्न झाला या मेळाव्यासाठी गुरुवर्य प्रा.तागड सर, गुरुवर्य प्रा. शिकलगार सर व गुरुवर्य प्रा.धांडे सर या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते, सर्व प्राध्यापकांनी सुद्धा याप्रसंगी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, या मेळाव्याच्या प्रसंगी नुकतीच CEDARBROOK UNIVERCITY USA यांच्यावतीने आनंद तांबे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार गुरुवर्य प्रा. तागड सर व सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने करण्यात आला, त्याचप्रमाणे आपल्या कारकीर्दीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मांडवगण फराटा येथील विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष आबा उर्फ महादेव फराटे यांचा सुद्धा सत्कार या प्रसंगी करण्यात आला त्याचप्रमाणे पोलीस खात्यात उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे व माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बगाडे , उप पोलीस निरीक्षक जयसिंग कदम यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला या स्नेह मेळाव्यासाठी यशवंतराव मोहिते कॉलेजच्या 1983 च्या बँच चे ग्रॅज्युएट पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी या स्नेहसंमेलनासाठी दिवसभरासाठी उपस्थित होते सर्वांनी एकमेकाची ओळख करून घेत आपापल्या आयुष्यात केलेल्या कामगिरीची माहिती आपापल्या भाषणात दिली, चहा नाश्ता ,जेवण, नाच गाणे, दंगामस्ती, फुल एन्जॉय दिवसभर सर्वांनीच केला. या स्नेह मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले विठ्ठल भरेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रदीप भोईटे, बंडू हरपुडे ,दत्ता गांधी, सुरेश मिरगे, कैलास ढमाले तसेच या स्नेह मेळाव्याची संकल्पना मांडणारे पांडुरंग निकम यांचेही या प्रसंगी आभार मानण्यात आले, अतिशय उत्साहात आनंदात आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देत भविष्यकाळात पुन्हा पुन्हा भेटण्याचा एकमेकांना शब्द व आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली, पुढील स्नेह मेळावा माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांच्या फार्म हाऊस वर संपन्न होईल असे स्वतः सुरेश मिरगे यांनी याप्रसंगी सांगितले.

