Home Blog Page 106

सिंधू पाणी करार स्थगितीनंतर पाकिस्तानला ३ मोठे झटके; हिमालयीन प्रदेशाला १० हजार मेगावॅटचा फायदा

0

सिंधू पाणी करार मोडल्यानंतर भारत आता पाकिस्तानला नवीन धक्के देण्याची तयारी करत आहे. सिंधू पाणी करारामुळे बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प भारत सरकार जलदगतीने पूर्ण करणार असल्याची बातमी आहे. खरं तर, या अंतर्गत, कोणतीही नवीन कारवाई करण्यापूर्वी, भारताकडून पाकिस्तानला 6 महिने आधीच सूचना द्यावी लागते. असे म्हटले जात आहे की भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व या संबंधित बैठका थांबवण्याची योजना आखली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, चिनाब-झेलम-सिंधू अक्षावर किरू ते क्वार पर्यंतच्या जलविद्युत प्रकल्पांचे काम जलद गतीने सुरू होणार आहे. जर या प्रकल्पांना गती मिळाली तर हिमालयीन प्रदेशाला सुमारे १० हजार मेगावॅटचा फायदा होऊ शकेल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे आयडब्ल्यूटी अंतर्गत, पाकिस्तानने आक्षेप घेतल्यानंतर अनेक प्रकल्पांचे काम रखडते.

आणखी एक धक्का

जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याव्यतिरिक्त आणि बैठकांना उपस्थित न राहण्याव्यतिरिक्त भारत आता पाकिस्तानसोबत जलविज्ञानविषयक डेटा शेअर न करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. यामध्ये पुराच्या आकडेवारीचाही समावेश आहे. अहवालानुसार, भारत या संदर्भातील सर्व कायदेशीर पैलूंचा तपास करत आहे.

रिपोर्टनुसार, भारताने पाकिस्तानसोबत नदीशी संबंधित डेटा शेअर न करण्याचा विचारही केला आहे. प्रत्यक्षात, Indus Water Treaty (IWT) अंतर्गत, दर महिन्याला आणि किमान 3 महिन्यांतून एकदा डेटा शेअर करणे आवश्यक आहे.

काय फायदा होईल?

५४० मेगावॅट क्वार, १००० मेगावॅट पाकल दुल, ६२४ मेगावॅट किरू, ३९० मेगावॅट किर्थाई १, ९३० मेगावॅट किर्थाई २, १८५६ मेगावॅट सावलकोट यासारख्या इतर जलविद्युत प्रकल्पांच्या गतीमुळे जम्मू आणि काश्मीरला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल.

याशिवाय अनेक प्रकल्प वीज योजनांमध्ये देखील ते उपयुक्त ठरेल. यामध्ये तुळबुल ते बागलिहार, किशनगंगा, रतले, उरी, लोअर कलनई अशा अनेक योजनांचा समावेश आहे. आयडब्ल्यूटी अंतर्गत पाकिस्तानने आक्षेप घेतल्यानंतर या योजना थांबल्या. याशिवाय, भारत सध्याच्या धरण प्रकल्पांमध्ये फ्लशिंग करू शकला नाही. जलाशयातील गाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी जलाशय ‘फ्लशिंग’ ही एक तंत्र वापरली जाते. त्यात साचलेला गाळ बाहेर काढला जातो. यामध्ये जलाशयातून उच्च पाण्याचा प्रवाह सोडणे देखील समाविष्ट आहे.

ऑस्ट्रेलियन कंपनीकडून ‘राजकोट’ शिवरायांच्या पुतळ्याची चाचणी आयुर्मान १०० वर्षे;१ मे रोजी लोकार्पणची शक्यता

0

शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा २०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल, असा बनविला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी केली आहे. या शिव पुतळ्याच्या लोकार्पणाचा सोहळा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून वरिष्ठांनी त्या दृष्टीने तयारीत राहावे, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी दिली.

नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी मेढा राजकोट किल्ला येथे किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळला होता. या दुर्घटनेनंतर सरकारने याच ठिकाणी नव्याने शिवपुतळा उभारण्याचे निश्चित केले.

या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हा पुतळा उभारणी सुरू आहे. यापूर्वीचा शिव पुतळा हा जमिनीपासून चाळीस फूट उंचीचा होता. मात्र, आता नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. स्वतंत्र गुणवत्ता चाचणी पथकाकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे. योद्धाच्या आवेशातील हा शिव पुतळा असून छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल आहे. या शिव पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे असणार आहे.

