Home Blog Page 159

महापालिकेची ५ कोटीची निविदा मर्जीतील ठेकेदाराला न दिल्याच्या रागातून माजी नगरसेवकाची कामगारांना मारहाण; राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर

0

मर्जीतील ठेकेदाराला सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम न मिळाल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने ठेकेदाराच्या कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सहकार नगर भागात घडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करा असे आदेश अभियंतांना दिलेले असले तरीही त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या मलनि:सारण विभागातर्फे अरणेश्वर ते पदमावती मंदिर या दरम्यान आंबील ओढ्यातून १२०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने ५ कोटीपेक्षा जास्त रकमेची निविदा मंजूर केली आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असताना महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी खटाटोप केलेला होता, रिंग करण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यानंतर या कामात अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. पण माजी नगरसेवक व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना त्यात यश आलेले नाही. या अडवणुकीमुळे दीड महिना उशिराने कार्यादेश देण्यात आला.

अरणेश्वर ते पद्मावती यादरम्यान काम करताना या राजकीय मंडळींनी या कामावर हरकत घेत जवळपास दोन ते तीन आठवडे काम थांबवून ठेवलेले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी पुन्हा एकदा सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले होते.

पण आज सकाळी काम सुरू झाले असता माजी नगरसेवकाने आणि त्याच्या चार-पाच सहकाऱ्यांनी तेथे काम करणाऱ्या मजुरांना, जेसीबी चालकाला बेदम मारहाण करून पळून लावल्याने हे काम बंद पडलेले आहे. राजकीय दहशतीमुळे या ठिकाणी काम करण्यास या कामगारांनी नकार दिलेला आहे. मलनि:सारण विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जाउन प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणात सरकारी कामात गुन्हा दाखल करावा या संदर्भातील आदेश देण्यात आलेले होते पण रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कारवाई झालेली नाही.

मलनि:सारण विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, ‘सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम चालू असताना आज तेथील कामगारांना काही लोकांनी मारहाण केलेली आहे. हे लोक कोण आहेत हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. यासंदर्भात सरकारी कामात अडथळाल्याचा गुन्हा दाखल करा अशी आदेश अभियंत्यांना दिलेले आहेत.

कामाच्या ठिकाणी अभियंता अनुपस्थित

महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे काम चालू असताना त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या अभियंताने त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ही घटना घडली तेव्हा तेथे एकही अभियंता उपस्थित नव्हता.

तसेच वरिष्ठांनी घटनास्थळी जाण्याचे आदेश दिल्यानंतर व कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितल्यानंतरही त्यांना दिवसभरात काय केले याची माहिती रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे अभियंता देखील या प्रकरणात कुचराई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पीडित तरुणीच्या पदरी निराशाच का? पुणे पोलिसांकडून देण्यात आला नव्या मागणीला नकार 

0

काही दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे, मात्रा आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

काय आहे पीडितेची मागणी?

स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्तावर सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशिर केल्याचं स्पष्टीकरण यावर पुणे पोलिसांकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील कोण असणार? हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या

स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी तब्बल 13 पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली होती, तो त्याच्या मुळगावी गुणा येथे लपून बसल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी आरोपीच्या गावात त्याचा कसून शोध घेतला. त्याची माहिती सांगणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं.

अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने पीडितेवर दोनदा बलात्कार केल्याचं वैद्यकीय अहवालामधून समोर आलं आहे. मात्र या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे, आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

विकी कौशल ‘या’ गंभीर आजारातून सुखरूप बाहेर; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद

0

बॉलीवूडमध्ये सध्या कोणत्या अभिनेत्याची हवा असेल तर तो अभिनेता विकी कौशल आहे. विकी कौशलने त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वांच्या मनात स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. चित्रपटाचं तर कौतुक होतचं आहे सोबतच विकीच्या अभिनयाचं कौतुक करताना चाहते थांबत नाहीयेत. विकीने त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून सर्वांनाच त्याने चकित केलं आहे. या चित्रपटानंतर तर त्याचा चाहतावर्गही प्रचंड वाढला आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सर्चही केल्या जात आहेत.