एकीकडे शासकीय मोबदला अन् पुन्हा FSI ही लाटून खोट्या तक्रारीद्वारे विकसकाकडे खंडणी’: गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे विचार आणि आचरण असल्याने बनावट कागदपत्राची जुळवा जुळव करून कर्वेनगर भालेकर वस्ती मधील सर्व्हे नं. 14 मध्ये जागा मालकाने शासकीय मोबदला आणि एफएसआय असा दुहेरी मलाई कमावण्याचा कार्यक्रम यशस्वी केलेला असतानाच पुन्हा जुन्या विकसकाकडे ‘खंडणी’ मागणाऱ्या जागा मालकांच्या विरोधात पुणे न्यायालयाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पानशेत धरणफुटी नंतर पुणे शहरालगतच्या गावांमधील पुनर्वसन वसाहतीला पानवठ्याचा रस्ता म्हणून कर्वेनगर सर्व्हे क्र.१४ मध्ये शासकीय रस्ता(४० फुटी) आरक्षित करण्यात आला होता; या जागेचा शासनाकडुन मोबदला स्विकारलेला असतानाही उर्वरित जागा विकसित करताना पुन्हा त्याच जागेचा इमारतीमध्ये FSI घेऊन शासकीय यंत्रणेची फसवणूक करण्यात आली आहे. कागदपत्रांची फेरफार करून शासकीय नियमांची ‘पायमल्ली’ करत दुहेरी ‘मलाई’ लाटणाऱ्या या जागा मालकांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आल्यानंतर संबंधित जागा मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वडिलोपार्जित जमिनी स्वतः भागीदारी असलेल्या संस्थेकडे विकसित करण्यास देण्यास देऊन अन्य भागीदारी सभासदांची ही फसवणूक केली असल्याचे सुनावणीदरम्यान निष्पन्न झाले. वडिलोपार्जित मिळकती विकसित झाल्यानंतर संबंधित भागीदारी व्यवसायातून कायदेशिर निवृत्ती घेऊन सर्व हक्क संपुष्टात आल्यानंतरही तब्बल 14 वर्षांनी खोट्या व बनावट तक्रारी करून त्या मागे घेण्यासाठी ‘खंडणी’ मागणे, धमकावणे यासह न्यायालय, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग आणि ‘महारेरा’कडे खोट्या व बनावट तक्रारी करून खोट्या नोटीसा, ब्लॅकमेलिंग इ. गुन्हेगारी कृत्याच्या अनुषंगाने आरोपी गोरख नारायण भालेकर, राजेंद्र नारायण भालेकर, सौ. रेशमा गोरख भालेकर (सर्व रा. जकात नाका, कर्वेनगर, पुणे) कुणाल सुनिल सरवदे (रा. बहुली, पुणे) शशिकांत राघू सरवदे रा. बहुली पुणे), रफीक जमादार (रा. वारजे पुणे) या ६ जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३च्या कलम २२७, २२८, २३६, २४६, ३०६(२), ३१८(३), ३५१(३), आर/डब्ल्यू. कलम ३(५) अंतर्गत दंडनीय गुन्हे केले आहेत. म्हणून, आरोपी क्रमांक १ ते ६ वरील बी.एन.एस.एस. च्या कलम २२७ नुसार पुणे न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी भूसंपादित जागेबाबत दि. 30/8/2021 रोजी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे फिर्यादी श्री. बाळासाहेब बबनराव बराटे (रा. कर्वेनगर, पुणे) यांनी तक्रार अर्ज दिला. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच फिर्यादी व त्यांचे व्यवसायिक भागीदार, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या विरोधात वकिलामार्फत खोट्या नोटीसा पाठवणे, खोटे कोर्ट केसेस या संदर्भात फिर्यादीने अॅड. सचिन ताठे यांच्या मार्फत पुणे येथील न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील ६जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

प्रत्येक महिलेसाठी योगाभ्यास करणे गरजेचा; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

0

महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. मानसी उपक्रमामुळे कोथरुड मधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून, आगामी काळात पुणे शहरात ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या ‘मानसी’ उपक्रमातील मुलींचे एकत्रिकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी माजी नगरसेविका मोनिका वहिनी मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, योग गुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. स्त्रित्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना, अशा विविध आव्हानांवर मात करत, त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील १००० मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे आणि शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक

0

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान दिलं. त्यांनी हिंदी चित्रपटातील एक डायलॉग सांगत, “ये, मार मुझे!” असं म्हटलं. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही संपलेल्या माणसाला मारत नाही. लोकांनी त्यांना आधीच नाकारलं आहे.”

शिंदे यांनी शिवसेना हेच खरे पक्ष असल्याचा दावा करत, बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आपण पुढे नेत असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की, “धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि लोकांचाही पाठिंबा आपल्याला आहे.”

या कार्यक्रमात काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसोबत युतीमध्ये लढण्याचे संकेत दिले.

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कोणत्याही हल्ल्याला तयार आहोत, पण आमच्यात अजून ताकद आहे.”

दरम्यान दोन्ही गटांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. ही शाब्दिक चकमक पाहता, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून रस्त्यावरच्या मुलांसाठी ‘मोबाईल स्क्वॉड’ योजना; ३१ व्हॅनद्वारे सेवा सुरू

0

राज्य सरकारने रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ किंवा अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील मुलांसाठी ‘मोबाईल स्क्वॉड’ नावाची एक अभिनव योजना सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना पोषण, आरोग्यसेवा, शिक्षण व सामाजिक सुरक्षा देणे आहे.