व्हिंटेज कंपनीकडून ‘ना हरकत’

पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुतार यांनी येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. मालवण किल्ल्यावर वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांनी प्रथम छत्रपतींचा अडीच फूट उंचीचा पुतळा तयार करून तो ऑस्ट्रेलियाला पाठवला होता. तेथे असलेल्या व्हिंटेज कंपनीकडून हा पुतळा वाऱ्याच्या वेगाला कशाप्रकारे प्रतिसाद देईल, याची चाचपणी करण्यात आली. या पुतळ्यावर ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे सोडण्यात आले. त्या वाऱ्यावर पुतळा मजबुतीने उभा राहिला. तसे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ कंपनीकडून देण्यात आले. त्यानंतरच या पुतळ्या बसविण्याच्या कामास सुतार यांच्या कंपनीकडून सुरुवात करण्यात आली. हे सर्व करत असताना पुतळ्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण तसेच तपासणी आयआयटी मुंबईकडून करून घेण्यात आली आहे. पुतळ्याचे काम पूर्णत्वास आल्याने येत्या एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

असा आहे पुतळा- 

९३ फूट जमिनीपासून उंची

१० मीटर चबुतऱ्याची उंची

६० फूट शिव पुतळ्याची उंची

२३ फूट तलवारीची उंची

पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास! फक्त तीनच नागरिकांनी भारत सोडला

0

शहरात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र विभाग व संबंधित यंत्रणांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कोणताही परदेशी नागरिक भारतात आल्यावर संबंधित शहराच्या पोलिस आयुक्तालयात किंवा जिल्हा अधीक्षक कार्यालयात आपली नोंद अनिवार्यपणे करावी लागते. तसेच, एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना देखील नोंदवहीत बदल करणे आवश्यक असते. वेळोवेळी पोलिसांकडून त्यांच्या वास्तव्यासंबंधी तपासणीही केली जाते.

पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या :

दीर्घ मुदतीच्या व्हिसा-

३५ पुरुष,

५६ महिला

व्हिजिटर व्हिसा

– २० नागरिक

भारताची युद्ध घोषणेची वाटचाल? पुढचं पाऊलही टाकलं 48 तासांमध्ये या नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दूतावासांनाही बोलावलं

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली असून पाकिस्तानची  सर्व बाजूने कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताने आता एक पाऊल पुढे टाकलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत. परराष्ट्र खात्याने अमेरिका, चीन, रशिया, कॅनडा, इंग्लंडसह विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू केली आहे. यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे युद्धाच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.

दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेची माहिती या राजदूतांना देण्यात येत आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. तशेच 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेशही दिले आहेत. एकीकडे या गोष्टी घडत असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. यावेळी अमित शाहांच्या हातामध्ये दोन लाल फाईल्स होत्या. त्यामुळे भारताची वाटचाल ही युद्ध घोषणेच्या दिशेने सुरू आहे का अशी चर्चाही यावेळी केली जात आहे.

दहशतवाद्यांना कल्पनेच्या पलिकडची शिक्षा देणार, आता ही वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे. पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आलीय, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं. देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है… अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, अनंतनाग जिल्ह्याच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशाच्या विविध राज्यातील हे नागरिक आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सौदी-अरेबियातील आपला दौरा मध्येच सोडून देश गाठला. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

मोदींनी इंग्रजीतून केलं भाषण, जगाला दिला मेसेज

बिहारच्या भूमीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या आकांना शोधून काढेल, कठोरातील कठोर शिक्षा देईल. ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढू. भारताचं स्पीरिट, भारताचं धैर्य दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे खचणार नाही,दहशतवाला कदापि माफी मिळणार नाही. या प्रकरणात योग्य न्याय होईलच, यासाठी सर्व ते प्रयत्न करु. हाच निर्धार प्रत्येक भारतीयाचा आहे. माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील प्रत्येक देश आणि त्यांच्या नेत्यांचे आभार, असे मोदींनी म्हटले.

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने – डोंबिवली

2) संजय लेले – डोंबिवली

3) हेमंत जोशी- डोंबिवली

4) संतोष जगदाळे- पुणे

5) कौस्तुभ गणबोटे- पुणे

6) दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे-

1) एस बालचंद्रू

2) सुबोध पाटील

3) शोबीत पटेल

पर्यटक हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल!; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गनबोटे आणि जगदाळेंना श्रद्धांजली

0

काश्मीरमध्ये पर्यटकांवर क्रूरपणे हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा, इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी ना. पाटील यांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी ना. पाटील म्हणाले की, हल्ल्याची कुटुंबियांकडून हकिकत ऐकून मन हेलावून गेलं. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरपणे पर्यटकांना लक्ष्य केलंय, त्यामुळे संपूर्ण देशच नव्हे; तर जगभरात संतापाची लाट आहे. माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर परिणाम दहशतवादी आणि त्यांच्या सर्व आकांना भोगावे लागतील.