विकी नेमक्या कोणत्या आजाराने त्रासलेला होता?

पण बऱ्याच चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की तो एका गंभीर आजारातून बाहेर आला आहे. होय, त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासलं होतं, ज्यामुळे त्याचे हातपाय देखील कम करायचे बंद झाले होते. विकी कौशलने स्वतः एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली. विकी नेमक्या कोणत्या आजाराने त्रासलेला होता? आणि हा आजार किती गंभीर स्वरूपाचा असतो, तसेच त्यावर कोणते उपाय आहेत? या सर्वांबद्दल जाणून घेऊयात.

विकी कौशलला कोणता आजार झाला होता?

विकी कौशलला स्लीप पॅरालिसिस नावाचा एक गंभीर आजार होता, ज्यामध्ये व्यक्ती झोपेच्या वेळी काहीही हालचाल करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही. विकीने स्वतः या आजाराची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. विकिने सांगितलं की, त्याच्यासाठी हा खूप भयानक अनुभव होता. पण त्यावर मात करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही तो म्हणतो.

स्लीप पॅरालिसिस म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणे आणि उपाय काय?

स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?

हा एक झोपेचा आजार आहे. हे झोपेच्या पद्धती बदलल्यामुळे होऊ शकतो. यामध्ये, असे वाटते की ती व्यक्ती झोपेतून जागी तर झाली आहे, पण अंथरूणावर उठू शकत नाही, अगदी कोणतेही काम करू शकत नाही. ही अशी स्थिती असते, ज्यात खूप प्रयत्न करूनही व्यक्तीला हात-पाय हलवता येत नाहीत. यासोबतच, या आजारादरम्यान, व्यक्तीला झोपेत उंच ठिकाणाहून पडणे, पाण्यात बुडणे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा भयानक गोष्टी दिसतात.

स्लीप पॅरालिसिस कशामुळे होतो?

स्लीप पॅरालिसिस झोपेच्या विकारांपैकी एक आजार असल्यामुळे यात मोठे कारण म्हणजे झोपेचा अभाव. तसेच झोपण्याच्या पद्धतीत बदल, मादक पदार्थांचे सेवन जास्त केल्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त ताण घेणे, पॅनिक डिसऑर्डर आणि मेंदूवर जास्त दबाव आल्याने देखील हा आजार उद्भवू शकतो.

स्लीप पॅरालिसिसवर उपाय काय?

स्लीप पॅरालिसिसच्या बाबतीत बिघडलेली जीवनशैली सुरळीत करणे आणि चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात निरोगी दिनचर्यांचा समावेश करून जास्तीतजास्त विश्रांती घेणे महत्त्वाचे. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे, आनंद वाटेल अशा गोष्टीमध्ये मन रमवणे, पोषक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वा गोष्टींवर जोर देणे गरजेचे आहे.

(तळटीप: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्त्रोतांवरून घेण्यात आली आहे. हा कोणत्याही वैद्यकीय मताचा पर्याय नाही. त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.)

अमेरिकन पाहुण्यांचे हडपसरमध्ये मनपा शाळेमध्ये प्रथमच आगमन ….. ‘मुख्याध्यापक व शिक्षकांनी केला शाळेचा कायापालट’

0

डेटा एक्सल कंपनी पुणे यांचेकडून पुणे मनपा शाळा साडेसतरा नळी, हडपसर या शाळेस ६.५० लाख रुपयांचे संपूर्ण इमारत रंगकाम, ५ कपाटे, १३ व्हाईट बोर्ड, १ नोटीस बोर्ड, ५ सतरंज्या, इ. शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यानिमित्ताने डेटा एक्सल कंपनी पुणे, रोटरी क्लब सिंहगड रोड चॅरिटेबल ट्रस्ट आणि IFRM ३१३१ यांचे संयुक्त सहकार्याने हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

