आषाढी वारी २०२६मध्ये लाखो वारकऱ्यांच्या गर्दीचे अचूक व्यवस्थापन करत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सेंटियंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय प्रणालीच्या माध्यमातून यंदाच्या वारीत तब्बल ३१ लाख ९८ हजार १२९ वारकरी भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे. २४ ते २६ जुलै या तीन दिवसांत पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची ही एआय आधारित मोजणी असून, पारंपरिक पद्धतीतील दुबार मोजणीला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तब्बल १८ लाख ९६ हजार ५७३ वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याची नोंद झाली आहे.
दुबार मोजणीला एआयचा ब्रेक
यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गर्दी मोजताना एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद होण्याची शक्यता होती. मात्र, यंदाच्या एआय प्रणालीने प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र डिजिटल ओळख तयार करून दुबार मोजणी टाळली. त्यामुळे वारकऱ्यांची संख्या अधिक अचूकपणे समोर आली.
पाच प्रवेशद्वारांवर एआयची नजर
पंढरपूर शहरातील सरगम चौक-इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता-दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक-मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक या पाच प्रमुख प्रवेश मार्गांवर एआय कॅमेरे बसविण्यात आले होते. या प्रणालीने व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग, टोपी आणि इतर वैशिष्ट्यांच्या आधारे प्रत्येक वारकऱ्याची स्वतंत्र ओळख निश्चित केली.
शहरात फिरल्यानंतरही तीच ओळख कायम
वारीदरम्यान वारकरी शहरातील वेगवेगळ्या भागांतून फिरत असताना विविध कॅमेऱ्यांमध्ये दिसले तरी एआय प्रणालीने त्यांची एकच ओळख कायम ठेवली. तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांचीही पडताळणी करून पुनर्मोजणी टाळण्यात आली.
भाविकांच्या गोपनीयतेची काळजी
एआय प्रणालीचा वापर करताना भाविकांच्या गोपनीयतेलाही प्राधान्य देण्यात आले. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा तसेच जीडीपीआर नियमांचे पालन करण्यात आले असून, कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर संग्रहित करण्यात आलेली नाही.
तीन दिवसांची एआय आधारित वारकरी संख्या
२४ जुलै २०२६ – ६ लाख ७५ हजार २७४ वारकरी
२५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) – १८ लाख ९६ हजार ५७३ वारकरी
२६ जुलै २०२६ – ६ लाख २६ हजार २८२ वारकरी
एकूण – ३१ लाख ९८ हजार १२९ वारकरी
गर्दी व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा नवा अध्याय
पंढरपूर आषाढी वारी हा जगातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीचा अचूक अंदाज महत्त्वाचा असतो. यंदा एआयच्या मदतीने सुमारे ३२ लाख युनिक भाविकांची अचूक नोंद करण्यात आली. भविष्यात गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
-अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक











