Home Blog Page 13

मस्तानी तलावाचं मौन आक्रोशात बदलतंय… इतिहासाच्या छायेत बुडतंय एक वारसास्थळ

0

दिवे घाटाच्या कुशीत वसलेला, १८व्या शतकातील इतिहास साठवून ठेवणारा मस्तानी तलाव पावसाळ्यात भरून वाहतोय… पण त्याच पावसाच्या थेंबांसोबत पर्यटकांची बेजबाबदार गर्दी, सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणारे खेळ, आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा घाण वास तलावाभोवती दरवळतोय.

पावसाचे पाणी भरलेलं असलं तरी व्यवस्थेचा कोरडेपणा स्पष्ट जाणवतो. ना कुंपण, ना सुरक्षारक्षक, ना स्वच्छता हे दृश्य पाहून वाटतं, जणू इतिहासानंच माघार घेतली आहे. दगडी कड्यावर बसून पाय पाण्यात लटकवणारी तरुण मंडळी, मोबाइलवर reels चा हव्यास, आणि डोळ्यांदेखत घडणारी सार्वजनिक विकृती… या सर्वामुळे तलावाची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळत आहे.

नवाब शादाब अली बहादूर पेशवा, खुद्द बाजीराव आणि मस्तानी यांचे नवव्या पिढीतील वंशज यांनी तलावाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला. “हा तलाव मस्तानीबाईंनी शेतकऱ्यांसाठी पाण्याचा उपाय म्हणून सुचवला होता. आज त्याच तलावाला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय,” असं ते म्हणाले.

बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीही याच समस्येवर आवाज उठवत आहे. समितीचे कुंदन कुमार साठे म्हणतात, “ही केवळ तलावाची नव्हे, तर संपूर्ण इतिहासाची विटंबना आहे.”

पुरातत्त्व विभागाकडून जरी काही प्राथमिक कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही बिकट आहे. ना रेलिंग पूर्ण झालंय, ना देखभाल नियमित आहे. तलावाजवळच दारू प्यायची, कचरा टाकायचा, आणि चार चाकी गाड्या अगदी कडेला नेऊन फोटो काढायचे, हे सारं दृश्य धोकादायक आणि अस्वस्थ करणारं आहे.

स्थानिक सांगतात, की यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत, माणसं बुडालेली आहेत. पण प्रशासनाने एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही. हे पाहता, मस्तानी तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यात नव्हे, तर संवेदनशून्यतेच्या गर्तेतही बुडतोय.

ही वेळ आहे, जेव्हा प्रशासनाने जागं व्हायला हवं. कारण इतिहास जपणं ही केवळ पर्यटनाची जबाबदारी नाही, ती आपल्या संस्कृतीची सन्मान राखण्याची जबाबदारी आहे.

भिमाशंकरला जात असताना वयोवृद्ध भाविकाला चाकूचा धाक दाखवत लुटलं; ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल

0

भिमाशंकरला दर्शनासाठी जात असताना एका ६९ वर्षीय दिल्लीस्थित वयोवृद्ध भाविकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळून ऑटो रिक्षा भाड्याने घेतल्यानंतर, चालकाने वाटेत रस्त्यापासून दूर जंगलात नेऊन हा प्रकार केला. या प्रकरणी अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील रहिवासी सुरेशचंद्र चौहान (वय ६९) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेटजवळून त्यांनी एक ऑटो रिक्षा भाड्याने घेतली. चालकाने भाडे निश्चित करून त्यांना भिमाशंकर दर्शनासाठी घेऊन जाण्याचे कबूल केले.

मात्र प्रवासाच्या अर्ध्यावर आल्यानंतर, चालकाने मार्ग बदलून भिमाशंकरजवळील जंगलात रिक्षा नेली आणि चौहान यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यांच्याकडून जबरदस्तीने Google Pay द्वारे ४,५०० रुपये ट्रान्सफर करवून घेतले आणि खिशातील रोख १५,००० रुपये काढून घेतले. एकूण १९,५०० रुपयांचा अपहार करून आरोपीने चौहान यांना जंगलातच सोडून दिले आणि पसार झाला.

या प्रसंगानंतर चौहान यांनी वाटेतून जाणाऱ्या वाहनांची मदत घेत पुन्हा पुण्यात परत येत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात ऑटोचालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) (दरोडा) आणि ३५१(३) (गंभीर धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, विशेषतः पार्सल गेट परिसरातील व्हिडीओ रेकॉर्डिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे तपासाचे नेतृत्व करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान हे कामानिमित्त शनिवारी पुण्यात आले होते आणि त्यानंतर भिमाशंकर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.

यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यामध्ये १९ वर्षीय तरुणाला ऑटोचालकाने मारहाण करत ३०० रुपये आणि ९०,००० रुपयांचा मोबाइल चोरला होता.

शिक्षिकेच्या राजीनाम्यानंतर वादाला पेट; शाळेच्या अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, प्रतिआरोपात शिक्षकांवरही तक्रार

0

एका खाजगी शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या अध्यक्षाने तिचा पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिक्षिकेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शाळेच्या अध्यक्षानेही शिक्षिका आणि तिच्या समर्थकांविरोधात प्रतितक्रार दाखल करत मारहाण व शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणात २८ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, चैतन्य गुलाब लांडगे (३६, रा. लोणी काळभोर) याच्यावर विनयभंग, मारहाण व धमकी यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडगे हे मांजरी बुद्रुक येथील मोरे वस्तीजवळ असलेल्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तक्रारदार शिक्षिका यापूर्वी या शाळेत कार्यरत होती, मात्र काही दिवसांपूर्वी तिने नोकरीचा राजीनामा दिला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांडगे यांनी राजीनाम्याचा राग मनात धरून १२ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शिक्षिकेचा पाठलाग केला. तिच्या घराजवळ येऊन त्यांनी अश्लील भाषा वापरत, तिला जबरदस्तीने ओढून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी तिच्या गालावर आणि डोळ्याजवळ मारहाण करत जखमी केल्याचंही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर काही जणांना बोलावून “तुला सोडणार नाही, जीवे मारतो,” अशी धमकीही दिल्याचं तिने म्हटलं आहे.

या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी लांडगेविरोधात भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, चैतन्य लांडगे यांनीही प्रतितक्रार दाखल केली असून, शिक्षिका व तिच्या सात साथीदारांनी शाळेच्या परिसरात येऊन शिवीगाळ, धमकी आणि दगडफेक करत शाळेच्या खिडकीच्या काच फोडल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित शिक्षिका पालकांना चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या वादामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षकांमध्ये सुरू असलेली कुरबूर आता उघड झाली असून, दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

धम्मदिप सांस्कृतिक कलामंचच्या वतीने गरजू विध्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप

0

बदलापूर दि. १५ (विनोद धोत्रे) सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून सामजिक बांधिलकी जपणारी दापोली तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणजे धम्मदीप सांस्कृतिक कलामंच, सर्वच क्षेत्रातील सर्वच स्तरातील गरजू, उद्यमी व होतकरू लोकांच्या पाठीशी उभी राहून त्यांना आधार देण्याचे महत्कार्य धम्मदीप सांस्कृतिक संस्थेच्या वतीने नेहमीच करण्यात येते त्याच अंतर्गत बदलापूर मुळगाव येथील गरीब, गरजू व शिक्षणाची कास धरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर, छत्री यांचे मोफत वाटप संस्थेचे अध्यक्ष अरविंद रुके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

सदर प्रसंगी अध्यक्ष अरविंद रूके , उपाध्यक्ष विनोद धोत्रे, उपाध्यक्ष दिनेश सावंत, सरचिटणीस अमरदिप जाधव, सहचिटणीस नितेश कासारे, कोषाध्यक्ष संगम जाधव, विनोद रूके (बोंडीवली) आदी मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांच्या उपस्थितीत शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करून आपण निसर्गाचे देणे लागतो या उदात्त विचारातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर प्रसंगी अध्यक्ष अरविंद रुके यांनी सर्वाना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले व सदर कार्यक्रमास आर्थिक सहाय्य करून योगदान देणाऱ्या सर्व दानी व्यक्तींचे मनापासुन आभार व्यक्त केले, तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ तसेच विनोद धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सागर जाधव यांचे विशेष आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

सर्व भाषांची जननी ही पाली भाषा होय – ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे

0

मुंबई दि. १५ (रामदास धो. गमरे) “सम्राट अशोकाच्या कालखंडात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती भारत हा अनेक प्रांत, विभाग यात विखुरलेला होता पाकिस्तान, सिलोन, ब्रम्हदेश ते अफगाणिस्तान पर्यंतच्या भूभागावर चक्रवर्ती सम्राट अशोकाची एकहाती सत्ता होती, त्या सम्राट अशोकाच्या काळातील बोलीभाषा पाली होती आता अडीच हजार वर्षांनंतर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने पाली भाषेची ओळख होऊ लागली आणि या पाली भाषेतूनच सध्या बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा निर्माण झाल्या आहेत, पाली भाषेतील अनेक शब्द मराठी व इतर भाषेत प्रचलित आहेत परंतु पाली भाषेचा अर्थ आपण समजून घेत नाही त्यामुळे त्याचा विपर्यास केला जातो उदाहरणार्थ भगवा आतंकवाद यातील भगवा हा मूळ पाली भाषेतील शब्द आहे असे अनेक पाली भाषेतील शब्द दैनंदिन बोलीभाषेत वापरले जातात परंतु त्याची माहिती नसल्याने त्या शब्दांचा विपर्यास केला जातो हे कुठं तरी थांबलं पाहिजे, धम्म आणि धर्म हे वेगवेगळे प्रवाह असून धम्माचे विचार, आचारसंहिता ही माणसाने माणसाशी कस वागावं यावर अवलंबून असून धर्म हा दांभिकता, भीती, अंधश्रद्धा यावर आधारित आहे व तीच अराजकता आता धम्मा मध्ये घुसू पाहत आहे” असे प्रतिपादन वर्षावास प्रवचन मालिकेच्या दुसऱ्या पुष्पात ‘बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे यांनी केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प उपसभापती आनंदराज आंबेडकर विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी व प्रभावी आवाजात केले, तसेच संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत असताना ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकीत कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्ताविक सादर केले.

बौद्ध धम्म व धार्मिक विधीचे गाडे अभ्यासक विनोद मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात “बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी” या विषयाचा आढावा घेत असताना त्यांनी अनेकविध उदाहरण देऊन समाजात कश्या प्रकारची जागरूकता निर्माण करायला हवी अश्या अत्यंत मौलिक सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या, भैय्यासाहेबांनी बौद्धाचार्यांची निर्मिती का केली ? उपासक, उपसिकांचे कार्य व कर्तव्ये कोणती यावर प्रकाश टाकीत सर्वांना मौलिक अशी माहिती दिली. संस्कार समिती ही न चुकता शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करते त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमास समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर जाधव, चिटणीस रवींद्र शिंदे, अनिरुद्ध जाधव, महेंद्र पवार, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, यशवंत कदम, जेष्ठ पत्रकार गुणाजी काजिर्डेकर, आनंद जाधव, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरतेशेवटी यावर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या बौद्धाचार्यांना साश्रु नयनांनी मूक श्रद्धांजली अर्पण केली तद्नंतर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सम्यक कोकण कला संस्थेच्या विद्यमाने चिंचघर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे मोफत वाटप

0

मंडणगड दि. १४ (रामदास धो. गमरे) कलावंतचे माहेरघर असलेली मातृसंस्था सम्यक कोकण कला संस्था ही सांस्कृतिक वारसा जपत असतानाच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ही आपले अमूल्य असे योगदान देत राहते, ग्रामीण दुर्गम भागातील गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेयपयोगी वस्तू व वह्यांचे वाटप करणे, त्यांच्यातील कला साहित्यिक गुणांना वाव मिळवून देणे, नवनवीन कलावंत घडवणे, पडत्या काळात त्यांना मदत करणे, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम गेली २५ वर्षे सदर संस्था राबवित आहे त्याअंतर्गत मंडणगड तालुक्यातील चिंचघर गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, मौजे चिंचघर, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत शालेयपयोगी वस्तू व वह्या वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या आरंभी संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, उपाध्यक्ष मुकुंद तांबे, कार्याध्यक्ष भगवान साळवी यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ केला, शाळेचे मुख्याध्यापक शिगवण गुरुजी, पाडलेकर गुरुजी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच संस्थेचे सचिव नरेश शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश सादर केले. तद्नंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू व वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा संचार झाला त्यांचा निरागस व अबोल आनंद बघून अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे मॅडम यांनी कोकण कला संस्था ही कलाक्षेत्रातील संस्था असून ही समाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाजोपयोगी उपक्रम राबवतात याबद्दल त्यांचे कौतुक केले. सदर प्रसंगी संस्थेचे माजी सचिव चंद्रमनी घाडगे, चिंचघर गावचे पोलीस पाटील दिलीप पिंपळकर, दिनेश आंग्रे, समीर पडेलकर, शालेय कमिटी सदस्य, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी समीर पडेलकर गुरुजींनी सम्यक कोकण संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच सदर उपक्रमास हातभार लावणाऱ्या सर्वांचे व उपस्थितीतांचे अध्यक्ष्यांच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