उद्घाटन प्रसंगी डेटा एक्सल कंपनीचे पुणे आणि अमेरिकन प्रतिनिधी सुमित भल्ला, विशाल भसीन, जीन मोसेले, ख्रिस्टी मॅक्ग्रथ, मार्क कलीनेन, जेसिका जोन्स, लॉवेल ऑरेलप, ब्रूक ओकीफ, सुनिल मंडलीया, सांथी जनपती, अजर बॅक्सी उपस्थित होते. तसेच मॅनेजिंग डायरेक्टर फेनास ऑटो लि. व सीएसआर समन्वयक रोटरी मा. दिपक महाजन, अध्यक्ष रोटरी क्लब सिंहगड रोड चॅरिटेबल ट्रस्ट मा. अभय देवारे उपस्थित होते. तसेच पुणे महापालिका शिक्षण विभाग प्राथ. उप – प्रशासकीय अधिकारी मा. शुभांगी चव्हाण व मा. शिल्पकला रंधवे, सहा. प्रशा. अधिकारी (क्रीडा) मा. सुनिल ताकवले, पर्यवेक्षिका मा. लिला मोरे, श्रुफिन फौंडेशन सीईओ मा. विजय राठोड व अध्यक्ष, उपशिक्षिका सौ. सविता रासोटे उपस्थित होते. सर्व परदेशी पाहुण्यांचे शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने ढोल – ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. इ. ३ री च्या मुलींनी स्वागत नृत्य सादर केले. पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विशाल भसीन यांनी मुलांना ध्येय साध्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्यास सांगितले. डेटा एक्सल कंपनी आणि IFRM ३१३१ यांचे मदतीमुळे शाळेचे रूप बदलण्यास मदत झाली, असे दिपक महाजन यांनी आपल्या भाषणात म्हटले. मा. शुभांगी चव्हाण यांनी शिक्षक, शालेय गुणवत्ता व उपक्रमांचे कौतुक केले व शाळेस सहाय्य करणाऱ्या या संस्थांचे आभार मानले. तसेच सौ. सविता रासोटे म्हणाल्या की, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हे पितृतुल्य भावनेने कार्यरत आहेत.यानंतर अतिथींच्या हस्ते मुख्य नामफलकाचे व सुसज्ज वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी जाधव व आभार प्रदर्शन चैताली देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती राठोड, शिक्षक विजय माने, राधिका गोरे, तानाजी सूर्यवंशी, आदिनाथ गोल्हार, विद्या लाळगे, सुनिल चोभे व अस्मिता सुरवसे, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न

0

चेंबूर दि. ११ (अधिराज्य) प्रत्येक देशाचा कारभार हा त्याच्या सामाजिक, राजकीय प्रगतीवर टिकून असतो त्यामुळे समाजात सामाजिक मूल्यांची जाण असलेले चांगले सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत या अनुषंगाने संकल्प संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते त्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंत वालावलकर स्कुल नेहरू नगर कुर्ला (पू) या ठिकाणी रविवार ९ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला.

सामाजिक क्षेत्रातील कार्य करीत असलेल्या तसेच समाज कार्य करण्याची आवड असणाऱ्यांसाठी १९ आठवड्याचे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते, या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय ? समाज कार्याचे महत्त्व नेतृत्वगुण, संवादकौशल्य, गटकार्य, प्रचार-प्रसिद्धी माध्यमे, समाज कार्यकर्त्याची भूमिका आणि विविध सामाजिक समस्या अशा विविध विषयांवर ४९ तज्ञ व्यक्ती कडून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चार शनिवार विविध संस्था संघटना आणि शासकीय कार्यालयामध्ये शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती सोबतच दोन दिवसीय निवासी शिबिर देखील घेण्यात आले होत त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास व स्वपरिचय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोक सेवा संगम संचालिका इथेल डिसूझा, सिने नाट्य अभिनेत्री अमृता उत्तरावर, ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या श्रीदेवी लोंढे, महाराष्ट्र विद्या विकास मंडळ कुर्लाचे सचिव सत्येंद्र जाधव, संकल्प संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद हिवाळे, कार्यक्रमाचे समन्वयक सविता हेंडवे, वनिता सावंत यांची उपस्थिती लाभली होती.

