Home Blog Page 154

कोल्हापुरात धक्कादायक वृत्त माजी आमदाराच्या पुतण्याचा जागीच मृत्यू गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका

0

धगधगत्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या अनेक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच आता कोल्हापुरातून धक्कादायक महिती समोर आली आहे. गाडी चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने माजी आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.

माजी आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू

काँग्रेसचे माजी आमदार पी एन पाटील यांच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची समोर आलं आहे. गाडी चालवत असताना धीरज पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा गाडीवरचा कंट्रोल सुटला. गाडीचे नियंत्रण सुटून अपघात झाला आहे. टेबलाई उड्डाण पूलाजवळ हा अपघात घडल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

https://x.com/News18lokmat/status/1900818842181382443?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1900818842181382443%7Ctwgr%5Ecc0ea49fa087e9533d29a37011769ee869942c6a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnews18marathi.com%2Fmaharashtra%2Fformer-mla-pn-patil-nephew-dheeraj-patil-dies-suffering-a-heart-attack-while-driving-shocking-cctv-video-1356746.html

गाडीचं नियंत्रण सुटलं अन्…

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओनुसार ही घटना रात्री आठच्या सुमारास घडल्याची माहिती मिळतीये. धीरज पाटील कारने प्रवास करत असताना वाटेत त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. काहीतरी होतंय असं जाणवल्यावर त्यांच्या गाडीचं नियंत्रण सुटलं. तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गाडी फ्लायओव्हरवर न घातला त्यांनी गाडी वळवली मात्र गाडीचा स्पीड इतका होता की, धीरज पाटील यांना काहीही सुधारलं नाही.

हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

दरम्यान, गाडीने पुढे जाऊन दुचाकी आणि दुकानांना धडक दिल्यानंतर गाडी जागेवरच थांबली. गाडीचा अपघात झाल्यानंतर धीरज पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढलं अन् दवाखान्यात नेलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

आळंदीच्या या भागात अफुची लागवड, जगताप मळा रस्त्यावर पोलिसांचा छापा अफुची ६६ झाडे महिला गजाआड

0

पुणे : लोणी काळभोर भागातील म्हातोबाची आळंदी गावात एका शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली.

याप्रकरणी मंगल दादासाहेब जावळकर (वय ४५, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर, ता. हवेली) हिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

पुणे-सोलापूर रस्त्यावर म्हातोबाची आळंदी गाव आहे. जगताप मळा रस्त्यावर मंगल जावळकर हिची जागा आहे. या जागेत अफुची लागवड करण्यात आली होती. तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याची माहिती खबऱ्याने लोणी काळभोर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पंचासमक्ष तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जमीन मालक जावळकर हिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार क्षीरसागर, वणवे, कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे यांनी ही कारवाई केली.

अफू लागवडीचे दोन प्रकार

यापूर्वी लोणी काळभोर भागात शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. अफुची बेकायदा लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. शेतात अफू, गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक राजेंद्र उन्हाळे यांनी दिला आहे. वर्षभरापूर्वी उजनी धरणाच्या पाणलोटात केळीच्या शेतात अफुची लागवड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

“आरएसएस हे विष आहे”, तुषार गांधींच्या विधानावरून वाद; माफीच्या मागणीस स्पष्ट नकार! गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता…. भिती व्यक्त 

0

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तुषार गांधींच्या हस्ते केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान तुषार गांधींनी भारतीय जनता पक्ष व RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत विधान केल्यानंतर त्यावरून दोन्ही संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र, आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचं तुषार गांधींनी स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले होते तुषार गांधी?

तुषार गांधींनी या कार्यक्रमादरम्यान भाजपा व आरएसएस यांच्यावर टीकात्मक टिप्पणी केली होती. “आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या घडामोडींची भीती वाटायला हवी. कारण जर आत्माच नष्ट झाला, तर सारंकाही नष्ट होईल”, असं तुषार गांधी या कार्यक्रमात म्हणाले होते.

