Home Blog Page 200

“सुरेश धस यांना ही दोन टार्गेट पुर्ण करण्यास पाठवलंय” मिडिया स्पेसची मला गरज नाही ….मी आहे तो परफेक्टच

0

मराठा समाजात फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, जरांगेंना कापायला पाठवलंय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणीतून निघालेल्या लाँग मार्चमध्ये सहभागी आंदोलकांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनीही उत्तर दिलं होतं. त्याला पुन्हा उत्तर देत आव्हाडांनी धसांवर हल्लाबोल केला आहे.

सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना म्हटलं होतं, की आव्हाड सोमनाथच्या नावानी आले आणि अक्षय शिंदेंचं गुणगाण गायलं. तसंच आव्हाडांना मोर्चाच पाहिजे असेल तर तिकडे ठाण्यात काढावा असं सुरेश धस म्हणाले होते. त्याला आव्हाडांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेश धस यांच्या ‘पोलिसांना माफ करण्याबद्दलच्या वक्तव्याला’ सोमनाथच्या आईने माऊलीने उत्तर दिलंय. त्या माऊलीला सलाम.

“अक्षय शिंदेचं मी गुणगाण गायलं नाही, तो गुन्हेगार असेल तर शिक्षा होईल. आम्ही म्हणत नाही खून झाला, न्यायाधीशांना सांगितलं की एन्काऊंटर नाही. शाळेतलं सीसीटीव्ही कुठे गेलं? का नाही आपटेची चौकशी झाली? का ती केस रजिस्टर नाही झाली?” असा सवाल आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले, मिडिया स्पेसची मला गरज नाही. अचानक माझे इन्स्टापेज सुरू होता नाही, ढोल वाजवताना, मान हालवताना….मी आहे तो परफेक्ट आहे. आपलं काम आपल्या पद्धतीनं करा. तुमचं काम एवढंच की जरांगेंना कापायचं, मराठा समाजात फूट पाडायची. हे लोकांना कळत नाही का? असं आव्हाड म्हणाले.

‘छावा’तील या डायलॉग्समध्ये बदल, काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री ‘आमीन’च्या जागी; ‘युए 16+’ रेटिंग

0

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ते दृश्य हटवण्याचा निर्णय टीमकडून घेण्यात आला. लेझीम नृत्यकला जगभरात पोहोचावी, केवळ या उद्देशाने ते दृश्य चित्रपटात समाविष्ट केल्याचं दिग्दर्शक, अभिनेत्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटातील इतरही काही दृश्ये आणि संवादांवर कात्री चालवण्यात येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही दृश्यांमध्ये आणि संवादांमध्ये बदल सुचवले आहेत.

मराठा योद्धांनी साडी नेसल्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे, त्याचं नाव सांगणारा डिस्क्लेमर समाविष्ट करण्यास सांगितलं आहे. याव्यतिरिक्त डिस्क्लेमरमध्ये हेसुद्धा स्पष्ट करण्याची सूचना दिली आहे की, या चित्रपटाचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याचा किंवा तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा नाही.

‘छावा’ या चित्रपटातील ‘हरा*****’ शब्दाला म्यूट करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही डायलॉग्समध्येही बदल सुचविण्यात आले आहेत. ‘मुघल सल्तनत का जहर’ या डायलॉगला बदलून ‘उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थें’ असं करण्यात आलं आहे.

‘खून तो आखिर मुघलों का ही है’ हा संवाद बदलून ‘खून तो है औरंग का ही’ असं केलंय. चित्रपटातील एका सीनमध्ये ‘आमीन’ या शब्दाऐवजी ‘जय भवानी’ हा शब्द वापरण्यास सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन हे बदल सुचविण्यात आले आहेत.

’16 वर्षे’ बदलून ’14 वर्षे’ असं केलंय

’22 साल का लडका’ बदलून ’24 साल का लडका’ असं केलंय

‘9 साल’ बदलून ‘कई साल’ असं केलंय

‘छावा’ला सेन्सॉर बोर्डाने ‘युए 16+’ची रेटिंग दिली आहे.

या चित्रपटाचा रनटाइम 161 मिनिटं आणि 50 सेकंद म्हणजेच जवळपास 2 तास 42 मिनिटं इतका आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनाही दाखवणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं होतं.