सदर प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पगुच्छ अर्पण करून स्वागतगीत आणि सामूहिक उद्देशिके चे वाचन करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला, वनिता सावंत यांनी उपस्थित पाहुण्यांचा अल्पपरिचय देऊन त्यांचे स्वागत केले तर समन्वयक सविता हेंडवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना फार सरळ मोजक्या शब्दात मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम आणि नेहा सावंत यांनी उत्कृष्ट प्रकारे केले. सर्व प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणा दरम्यान आपले अनुभव, काय शिकायला मिळाले काही अडचणी असतांना देखील प्रशिक्षण कसे यशस्वी पूर्ण केले तसेच भविष्यातल्या त्यांच्या वाटचाल कशी असेल मनोगताचा माध्यमातून सांगितले. उपस्थित पाहुण्यांचा हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांनी १९ आठवड्यांचे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा हस्ते विशेषता निवासी शिबिरा मध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटीज च्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

स्वागत अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी सामाजिक कार्यकर्ता यांचे भूमिका आणि भविष्यातले कार्य कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन भविष्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलोफर शेख यांनी केले. विशेष आभार वर्षाताई विद्या विलास, विद्या पाटेकर डॉ. संतोष कांबळे,आदेश पगारे सुजाता सावंत, स्वप्निल जाधव, सुनीता चिकणे शिवाजी नगर पोलीस स्टेशन, जनजागृती विद्यार्थी संघ,लोकमान्य तिलक सामान्य रुग्णालय सायन, महाराष्ट्र नशा बंदी मंडळ समतोल फाउंडेशन,युसुफ मेहर अली सेंटर,प्रिंटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष सहकार्य दिपा गमरे राजेंद्र कांबळे सूर्यकांत चव्हाण यांचे लाभले. सरतेशेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

भाजपची विधानपरिषदेची 3 नावं ठरली, उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू याचं नाव पुन्हा दिल्लीला पाठवलं, अन्य 2 नावंही समोर!

0

निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात, भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये, भाजपकडून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन निष्ठावंत नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील असून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची एक आहे.

राष्ट्रवादीचीही बैठक संपन्न

विधानपरिषदेवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी अजित पवारांनी काहींना शब्द दिला होता. त्यामुळे, ते नेते सध्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडेल अशी आशा बाळगून आहेत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रम- 

विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार…..

  • 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.
  • 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
  • 18 मार्चला उमेदवारी अर्ज छाननी
  • 20 मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.
  • 27 मार्चला मतदान प्रक्रिया होणार आहे.

मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

‘सज्जन आता जगणारच नाही…’ तुकोबांबरोबर एकनाथ ही दूर सारायचा प्लॅन तयार…; जयंत पाटलांनी नेहमीच्या शैलीत महायुतीवर डागले बाण

0

‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, या अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलेल्या ओळीचाच आधार घेत जयंत पाटलांनी सरकारला चिमटे काढले. राज्याची आर्थिक परिस्थिती, वाढलेली गुन्हेगारी, लोकांसाठी आणलेल्या योजनांसाठी तरतूद न केल्याचा मुद्दा अधोरेखित जयंत पाटलांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारला सुनावले.जयंत पाटलांनी विधानसभेत एक कविता वाचून दाखवत अर्थसंकल्पावर भाष्य केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “अजित पवारांनी कविता दिली. महाराष्ट्र आता थांबवणार नाही, अशी कविता आहे. पण, मीही विचार करायला लागलो की कविता काही सुचतेय का बघावं. शंभूराजे, मी काही कविच्या मार्गावरचा नाहीये. पण, तरी चार ओळी सुचल्या आहेत”, असे म्हणत जयंत पाटलांनी कविता वाचून दाखवली.