पीएमआरडीए ‘डीपी’ रद्द मुंबई हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; 25 ऑगस्टची तारीख ठरली उज्वल केसकर यांना मोठ यश 

0

पुणे महापालिकेच्या समाविष्ट 23 गावांसाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यास एमआरटीपी अॅक्ट कलम 23 अन्वये 74 व्या घटना दुरुस्तीचा भंग करून शेडूल 12 प्रमाणे पुणे मनपाचा अधिकार डावलल्याच्या विरोधात भाजपा ज्येष्ठ नेते उज्वल केसकर यांची याचिका ग्राह्य धरत पीएमआरडीए ‘विकास आराखडा’ रद्द करण्याचा निर्णय घेऊन मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. आठ याचिका रद्द केल्यानंतरही 3 याचिका ग्राह्य धरत 25 ऑगस्टची सुनावणीची तारीख दिल्याने उज्वल केसकर यांना मोठ यश मिळाले असून पुणे महापालिकेलाही फायदा होणार आहे.

राज्यात मविआ सरकारने आणि पुणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे बहुमत असल्यामुळे एमआरटीपी अॅक्ट कलम 23 अन्वये 74 व्या घटना दुरुस्तीचा भंग करून शेडूल 12 प्रमाणे पुणे मनपाचा अधिकार डावलला होता.  संबंधित प्रकार हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियोजन प्राधिकरणाच्या अधिकाराचा विषय असल्याने हा एक ऐतिहासिक अधिकाराच्या मुद्द्यावर होणारा लढा आहे. घटनेने दिलेले अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कडेच राहिले पाहिजे यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहू. आमचा लढा त्यासाठी असल्याने अंतिम निकाल येईल तोपर्यंत आमची लढाई चालू राहील.  पुन्हा एकदा मेहरबान हायकोर्टाचे आम्ही आभारी आहोत. असे मत माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांनी व्यक्त केले.

आज मेहरबान हायकोर्ट येथे पीएमआरडीए प्रारूप विकास आराखड्या बाबत मेहरबान मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि संदीप मारणे साहेब यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन पीएमआरडी  यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर निर्णय होऊन 8 याचिका निकाली काढल्या. आम्ही दाखल केलेली याचिका पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट 23 गावांच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत होती, आमचे वकील एडवोकेट संजीव गोरवाडकर आणि ऋत्विक जोशी यांनी मेहरबान हायकोर्टाच्या हे निदर्शनास आणून दिले की आमची याचिका ही फक्त प्रारूप विकास आराखड्याबद्दल नसून नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाराबद्दल आहे. त्यावर मेहरबान हायकोर्टाने आमच्या याचिका कायम ठेवत सुनावणीसाठी 25 ऑगस्ट ही तारीख दिली.

पी एम आर डी ए च्या आराखडा रद्द करण्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो कारण पीएमआरडीएला डीपी करण्याचा अधिकारच नाही ही आमची भूमिका होती आज त्यावर मेहरबान हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले आमची लढाई ही अधिकाराची होती.

हा डीपी करण्यासाठी जो खर्च झाला त्याची जबाबदारी कुणाची ?  या डीपी मध्ये जागतिक  वारशाचा वेस्टन घाट दाखवण्याचे विसरून गेले होते घाईघाईमुळे. आम्ही पीएमआरडीएच्या आयुक्तांना भेटून या 23 गावांच्या बाबतीत घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती करणार आहोत. महापालिका आयुक्त पुणे मनपा आणि अप्पर मुख्य सचिव नगर विकास 1 यांच्याकडे महानगरपालिकेने केलेल्या ठरावाचे अंमलबजावणी करा अशी मागणी करणार आहोत. असेही माध्यमांशी बोलताना उज्वल केसकर यांनी सांगितले.

जुन्नरमध्ये पावसाळी पर्यटन बिघडले की शिस्त हरवलेली? स्थानिक संतप्त, कडक उपाययोजनांची मागणी

0

पावसाळ्याच्या आगमनानंतर जुन्नर तालुक्यातील निसर्ग सजीव झाला आहे. डोंगरदऱ्या हिरवाईने नटल्या आहेत, धबधबे प्रचंड वेगाने खळखळत वाहत आहेत. नाणेघाट, हरिश्चंद्रगड, टाकळी भीमा आणि रांधा धबधबा यांसारख्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पण निसर्गाच्या सौंदर्यात रमण्याऐवजी काही पर्यटकांची बेजबाबदार आणि धोकादायक वर्तन स्थानिकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे.

पर्यटनाचा हेतू शांततेत निसर्ग अनुभवणे असावा, पण सध्या अनेक पर्यटक, विशेषतः तरुण आणि कॉर्पोरेट ग्रुप्स, ‘व्हायरल व्हिडीओ’ आणि ‘परफेक्ट फोटो’च्या मागे धावत आहेत. धबधब्यांच्या कड्यावर उभं राहणं, ओल्या खडकांवर चढणं, संरक्षण रेलिंग पार करणं हे सगळं फक्त सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी केलं जात आहे. परिणामतः दुर्घटनांचं आणि अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे.

ओतूर गावातील एका स्थानिकाने सांगितलं, “इथं सूचना फलक आहेत, रेलिंग आहेत, पण पर्यटक मुद्दाम दुर्लक्ष करतात. थरार हाच उद्देश झालाय, सुरक्षितता नाही.” काही पर्यटक जोरजोरात गाणी वाजवतात, गाडीत दारू पितात, स्थानिकांना त्रास देतात. अनेकदा वाहनांमधून वेड्यासारखं ड्रायव्हिंग केलं जातं आणि कुणी अडवलं, की उलट शिवीगाळ किंवा मारहाण केली जाते.

धरणाळी, अंबोळीघाट, लाघाचा घाट यांसारख्या ठिकाणांवरील पावसाळी वाटा प्रचंड निसरड्या होतात. तरीही त्या वाटांवर निर्बंध झुगारून अनेकजण जात आहेत. मंचर परिसरात नुकताच एक कार अपघाताच्या घटनेत जिन्यांवरून घसरून कोसळली, यामधून किती गंभीर धोका निर्माण होतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

जुन्नरमधील नागरिक आता प्रशासनाकडे ठोस कृतीची मागणी करत आहेत. “पर्यटन म्हणजे आपल्या भागाचा अभिमान असायला हवा, भीती नव्हे. आज या पर्यटनामुळे स्थानिकांचा संयम सुटू लागला आहे,” असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

लोकांची मागणी आहे की, तात्काळ पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही निगराणी सुरू करावी, वाहतूक व्यवस्थापन ठोस करावं आणि नियमभंग करणाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई व्हावी. विशेषतः धोकादायक वर्तन, अराजकता, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि ध्वनीप्रदूषण यावर नियंत्रण ठेवावं, अशी ठाम मागणी आहे.

पावसाळी सौंदर्याने नटलेला जुन्नर पर्यटकांना आकर्षित करतच राहील. मात्र, निसर्ग जितका मोहक आहे, तितकाच तो जबाबदारीने अनुभवण्यास पात्र आहे. स्थानिकांचा सूर स्पष्ट आहे, पर्यटन स्वागतार्ह असावं, पण शिस्तीच्या चौकटीतच.

करसवलतीच्या नावाखाली फसवणूक : आयकर विभागाची देशभरात मोठी कारवाई, १०४५ कोटींच्या खोट्या रिफंडवर शिक्कामोर्तब

0

आयकर विभागाने देशभरात बनावट कर परताव्यांच्या (टॅक्स रिफंड) प्रकरणांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. आयकर कायदा १९६१ अंतर्गत विविध सवलती आणि वजावट कलमांचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि टोळ्यांविरोधात ही मोहीम आखण्यात आली आहे. एक विश्लेषण करताना विभागाच्या निदर्शनास आलं की, या प्रकारामागे कुशल फसवणूक तंत्र वापरून तयार करण्यात आलेल्या योजनांचा मोठा जाळं उभं करण्यात आलं आहे, जे अनेकदा बोगस ITR फायलिंग करणाऱ्यांमार्फत राबवले जात होते.

तपासणीत असे अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत, जिथे करदात्यांनी विविध कलमांखाली खोट्या वजावट दाखवून मोठ्या प्रमाणावर रिफंड मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने गृहभाडे भत्ता (कलम 10(13A)), राजकीय पक्षांना देणगी (कलम 80GGC), शैक्षणिक कर्जावरील व्याज (कलम 80E), आरोग्य विम्यासाठी प्रीमियम (कलम 80D), गंभीर आजारांवरील उपचार (कलम 80DDB), घर व इलेक्ट्रिक वाहन कर्जावरील व्याज (80EE, 80EEB), वैज्ञानिक संशोधनासाठी देणगी (80GGA) आणि सामाजिक संस्थांना देणगी (80G) या कलमांचा वापर करून बनावट दावे करण्यात आले होते.

अनेक प्रकरणांमध्ये करदात्यांनी बनावट TDS विवरणपत्रे सादर करून मोठ्या रकमा रिफंड म्हणून मिळवण्याचा प्रयत्न केला, ज्या मागे कुठलाही वैध दस्तऐवज नव्हता.

या पार्श्वभूमीवर विभागाने देशभरात १५० हून अधिक ठिकाणी छापे आणि तपास मोहीम राबवली आहे. या कारवायांमधून बनावट रिटर्न सादर करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा विभागाचा मानस आहे. याशिवाय विभागाने SMS आणि ईमेलच्या माध्यमातून करदात्यांना स्वतःहून चुकीचे रिटर्न सुधारण्यासाठी सूचित केलं आहे.

गेल्या चार महिन्यांत या मोहिमेला मोठं यश मिळालं असून, सुमारे ४०,००० करदात्यांनी आपले रिटर्न परत दुरुस्त केले आहेत, ज्यातून १०४५ कोटी रुपयांपर्यंतच्या खोट्या दाव्यांवर पाणी फेरले आहे.

या तपासांमधून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे संबंधित रॅकेट्सवर कारवाई करणे आणि त्यांचे नेटवर्क खंडित करणे शक्य होईल, अशी अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे. चुकीचे रिटर्न सादर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आयकर विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, देशाच्या कर प्रणालीतील प्रामाणिकता टिकवणे हे सर्वोच्च उद्दिष्ट असून, अशा प्रकारच्या बनावट परताव्यांना आता कोणतीही माफी मिळणार नाही. कर चुकवणाऱ्यांनी सावध राहावे आणि तत्काळ योग्य पद्धतीने आपले रिटर्न सुधारावेत, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई अटळ आहे.

वाकड हुंडा प्रकरण : पती व सासरच्या मंडळींना २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा कायम

0

हुंड्याच्या मागणीसाठी पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याच्या गंभीर प्रकरणात वडगाव मावळ सत्र न्यायालयाने पती आणि त्याच्या तीन नातलगांविरुद्धच्या शिक्षा कायम ठेवत स्पष्ट संदेश दिला आहे की, अशा प्रकारच्या अत्याचारांना न्यायव्यवस्था माफ करत नाही.

या प्रकरणात पती आणि सासरच्यांनी महिलेला सतत वेगवेगळ्या कारणांनी तिच्या माहेरून मोठ्या रकमा आणण्यास भाग पाडले. प्लॉट खरेदीसाठी, नातेवाइकाच्या नोकरीसाठी, तसेच सोनं खरेदी आणि फ्लॅट घेण्यासाठी तिच्यावर आर्थिक मागण्या करत दबाव आणण्यात आला. महिलेला वाकड परिसरात प्लॉट घेण्यासाठी तब्बल १ कोटी २० लाख, सासूच्या मुलीच्या नोकरीसाठी ११ लाख, आणि स्वतःच्या पगारातून ८० लाखांचा फ्लॅट घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली.

या प्रकरणी वडगाव मावळ न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी दिलेल्या शिक्षेच्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं. मात्र, सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी ती अपील फेटाळून लावत, मूळ शिक्षेला दुजोरा दिला.

या खटल्यात दोषी ठरलेले आहेत:

  • इरफान जल्लाखान अल्मेल (३१) – पती
  • जल्लाखान एच. अल्मेल (६७) – वडील
  • यासमिन जल्लाखान अल्मेल (६०) – आई
  • फरहाना समीर सय्यद (३३) – बहीण

हे सर्वजण तळेगाव येथील अमन बंगलो, भाटिया कॉलनी येथे राहणारे आहेत. चौघांनाही २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ₹५,००० दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून दिला जाणार आहे.

सरकार पक्षातर्फे अधिवक्ता स्मिता चौगुले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांतून महिलेला झालेला मानसिक आणि शारीरिक छळ स्पष्टपणे सिद्ध झाला. न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादाला मान्यता देत आरोपींना कोणतीही सौम्यता न दाखवता शिक्षा कायम ठेवली.

या निकालामुळे हुंड्यासाठी होणाऱ्या अत्याचारांबाबत न्यायालये किती कटाक्षाने आणि गंभीरपणे निर्णय घेतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. न्यायाधीशांनी निकालात नमूद केलं की, अशा गुन्ह्यांना “गंभीर स्वरूपाचा अपराध” मानून कडक शिक्षाच योग्य आहे. या निकालामुळे अशा प्रकारच्या अत्याचारांना रोखण्यासाठी कायद्याच्या धाकात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.