तुषार गांधींच्या या विधानावरून भारतीय जनता पक्ष व आरएसएसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. केरळमध्येच भाजपा व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही कार्यकर्त्यांनी तुषार गांधी यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. केरळमधील सत्ताधारी माकप व विरोधातील काँग्रेस पक्ष या दोघांनी या कृत्यांचा निषेध केला आहे.

मी माफी मागणार नाही – तुषार गांधी

दरम्यान, भाजपा व आरएसएसकडून तुषार गांधींनी माफी मागण्याची व विधान मागे घेण्याची मागणी केली जात आहे. त्यावर तुषार गांधींनी स्पष्ट नकार दिला आहे. “त्यांची इच्छा आहे की मी जे काही म्हणालो त्याबद्दल माफी मागावी. माझं विधान मागे घ्यावं. पण मी म्हणालो मी ते करणार नाही. मी जेव्हा काही बोलतो, तेव्हा मी त्याबद्दल माफी मागावी लागेल किंवा ते विधान मागे घ्यावं लागेल असा विचार अजिबात करत नाही”, असं तुषार गांधी शुक्रवारी कोचीतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

“या असल्या प्रकारांमुळे गद्दारांना लोकांसमोर उघडं पाडण्याचा माझा निर्धार आणखी पक्का होतो. कारण हा लढा स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. आता आपल्या सर्वांसमोर एकच शत्रू आहे. त्या सगळ्यांना उघडं पाडायलाच हवं. मला तर भीती वाटते आहे की महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता गांधींच्या पुतळ्यावरही हल्ला करतील की काय. सवयीप्रमाणे ते आता माझ्या पणजोबांच्या पुतळ्यावरही गोळ्या झाडणार का?”, असा प्रश्नही तुषार गांधींनी यावेळी उपस्थित केला

जुन्या नव्यांचा संगम असलेल्या रोहित सेनेची चॅम्पियन्स ट्रॉफी कामगिरी; काय काय केले विक्रम? विजयी ‘पंच’… 9 महिन्यांतच दुसरी ट्रॉफी

0

भारतीय क्रिकेट संघाने गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्च रोजी न्यूझीलंडला अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडियाने यासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 5 सामने खेळले आणि ते जिंकलेही. थोडक्यात सांगायचं तर टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारतासाठी प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 4 वेगवेगळे खेळाडू हे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले. विराट कोहली याने 2, तर रोहित, उपकर्णधार शुबमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 वेळेस हा पुरस्कार जिंकला.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसह योगदान दिलं. या स्पर्धेसाठी एकूण 15 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र त्यापैकी ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह या तिघांचा अपवाद वगळता इतर सर्व खेळाडूंना प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टीम इंडियाच्या या 12 खेळाडूंनी स्पर्धेत कशी कामगिरी? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. तसेच त्याआधी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासह काही विक्रम केलेत. तसेच काही वर्ल्ड रेकॉर्डही केले. रोहितसेनेने नक्की काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

विजयी ‘पंच’

टीम इंडियाने साखळी फेरीत अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचा वचपा काढला. त्यानंतर भारत-न्यूझीलंड साखळी फेरीनंतर अंतिम सामन्यात भिडले. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 252 धावांचं आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने अशाप्रकारे एकूण आणि सलग 5 सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

9 महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी

भारताने यासह 9 महिन्यांत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. रोहितसेनेने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच भारताने 12 वर्षांची प्रतिक्षाही संपवली. टीम इंडियाने याआधी 23 जून 2013 रोजी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह वर्ल्ड रेकॉर्ड आणि 25 वर्षांआधीचा हिशोब बरोबर

भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाने या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी इंडिया पहिलीच टीम ठरली. तसेच न्यूझीलंडचा हिशोबही चुकता केला. टीम इंडियाने 2002 साली श्रीलंकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर केली होती. अर्थात श्रीलंका आणि भारत संयुक्त विजेते ठरले होते. तर त्याआधी 2000 साली न्यूझीलंडने भारताला आयसीसी नॉकआऊट फायनलमध्ये पराभूत केलं होतं. भारताने त्या पराभवाची 25 वर्षांनंतर परतफेड केली.

अनुभवी जोडीची चौथी तर जडेजाची तिसरी आयसीसी ट्रॉफी

दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीची चौथी तर रवींद्र जडेजाची ही तिसरी आयसीसी ट्रॉफी ठरली. रोहित याआधी टी 20 वर्ल्ड कप (2007 आणि 2024) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 विजयी संघातील सदस्य होता. तर विराट वनडे वर्ल्ड कप 2011, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघात होता. तर रवींद्र जडेजाची तिसरी ट्रॉफी ठरली. जडेजा याआधी टी 20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 विजेता संघाचा भाग होता.

खेळाडू निहाय कामगिरी- 

कॅप्टन रोहित शर्मा

रोहितने कर्णधार म्हणून त्याची भूमिका चोखपणे पार पाडली. रोहितला फलंदाज म्हणून काही खास करता आलं नाही. मात्र रोहितने अंतिम फेरीत सर्व भरपाई केली. रोहितने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना 76 धावांची झंझावाती खेळी करुन टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली. रोहितला या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितने संपूर्ण स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 180 धावा केल्या. तसेच 1 कॅचही घेतली.

उपकर्णधार शुबमन गिल

उपकर्णधार शुबमन गिल याने चॅम्पियन्स ट्रॉफीत शतकाने सुरुवात केली. शुबमनला त्यासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं. गिलने एकूण 5 सामन्यांमध्ये 188 धावा केल्या. तसेच 5 कॅचेसही घेतल्या.

अनुभवी विराट कोहली

रनमशीन, चेजमास्टर, किंग कोहली अशी अनेक बिरुदावली मिरवणाऱ्या विराटने धमाकेदार कामगिरी केली. विराटने 5 सामन्यांमध्ये 1 शतकासह 218 धावा केल्या. तसेच 7 कॅचेस घेतल्या आणि 1 रन आऊट केला. विराट एकूण 2 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

मिडल ऑर्डरचा कणा श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर याने संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 5 सामन्यांमध्ये 243 धावा केल्या. श्रेयसने मिडल ऑर्डरमध्ये चौथ्या स्थानी निर्णायक भूमिका बजावली. तसेच श्रेयसने टीम इंडिया अडचणीत असताना तारणहाराची भूमिका बजावली. तसेच श्रेयसने 2 कॅच घेण्यासाठी 1 रन आऊटही केला.

विकेटकीपर केएल राहुल

विकेटकीपर म्हणून केएल राहुल याने चांगली कामगिरी केली. तसेच केएलने बाद फेरीतील सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. केएलने 140 धावाच केल्या. मात्र त्याने ज्या क्षणी या धावा केल्या ती वेळ फार अटीतटीची होती. केएलने या धावांसह स्टंपमागून 5 कॅचेस घेतल्या. तसेच 1 रन आऊटमध्ये योगदान दिलं.

ऑलराउंडर अक्षर पटेल

अक्षर पटेल याने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर निर्णायक भूमिका बजावली. अक्षरने पाचव्या आणि त्या खालील स्थानी येत बॅटिंग केली. अक्षरने एकूण 109 धावा केल्या. तसेच 5 विकेट्सही घेतल्या. सोबतच 2 रन आऊट आणि 2 कॅचेसही घेतल्या.

हार्दिक पंड्या

ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 99 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. हार्दिकने मोक्याच्या क्षणी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. तसेच 2 कॅचेसही घेतल्या.

‘सर’ रवींद्र जडेजा

ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने 5 विकेट्स घेतल्या. तसेच 27 धावा केल्या. सोबत 1 कॅचही घेतली. मात्र जडेजाने नेहमीप्रमाणे अप्रतिम फिल्डिंग केली. तसेच जडेजाने फिल्डिंगद्वारे कितीतरी धावा रोखल्या.