जयंत पाटलांनी विधानसभेत म्हटलेली कविता- 

सज्जन आता जगणार नाही

दुर्जन आता मरणार नाही                      महाराष्ट्र आता थांबणार नाही….!

गुन्हेगारी थांबणार नाही

रक्तपात रोखणार नाही                          महाराष्ट्र आता थांबणार नाही….!

पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही

जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही         महाराष्ट्र आता थांबणार नाही….!

आश्वासने पूर्ण करणार नाही

विकासाची वाट धरणार नाही                      महाराष्ट्र आता थांबणार नाही….!

रोजगार देणार नाही

शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही      महाराष्ट्र आता थांबणार नाही….!

अजितदादांनी तुकोबांना दूर केलंय

कविता वाचल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे”, असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.

महात्मा फुले योजना थकीत बिलांपोटी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरात रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

0

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. बुधवारअखेर (दि. ५) या योजनेची थकबाकी १,५७७ कोटी ७२ लाख २३ हजार ६८० हजार रुपयांवर पोहोचली. यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले. या निधीतून रुग्णालयांची थकबाकी अदा करावी, असे आदेशात म्हटले आहे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदायी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना निधीटंचाईच्या गर्तेत सापडली होती. या योजनेतून उपचार करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांना जुलै २०२४ पासून छदामही देण्यात आलेला नाही. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सामान्यत: दीड ते दोन महिन्यांत पैसे अदा होतात; पण सध्या मात्र आठ महिन्यांपासून पैशांची प्रतीक्षा आहे. परताव्यासाठी रुग्णालये शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

राज्यभरातील रुग्णालये – १,६६१                              जुलै २०२४ पासून थकबाकी – १,५७७ कोटी ७२ लाख,

जिल्हानिहाय थकबाकी अशी- ———-

जिल्हा थकबाकी (कोटींमध्ये)

अहिल्यानगर ९८ कोटी १४ लाख

अकोला ३५ कोटी ६० लाख

अमरावती ४६ कोटी

बीड २० कोटी

भंडारा ४ कोटी

बुलडाणा २० कोटी

चंद्रपूर ५ कोटी

छत्रपती संभाजीनगर ११३ कोटी

धाराशिव ७ कोटी

धुळे ४५ कोटी

गडचिरोली १ कोटी

गोंदिया ७ कोटी

हिंगोली ३ कोटी

जळगाव ४२ कोटी

जालना २८ कोटी

कोल्हापूर ९० कोटी

लातूर २४ कोटी

मुंबई आणि उपनगरे १२७ कोटी

नागपूर १०६ कोटी,

नांदेड ४३ कोटी

नंदुरबार ६ कोटी

नाशिक १८७ कोटी

पालघर ७ कोटी

परभणी ५ कोटी

पुणे ११५ कोटी

रायगड २९ कोटी

रत्नागिरी १८ कोटी

सातारा ४६ कोटी

सांगली – ५९ कोटी

सिंधुदुर्ग ७ कोटी

सोलापूर ७१ कोटी

ठाणे ९८ कोटी

वर्धा ३९ कोटी

वाशिम १४ कोटी

यवतमाळ १२ कोटी

गेल्या आठ वर्षांपासून रखडल्या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती; लवरकच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करणार: शासन निर्णय

0

राज्यातील पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाने दिलासा दिला आहे. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. ही पदोन्नती गेल्या आठ वर्षांपासून रखडली होती. आता त्यासंबंधित आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्यात येणार आहेत. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून 125 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. त्यावर आता महसूल विभागाने निर्यण घेतला आहे. या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली होती.

राज्यसेवेतील कोणत्या अधिकाऱ्यांना IAS पदी बढती?

1. संजय ज्ञानदेव पवार

2. नंदकुमार चैतराम भेडसे

3. सुनील बजाजीराव महिंद्रकर

4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर

5. निलेश गोरख सागर

6. लक्ष्मण भिका राऊत

7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार

8. माधवी समीर सरदेशमुख

9. बाळासाहेब जालिंदर बेलदार

10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार

11. आण्णासाहेब दादू चव्हाण

12. गोपीचंद्र मुरलीधर कदम

13. बापू गोपीनाथराव पवार

14. महेश विश्वास आव्हाड

15. वैदही मनोज रानडे

16. विवेक बन्सी गायकवाड

17. नंदिनी मिलिंद आवाडे

18. वर्षा मुकुंद लड्डा

19. मंगेश हिरामन जोशी

20. अनिता निखील मेश्राम

21. गितांजली श्रीराम बाविस्कर

22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे

23. अर्जुन किसनराव चिखले

राज्याचे ‘कर्ज झाले तिप्पट महसुली तूटही दुप्पट…..’; ‘स्थानिक’च्या निवडणुका या निधीत 11 % वाढ तर लाडकी बहीण निधी एवढ्या कोटींनी कमी

0

महायुती सरकारने निवडणूकपूर्वी जाहीर केलेल्या योजनांमुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा भार वाढला आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. या अर्थसंकल्पीय सत्रात महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे कर्ज तब्बल 9.3 लाख कोटी रुपये एवढे आहे. तसेच, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महसुली तूट 45,891 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन योजना नाहीत – फक्त विद्यमान योजनांवर भर

राज्याच्या तिजोरीत फारसे पैसे शिल्लक नसल्याने, सरकारने या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या नव्या योजना जाहीर केल्या नाहीत. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या मोठ्या आश्वासनांपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये वाढवण्याची घोषणा आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही.

सरकारने मुख्यतः विद्यमान योजनांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे आणि राज्याच्या कर्ज आणि वित्तीय तुटीला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

लाडकी बहीण योजनेचा निधी 10,000 कोटींनी कमी केला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या वर्षी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 10,000 कोटींनी कमी आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेसाठीच्या निधीत 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा निधी 18,165 कोटी रुपयांवरून 20,165 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

तसेच, अनुसूचित जातींसाठीच्या वार्षिक योजनेतील निधीत 42 टक्के, तर आदिवासी घटकासाठीच्या योजनेतील निधीत 40 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

नवीन कर आणि महसुली उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न

सरकारने महसूल वाढवण्यासाठी नवीन कर लावण्याचे प्रस्तावित केले आहे. मुख्यतः मोटार वाहनांशी संबंधित नवीन करांमधून सुमारे 1,125 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय, काही व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कही वाढवण्यात आले आहेत.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता, राज्याच्या कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होते. 2024-25 या वर्षी राज्याचे कर्ज 7.1 लाख कोटी रुपये होते, तर आता ते 9.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दहा वर्षांत हे कर्ज तीनपट वाढले आहे.

राज्याची महसुली तूटही मोठ्या प्रमाणावर वाढली असून, गेल्या वर्षीच्या 20,051 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ती 45,891 कोटी रुपये एवढी आहे, म्हणजेच ती दुप्पट झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, कर्ज आणि वित्तीय तूट ही ठरलेल्या मर्यादेतच आहे.

त्यांनी सांगितले की, राज्याचा वित्तीय तुटीचा दर 2.76% आहे, जो मान्य मर्यादेत आहे. तसेच राज्याचे कर्ज सकल राज्य उत्पन्नाच्या (GSDP) 18.7% आहे, तर ठरवलेली कमाल मर्यादा 25% आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आलेला नाही. सर्व प्रकल्प हे आधीच सुरू असलेले प्रकल्प असून, त्यासाठी कोणत्याही नव्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

सरकारने राज्याच्या आर्थिक स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन योजना आणण्याऐवजी, खर्च मर्यादित ठेवण्यावर भर दिला आहे. मात्र, वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर सरकारला भविष्यात आर्थिक आव्हाने मोठ्या प्रमाणावर भेडसावू शकतात.