मुसळधार पावसात महाबळेश्वरला पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या ६ मित्रांच्या आनंदावर काळाने भयंकर घाला घातला आहे.पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ परिसरात भरधाव वेगातील महागड्या टाटा नेक्सॉन कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत मावळ आणि तळेगाव परिसरातील ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या १९ ते २० वर्षे वयाच्या ४ तरुण मित्रांचा असा अचानक मृत्यू झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरात अत्यंत सुन्न करणारे वातावरण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार शिरवळजवळ आली असता चालकाचे वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली.
या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांकडून मदतकार्य करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सारोळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघाताबाबत शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.