काय आहे ‘मोबाईल स्क्वॉड’ योजना?
महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या या योजनेत NGO मार्फत बालमित्र व्हॅन्स रस्त्यावर फिरणार आहेत. प्रत्येक व्हॅनमध्ये एक समुपदेशक, शिक्षक, देखभाल करणारा व्यक्ती आणि ड्रायव्हर असणार. या व्हॅनमध्ये २५ मुलांना सामावून घेण्याची क्षमता असेल.

कोणत्या मुलांना मदत केली जाणार?
या मोबाईल स्क्वॉडद्वारे खालील प्रकारातील मुलांची ओळख पटवली जाईल:

  • रस्त्यावर राहणारी/भिक मागणारी मुले
  • बालमजूर, वाहने थांबवून वस्तू विकणारी मुले
  • वेश्यावस्तीतील मुले
  • व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्याची गरज असलेली मुले
  • झोपडपट्टीत राहणारी पण कामाला लावलेली मुले

कशी असेल कार्यपद्धती?

  • मुलांचा आधी संपर्क करून पालकांची संमती घेतली जाईल
  • वैद्यकीय गरज असल्यास रुग्णालयात नेले जाईल
  • साहित्य, नाटक, गाणी, कविता, कला, क्रीडा यांचा माध्यमातून त्यांच्यात आवड निर्माण केली जाईल
  • रोज स्नान, हात धुणे, स्वच्छता, नखं कापणे अशा वैयक्तिक स्वच्छतेची सवय लावली जाईल
  • नंतर पालकांना समजावून मुलांना सरकारी शाळा, अंगणवाडी किंवा बालवाडीत प्रवेश मिळवून दिला जाईल

पायलट प्रोजेक्टचा यशस्वी अनुभव
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “या उपक्रमाचा प्रारंभ प्रायोगिक तत्वावर झाला होता आणि आतापर्यंत ३,८१३ मुलांचे समुपदेशन करून त्यांना शाळेत प्रवेश दिला गेला आहे. आता यश पाहून संपूर्ण राज्यातील २६ शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.”

सुरक्षा उपाय आणि नियमावली

  • प्रत्येक फेरीपूर्वी स्थानिक पोलिसांना माहिती देणे बंधनकारक
  • प्रत्येक व्हॅनमध्ये २ महिला सदस्यांची उपस्थिती अनिवार्य
  • व्हॅनमध्ये GPS ट्रॅकिंग आणि CCTV कॅमेरे अनिवार्य

बजेट आणि कार्यक्षेत्र

  • एकूण ₹८.०६ कोटींचा निधी मंजूर
  • २९ महापालिकांमध्ये ३१ मोबाईल व्हॅन्स कार्यान्वित
  • मुंबईत एकेक व्हॅन सिटी, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात
  • पुढच्या टप्प्यात नगर परिषद क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांवर योजना वाढवण्यात येणार

पुणे-सातारा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण; प्रवाशांना मिळणार दिलासा

0

मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील 145 किलोमीटर लांब दुहेरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला असून, प्रवाशांना आता विलंब आणि ट्रेन रद्द होण्याच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

17 जून रोजी सुरक्षा मंजुरी
पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी माहिती दिली की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 17 जून रोजी नव्या दुहेरी मार्गाची तपासणी करून सुरक्षा मंजुरी दिली आहे. आता लवकरच यावर रेल्वे आणि तांत्रिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर नियमित गाड्यांचे संचालन सुरू होईल.

खर्च दुपटीने वाढला, पण काम पूर्ण
या प्रकल्पासाठी सुरुवातीला ₹2,480 कोटींचा अंदाजित खर्च होता. मात्र काम आठ वर्षांपेक्षा जास्त काळ चालल्यामुळे आणि विविध अडथळ्यांमुळे हा खर्च वाढून जवळपास ₹4,800 कोटींवर पोहोचला आहे. एकूण 280 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले आहे.

प्रवाशांना दिलासा
या मार्गावर नियमित प्रवास करणारे किशोर मारणे यांनी सांगितले, “सिंगल ट्रॅकमुळे सतत होणारा विलंब त्रासदायक होता. आता दुहेरी मार्ग झाल्यामुळे गाड्या वेळेवर धावतील, रद्द होण्याचं प्रमाण कमी होईल, आणि प्रवास अधिक सोयीचा होईल अशी अपेक्षा आहे.”

मुख्य ठळक बाबी:

  • पुणे-सातारा मार्गाचे 145 किमी दुहेरीकरण पूर्ण
  • रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी
  • ₹4,800 कोटींचा खर्च
  • नियमित गाड्यांचे वेळापत्रक अधिक विश्वासार्ह होणार

सर्वात मोठी चोरी! १६ अब्ज गुगल, अॅपल आणि फेसबुक खात्यांची माहिती लीक

0

गुगल, अॅपल आणि फेसबुकसारखी अकाउंट्स वापरणाऱ्या १६ अब्ज वापरकर्त्यांची लॉगिन माहिती आणि पासवर्ड चोरीला गेले असल्याचं समोर आलं आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी पासवर्ड चोरी मानली जात आहे.

डार्क वेबवर विक्रीला उपलब्ध
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी उघड केलं आहे की ही माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यात Google, Apple, Facebook, GitHub, Telegram आणि अनेक सरकारी संस्थांच्या लॉगिन डिटेल्सचा समावेश आहे.

काय धोका आहे?

  • फिशिंग अ‍ॅटॅक (खोट्या लिंकवर क्लिक करून फसवणूक)
  • ID चोरी
  • तुमचं अकाउंट हॅक होऊन दुसऱ्याच्या ताब्यात जाणं

हे कसं घडलं?
फोर्ब्सच्या अहवालानुसार, ३० वेगवेगळ्या डेटासेटमधून ३.५ अब्ज पेक्षा जास्त रेकॉर्ड लीक झाले. हे सर्व इन्फो-स्टिलर मालवेअर (सॉफ्टवेअर जे माहिती चोरतं) मुळे झालं आहे.

आता काय कराल?
तुमचं अकाउंट लीक झालं आहे का हे तपासण्यापेक्षा, पुढील गोष्टी लगेच करा:

  • सर्व खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला.
  • ‘2-Step Verification’ (OTP द्वारे खात्री) ऑन करा.
  • Passkeys वापरा – हे पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित.
  • संशयास्पद ईमेल किंवा लिंकवर क्लिक करू नका.

गुगल आणि इतर कंपन्यांनी वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षित राहा आणि डिजिटल सावधगिरी बाळगा!

एअर इंडियाकडून नियमभंग; तीन विमानांनी तपासणी न करताच केले उड्डाण, DGCA ची तंबी

0

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात आता आणखी एक मोठी चूक समोर आली आहे. भारताच्या नागरी विमानन विभागाने (DGCA) एअर इंडियाला तंबी दिली आहे की, त्यांनी तिन एअरबस विमानांची वेळेवर सुरक्षा तपासणी न करता ती उड्डाणासाठी वापरली.

तपासणी न करता विमानांचे उड्डाण

  • DGCA च्या तपासणीत असं समोर आलं की, विमानातील ‘इमर्जन्सी स्लाइड’ (आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारी स्लाइड) तपासायची होती, पण ती तपासली गेली नाही.
  • एका विमानाची तपासणी एक महिना उशिरा करण्यात आली.
  • दुसऱ्या विमानात ही तपासणी तीन महिने उशिरा केली गेली.
  • तिसऱ्या प्रकरणात २ दिवसांचा उशीर झाला.

तरीही ही विमाने दुबई, रियाध, जेद्दा यांसारख्या परदेशी आणि देशांतर्गत मार्गांवर उड्डाण करत राहिली.

