Home Blog Page 198

‘मार्क झुकरबर्गला फाशीची शिक्षा खुलासाही स्वतः मार्क झुकरबर्गने केला; ईशनिंदा झाल्याचा… प्रकरण नक्की काय?

0

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांची पालक कंपनी असलेल्या मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्गला पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याबद्दलचा खुलासा स्वतः मार्क झुकरबर्गने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ईशनिंदा झाल्याचा ठपका ठेवत मार्क झुकरबर्गला जबाबदार धरण्यात आले होते. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबतीत कोणतीही चुकीची कृती पाकिस्तानमध्ये खपवून घेतली जात नाही. ईशनिंदेबाबत त्यांच्याकडे कडक कायदे आहेत. फेसबुकवर अपलोड झालेल्या एका चित्रावरून फेसबुकविरोधात खटला चालविण्यात आला होता. याची माहिती मार्क झुकरबर्गने जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये दिली.

प्रकरण काय आहे?

फेसबुकवर अपलोड केलेल्या एका पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. ईशनिंदेबाबत कडक कायदे असल्यामुळे याविरोधात खटला दाखल करण्यात आला. झुकरबर्गने सांगितले की, फेसबुकवर मोहम्मद पैगंबर यांचे एक चित्र शेअर करण्यात आले होते. पाकिस्तानच्या कायद्यानुसार याला ईशनिंदा मानले गेले. या पोस्टनंतर माझ्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला. तसेच सुनावणी नंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली.

मार्क झुकरबर्गने काय म्हटले?

मार्क झुकरबर्गने सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे लागू आहेत. सर्वच कायद्यांवर आम्ही सहमत असू असे नाही. पाकिस्तानच्या बाबतीत हेच झाले होते. फेसबुकवर शेअर झालेल्या चित्राला ईशनिंदेचे प्रकरण माणून माझ्याविरोधात खटला भरला. मला दोषीही ठरवले. जगातील अनेक देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहेत. जगात असे अनेक देश आहेत, जिथे आपल्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांचा काहीच ताळमेळ बसत नाही. त्यांच्या मताप्रमाणे त्यांना नको असलेला कटेंट आम्ही फेसबुकवरून हटविला पाहिजे. तर काही देशातील सरकार तर आम्हाला कारागृहात टाकण्याची तयारी करतात.

मार्क झुकरबर्गने पुढे म्हटले की, पण पाकिस्तानला जाण्याचा माझा कोणताही विचार नाही, त्यामुळे आता तरी मला काही चिंता नाही.

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या नेत्याचा पक्ष प्रवेश; ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, उपनेतेपदाचा राजीनामा!

0

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु होती ती अखेर खरी ठरली आहे. कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी कुठल्या पक्षात प्रवेश करणार? ते अखेर निश्चित झालं आहे. ठाण्यात उद्या दुपारी 3 वाजता ते शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु आहेत. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. ते पक्ष सोडणार असून ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.

आता राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समजतय. उद्या दुपारी 3 वाजता राजन साळवी ठाण्यातील आनंदाश्रमात शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश करतील. 1 वाजता नवी मुंबईतील सिडको भवन इथून हजारों कार्यकर्त्यांता ताफा घेऊन ते ठाण्यात येतील. अडीचवर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट तयार झाले. सुरुवातीला 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. पण राजन साळवी हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्यामागे एसीबी चौकशीचा ससेमिराही लागला होता. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजन साळवी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या सातत्याने येऊ लागल्या. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्घा घेतली.

‘बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं’

नुकताच रत्नागिरीतील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी त्यांना घरचा आहेर दिला. “विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच राजन साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली होती” असा दावा विलास चाळके यांनी केला. “राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याचा, शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न करतात, यामुळे मला असं वाटतं की त्यांना बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं. पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं होतं. यामुळे ते पराभवाचं खापर माझ्यावर आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत” असं विलास चाळके म्हणाले.

ठाकरेंच्या या 2 वाघांमुळे ‘ऑपरेशन टायगर’ बारगळलं? 5 जाळ्यात आलेही आहेत पण पडद्यामागे घडतयं काय?

0

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरवशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर हे ठाकरेंच्या दोन खासदारांमुळे बारगळलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सगळ्या खासदारांनी एकत्र येत पक्षात एकजूट असल्याचे दाखवत पक्षफुटीच्या चर्चा निरर्थक असल्याचा दावा केला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केले. ऑपरेशन टायगरनुसार, शिंदे गटात ठाकरेंच्या माजी लोकप्रतिनिधींचा पक्षात प्रवेश सुरू होता. तर, दुसरीकडे खासदारही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते.

ऑपरेशन टायगर का बारगळलं?

दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसाठी सुरू करण्यात आले होते. शिंदेंच्या जाळ्यात काही खासदारही आले. पण, दोन खासदारांनी नकार दिल्याने हे ऑपरेशन बारगळल्याचे म्हटले जात आहे. शिंदेच्या ऑफरला नकार देणारा खासदार हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहेत. त्यापैकी 6 ते 7 खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, एका सूत्राच्या माहितीनुसार 5 खासदार गळादेखील लागले. मात्र, त्यानंतर आलेल्या नकारानंतर हे ऑपरेशन बारगळले असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे काय करणार?

ऑपरेशन टायगरमध्ये खासदारांचा गट फुटत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या ही मोहीम योग्य वेळी सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केले आहे. त्यामुळे तूर्तास या लहान ऑपरेशनसाठी घाई करणार नसल्याचे शिंदे गटातील सूत्रांनी सांगितले. ठाकरेंचे खासदार फुटले असते तर शिंदे गटात अथवा भाजपात त्यांनी प्रवेश केला असता. त्याच्या परिणामी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरील अवलंबित्व कमी झाले असते.

महिला आयोगाच्या अध्यक्षांवरच अश्लील पोस्ट, दोघांना ठोकल्या बेड्या गिरगावच्या कोर्टात हजर करण्यात येणार

0

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रीारीनुसार कारवाई करत पोलनिसांनी आता दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले . तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपींना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहिती माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतरच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर अविनाश कुळे आणि आकाश डाळवे यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री स्मृती इराणी होऊ शकतात? या कारणांमुळे दावा झाला भक्कम

0

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळाली. आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाही. मात्र अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजप घराणेशाहीच्या विरोधात असले तरी अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईक आणि अपत्यांना तिकीट दिलं होतं. पण घराणेशाही असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केलेलं नाही. त्यामुळे प्रवेश शर्मा यांचे नाव मागे पडत आहे. तर रेखा गुप्ता, शिखा रॉय यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र यात रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे. पण दिल्लीत केजरीवाल यांच्या तोडीस तोड असा चेहरा आणि महिला मुख्यमंत्री करायीच असेल तर स्मृती इराणी यांचं नाव चर्चेत येत आहे. राजकीय अनुभव, भाजपचा आक्रमक चेहरा आणि २०३० मध्ये केजरीवालांना पुन्हा चितपट करण्यासाठी स्मृती इराणी याचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको.

देशातील ज्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात भाजपची सत्ता आहे तिथं एकही महिला मुख्यमंत्री नाहीय. त्यामुळे किमान एक महिला मुख्यमंत्री असावी असा निर्णय भाजप घेऊ शखते. तसंच अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनीही आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. त्यामुळे केजरीवालांच्या त्या खेळीला महिला मुख्यमंत्री देऊन भाजप शह देऊ शकते.

कोण आहेत स्मृती इराणी?

स्मृती इराणी यांनी राजकारणात येण्याआधी हॉटेलपासून अभिनय क्षेत्रापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय. पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता, पण शिक्षण पूर्ण केलं नाही. त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम केलं. वडिलांच्या मदतीने दिल्लीत ब्युटी प्रोडक्टचं मार्केटिंग केलं. याचवेळी त्यांनी मुंबईत मॉडेलिंगमध्ये नशिब अजमावलं.

१९९८ मध्ये स्मृती इराणी यांनी मिस इंडियासाठी मुलाखत दिली आणि त्यांची निवड झाली होती. पण वडिलांनी या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. मात्र आईने मदत केल्यानं त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. स्मृती इराणी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचल्या पण विजेतेपद पटकावता आलं नाही. आईने खर्च केलेले पैसे परत करण्यासाठी स्मृती इराणी यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. मॉडेलिंगसाठी ऑडिशन देऊनही नोकरी मिळाली नाही. त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. क्योंकी सास… साठी ऑडिशन दिली पण त्यात निवड झाली नाही. त्यानंतर २०००-२००८ पर्यंत प्रसिद्ध टीव्ही मालिका क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत तुलसी हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. यातून स्मृती इराणी यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

स्मृती इराणी यांनी २००१ मध्ये पारसी आंत्रप्र्योन्योर जुबीन इराणींसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. तर जुबीन यांचं पहिलं लग्न झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचीही एक मुलगी आहे. स्मृती इराणी यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. त्यामुळे लहानपणीच स्मृती इराणींही संघाच्या विचारात वाढल्या. त्यांची आईसुद्धा जनसंघाचं काम करायच्या.