पुणे महापालिका प्रशासनाचा व्यायामशाळा भ्रष्टाचार; सागर धाडवे यांची मनपा आयुक्तांकडे चौकशीची मागणी

0

पुणे, ता. २४ : महानगरपालिकेच्या व्यायाम शाळेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २९ मध्ये सत्ताधारी स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या माध्यमातून चाललेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी कांग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

यासंदर्भांत सागर धाडवे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली असता, त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक २९ मध्ये तरुणांच्या आरोग्यासाठी कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर व लोकमान्यनगर व्यायामशाळा, तसेच कै. चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा मनपा शाळा क्रमांक १७, नवी पेठ या तीन व्यायामशाळा बांधल्या आहेत. या व्यायामशाळा बांधण्यासाठी, तसेच साहित्य खरेदी आणि त्या जिमच्या देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च टेंडरच्या माध्यमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

सागर धाडवे म्हणाले, “सदर व्यायामशाळा या पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. मात्र, या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नसल्याचे पुणे मनपा क्रीडा विभागाने कळविले आहे. तसेच व्यायामशाळा बांधल्यानंतर त्या आजपर्यंत आमच्या ताब्यातही दिल्या गेल्या नाहीत, असे कळविले. याउलट पुणे मनपाच्या मालकीच्या असणाऱ्या या तीनही व्यायाम शाळांमधून गेले अनेक वर्ष पुणे मनपाचे सत्ताधारी स्थानिक नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे एका तरुणांकडून ४०० रुपये प्रति महिना याप्रमाणे तिन्ही व्यायामशाळामधून हजारो तरुणांकडून लाखो रुपये गोळा करत आहेत.”

सदर प्रकरण गांभीर्याने घेणे गरजेचे असून स्थानिक नगरसेवक, पुणे मनपाचे काही प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचे सरळसरळ दिसून येत आहे. सदर विषयासंदर्भात दिनांक २७ मार्च २०२५ रोजी माहिती अधिकार पुणे मनपा दरबारी दिल्यानंतर पुणे मनपा येथील काही सत्ताधार्जिण्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परतेने सदर भ्रष्टाचार लपविण्यासाठी तसेच स्थानिक सत्ताधारी नगरसेवकाला वाचवण्यासाठी गेले १० वर्षाहून अधिक काळ नगरसेवकाच्या ताब्यात असणारी व्यायामशाळा आता पुणे मनपाला हस्तांतरणाची कार्यवाही सुरू केली आणि पुन्हा पुणे मनपातील क्रीडा, मालमत्ता आणि दक्षता विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन सानेगुरुजीनगर, आंबीलओढा येथील कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा ११ महिन्यांसाठी सानेगुरुजी मंडळास देण्याचा प्रस्ताव मांडला असून, तो आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सदर विषयाकडे पाहता सत्ताधारी स्थानिक नगरसेवक ह्यांचा प्रशासनावर दबाव आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे आयुक्तांनी सदर विषयाची तत्पर चौकशी करून पुणेकरांच्या कररूपी पैशावर डल्ला मारणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तसेच या माध्यमातून लाखो रुपये गोळा करणाऱ्या सत्ताधारी भाजप नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार धाडवे यांनी केली आहे. तसेच सदर विषयाची पूर्ण कागदपत्रांसहित माहिती घेऊन पुणे पोलिस आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार आहे, असे सांगितले.

काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा वारजेतील सकल हिंदू समाजाकडून निषेध

0

काश्मीर येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी वारजेतील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 ला संध्याकाळी 6.30 वाजता एकत्र आले आणि देशभक्तीपर घोषणा, गीते म्हणून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. जमलेल्या नागरिकांनी या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी महिला आणि तरुणही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिंदू समाजाने एकत्र येऊन दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या या हत्येचा ठिकठिकाणी निषेध करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. नवनाथशेठ गुंडाळ पाटील यांनी मरण पावलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली म्हणून दोन शब्द सांगितले आणि हिंदू समाजाने आता तीव्र प्रतिकार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी 2 मिनिटे मौन पाळून सर्व नागरिकांनी मृत झालेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बजरंग दल वारजेचे प्रखंड मंत्री श्री. अनंतजी वांजळे, बजरंग दल संभाजी भागाचे धर्मप्रसार प्रमुख श्री. चेतनजी शेळके, राजे शिवराय प्रतिष्ठान व शिवतेज मित्रमंडळ वारजेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रणजितजी टेमघरे आणि विविध गणेशोत्सव मंडळ, शिवजयंती मंडळाचे तरुण कार्यकर्तेही उपस्थित होते.