DGCA ची नाराजी
DGCA ने म्हटलं आहे की, ही विमाने अवैध किंवा वेळेच्या बाहेर असलेल्या सुरक्षा उपकरणांसह उडवली गेली, जे सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन आहे. तसेच, एअर इंडियाने वेळेत स्पष्टीकरणही दिलं नाही, म्हणून त्यांना तंबी देण्यात आली आहे.

एअर इंडियाचं स्पष्टीकरण
एअर इंडियाने सांगितलं की, ते सर्व देखभाल कागदपत्रे आणि तपासणीची माहिती पुन्हा एकदा तपासत आहेत, आणि लवकरच सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

अहमदाबाद अपघाताबाबत कंपनीचं म्हणणं
12 जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताबाबत कंपनीचे CEO म्हणाले की, त्या विमानाची सर्व तपासणी झाली होती आणि काहीही त्रुटी नव्हती. तरीही आता 15% मोठ्या (वाइडबॉडी) विमानांच्या उड्डाणांमध्ये तात्पुरती कपात करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा चुकांपासून बचाव होईल.

संपूर्ण प्रकरणातून हे स्पष्ट होतं की, हवाई सुरक्षेकडे थोडं दुर्लक्ष झालं असून DGCA ने योग्य वेळी हस्तक्षेप करून तंबी दिली आहे. यानंतर एअर इंडिया अधिक जबाबदारीने काम करेल, अशी अपेक्षा आहे.

प्रभाग ११ची अनोखी नाळ: ‘राम’राज्य ‘चंद्र’छायेचे कदम अन् समाजसेवी वारश्याचे ‘हात’!

0

‘……कोथरूड!’ म्हटलं की एक वेगळीच कल्पना सर्वांचे मनात येते मग ती राजकीय असू द्या किंवा सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक! पुणे शहराचे राजकीय केंद्र म्हणून आज कोथरूडचा उदय होत असताना या भागातील नेतृत्वही तेवढे जिव्हाळ्याचं स्नेहाचा आणि समाजसेवी वारश्याच बनतय! वरकरणी पाहता उच्च-भ्रु सोसायटीचा भाग म्हणून कोथरूडची ओळख असली तरी कोथरूडच्या नसानसात कष्टकरी आणि राबणारे हातांचे जीर्ण वास्तव्य नाकारता येत नाही आणि याच जाज्वल सत्याचा हक्काचा आधार आणि जिव्हाळ्याची नाळ म्हटलं की एक नाव पुढे येते ते म्हणजे रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम! पुणे महापालिकेचे सभासद म्हणून ‘हॅट्रिक’ साजरी करणाऱ्या या नेतृत्वाने भक्कम हाताने फक्त समाजसेवी वारसा जतन केला आहे. म्हणूनच आज प्रभागाची अनोखी नाळ रामराज्य विचाराचे आणि चंद्रछायेची शितलता देणारे भक्कम समाजसेवी वारशाचे ‘हात’ म्हणून अँड. चंदूशेठ कदम यांच्याकडेच पाहिले जाते. अशा या अवलिया व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोथरूड भागामध्ये माजी नगरसेवक कै. सुबराव कदम यांनी काँग्रेस विचाराची जी स्नेहवेल लावली होती त्या विचारांची जपणूक करत काँग्रेस विचाराचे जतन करून कठीण परिस्थितीमध्ये याच विचाराची वाढ करण्यासाठी अहोरात्र जनसेवेच्या व्रतामध्ये गुंतलेले हात म्हणून रामचंद्र कदम यांच्याकडे पाहिले जाते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा कार्यकर्त्यांवर चंद्रछाया निर्माण करणे आणि जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रामराज्य संकल्पनेचे जनजीवन बनवण्यासाठी काँग्रेस विचारांची जोड घेऊन प्रभाग 11 मधील सुतारदरा किष्किंधानगर जयभवानीनगर म्हातोबानगर व केळेवाडी या वस्ती विभागातील नागरिकांसाठी विभिन्न योजना आणि या भागातील मुलींचे आणि तरुणांचे प्रश्न शैक्षणिक समस्या आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस विचारांच्या जीवावर काम करत नगरसेवक आणि नागरिक यांची वेगळीच नाळ निर्माण झाली आहे. राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांनी या भागावर आपली पकड मिळवण्यासाठी आज अतोनात प्रयत्न केले आहेत, करत आहेत…. तरीही नागरिक आणि लोकप्रतिनिधींची अनोखी नाळ आजवर वृद्धिंगतच होत जाणे हे चंदूशेठ कदम यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.

लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक कोणतीही असो ‘हॅट्रिक’ नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम यांचा दृढसंकल्प काँग्रेस पक्षाचे विचार आणि प्रचार करण्यासाठी कायमच फायद्याचे झाले असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीत चंदुशेठ कदम यांनी विरोधी पक्षातून प्रबळ स्थानिक उमेदवार असतानाही उत्साहवर्धक आणि समाधानकारक वातावरण बनवण्यात यश मिळवलं होतं. पुणे महापालिका काँग्रेस नगरसेवक म्हणून गेली 15 वर्षे नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी काम करत आहेत. प्रभाग ११मध्ये एक आश्वासक चेहरा आज ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडे पाहिले जात असून वस्ती विभागात आजवर केलेली कामे हीच त्यांची जमेची ठरणार आहे.

सध्या राजकीय विरोधकांकडून हाच अभेद गड भेदण्यासाठी जंग जंग पछाडले जात असले तरीसुद्धा 2 दशकांची घट्ट विणलेली ही नाळ जराही क्षीण न होणे ही खरी विचारांची आणि स्नेहबंधाची ताकद आहे. यंदाची लढाई सर्वात बिकट असे चित्र निर्माण केले जात असले तरीसुद्धा भक्कम पुरोगामी विचारांची बांधणी असलेल्या या नेतृत्वाला मात्र आपल्या मतदारांवर प्रचंड प्रचंड विश्वास असून पुन्हा सेवेची संधी मिळण्याचीही खात्री आहे.

नागपूरमध्ये ‘चिल्लर चोर’; दारूच्या दुकानातून ३.७५ लाखांची चिल्लर चोरून पसार

0

नागपूरमध्ये एका दारू दुकानातून ४ लाख ८७ हजार रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या रकमेमध्ये तब्बल ३.७५ लाख रुपये केवळ नाण्यांच्या स्वरूपात होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी एक आरोपी राजा खान याला अटक केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसते की चोर रात्री ३:४१ ते ४:१० च्या दरम्यान दुकानाच्या शटरखालून आत घुसतो आणि ५, १० आणि २० रुपयांची नाणी वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरतो. त्यानंतर तो नाण्यांनी भरलेल्या पोत्यात घेऊन दुकानाबाहेर जातो. दुकानात दररोज ३०-३५ हजार रुपयांची चिल्लर साठवून ठेवली जात असल्याने मालकाने ती वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये ठेवली होती.

फुटेजच्या आधारे राजा खान याची ओळख पटवण्यात आली असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी काही वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीकडे अधिक चौकशी सुरू आहे.

मागील घटना

  • नागपूरमधील दारू दुकानांमध्ये चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत:
  • ६ जून रोजी एका बिअर शॉपमधून खिडकीतून घुसून २५ हजार रुपये चोरी करण्यात आले होते.
  • ह्या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे.

वाढत्या चोऱ्यांनी व्यापाऱ्यांत भीती
दारू दुकानांवर सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता पोलिसांनी या चिल्लर चोराच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे.

एकीकडे नगदी व्यवहार कमी होत चालले असतानाही, नगद चिल्लर चोरी करणारा चोर पुन्हा चर्चेत आला आहे. ‘चिल्लर’ म्हणजे किरकोळ रक्कम नव्हे, तर लाखोंच्या नाण्यांवर डोळा ठेवणारी ‘चिल्लर माफिया’ आता पोलिसांसमोर नवे आव्हान उभे करत आहे.