२००३ मध्ये स्मृती इराणी यांनी भाजप प्रवेश केला. तर २००४ मध्ये महाराष्ट्र यूथ विंगच्या व्हाइस प्रेसिडंट बनल्या. २००४ मध्ये दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून त्यांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. २०१० मध्ये स्मृती इराणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विभागाच्या अध्यक्ष बनल्या. २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींविरोधात त्या लोकसभा निवडणूक लढल्या. पराभवानंतरही त्यांना मोदी सरकारने केंद्रीय मंत्री बनवलं. २०२४ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या केएल शर्मा यांनी पराभूत केलं.

‘…तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची सत्ता वाचवली असती पण…’; शिंदेंच्या सत्कार वादात मनसेची उडी

0

नवी दिल्लीमधील ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर यावरुन निशाणा साधला आहे. पवारांनी या कार्यक्रमाला नव्हतं जायचा पाहिजे. त्यांच्या हस्ते आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हणातो अशांचा सत्कार होणं दुर्देवी असल्याची टीका राऊतांनी केली. एकनाथ शिंदेंची शिवसेनेबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरुन राऊतांवर निशाणा साधल्याचं दिसत आहे. असं असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या वादात उडी घेत उद्धव ठाकरेंच्या सेनेला लक्ष्य केलं आहे.

…तर शरद पवारांनी सत्ता वाचवली असती

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याचा संदर्भ देत मनसेचे नेते संदीप देशपांडेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही शिंदेंच्या सगळ्याच आमदारांचा सत्कार करायला हवा होता कारण या शिंदेंनी महाराष्ट्राची निष्क्रीय मुख्यमंत्र्यांपासून सुटका केली. शरद पवारांनाही ठाकरेंपासून आणि संजय राऊतांपासून सुटका हवी होती. मनात आणलं असतं तर शरद पवारांनी सत्ता वाचवली असती पण त्यांनी ते केलं नाही,” असं विधान केलं.

ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद बदललं नसतं तर…

पुढे बोलताना, “शरद पवार कधी स्वत:चं सोडून दुस-याचं नेतृत्व मान्य करणार नाहीत. ठाकरेंपासून सुटकेचे मार्ग पवार शोधत आहेत. ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद बदललं नसतं तर महाराष्ट्र लॉकडाऊन लॉकडाऊन खेळत बसला असता. आपण महाराष्ट्रात एका निष्क्रीय मुख्यमंत्र्याला बसवलं ही चूक झाली हे आता पवारांना कळलं असावं,” असं म्हणत देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

राज्यात भाजपची महालाट; 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच मोठी बांधणी

0

भाजपाची राज्यात मोठी लाट आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. महायुतीत भाजपा हा मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. तर आता सदस्य नोंदणीतही भाजपाने नवीन विक्रम केला आहे. भाजपचे राज्यात 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच भाजपाने मोठी मोर्चे बांधणी केल्याचे दिसून आले.

हा केवळ आकडा नाही विश्वास

महाराष्ट्र भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर आणि महाराष्ट्रच्या जनतेच्या आशीर्वादाने 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. 1 कोटी हा केवळ आकडा नसून महाराष्ट्रच्या जनतेचा भाजपा वरील विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी नोंदणी अभियान यशस्वी केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

आता लवकरच दीड कोटींचा टप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिक सदस्यता नोंदणी करत सदस्यता अभियान सुरु केलं होतं. राज्यात देवेंद्र फडणवीस यांची प्राथमिक सदस्यता नोंदणी करत अभियानाला सुरुवात झाली आहे. भाजपनं दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टीचा संकल्प केला होता. एक कोटी सदस्यांच्या आमचा प्रवास आता पूर्ण झाला. राज्यातले मुख्यमंत्री, मंत्री, सर्वांनी भार घेतला. पुढील काही दिवसात १५ लक्ष सदस्य होतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संघटन पर्व राबवणार

पक्ष संघटना, कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत. पुढील १५ दिवस आम्ही संघटन पर्व राबवणार आहोत. जवळपास १ लाख बूथवर आम्ही १ कोटी २ लाख सदस्य बनवले आहेत. मला अभिमान आहे, १८५६ कार्यकर्त्यांनी १ हजार सदस्य संख्या पूर्ण केली. १७२६ कार्यकर्त्यांनी ५०० सदस्य संख्या केली.या अभियानात युवा, लाडक्या बहिणी, आदिवासी भागात, बौध्द समाजात सर्वच समाजाने सहयोग घेतला आहे. असा कोणताही समाज नाही ज्याने भाजपचं सदस्यता घेतली नाही. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज लोकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

एकनाथ शिंदेंच्या सत्कारासोहळ्याला जाणं शरद पवारांनी टाळायला हवं होतं, उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त!

0

नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सत्कार सोहळ्यात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्ष फुटीस कारणीभूत असलेल्या एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी यावर पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा केलेल्या सत्कारानंतर पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाची ही अधिकृत भूमिका आहे.

ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणे टाळायला हवं होतं, असं मत उद्धव ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

मविआचं काय होणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कालच्या सत्कार सोहळ्यावरुन नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं टाळायला हवं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनं महायुतीला ज्या प्रकारे विरोध केला होता त्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेला पटलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची अधिकृत भूमिका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सेनेच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून आगामी तीन प्रमुख पक्षांची भूमिका असेल हे लवकरच कळेल.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील नियोजित कार्यक्रम होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख विरोधक एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा सत्कार शरद पवार यांनी केल्यानं राजकीय चर्चा सुरु होतात. यामुळं सत्कार टाळायला हवा होता, असं ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांचं मत आहे.

संजय राऊत यांची शरद पवार यांच्यावर टीका

खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शरद पवारांवर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं म्हणजे अमित शाह यांचा सत्कार करण्यासारखं आहे, असं राऊत म्हणाले.

बॉडी वॉश ते गीझर, मुंबईच्या रस्त्यावर महिलांसाठी धावतेय अनोखी बस; पंचतारांकित हॉटेलपेक्षा नाही कमी

0

शाम्पू, गीझर, अंघोळीची परिपूर्ण सुविधा, तेही चालत्या बसच्या आत. ऐकून आश्चर्यचकित झालात ना. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. होय मुंबईच्या रस्त्यावर एक अनोखी बस धावतेय. या विशेष बसचा महिनाभरात मोठ्या संख्येने महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ही बस आहे एक मोबाईल बाथरूम आहे. या मोबाईल बाथरूमचे (Bathroom bus) व्यवस्थापन बी द चेंज नावाची संस्था करत आहे. तीन बहिणी मिळून महिलांना अंघोळीची ही सुविधा देणारी बस चालवतात. यातून त्या महिलांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी सहकार्य केले आहे. महिलांना मोफत शॉवर सेवा खूप आवडत असल्याचा फीडबॅक आहे.

‘या’ मोबाईल बाथरूममध्ये काय काय आहे?

या अत्याधुनिक मोबाईल बाथरूमध्ये पाच मोबाईल फोन चार्जर आणि दोन कपडे सुकवण्याचे ड्रायर आहेत. हँडवॉश, बॉडीवॉश, शाम्पू, टब आणि गीझर या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत.

‘लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत, तुमचा काय..’; BJP चा ठाकरेंवर हल्लाबोल! POP मूर्ती वाद तापला

0

मुंबईमधील माघी गणेश उत्सवादरम्यान पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आता या वादाला राजकीय रंग मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधल्यानंतर भारतीय जनता पार्टीने ठाकरेंच्या कार्यकाळातील अनेक घटनांचा संदर्भ देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना…

“श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात,” असं आशिष शेलार यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. “आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मूर्ती अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?” असा सवाल शेलार यांनी केला आहे. पुढे बोलताना, “कारण यांच्या पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बंद कसा पडेल याचेच प्रयत्न केले. लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत,” असा घणाघात शेलार यांनी केला आहे. “गणेशोत्सव असो वा दहिहंडी उत्सव ज्या ज्या वेळी अडचणीत सापडला तेव्हा हे कधीच त्याची बाजू मांडायला न्यायालयात गेले नाहीत. आजही जाणार असे सांगत नाहीत. हिंदू देव देवता, मंदिर आणि उत्सव, विशेषतः अयोध्येतील राम मंदिर या सगळ्याचे हे विरोधक आहेत. टीकाकार आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली आहे.

तुमचा काय अधिकार आहे?

एवढ्यावरच न थांबता, “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा यांना त्रास होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाला ज्यांनी हात लावला नाही. जे अजान स्पर्धा भरवतात आणि ज्यांना “भोंग्यांचा आवाज” हल्ली सुमधुर वाटतो आणि गणपतीची आरती हातात घेणे जे टाळतात. ते आता माघी गणेशोत्सवावर बोलतात? तुमचा काय अधिकार आहे?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. पोस्टमध्ये पुढे, “हे सुखकर्ता.. दुखहर्त्या… तुझे हे ढोंगी, स्वार्थी भक्त आज जी तुझी “आरती” करीत आहेत ते म्हणजे निव्वळ ढोंग.. ढोंग आणि ढोंग!” असंही शेलार म्हणालेत. “महाराष्ट्रातील गणेशभक्त यांच्यापासून सावध झालाच आहे, आता गणपती बाप्पा तूही यांचे हे ढोंगी रुप पाहून घे रे महाराजा!” असं पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात !

आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मुर्त्या अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?

कारण यांचे पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव…