Home Blog Page 19

भक्तांशी समलैंगिक संबंधासाठी अघोरी प्रकार, मठातील नंगानाच पाहून महाराष्ट्र हादरला; भोंदुबाबाचे अनेक प्रताप

0

पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद तामदार याचे हायटेक कारनाम्यांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे. श्रद्धेच्या आडून भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या या बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या बाबाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील सुस गावातील स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये त्याचा मठ आहे. अनेक महिलांना आंघोळ घालताना, त्यांच्यासोबत विचित्र डान्स करताना, महिलांची ओटी भरतानाचे बाबाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तो स्वतःला दिव्यशक्ती असलेला अध्यात्मिक गुरू भासवत होता. समलैंगिक संबंधासाठी बाबा अनेक अघोरी प्रकार करायचा. त्याचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत.

असे फुटले बिंग

प्रसाद तामदार याच्या एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत होता. या भाविकाने त्याच्या मित्राला मोबाईल दाखवला. लॅपटॉपच्या मदतीने त्याने मोबाईल तपासला. त्यात त्याला एअर ड्रॉइ़ड कीड ॲप दिसले. त्यावरून सदर मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे त्याने सांगितले. त्याला बाबाने हा मोबाईल काही काळ घेतल्याचे आठवले. त्याने इतर भक्तांना याविषयी विचारले. त्यांना पण असाच अनुभव आला.

हा बाबा मोबाईलमध्ये एअर ड्रॉइ़ड कीड ॲप डाऊनलोड करायचा. या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा. ते सध्या कुठे आहेत. त्यांनी कोणते कपडे घातले आहेत. त्यांनी दिवसभरात काय काय केले यांची इत्यंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा. त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा. तामदार याचा पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात मोठा भक्त परिवार असल्याचे समोर आले आहे.

भक्तांसोबत समलैंगिक संबंध ठेवायचा

प्रसाद हा भक्तांचा विश्वास संपादन करायचा. त्यांच्यावर मोठे प्राणघातक संकट येणार असल्याचा दावा करायचा. त्यानंतर त्यांना अघोरी पुजा करण्यासाठी मठात बोलवायचा. त्याअगोदर तो भक्ताला मठात बोलावून त्याला पुढील दोन दिवस जागरण करण्यास सांगायचा. त्याला मंत्र जपायला सांगायचा. कुटुंबातील मंडळींना भक्ताला जागी ठेवण्यासाठी बजावायचा.

दोन-तीन दिवस न झोपलेला हा भक्त पेंगतच मठात दाखल व्हायचा. मग बाबा त्याला सर्व कपडे काढून शाल पांघरायला द्यायचा. त्याच्याकडून काही थोतांड विधी करून त्याला झोपायला सांगायचा. कुटुंबियांना बाहेर थांबवायला सांगायचा. त्यानंतर झोपी गेलेल्या या भक्तासोबत तो लैंगिक चाळे करायचा. भक्ताला जाग आल्यावर तो त्याला तुझ्या सर्व समस्या आणि संकटं मी माझ्यावर घेत असल्याचा बनाव करत त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा.

कॅप्टन शुबमनची 269 धावांची खेळी, कोहलीचा महारेकॉर्ड ब्रेक भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला

0

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात इतिहास बदलला आहे. शुबमनने लीड्समध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकलं. शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही हा तडाखा असाच कायम ठेवत ऐतिहासिक कामगिरी केली. शुबमनने धमाकेदार द्विशतक ठोकलं. त्यानंतर शुबमनने वेगाने पुढील 50 धावा केल्या. शुबमनने यासह 250 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे शुबमनला त्रिशतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन त्रिशतक करण्यात अपयशी ठरला. शुबमनने एकूण 269 धावांची खेळी केली. शुबमनने यासह  भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा महारेकॉर्ड ब्रेक केला.

विराट कोहलीचा रेकॉर्ड उद्धवस्त

शुबमनने 387 बॉलमध्ये 69.51 च्या स्ट्राईक रेटने 30 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 269 रन्स केल्या. शुबमन यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. शुबमनने या खेळीदरम्यान 255 धावा पूर्ण करताच विराट कोहली याला मागे टाकलं. शुबमनने विराटचा कर्णधार म्हणून नाबाद 254 धावांचा विक्रम मोडीत काढला.

विराट कोहली याने 6 वर्षांपूर्वी त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली होती. विराटने 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात 336 बॉलमध्ये नॉट आऊट 254 रन्स केल्या होत्या.

कॅप्टन शुबमन गिल याचे आणखी काही विक्रम

शुबमनने द्विशतकासह असंख्य विक्रम स्वत:च्या नावावर केले. शुबमनने भारताकडून इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. शुबमनआधी एकाही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीत 6 वर्षांनंतर हे पहिलं द्विशतक ठरलं.

भारताच्या पहिल्या डावात 587 धावा

दरम्यान शुबमनने केलेल्या या 269 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 580 पार धडक देता आली. टीम इंडियाकडून शुबमन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र दोघांचीही शतकाची संधी हुकली.

यशस्वीने 107 बॉलमध्ये 13 फोरसह 87 रन्स केल्या. तर ऑलराउंडर जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारसह 64.96 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर यानेही संयमी पण तडाखेदार खेळी केली. वॉशिंग्टनने 42 धावांची खेळी केली.  भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता भारतीय गोलंदाजांसमोर सर्व मदार असणार आहे.

‘बाबा, आय एम सॉरी, मी जाते…’, सोन्याची 300 नाणी, 70 लाखांची कार देऊनही बापाची लाडकी ‘लेक’ वाचली नाही!

0

मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाहीये, मी आता जगू शकत नाही, मी जाते… असं म्हणत मुलीने तिचं आयुष्य संपवलं आहे. मृत्यूला कवटाळण्याआधी रिधानाने तिच्या वडिलांना पत्र लिहिलं आणि मनातल्या सगळ्या वेदना सांगून टाकल्या. 27 वर्षांच्या रिधान्याने हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. वडिलांनी रिधान्याच्या सासरी 300 सोन्याचे शिक्के आणि आलिशान व्हॉल्वो कार दिली होती, तरीही तिचा हुंड्यासाठी छळ झाला.

हुंड्यासाठी सासरी छळ

हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने रिधान्याने जीवन संपवलं, यानंतर तिचा पती आणि सासरच्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रिधान्या कापड उत्पादक अन्नादुराई यांची मुलगी होती. याच वर्षी एप्रिल महिन्यात रिधान्याचं 28 वर्षांच्या कविन कुमार याच्यासोबत लग्न झालं होतं.

रिधान्याच्या वडिलांनी हुंड्यामध्ये 500 सोन्याची नाणी आणि 70 लाख रुपयांची आलिशान व्हॉल्वो कार द्यायचं आश्वासन दिलं होतं. लग्नामध्ये त्यांनी रिधान्याच्या सासरच्यांना 300 नाणी दिली, पण उरलेल्या 200 नाण्यांसाठीचा दबाव वाढतच राहिला, त्यामुळे रिधान्याचा सासरी छळ करण्यात आला.

कारमध्ये संपवलं आयुष्य

शनिवारी रिधान्या मोंडिपलायम मंदिरात जात असल्याचे सांगून तिच्या सासरच्या घरातून निघून गेली. काही तासांनंतर, पोलिसांना परिसरात एका कारची माहिती मिळाली. आत त्यांना रिधान्या बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. रिधान्याने कीटकनाशक गोळ्या खाल्ल्याचं सांगण्यात येत आहे. रिधान्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि रविवारी शवविच्छेदनानंतर कुटुंबाला सोपवण्यात आला.

वडिलांना व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज

मृत्यूच्या काही काळापूर्वी तिच्या वडिलांना सात व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज पाठवण्यात आले होते. यामध्ये रिधान्याने तिला काय सहन करावे लागले हे सविस्तरपणे सांगितले. तिने तिच्या पती आणि त्याच्या पालकांवर दररोज मानसिक छळ करण्याचा आणि कविनवर अत्याचार करण्याचा आरोप केला. ‘मला हे जीवन आवडत नाही. मी आता जगू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. मला माफ करा, बाबा – सर्व काही संपले आहे. मी जात आहे.’, असं रिधान्या तिच्या व्हॉइस मेसेज मध्ये म्हणाली.

जुळवून घेण्याचा वडिलांचा सल्ला

‘लग्नानंतर रिधान्या 15 दिवसांमध्येच घरी परतली तेव्हा ती खूप दुःखी आणि अस्वस्थ होती. मी तिला जुळवून घ्यायला सांगितलं, पण शेवट असा होईल हे मला वाटलं नव्हतं’, अशी प्रतिक्रिया रिधान्याच्या वडिलांनी दिली आहे.

100 कोटी रुपयांची इच्छा

‘रिधान्याच्या सासरच्यांनी त्यांना मिळालेल्या हुंड्याची तुलना इतरांशी केली. रिधान्याच्या सासरच्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर वरांना मिळाले तसेच 100 कोटी रुपये पाहिजे होते. त्यांनी आम्हाला फसवलं’, असा आरोप अन्नादुराई यांनी केला आहे. याप्रकरणी तामीळनाडूच्या तिरुपूरमधल्या चेय्यूर पोलिसांनी कविन कुमार त्याचे पालक इश्वरमूर्ती आणि चित्रादेवी यांना अटक केली आहे.

मलाईदार ‘प्रतिनियुक्ती’ सुटेना बदली आदेशांनाही बधेना! अधिवेशनातही मंत्रालयात खेटे नगर विकासमध्ये ‘लॉबिंग’ सुरूच

0

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘मोक्या’च्या पदांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या २९ उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने अलीकडेच रद्द केली. त्यांना राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील मूळ पदांवर रुजू करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्रीही आग्रही असताना अनेकांनी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे. बुधवारपर्यंत २९पैकी केवळ १२ अधिकारी आपल्या मूळ पदांवर परतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून ‘बदली’ टाळण्यासाठी नगरविकास विभागात ‘लॉबिंग’ सुरू असल्याचीही चर्चा आहे.

सरकारमधील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाने नगरविकास खात्याच्या अखत्यारितील मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रांतील महापालिका, तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), एसआरए, म्हाडा अशा महत्त्वाच्या नागरी संस्था तसेच प्राधिकरणांमध्ये महत्त्वाच्या पदांवर हे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. ही प्रतिनियुक्ती एक वर्षासाठी होत असली, तरी अनेक अधिकाऱ्यांना गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ मिळत आहे. आताची पदे सोडून विदर्भ-मराठवाड्यातील ग्रामीण भागांत ‘अनाकर्षक’ पदांवर जाण्यास हे अधिकारी इच्छुक नसल्याची माहिती आहे. ‘मलईदार’ विभागांमध्ये कार्यरत राहिलेल्या या अधिकाऱ्यांना महसूल विभागात मूळच्या ठिकाणी, म्हणजेच विदर्भ-मराठवाड्यात परतावे लागणार असल्यामुळे आपले ‘अर्थकारण’ कोलमडण्याची अधिकाऱ्यांना भीती आहे. यामागील कारण २७ जून रोजी सरकारने काढलेल्या आदेशात दडले आहे.

राज्यभरातील २९ उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करावे आणि त्यांनी सोमवारपर्यंत आपल्या मूळ विभागात, म्हणजेच महसूल विभागात हजर व्हावे, असा शासनाचा आदेश आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय या अधिकाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर केली जाऊ नये व प्रतिनियुक्तीच्या कार्यालयाने रजेचा अर्ज स्वीकारू नये, असे सक्त आदेशही देण्यात आले आहेत. मूळ कार्यालयात तात्काळ रुजू न झाल्यास किंवा कोणताही दबाव आणून आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईस सामारे जावे लागेल, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे बरेच अधिकारी अस्वस्थ झाले असून तो रद्द करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

अनेक अधिकारी बुधवारीही महापालिका किंवा प्राधिकरणांमध्येच प्रतिनियुक्तीवरील पदांवरच कार्यरत असल्याचे समजते. काही अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र त्यांना परत बोलविण्याचा पूर्ण अधिकार मूळ विभागाला (महसूल) असल्याची माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शासकीय योजनांना खीळ

बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी महसूल विभागाचा आढावा घेतला. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची ४८ पद रिक्त असल्याचे आढळून आले. काही जिल्ह्यांमध्ये या संवर्गातील जवळपास ८० पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांमुळे काही जिल्ह्यांमध्ये विविध योजनांची अंमलबजावणी शक्य होत नसल्याचे मत बावनकुळे यांनी मध्यंतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले होते. त्यातूनच वेगवेगळ्या प्राधिकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या २९ अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची चणचण असल्याने शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला खीळ बसत असल्यामुळे आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आग्रही असल्याची माहिती आहे.

आदेश ‘महसूल’चा धाव ‘नगरविकास’कडे…

प्रतिनियुक्तीवर राहण्यासाठी आग्रही असलेले बहुतांश अधिकारी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या महापालिका तसेच प्राधिकरणांमध्ये ‘मोक्याची पदे’ पटकावून असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदेश रद्द व्हावा, यासाठी काही अधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाकडे ‘धाव’ घेतल्याचे समजते. प्रतिनियुक्ती वाढवून मिळावी यासाठी महसूल मंत्रालयाकडून ‘ना हरकत’ मिळवून नगरविकास विभागाकडून कालावधी वाढवून मिळावा यासाठी काही उपजिल्हाधिकारी अधिवेशनकाळातही मंत्रालयात खेटे मारताना दिसत आहेत.

मनसैनिकांचा कोथरूडला राडा! राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या थेट घरावर धडक, पोलिसांच्या ताब्यात

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये गोंधळ घातलाय. राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ घातला. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला आहे. मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलिसांनी धाव घेतली आणि केदार सोमण यांना ताब्यात घेतले.

राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

कोथरूड येथील राहणारा केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सोमण यांचा पत्ता शोधत आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली. सोमण यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलीस कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोहोचले.

पोलिसांनी घेतले केदार सोमण यांना ताब्यात

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य द्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, केदार सोमण याला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर धाव घेत मोठा गोंधळ घातला. केदार सोमण यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले की, रात्री हाफ खंबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा तू मेरा भाई है..(उठा रात्री पण घरीच बसून वाईन प्यायचा, घराबाहेर न पाडण्याचे व्रत, अखंड होते…)

मनसैनिकांनी घातला घराबाहेर मोठा गोंधळ

ही केदार सोमण यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली आणि ज्यानंतर एकच गोंधळ उडावा. सोमण यांच्या घरी पोहोचलेल्या मनसैनिकांनी यावेळी शिवीगाळ देखील केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सोमण यांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या गाडीवरही काही कार्यकर्त्ये धावून आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल पोस्ट केल्याने केदार सोमण यांच्या घरी मनसे कार्यकर्त्ये पोहोचले होते.

ठाकरेंची नवी राजकीय खेळी सर्वोच्च पुन्हा न्यायालयात धाव; अजित पवारांप्रमाणेच शिंदेंनाही ‘डिस्क्लेमर’ द्या!

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये नव्याने याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील वादाचा संदर्भ देताना जो आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तोच आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही द्यावा अशी मागणी केली आहे. ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं पक्ष चिन्ह म्हणजेच ‘धनुष्यबाणा’संदर्भात केली आहे.

कोण करणार या प्रकरणाची सुनावणी?

निवडणूक चिन्हावरुन सुरु असलेल्या वादावर तातडीने सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काय आदेश दिलेला कोर्टाने?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भातील वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर आदेश दिला जावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा मुद्दा न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मराठी वृत्तपत्रांसहीत अन्य वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करावं असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये दिला होता. असाच आदेश शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणासंदर्भातही द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाने केली आहे.

अजित पवारांच्या पक्षाला काय सांगितलेलं?

सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला ‘घड्याळ’ हे चिन्ह कायम ठेवण्याची आणि ते निवडणुकीत वापरण्याची परवानगी दिलेली. मात्र ही परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला डिस्क्लेमरसह हे चिन्ह वापरण्यास सांगितले होते. तसेच नव्या हमीपत्रात कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाही, असं लिहून देण्याचे आदेश दिलेले.

त्यानंतर 7 नोव्हेंबरला दिलेल्या आदेशामध्ये, घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात 36 तासांत वृत्तपत्रांत द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला दिलेली. त्यानंतर तशी जाहिरात छापूनही आली होती.

ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने 7 मे रोजी दिलेल्या आदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिलेला. शिंदेंच्या शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या सेनेनं न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी ठाकरेंच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना, घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ देत, विधानसभा अध्यक्षांनी 2023 मध्ये केवळ विधिमंडळातील संख्याबळावर ‘धनुष्यबाण’ चिन्हं शिंदेंच्या शिवसेनेला दिलं असून हे चुकीचं असल्याचं म्हटलेलं.

कधी होणार या याचिकेवर सुनावणी

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने 14 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होईल असं सांगितलं आहे.

दोन्ही ठाकरेंचं सगळं ठरलं; या मुद्द्यांवर एकमतही झालं….. कोण कुठे बसणार? कोणीची भाषणं होणार?

0

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असून 5 जुलै रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयी मेळाव्याच्या मंचावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील. हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून शिकवण्यासंदर्भातील शासन आदेश रद्द करण्यासाठी दोन्ही सेनांनी 5 जुलै रोजी मोर्चा कढण्याचं आवाहन केलेलं. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील दोन्ही शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता नियोजित तारखेलाच ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा घेणार आहेत. हा मेळावा कसं असणार आहे याची माहिती समोर आली आहे.

नेत्यांच्या वारंवार बैठका

ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याच्या नियोजनासाठी मागील काही दिवसांपासून दोन्ही सनेंचे नेते एकमेकांना भेटत आहे. बुधवारी रात्री मनसे-शिवसेना- ठाकरे नेत्यांची संयुक्त बैठक वरळी डोम येथे पार पडली. या बैठकीत मेळावा कसा व्हावा यासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मनसेकडून बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, सुनिल शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मेळाव्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली. 5 जुलैच्या ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याचा मास्टर प्लान ‘माध्यमांच्या’च्या हाती लागला आहे. नेमका कसा असणार हा मेळावा पाहूयात…

मेळाव्याच्या नियोजनाचे या मुद्द्यांची यादी- 

  •  मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार आहे.
  •  मेळाव्यात केवळ ठाकरे बंधुंची भाषणे होणार आहेत. इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणे होतील असं ठरलं आहे.
  • व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.
  •   दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष आले तर ते अशी मोजकी भाषणं होतील. इतर नेत्याची भाषणे होणार नाहीत.
  •  संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार.
  •  सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसनव्यवस्था असणार आहे.
  •  मेळाव्याचा केंद्रबिंदु मात्र ठाकरे बंधुच राहणार आहेत.
  • मुंबईत जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना पहाता येणार आहे.
  •  दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपापला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.
  • गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे.
  • दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.
  • वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.
  • वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
  • बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.
  • सोशल मिडीया, बॅनर; जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.

आषाढी वारीत चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात नसेल पाणी ‘उजनी’ चे सर्व दरवाजे बंद; भीमा नदी विसर्ग थांबला

0

पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.

उजनी धरण सध्या ७३ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात येणारे १६०० क्युसेक पाणी देखील बंद करण्यात आले आहे. ८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. पण, धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद केल्याने पुढील पाच दिवसांत धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरेल, अशी स्थिती आहे. धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणी असून त्यात ३९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखील आता बंद करण्यात आला आहे.

वनाच्छादित भाग ३३ टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना; वृक्षतोडीस आळा घालणारे विधेयक मागे; नव्याने विधेयक होणार सादर

0

अवैधरित्या होणाऱ्या वृक्ष तोडीस आळा घालण्यासाठी सादर केलेले ‘महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतचे (नियमन) (सुधारणा) विधेयक २०२४’ विधानसभेत बुधवारी मागे घेण्यात आले. हे विधेयक पुन्हा नव्याने मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या विधेयकात झाडे तोडणाऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये दंडाची तरतूद केली होती त्याला सदस्यांनी विरोध दर्शवला होता.

हे विधेयक मागे घेतले जात असल्याबद्दल माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला. ते म्हणाले, की नवीन विधेयकात केवळ दंडाची रक्कम वाढवली आहे. अवैध वृक्ष तोड करणाऱ्यांना १९६४ मध्ये एक हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. दंडाची ही रक्कम आता ५० हजार करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणताही बदल या विधेयकात नसल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयक बदलाच्या अडून कोणालाही सरसकट सवलत देऊ नये अशी मागणी त्यांनी केली.

दंड अन्यायकारक

भास्कर जाधव म्हणाले, ”झाडे तोडण्याबाबतचे हे विधेयक कोकणातील दोन जिल्ह्यासाठी अडचणीचे आहे. दोडामार्ग वगळता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडांची लागवड आहे. या झाडापासून कात तयार केला जातो. हा उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. शासनाच्या मदतीशिवाय उद्योगाने भरारी घेतली आहे. तसेच कोकणात ९९ टक्के जमीन ही खासगी आहे. मात्र या जमिनीवरील झाड तोडले तर ५० हजार रुपयांचा दंड अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे विधेयक मागे घेतले जात असल्याचे स्पष्ट केले.’

झाडे तोडण्यावर निर्बंध आवश्यक

या विषयावरील चर्चेत बोलताना वनमंत्री नाईक म्हणाले, राज्यात सध्या २१ टक्के वनाच्छादित भाग असून, तो ३३ टक्के करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे.

मात्र हे करत असताना गोरगरीब व्यक्तीकडून, शेतकऱ्याकडून चुकून झाड वा फांदी तोडली गेल्यास, त्याला ५० हजाराचा दंड अडचणीचा ठरू शकतो. तसेच या व्याख्येत फांद्या तोडणे हे देखील झाड तोडणे यासारखेच असल्याचे म्हटले आहे. या सर्व अडचणीच्या मुद्द्यांचा विचार करून सुधारित विधेयक मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल.”

एमएचटी-सीईटी परीक्षेत त्रुटी; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत कबुली

0

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आयोजित केलेल्या परीक्षेत त्रुटी असल्याची कबुली राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रकरणी संबंधित विषयतज्ज्ञांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली.

परीक्षा केंद्राकडे तक्रार केली; पण दखल घेतली गेली नाही –

ते म्हणाले, ‘राज्य एमएचटी-सीईटी परीक्षेत चालू वर्षी चार मे रोजी घेतलेल्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील २१ प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील सुमारे २० ते २५ प्रश्नांत चारही पर्याय चुकीचे होते. याबाबत त्यांनी परीक्षा केंद्राकडे तक्रार केली; पण दखल घेतली गेली नाही, ही बाब खरी आहे.’

२७ हजार उमेदवरांची उपस्थिती –

एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीबी आणि सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २८ हजार ८३७विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या पीसीएम ग्रुपकरिता चालू वर्षी नऊ ते २७ एप्रिल या कालावधीत एकूण २८ सत्रात पार पडली आहे. या २८ सत्रांपैकी २७ एप्रिल रोजीच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी, मराठी आणि उर्दू भाषांतील पीसीएम ग्रुपच्या परीक्षेदरम्यान २७ हजार ८३७ उमेदवार उपस्थित होते.

२१ प्रश्नांत चुका –

या उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित इंग्लिश भाषांतरातील २१ प्रश्नांत चुका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मराठी आणि उर्दू प्रश्नांमध्ये चूक नव्हती. इंग्लिश भाषांतरामध्ये चुका आढळल्याने ज्या उमेदवारांनी सकाळी ही परीक्षा दिली, त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चालू वर्षी पाच मे रोजी फेरपरीक्षा घेतली. या प्रकरणी संबंधित विषयतज्ज्ञांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.