वयोवृद्धाचे घरच बळकावले अशाच्या खोट्या प्रचारास सुजाण सभासदांनी बळी पडू नये; श्री रामेश्वर पॅनेलचे आवाहन

0

पुणे शहरासह जिल्ह्यात ३२ वर्षांपासून अग्रणी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या नांदेड जेपीनगर येथील श्रीरामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात जाणीवपूर्वक काहीजण खोटा प्रचार करत आहेत त्याला सभासदांनी बळी पडू नये, असे आवाहन श्रीरामेश्वर पॅनेलने केले आहे. पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकी येत्या रविवारी २७ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत श्रीरामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्या वेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक, माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब हगवणे यांनी विरोधकांवर सडेतोड टीका केली.

बाळासाहेब हगवणे म्हणाले, सिंहगड-हवेलीसह जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थेने मोठे योगदान दिले आहे. असे असताना पतसंस्थेला बदनाम करण्याचे षड्यंत्र काही विरोधकांनी रचले आहेत. पतसंस्थेच्या वतीने विरोधकांना वेळोवेळी भरीव आर्थिक मदत दिली आहे. मात्र, पतसंस्थेची उन्नती पाहवत नसल्याने – आकसापोटी बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. एका वयोवृद्ध व्यक्तीने विनामोबदला राहण्यासाठी घर दिले असता त्यांचे घरही विरोधकाने बेकायदा बळकावले आहे, असे सांगून अशा उपद्रवी विरोधकांना त्यांची जागा सुजाण सभासदांनी दाखवावी.

या वेळी उपस्थित सभासदांनी एका स्वार्थी व्यक्तीमुळे प्रथमच पतसंस्थेची निवडणूक होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार केला. पॅनेलचे चिन्ह असलेल्या कपबशींच्या भव्य प्रतिकृती हातात घेऊन उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी पॅनेलचे सर्वसाधारण जागेचे उमेदवार सचिन दशरथ दांगट, विकास पंढरीनाथ दांगट, अभिजित सोपान घुले, बाळासाहेब काळुराम घुले, बाळासाहेब अर्जुनराव हगवणे, राजेंद्र गणपत हगवणे, देवीदास एकनाथ लगड, विलास साधू मते, विशेष मागास राखीव प्रवर्गातील राजेश शंकर देवकर आदीं उपस्थित होते.

फक्त ‘या’ ॲपमुळे पहलगाममध्ये दहशतवादी पर्यटकांपर्यंत पोहोचू शकले, अन्यथा..

0

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यापैकी चार ते पाच जण हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आले असण्याची शक्यता आहे. शिवाय हल्लेखोरांच्या शरीरांवर कॅमेरे लावण्यात आल्याची शंकाही जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बोलून दाखवली. या हल्ल्याबाबत सतत नवनवीन खुलासे होते आहेत. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एक खास मोबाइल ॲप होतं, ज्याचा वापर करून ते पहलगामच्या घनदाट जंगलातून बैसरन परिसरात पोहोचू शकले, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.

दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता. याआधीही दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या ॲपचा वापर केला होता. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ॲप ट्रॅक करण्यात आलं आणि ते टाळण्यासाठी दहशतवाद्यांनी पहलगामच्या जंगलात त्याचा वापर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले.

या हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपास संस्थांच्या मते, पाकिस्तानी लष्कराने त्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून ट्रॅकिंग टाळण्यासाठी मदत केली होती. हे मोबाइल ॲप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने विकसित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मोबाइल ॲप बनवल्यानंतर त्याच्या वापराबद्दल त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सनी दहशतवाद्यांना ते ॲप कसं वापरायचं, याचं प्रशिक्षण दिलं होतं.

दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यामागील मुख्य हेतू अमरनाथ यात्रेपूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये दहशत निर्माणकरण्याचा होता. या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ असल्याचा संशय आहे. ‘रेझिस्टन्स फ्रंट’चे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ असे हल्ले करण्यात तज्ज्ञ आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांपैकी काहीजण हे पाकिस्तानमध्ये बोलल्या जाणाऱ्या शैलीत उर्दू बोलत होते. मात्र कमीत कमी दोन स्थानिक अतिरेकी त्यांच्यासोबत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ते काश्मीरच्या कोणत्या भागातून आले होते, याबाबत स्पष्टता झाली नसली तरी ते पीर पंजाल परिसरातील डोंगराळ भागाचे रहिवासी असण्याची शक्यता आहे.