अखेर वन उद्यानाचा वीज पुरवठा नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्यामुळे सुरळीत; स्वतःच्या खिशातून ₹22,590

0

बावधन येथील नागरी वन उद्यान परिसरातील वीज बिल न भरल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे झाडांना पाणी देणे अशक्य झाले आणि परिणामी झाडे वाळू लागली, काही झाडे तर सुकून गेली. हे उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी रोजच्या वावराचे आणि निवांत क्षण घालवण्याचे प्रमुख ठिकाण आहे. मात्र, वीज नसल्यामुळे येथे अंधार पसरला आणि उद्यानाची दुर्दशा सुरू झाली.

ही परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहून नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी स्वतः समक्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तसेच फोनवरून सातत्याने संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या गलथान कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. परिणामी, मेहनतीने उभारलेले नागरी वन उद्यान ओसाड होण्याच्या मार्गावर होते.

नगरसेवक वेडेपाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच निर्णय होत नसल्याचे पाहून उद्यानातील हिरवाई वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातून ₹22,590 भरून वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे झाडांना पुन्हा पाणी मिळेल आणि उद्यान पुन्हा हिरवेगार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि उद्यानाचा नियमित वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या या तत्पर आणि सामाजिक जाणीवेच्या कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करून वेळेत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, आणि “पर्यावरण संरक्षण आणि लोकांसाठी उत्तम सुविधा देणे हीच आमची जबाबदारी आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आम्ही प्रशासनाकडे ठोस मागणी करणार आहोत,” असे मत दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केले.

कोथरूडचे संवेदनशील आमदार नामदार चंद्रकांतदादा पाटील संचालित ‘सुखदा’च्या प्रथम महिलेस ‘लक्ष्मी’ प्राप्ती

0

हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळेच नवरात्रोत्सव काळातही तिची मनोभावे पूजा केली जाते. तिच्या जन्मानंतर अनेक कुटुंबांमध्ये मोठा आनंद साजरा केल्याचे आपण नेहमीच पाहतो. असाच काहीसा आनंद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरु केलेल्या ‘सुखदा’ उपक्रमाचा भाग असलेल्यांना झाला आहे.‌

वास्तविक, आपल्याकडे गर्भसंस्काराला प्राचीन  काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या महिलेच्या गर्भधारणेपासून सुदृढ आणि बुद्धिमान अपत्यप्राप्तीसाठी गर्भसंस्कार हा अतिशय आवश्यक मानला जातो. कारण याच काळात तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच बाळंतपणासाठी सक्षमपणे समोर जाता यावं. योग्य आहार, योग्य व्यायाम व सर्वासाठीचे समुपदेशन याची नितांत आवश्यकता असते.

पुण्यासारख्या महानगरात प्रत्येक कुटुंबाला हे शक्य असतं असं नाही. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात गर्भधारणेपासून ते प्रसूती हे मोठं दिव्यच असतं. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात.

त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्माला येणारं बाळ हे सुदृढ असावं; यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघामध्ये ‘सुखदा’ उपक्रम कार्यान्वित झाला. या उपक्रमाचा वस्ती भागातील असंख्य महिलांना लाभ होत आहे. आज याच उपक्रमात सहभागी सौ. रजनी दिघे या महिलेची प्रसूती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाली. यावेळी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे याचा आनंद केवळ दिघे कुटुंबियच नव्हे; तर सुखदा उपक्रमाशी जोडलेला प्रत्येकजण व्यक्त करत आहेत.

या आनंदाच्या क्षणाबाबत सुखदा उपक्रमाच्या चेअरमन स्मीता पाटील म्हणाल्या की, आपल्याकडे मुलीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात भरभराट होत असते. आपल्याकडे गर्भसंस्कार हा अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.‌ यातील गर्भसंस्काराचा अर्थच हा आहे की, गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. त्यामुळे कोथरूडचे संवेदनशील आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सुखदा’ हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत गरोदर महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे; यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन, गर्भवतीस पोषक आहार, प्रसूतीनंतर योग सराव; तसेच गर्भधारणेपासून ते‌ प्रसूती औषधोपचाराचा खर्च यासर्व सुविधा मोफत करुन दिल्या आहेत आहे. तसेच, दैनंदिन तपासणीसाठी केळेवाडीत सुखदाचे अद्ययावत केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज या उपक्रमाचा पहिला प्रसाद लक्ष्मीच्या रुपाने मिळाला आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.”

यावेळी सुखदा उपक्रमातील योग शिक्षिका मुग्धा भागवत, स्त्रीरोग तज्ज्ञा अपूर्वा देशपांडे, धनश्री चितळे, भाजपा नेत्या स्वातीताई मोहोळ, सुरेखा जगताप उपस्थित होते.

काळसुर कौंढर येथे महामातांचा जयंतीमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

गुहागर दि. १० (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि विभागीय मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता राजमाता जिजाऊ, शिक्षणाची जननी माता सावित्रीबाई, महासूर्याची सावली, नऊ कोटी लेकरांची माऊली त्यागमाता रमाई या मातांचा संयुक्त जयंती महोत्सव सौ. प्रियांका दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी धम्मगिरी बुद्धविहार, मौजे काळसुर कौंढर येथे मोठ्या जल्लोषात व हर्षोउल्हासात संपन्न झाला.

सदर प्रसंगी धम्मध्वजाच ध्वजारोहण स्थानिक शाखेच्या अध्यक्षा सौ. स्मिता मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर धार्मिक पूजाविधी चंद्रकात गमरे गुरुजी (चिखली) यांनी सुमधुर व गोडवाणीने संपन्न केला, कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सहसचिव दिलीप मोहिते, विभागीय महिला मंडळाच्या कार्यकारिणीनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुणाल गमरे (चिखली) यांनी लाघवी व प्रभावी भाषाशैलीत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर पाहुण्यांचे स्वागत चंद्रकला जाधव यांनी केले.

सदर प्रसंगी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, माजी अध्यक्ष सुनील जाधव, माजी चिटणीस मनोहर मोहिते, विश्वस्त श्रीपत गोपाळ गमरे, मुंढर गावचे पोलिस पाटील निलेश गमरे, सरपंचा सौ. अमिषा गमरे, अनिल जाधव, कौंढर गावच्या सरपंचा सौ. सिया गुजर, विभाग कार्यकारिणी, महिला मंडळ, विविध शाखांचे पंचपदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी महिलांचा स्नेहमेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, दुपार नंतर दुसऱ्या सत्रात विभागीय अध्यक्ष राजू मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते, सदर सभेत मुंढर गावच्या सरपंचा अमिषा गमरे आणि कौंढर गावच्या सरपंचा सिया गुजर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी तिन्ही महामातांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत त्यांनी आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत त्यावर कशी मात केली व समाजाचे भले केले याची माहिती देत सर्व महिलांनी तिन्ही महामातांच्या जीवनावर आत्मपरीक्षण करून त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे आवाहन करीत कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.

गुहागर तालुक्यात प्रथमच बौद्धांची पतसंस्था निर्माण झाली असून तिचे भागपत्र (Share Certificate) तयार असून कार्यालयातून ते घेऊन जावेत व ज्यांच्या वर्गण्या थकीत असतील त्यांनी थकबाजी जमा करून पतसंस्थेला सहकार्य करावे असे विनम्र आवाहन पतसंस्था विश्वस्त मंडळाद्वारे करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, माजी अध्यक्ष सुनील जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. गिमवी विभाग क्र. ३च्या महिला मंडळाने कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दीपक मोहिते यांना पतसंस्थेकरिता सदिच्छा भेट म्हणून देणगीस्वरूपात टेबल फॅन दिला.

अध्यक्षीय भाषणात राजू मोहिते “भविष्यात सदर कार्यक्रमासारखे अजूनही स्तुत्य उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील तसेच त्याद्वारे विभागाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी होममिनिस्टर सारखे बुद्धीला चालना देणारे तिकीट शो, लॉटरी शो, क्यूझ शो आयोजित करू, तसेच महिलांना संधी दिली तर महिला कश्याप्रकारे कार्यक्रम यशस्वीपणे राबवू शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम होय, सर्वच महिलांनी सुनियोजित, सूत्रबद्ध, शिस्तबद्ध असा कार्यक्रम एकहाती राबवून आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली आहे” असे नमूद केले. सोबतच देवघर शाखाच्या सौ. नुतन प्रणित सावंत, पुर्वा मयुर मोहिते, काजल अशोक मोहिते, मुंढर शाखेच्या दिक्षिता सागर सुर्वे, जानवळे शाखेच्या कु. भुमिका जाधव यांनी भाषणातून तसेच मुंढर शाखेच्या सौ. सारिका राजेश मोहिते (रमाई गीत), जानवळे शाखेच्या महिला मंडळाने (सावित्रीबाई ओवी), चिखली शाखेच्या सौ. सुचिता गमरे (बुद्ध गीत), कु. नैना गमरे (रमाई गीत), कौंढर शाखेच्या रमाई महिला मंडळ (स्वागतगीत), सौ. सारिका जाधव (रमाई गीत) यांनी भाषण व गीतगायनातून शुभेच्छापर विचार व्यक्त केले तर कु. सुमेध महेंद्र मोहिते व कु. सम्यक महेंद्र मोहिते यांनी इंग्रजी भाषेतून संविधान उद्देशीका वाचन केले.

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कौंढर गाव महिला मंडळ, मध्यवर्ती महिला मंडळ, विभाग अधिकारी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, सदस्य यांचे आभार मानून कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियांका दिलीप मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

बाबासाहेबांना विश्वरत्न घडवण्यात रामजी बाबांनी पाया घातला तर रमाईने कळस चढवला – आनंदराज आंबेडकर

0

मुंबई दि. ८ (रामदास धो. गमरे) “लहान वयात असतानाच भिवा हा बुद्धिमान आहे आणि भविष्यात तो मोठा व्यक्ती बनू शकतो हे लक्षात येताच रामजी बाबांनी भिवाची म्हणजेच बाबासाहेबांच्या शिक्षणाची भूक शमवण्यासाठी रक्ताच पाणी करून, कष्ट मेहनत करून बाबासाहेबांना शैक्षणिक वस्तू, शालेय पुस्तके दिली मातीचा गोळा असलेल्या भिवाला शिक्षणाच खतपाणी देऊन त्यांनी घडवलं, रमाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्यावर तिने सून, पत्नी, आई अशी सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली, बाबासाहेब परदेशी असताना आर्थिक तंगी व वैद्यकीय सेवा न मिळाल्याने त्यांची तीन मुले मातीआड करावी लागली त्यावेळी कफन घ्यायला ही पैसा नसल्याने मातेने स्वतःच लुगड फाडुन त्यात मूल गुंडाळून त्यांना दफन केलं परंतु बाबासाहेबांच मन अभ्यासावरून विचलित होऊ नये, त्यांच्या कार्यात अडसर निर्माण होऊ नये म्हणून रमाईने त्यांना कधी कोणतीही बातमी दिली नाही स्वतः दुःख पचवून मोलमजुरी करून परिवार सांभाळला, आपला नवरा बॅरिस्टर त्याला कोणी नाव ठेवू नये म्हणून काळोखात त्या लाकडं गोळा करायला आणि शेणी थापायला जात असत व त्यातूनच बाबासाहेबांना पैसे पाठवत व तटपुंज्या शिल्लक रकमेत घर चालवत, उपाशीपोटी राहून कुटुंबाचा सर्व भार त्यांनी आपल्या खांद्यावर पेलवला, चंदनापरी झीज झीज झिजल्या त्यातून त्यांना आजार ही बळावला व त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला, आयुष्यभर फक्त त्याग हेच जीवनसुत्र बनवून माता रमाईने संपूर्ण जीवन बाबासाहेबांना व नऊ कोटी लेकरांसाठी खर्च केले, बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न घडवण्यास रामजी बाबांनी पाया घातला व आपले संपूर्ण आयुष्य त्यागणाऱ्या रमाईनेच खऱ्या अर्थाने कळस चढवला” असे प्रतिपादन प्रमुख अतिथी या नात्याने बोलत असत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महासुर्याची सावली त्यागमूर्ती माता रमाई यांचा १२७ वा जयंतीमहोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमा आरंभी धार्मिक विधी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी सुमधुर वाणीने पार पाडला, तर पाहुण्यांचे स्वागत मध्यवर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव व उपाध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी सालस वाणीने अत्यंत प्रभावीपणे केले.