कुलदीप यादव

फिरकीपटू कुलदीप यादव याने एकूण 7 विकेट्स घेतल्या. मात्र अंतिम सामन्यात 2 विकेट्स घेत कुलदीपने सामन्यात टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवण्यात मदत केली. तसेच कुलदीपने 1 कॅचही घेतली.

‘मिस्टर आयसीसी’ मोहम्मद शमी

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने या स्पर्धेत एकूण 9 विकेट्स घेतल्या. शमीने बांगलादेशविरुद्ध 5 विकेट्सही घेतल्या. अंतिम फेरीत 1 विकेट मिळवली. तर स्पर्धेत एकमेव कॅच घेतली.

‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा या दोघांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अखेरच्या क्षणी निवड करण्यात आली. कॅप्टन रोहितने हर्षितच्या जागी वरुणला संधी दिली. वरुणने कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. वरुणने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. वरुणने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. त्यासाठी वरुणला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं. त्यानंतर वरुणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनल आणि अंतिम फेरीत प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

हर्षित राणा

हर्षित राणा याला फक्त 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. हर्षितने एकूण 4 विकेट्स घेतल्या. हर्षितने बांगलादेशविरुद्ध 3 आणि पाकिस्तानविरुद्ध 1 विकेट घेतली.

कोचिंग स्टाफ

तसेच अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत या तिघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकदाही संधी मिळाली नाही. मात्र या तिघांनी एनर्जी ड्रिंकसह ड्रेसिंग रुम ते ऑन फिल्ड खास मेसेज पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे यांचंही योगदान विसरुन चालणार नाही. तसेच हेड कोच गौतम गंभीर, बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल, फिल्डिंग कोच टी दिलीप, असिस्टंट कोच अभिषेक नायर आणि रेयान टेन डेस्काटे आणि इतर सपोर्ट स्टाफनेही पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.

संतोष देशमुख हत्येतील आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?

0

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ लागली आहे. आता मस्साजोग ग्रामस्थांनी यंदाचा होळी सण साजरा केला नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा करणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते वाल्मीक कराड यांच्या दिशेने वळली होती. त्यानंतर या प्रकरणात ९ ते १० आरोपींना अटक करण्यात आली होती. वाल्मीक कराड या प्रकरणात पुणे सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. त्यानंतर या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखर अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आठ व्हिडीओ आणि १५ फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोत ही हत्या किची निर्घृण आणि क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

संतापाचा उद्रेक उडाला

संतोष देशमुख यांच्या मृतदेहांची अक्षरश: विटंबना करतानाचे फोटो काढण्यात आले होते. हा फोटो व्हायलर करण्यात आले. त्यामुळे संतापाचा उद्रेक उडाला. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभारला गेला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात मस्साजोगमध्ये यंदा होळी आणि धुळवड साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. इतकेच या पुढे जोपपर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही तर मस्साजोगमध्ये कोणताच सण साजरा न करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे.

‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्याचे विखारी वक्तव्य; भाजपा – मनसे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

0

भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. ‘तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.

नेमकं काय म्हणाले कृपाशंकर सिंग?

त्यांना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कधीच कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही, होळीच्या निमित्तानं मला वाटतं त्यांना पण एक भांगेचा गोळा पाठवण्याचा प्रयत्न करतो’, असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कृपाशंकर सिंग यांच्या या टीकेवर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांना इशारा दिला आहे. आज सगळीकडे सगळेजण मजा करत आहेत, रंगाची उधळण होत आहे. तर त्यांना मजा करू द्याना आणि स्वत:ही मजा करा. कशाला गलिच्छ राजकारण करता. तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार, कृपा शंकर सिंग यांना इशारा देण्याइतपत ते काही मोठे नाही, राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते एक फेरीवाले आहेत. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात, असा घणाघात खोपकर यांनी यावेळी केला आहे.

राज्यात 2014 च्या महायुती सरकारपासूनच शक्तीपीठ महामार्गाची चर्चा; हा महामार्ग कसा? कोणती तीर्थक्षेत्र जोडणार? शेतकऱ्यांचा विरोध का?

0

राज्यात महायुती सरकार आल्यापासून म्हणजेच 2014 पासूनच या महामार्गाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा, स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध यामुळे ही चर्चा तिथेच थांबली होती. मात्र, आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना जोडणारा एक मोठा रस्ता करुन त्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांचं कॉरिडोअर तयार करण्याची सरकारची तयारी आहे. हा महामार्ग म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग आहे. याच शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय. काल मुंबईतील आझाद मैदानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी हा महामार्ग होऊ नये, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, हा महामार्ग नेमका कसा, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार, विरोध का होतोय हे प्रश्न अनेकांना पडले आहेत. हे या वृत्तातून जाणून घेऊ….

राज्यात महायुती सरकार आल्यापासून म्हणजेच 2014 पासूनच या महामार्गाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा, स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध यामुळे ही चर्चा तिथेच थांबली होती. मात्र, त्यानंतर 2024 ला या महामार्गाची अधिसूचना निघाली आणि पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. कारण, आता शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या प्रस्तावित महामार्गाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे हा महामार्ग नेमका कसा? शेतकऱ्यांचा विरोध का? आणि सरकारची भूमिका काय या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ.

कुठून कुठपर्यंत आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग? 

  • वर्ध्यातील पवनारपासून ते पत्रादेवीपर्यंत जणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा तब्बल 802 किलोमिटरचा सहा        पदरी महामार्ग आहे.
  • राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग गोव्यातील पत्रादेवीपर्यंत आहे.
  • सरकारी अधिूचनेत या महामार्गाला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे.
  • सरकारच्या योजनेनुसार विदर्भातील वर्ध्यापासून सुरूवात होऊन पुढे यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद,              परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग असा हा महामार्ग असणार आहे.
  • तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी हा महामार्ग असल्यानं, या महामार्गाच्या माध्यमातून,माहूर,तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) या सर्व क्षेत्रांना जोडणार आहे.

शेतकऱ्यांचा विरोध का?

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची मागणीच केली नव्हती, या महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमीहीन होतील, रस्ते असूनही पुन्हा त्याबाजूने दुसरे रस्ते कशाला हवे असं मत शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे शेतकरी या महामार्गाला विरोधक करत आहेत.

काल आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी सांगितलं की, आमचं सगळं कुटुंब शेतीवर आधारित आहे, ही जमीन गेल्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही. तसंच जमिनीच्या मोबदल्यात सरकार जो मोबदला देईल, तो काहीच पुरणार नाही, आम्हाला दुसरीकडे जमीनही मिळणार नाही, कुणी जमीन विकणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फायदा नाही, आमची शेती गेल्यावर कशावर उदरनिर्वाह करायचा असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

सरकारची भूमिका काय? 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे असं म्हणत हा प्रश्न सभागृहात मांडला. कोल्हापुरात स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हा महामार्ग लादणार नाही असं सांगितलं होतं, त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी असं दानवे म्हणाले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र तो लादायचा नाही. हा महामार्ग केवळ शक्तीपीठे किंवा आस्थेची केंद्रे जोडणार्‍या महामार्गापुरता मर्यादित नसून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे जीवनमान बदलणार आहे!”

सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करतय! 100 दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा 

0

मुंबई : शंभर दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केलाय. सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. राज्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांची जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली. फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजापूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार त्याचीच पाण्याअभावी आत्महत्या

आता सरकारमध्ये जे सुरू आहे ते अतिशय धक्कादायक आहे. ज्या शेतकऱ्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला तोच पाण्याअभावी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याकडे काही बघायचं नाही तर फक्त जातीय दंगली भडकवायच्या आहेत. हा रंगाचा महोत्सव आहे, सर्व जातीधर्माचे लोक सणांमध्ये सहभागी होतात पण सत्ताधाऱ्यांमधील काहींना हे खुपत आहे, असे ठाकूर म्हणाल्या.

दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल

शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी निर्णय घेण्याची बुद्धी देवाने सरकारला द्यावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. शंभर दिवसाच्या आत एका मंत्राचा राजीनामा द्यावा लागतो. आता दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसले आहे ही वास्तविकता आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.

राजापूरच्या मशिदीबाहेर राडा, ठाकूर म्हणाल्या, काही लोक अशांतता पसरवण्यासाठीच

फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजापूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक आहे. नितेश राणेंसारखी मूर्ख माणसं या फडणवीसांच्या टोळीमध्ये केवळ अशा पद्धतीची अशांतता पसरवण्यासाठीच ठेवली आहेत. लोकशाहीसाठी अत्यंत घातक परिस्थिती आहे. संतांच्या महाराष्ट्रात असं घडेल असं कधी वाटलं नव्हतं, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर अच्छादन टाकण्याची वेळ आलीय. हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नाही. देशाचा माहोल बिघडलाय, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

देशातील पहिलाच उसाचा ‘एआय’ प्रयोग यशस्वी एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन वाढ; खर्च अन् पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत

0

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे ऊस उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, शिवाय खर्च आणि पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पहिल्या टप्प्यातील विविध वाणांच्या तीन प्लॉटवरील ऊस तोडणी पूर्ण झाली असून, त्यातून एकरी १०४ ते १५० टनांपर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रयोग राबवला. ज्येष्ठ नेते शरद पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मागच्याच वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आणि पारंपरिक शेती पद्धतीने ऊस लागवड केलेला असे दोन स्वतंत्र प्लॉट तयार केले.

त्यात सीओ ८६०३२, सीओ एम २६५, एमएस १०००१, पीडीएन १५०१२, सीओ व्हिएसआय ८००५ आणि सीओ व्हिएसआय १८१२१ या सहा प्रकारच्या ऊस वाणांची लागवड या ठिकाणी करण्यात आली. त्यापैकी सीओ एम २६५, पीडीएन १५०१२ आणि सीओ व्हिएसआय ८००५ या तीन वाणांची तोडणी पूर्ण झाली. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आणि पारंपरिक पद्धतीच्या दोन्ही उसांची उत्पादकता, खर्च, पाण्याचा वापर याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे निष्कर्ष या प्रयोगाची यशस्विता दाखवून देत आहेत.

‘एआय’चे निष्कर्ष

पहिल्या टप्प्यात ऊस तोडणी झालेल्या तीन वाणांपैकी सीओ एम २६५ या वाणाचे एकरी उत्पादन १५०.१०टन, पीडीएन १५०१२ या वाणाचे १२०.४० टन आणि सीओ व्हिएसआय ८००५ या वाणाचे १०४.७८ टन उत्पादन मिळाले, सध्याच्या या वाणांच्या उत्पादकतेचा विचार करता, ही उत्पादकता वाढ जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे. त्याशिवाय ‘एआय’ तंत्राच्या वापरातून २६५ या उसाची उंची २४.१ फूट आणि वजन प्रति ऊस ४.५६ किलोपर्यंत मिळाले.

जे की पारंपरिक पद्धतीच्या ऊसात या वाणाची उंची १८.६ एवढी राहिली, तर वजन २.५ फुटापर्यंत मिळाले. ‘एआय’च्या वापरामुळे नेमकी आणि गरजेएवढीच खते मिळाल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्बही टिकून राहिला. ‘एआय’च्या प्लॉटमधील सेंद्रिय कर्ब १.० टक्के मिळाला, तर पारंपरिक लागवडीच्या क्षेत्रात तो ०.६८ टक्के एवढाच राहिला. तर खर्चही ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित तीन प्लॉटवरील ऊसतोडणी पूर्ण केली जाणार आहे. ‘एआय’ करते तरी काय?

एआयच्या माध्यमातून वेदर स्टेशनच्या सेन्सरद्वारे आणि सॅटेलाइट मॅपद्वारे शेतीतील पिकांचे मॉनिटरिंग केले जाते. शेतीमधील माती, जमिनीची, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि उसाला नेमकी गरज काय आहे, याची नेमकी माहिती त्यातून मिळते. या वेदर स्टेशनमध्ये जवळपास १२ प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, त्यात झाडाच्या मुळाजवळ ७ इंचांवर प्रायमरी सॉइल मॉइश्‍चर आणि सेकंड सॉइल मॉइश्चर असे दोन सेन्सर बसवले आहेत, ते हे सर्व कार्य करतात. त्यातूनच मग जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण पिकाचे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि त्याबाबतचे अलर्टही सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अॅपवर मिळतात.

एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग

शेतीमध्ये तसेच ऊस शेतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान तसेच विविध संशोधन समोर आले असतानाही आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, शेतीतील परिपूर्ण माहितीच्या अभावामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनदेखील घटते. पण आता ‘एआय’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयोगाने शेतकऱ्यांना उत्पादनातील शाश्वतता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज १००० शेतकऱ्यांच्या ऊसशेतीत या तंत्राचा वापर सुरू केला आहे. आता पुढे जाऊन शेतकरी गट किंवा गावांनाही सामूहिक पद्धतीने हा प्रयोग राबवता येऊ शकतो.

मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी ‘विधान परिषद’ ठरलं?; ‘या’ नावांची चर्चा पण पुन्हा धक्कातंत्रची शक्यता बळावली?

0

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे. तर निवडणुका 27 मार्च रोजी होणार आहेत. विरोधी पक्षांसाठी पुरेसा मतांचा कोटा नसल्याने, महाविकास आघाडी या निवडणुकीत जवळजवळ नसल्याचं दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील प्रत्येक पक्षात जोरदार स्पर्धा वाढली आहे. तीनही पक्षातील नेते विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत.

महाआघाडीत भाजपला तीन, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा भाग आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.

भाजप पुन्हा एकदा वापरणार धक्कातंत्र?

आतापर्यंत अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार देताना कायमच धक्कातंत्राचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. खरं तर सध्या राजकीय वर्तुळात दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण भाजपचा इतिहास लक्षात घेता काही अनपेक्षित नावं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात.

या’ तीन नावाची जोरदार चर्चा

1. दादाराव केचे – माजी आमदार आर्वी विधानसभा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे यांना या क्षेत्रातून संधी मिळाल्याने केचे यांचे पुनर्वसन करण्यात येऊ शकते.

2. अमरनाथ राजूरकर – माजी काँग्रेस आमदार आणि अशोक चव्हाण यांचे जवळचे. त्यांच्यासोबतच ते भाजपमध्ये देखील सामील झाले.

3. माधव भंडारी – हे भाजपचे दीर्घकाळ प्रवक्ते आहेत. जनसंघापासून ते पक्ष संघटनेपर्यंत सक्रिय आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून या दोन नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोट्यातही एक जागा आहे. यासाठी नावांवर विचार सुरू झाला आहे.

1. संग्राम कोते पाटील – राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तरुण चेहरा. क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रात व्यापक जनसंपर्क.

2. सुनील टिंगरे – वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार. अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. पुण्यातील पक्ष संघटनेच्या विस्तारात त्यांचे मोठे योगदान आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून 3 नावांची चर्चा

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या कोट्यातही एक जागा आहे. यासाठी दावेदारांची एक मोठी रांग आहे. तथापि, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण काही नावांबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

1. रवींद्र फाटक – माजी विधान परिषद सदस्य. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि ठाण्याच्या स्थानिक राजकारणातील एक प्रमुख चेहरा.

2. शहाजी बापू पाटील – माजी आमदार, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा ग्रामीण चेहरा.

3. शीतल म्हात्रे – शिवसेना प्रवक्त्या, माजी नगरसेविका. मुंबईत संघटना बांधण्याची मोठी जबाबदारी.