 

भारतीय बौद्ध महासभा, मुंबई प्रदेश कोषाध्यक्षा दीप्ती लोखंडे या प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना यांनी माता रमाईच्या जीवनपटाची माहिती देताना अगदीच प्रभावीपणे परंतु सर्वसामान्य सर्वांनाच कळेल अश्या साध्या, सोप्या शब्दांत मांडणी करत, रमाईने जीवनातील संघर्ष, गरिबी, दुःख यांच्याशी एकहाती लढत असताना केलेला त्याग, कुटुंबाचा भार सांभाळताना होणारी ओढताण हे सर्व सहन करून पचवून, बाबासाहेबांना कश्याप्रकारे साथ दिली, बाबासाहेबांकडे शिक्षणाची मागणी करून त्या शिकल्या, शिक्षण हे क्रांती आहे म्हणून आपल्या पतीला उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन स्वतः सर्व दुःख सहन करून बाबासाहेबांना पुढे पाठवलं हा मोठा त्याग आहे, तो त्याग प्रत्येक महिलेने समजून घेतला पाहिजे तरच प्रत्येक महिला एक चांगल कुटुंब घडवू शकते असे आपले विचार मांडले. समितीचे उपसभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी माता रमाईच्या अनेक आठवणींना उजाळा देत रमाई आजारी असताना त्या बाबासाहेबांच्या आजोळी गेल्या असता तेथील अनाथाश्रमातील मुलांना सरकारी शिधा न आल्याने उपासमार होत होती त्यावेळी स्वतःच्या हातच्या पाटल्या विकून त्यांनी मुलांच्या जेवणाची सोय केली अश्या माता रमाई शेवटच्या क्षणापर्यंत केवळ इतरांसाठी जगल्या व इतरांसाठी झिजल्या अशा अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, तद्नंतर सरचिटणीस राजेश घाडगे आणि कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनीही माता रमाईच्या आठवणी ताज्या करीत आपले मौलिक विचार मांडून शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास उपकार्याध्यक्ष मनोहर स. मोरे, उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, श्रीधर साळवी, यशवंत कदम, महेश तांबे, प्रकाश कांबळे, संदेश खैरे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, भागूराम सकपाळ, अतुल साळवी, विजय तांबे, निनाद जाधव, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव, सिद्धार्थ कांबळे, सुशीलाताई जाधव, प्रमिलाताई मर्चंडे, अंजलीताई मोहिते, ज्योती तांबे, सुजाता पवार, रेश्मा जाधव, सायली साळवी, प्रज्ञा जाधव, मानसी जाधव, सरोजनी शिरगावकर, माधवी मोहिते, नीता जाधव, सोनाली गायकवाड, उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या व शिवडी गटक्रमांक १३ च्या रमाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, सभासदा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी अंजलीताई मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

रोहितच्या निशाण्यावर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड, हिटमॅन अहमदाबादमध्ये इतिहास घडवणार? जाणून घ्या सविस्तर

0

भारतीय क्रिकेट संघ मायदेशात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी अखेरचा आणि एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने याआधीचे सलग 2 सामने जिंकून मालिकेवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने दोन्ही सामने हे 4 विकेट्सने जिंकले. कर्णधार रोहित शर्मा याने दुसऱ्या सामन्यात झंझावाती शतकी खेळी करत टीम इंडियाला जिंकून दिलं. रोहितने इंग्लंडविरुद्ध 90 बॉलमध्ये 119 रन्स केल्या. रोहित या खेळीमुळे सचिन तेंडुलकर याच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ पोहचला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणार आहे. रोहितकडे तिसऱ्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकून वेगवान 11 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 11 हजार धावांचा विश्व विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे.

रोहितची वनडे कारकीर्द

रोहितने आतापर्यंत 267 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार 987 धावा केल्या आहेत. रोहित 11 हजार एकदिवसीय धावांपासून फक्त 13 धावा दूर आहे. त्यामुळे रोहितकडे इंग्लंडविरुद्ध 268 व्या सामन्यात 11 हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे.

विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड

विराट कोहली याच्या नावावर वेगवान 11 हजार एकदिवसीय धावांचा विश्वविक्रम आहे. विराटने 2019 साली पाकिस्तानविरुद्ध कारकीर्दीतील 230 व्या सामन्यात 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडुलकर याने इंग्लंडविरुद्ध कारकीर्दीतील 268 व्या सामन्यात 11 हजार धावा केल्या होत्या.

इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.

म्हणून ऋषिराज प्रायव्हेट प्लेन बुक करुन बँकॉकला गेला; तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलाने सगळं सांगून टाकलं

0

शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे काल (सोमवारी, ता-10) पुणे शहरात खळबळ उडाली. पोलिस तपासाची चक्रे वेगात फिरली. त्यानंतर चौकशीत सावंत यांचा मुलगा आपल्या दोन मित्रांसोबत खासगी विमानाने बॅकाँकला जाणार असल्याचे उघड झाले. त्यानंतर कायदेशीर पाठपुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या या नाट्यावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अखेर पडदा पडला. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे पोलिस व विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली व यंत्रणेवर मोठा ताण पडला. या प्रकरणी सर्व माहिती समोर आली. दरम्यान आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे.

कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून…

एबीपी माझाशी बोलताना गिरीराज सावंत म्हणाले, काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती. नंतर आम्हाला कळालं की, तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला आहे, अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली आहे.

म्हणूनच न सांगता बँकॉकला निघाला

दहा दिवस अगोदरच तो दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललाय असे घरचे विचारतील म्हणूनच त्याने घरी न सांगता प्रायव्हेट प्लेन बुक करून बँकॉकला निघाला होता. आमच्या घरात कुठलाही कौटुंबिक वाद नाही. पोलिसांनी काल ऋषीराज पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला आहे, पोलिसांना त्यांच्या पुढील तपासात देखील आम्ही सहकार्य करू. विरोधकांनी कृपया याचं राजकारण करू नये त्यांना देखील मुलं असतील, असं आवाहन गिरीराज सावंत यांनी केलं आहे.

ऋषिकेश सावंत यांचं अपहरण झाल्याचं सोशल मिडियावर व्हायरल

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश (वय 32) यांचे अपहरण झालं आहे, ते खासगी विमानाने बँकॉकला रवाना झाला आहेत, सावंत यांना मुलाचे अपहरण झाल्याचा फोन आला होता, अशा प्रकारची माहिती सोमवारी (ता. 10) दुपारनंतर सोशल मिडियावरती व्हायरल झाली होती. कार चालकाने दिलेल्या माहितीनंतर सावंत यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याशी संपर्क न झाल्याने अखेर सावंत पोलिस आयुक्तालयात पोहचले होते. आपला मुलगा कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावंत आणि त्याचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी त्वरित ही माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, अखेर सर्व माहिती समोर आली.

एकनाथ शिंदेंसाठी कायपण, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

0

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे. एकनाथ शिंदे यांचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश करण्यासाठी नियमात बदल केला जाणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल केले जाणार आहेत.

मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या कारणावरुन महायुतीत वितुष्ट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय झाला आहे.

गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अलीकडे पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील आपल्या गावी निघून गेले होते. अखेर रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियु्क्तीला स्थगिती देण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका ही कायमच महत्त्वाची ठरते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. तरीही एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्याने चर्चांना उधाण आले होते.

एकनाथ शिंदेंना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’

एकनाथ शिंदे हे आजची मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर दिल्लीला जाणार आहेत. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. दिल्लीत सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र सदनात हा गौरव पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कोल्हापूरची सून होणार? भाजप खासदाराच्या मुलासोबतचा फोटो चर्चेत

0

सैराटमुळे सर्वांच्याच मनावर राज्य करणार्‍या रिंकू राजगुरुला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. रिंकू राजगुरुने सैराटनंतरही अनेक चित्रपट केले. त्या सर्व चित्रपटांमधून देखील आपल्या अभिनयाची वेगळी झलक दाखवली. अनेकदा रिंकूला मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं आहे. तेंव्हा तिला तिच्या खर्‍या आयुष्यात कोणी परश्या आहे का? असं अनेकदा विचारण्यात आलं होतं.अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे.

रिंकू राजगुरुच्या फोटोची चर्चा

रिंकू राजगुरुच्या सोशल मीडिया पोस्टची, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते.अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे. रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोमुळे रिंकू कोल्हापूरची सून होणार का?

अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. या फोटोमध्ये रिंकू भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे.

भाजप खासदारच्या मुलासोबत फोटो व्हायरल

स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केला आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नेटकऱ्यांना रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे वेगळंच वाटत असल्याच म्हंटल जात आहे.तर काही नेटकर्‍यांनी ‘जोडा छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्याने लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय? असं म्हणत या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णराज महाडिक आणि रिंकूचा फोटोची सोशल मीडियावर चर्चांना

कृष्णराज महाडिक आणि रिंकूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या फोटोच रहस्य जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे.दरम्यान रिंकूने या फोटोवर येणार्‍या कमेंट्सवर अद्यापतरी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ती आता यावर काय बोलणार याची सर्व चाहते वाट पाहतायत. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.